४-५ हजार वर्षांपूर्वीचे राम-कृष्ण, अडीच हजार वर्षांपूर्वीचे बुद्ध-महावीर, दोन हजार वर्षांपूर्वीचा येशू आणि दीड हजार वर्षांपूर्वीचा पैगंबर हे लोक त्यांच्या काळात, त्यावेळच्या समाजात खूप मोठे दार्शनिक/तत्त्ववेत्ते व विवेकाचा आवाज असतीलही. पण, आजच्या काळातल्या समस्त प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे निश्चितच नाहीयेत. प्रत्येक क्षणाला तंत्रज्ञानामुळे जग लहान होत चाललंय, विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतायत, नवीन प्रकारच्या मानवी क्रिया-प्रतिक्रिया निर्माण होतायत. आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाला नवनवीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, तात्विक स्वरूपाच्या मानवी समस्या निर्माण होतायत.
या समस्या जर फक्त विशिष्ट धर्माच्या नितीमूल्यांनी आपण सोडवायला गेलो तर जगात फक्त धार्मिक/सांस्कृतिक लढे होतील, आणि ते आता होताना आपण पाहायला लागलोय. दुसऱ्या व्यक्तीला, धर्माला किंवा संस्कृतीला आम्ही tolerate (सहन) करतो किंवा आम्ही tolerant आहोत हेच मुळात दर्शवते की आम्हाला दुसरी व्यक्ती, त्याचा धर्म किंवा संस्कृती रुचत नाही. फक्त आम्हाला त्याच्याविरुद्ध काही करता येत नाही म्हणून आम्ही ते tolerate करतो. पण जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही आमच्यातले जनावर बाहेर येऊ देतो आणि दुसऱ्या माणसाला त्याच्या जाती, धर्म, देश, संस्कृती आदी गोष्टींवरून एखाद्या ठिकाणाहून हुसकून लावतो, बहिष्कृत करतो, बलात्कार करतो व प्रसंगी जीवही मारतो. आणि हे करायला आम्हाला धर्म किंवा राष्ट्रवाद एक फसवे नैतिक अधिष्ठान देतो.
धर्माच्या, संस्कृतीच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली आम्ही दुसऱ्या माणसाचे अस्तित्व संपवायला थोडेही मागेपुढे पाहत नाही. आमच्या मनात कधीही हा विचार चुकूनही येत नाही की ज्या धर्माची, देशाची किंवा संस्कृतीची पताका आम्ही खांद्यावर घेतलीय, त्या धर्मात, देशात, संस्कृतीत आमचा जन्म एका अपघाताने झालाय, तो काही आम्ही निवडलेला नाही. म्हणजे मला हिंदू, मुस्लिम वगैरे म्हणूनच आणि त्यातही भारत देशातच जन्मायचं होतं असं ठरवून कुणीही जन्मत नाही. पण मग जन्मल्यापासून आपलाच धर्म, देश, संस्कृती श्रेष्ठ हा अहंकार आपल्या नकळत्या मेंदूत मोठ्या व्यक्तींकडून ठासून भरला जातो. आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या मुर्खपणे सुरू राहते.
गंमतीचा भाग हा की बहुसंख्य लोकांना या धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या जोखडातून मुक्त व्हावे वाटते. पण संख्येने कमी असणाऱ्या कट्टर अभिमानी लोकांना काय वाटेल, ते आपल्यावर रागावतील, आपल्याला बहिष्कृत करतील याचा विचार करून भीतीने हे बहुसंख्य लोक निमूटपणे या व्यवस्थेत आपला सहभाग चालू ठेवतात. ही कळपाची मानसिकता माणसाला स्वतंत्रपणे आयुष्य कधी जगूच देत नाही. आपल्याला जर खरेच ह्या जगात शांतता पाहायची असेल तर सर्वांनाच ह्या धर्मप्रेमाच्या, राष्ट्रवादाच्या, सांस्कृतिक अभिमानाच्या बेड्या आपल्या हातापायांतून काढून फेकून स्वतःला व दुसऱ्या माणसाला फक्त माणूस म्हणून पाहावे लागेल. याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मी तरी ह्या स्वातंत्र्यात आनंदाने जगायला सुरुवात केलीय, कारण कुठल्यातरी देव, देश, धर्म व संस्कृतीसाठी स्वतःच अमूल्य आणि एकदाच मिळणारे मानवी आयुष्य वाया घालवणे मला योग्य वाटत नाही. तुम्हाला जमतंय का बघा!
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment