Saturday, January 21, 2017

छडा - एक आवर्जून पाहावं असं नाटक

मराठी नाटकाला एक मोठी परंपरा आहे. हलक्या-फुलक्या विनोदी अंगाच्या नाटकांपासून ते अगदी आशयघन सामाजिक नाटकांपर्यंत वेगवेगळी असंख्य नाटके मराठी नाट्यक्षेत्राने अनुभवली. मात्र रहस्यकथा असणारी नाटके संख्येने फारच कमी स्टेजवर आली. रहस्यकथा हाताळताना लागणारे व गूढ कायम ठेवणारे संवाद, पात्रांना द्यावा लागणारा पुरेसा वेळ हा एक कळीचा प्रश्न असतो. त्याचबरोबर ध्वनी-संगीत, प्रकाश, रंगमंच आणि नेपथ्य यांचा नाटकासाठी असणारा मर्यादितपणा हे सांभाळून रहस्यमय नाटक उभे करणे हे एक मोठे दिव्य असते.

याच आठवड्यात सुरेश जयराम लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित "छडा" हे दोन अंकी नाटक पाहण्याचा योग आला. कथेत पात्रे मोजून 4, शेखर व कांचन हे नवरा बायको, नेहा ही त्यांची शेजारीण आणि अनुराधा. शेखर हा प्रथितयश TV अभिनेता तर कांचन मानसिक तणावांमुळे करिअरमध्ये अर्धविराम घेत मानसोपचार तज्ज्ञाकडून औषधोपचार घेतेय. शेखर आणि कांचन मध्ये सर्व काही सुरळीत नाहीये, पण एक सामायिक गुपित त्यांना वेगळे होण्यापासून थांबवत असते. शेजारीण नेहा ही शेखरची मोठी फॅन असते आणि तिच्या शेखरसोबतच्या आगळिकीने आधीच वैतागलेली कांचन अजून वैतागते. अनुराधा हे पात्र पहिल्या अंकाच्या शेवटी नाटकात प्रवेशते आणि कथेला वेगळीच कलाटणी देते.

शेखर व कांचन मधले ते गुपित काय? शेखर तेवढं एकचं गुपित ठेवत असतो की अजूनही खूप सारी गुपिते त्याने दडवलेली असतात? नेहा आणि शेखर मध्ये नेमकं काय शिजतंय? अनुराधा नेमकी कोण? शेखर आणि कांचन मधलं गुपित यांचा नेहा आणि अनुराधा यांच्यासोबत काय संबंध असतो? एका घरात, चार पात्रांत नेमके काय काय संबंध आहेत आणि त्यात कुणाचे हेतू काय आहेत? हे सगळे प्रश्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली उत्कंठा ताणून धरतात.

सुरेश जयराम यांच्या काटेकोरपणे रहस्य सांभाळून ठेवणाऱ्या कथेला मंगेश कदमांनी उत्कृष्ट न्याय दिलाय. "छडा" पाहताना हे सांगूनही पटणार नाही की हे "एका लग्नाची गोष्ट" वाल्या दिग्दर्शकाचं नाटक आहे. राहुल रानडे यांनी संगीताची धुरा खूप कौशल्याने सांभाळलीय. एखादया सिनेमात जेवढ्या कौशल्याने वेगवेगळेे आवाज, echo वापरून परिणाम साधला जातो, तो एका रहस्यमय नाटकात live पाहताना अजूनच थरारपूर्ण वाटतो. प्रकाशयोजना खूपच परिणामकारक आहे आणि कथेतले वेगवेगळ्या वेळचे प्रसंग त्यात खूप छान पद्धतीने खुलून येतात.

प्रमुख पात्रांचे म्हणाल तर शेखरच्या भूमिकेत सौरभ गोखलेने जीव ओतलाय. उरलेल्या तिन्ही स्त्री पात्रांशी त्याचे असणारे वेगवेगळे संबंध व त्यानुसार त्याची बदलणारी देहबोली, हावभाव अप्रतिम आहेत. कांचनच्या भूमिकेत रेश्मा रामचंद्र भाव खाऊन जाते. एका मानसिक तणावग्रस्त, संशयी स्त्रीची भूमिका तिने लीलया पेललीय. ज्या उत्स्फूर्तपणे काही प्रसंगात ती रडते किंवा मनातली घालमेल, अपराधीपणा दाखवते ते कमाल आहे. नेहाच्या भूमिकेत वेदांगी कुळकर्णी चपखल बसलीय. तारुण्यसुलभ अल्लडपणा व अचानक आलेल्या विक्षिप्त परिस्थितीशी रिऍक्ट होताना होणारी भयकंप अवस्था तिने छान वठवलीय. अनुराधाच्या भूमिकेत मानसी कुलकर्णीने एक वेगळीच छाप सोडलीय. शांतता, संयम, गुढपणा आणि रहस्य उलगडल्यावर तितकाच उत्स्फूर्तपणा हे तिने खूप जिवंतपणे उभारलेय.

शेवटच्या 10 मिनिटांत नाटकाच्या रहस्यावरून जेव्हा पडदा बाजूला होतो तेव्हा आपण फक्त अवाक होऊन पाहत राहतो. प्रत्येक पात्राच्या वागण्या-बोलण्यातील सुसंगती आणि त्या पात्राचे त्या कथेतील स्थान हे किती महत्वाचे आहे हे शेवटी कळते. 2 तासांच्या या नाटकात दचकून जावे असे अनेक प्रसंग आहेत आणि शेवटही अगदीच अकल्पित आहे. सर्व पात्रांना सामान न्याय लेखकाने दिलाय, तर मंगेश कदमांनी सर्व पात्रांच्या बारीकात बारीक गोष्टींवरसुद्धा भरपूर मेहनत घेतलीय. या सर्व कथेला, सादरीकरणाला राहुल रानडे यांच्या संगीताने आणि प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्य-प्रकाशाने एका वेगळ्याच उंचीवर नेलेय.

एकुणात "छडा" हे नक्कीच एक आवर्जून पाहावं असं नाटक आहे !

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment