सांप्रतसमयी महाराष्ट्रदेशी "जय मल्हार" नामक दूरचित्रवाणी मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यामुळे प्रस्तुत अभ्यासकाची उत्सुकता शिगेला जाऊन त्याने श्री खंडोबा यांचे चरित्रअध्ययन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. अभ्यासाअंती अभ्यासकास असे जाणवले की भारत देशच नव्हे तर समस्त विश्वातील साहित्य, चित्रपट, जीवनशैली, स्थापत्य, व्यवस्थापन व राजकारण यांवर श्री खंडोबा यांचा मोठा प्रभाव आहे, थोडक्यात श्री खंडोबा हा सर्वांचाच आदिपुरुष आहे. सदर अभ्यासनिरीक्षणे आम्ही वाचकवर्गापुढे संक्षिप्त रुपात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रतसमयीचा वाचकवर्ग लक्षात घेता खालील सारांश हा बोली मराठीत (हिंदी, इंग्रजी मिश्रित) लिहिणे उचित समजत आहोत!
तर मंडळी, खूप खूप वर्षांपुर्वी दोन दैत्य, मणी आणि त्याचा धाकटा भाऊ मल्ल, यांच्या तपाला प्रसन्न होऊन ब्रम्हदेवाने त्यांना अजेय राहण्याचा वर दिला, कारण प्रत्येक दैत्याच्या तपावर प्रसन्न होणे व त्यांना असला काहीतरी अभद्र वर देणे हे त्यांच्या विभागाचे कामच होते. हा वर देताना "Great powers come with great responsibilities" असंही ब्रम्हा बोलून गेले (पुढे हे वाक्य Spiderman वाल्यांनी चोरले, हलकट मेले Marvel वाले!), पण वर मिळायच्या आनंदात व पहिलीपासून इंग्रजी न शिकल्याने मणी व मल्ल यांना ते वाक्य कळले नाही. त्यांनी लागलीच पृथ्वीवर येऊन धुमाकूळ घालायला सुरुवात केली, ऋषी लोकांचे आश्रम उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. भयभीत सात ऋषी मिळून आधी इंद्राकडे गेले, तर तो बाबा मेनका, उर्वशीचे डान्स बघण्यात बिझी! सरकारी बाबूंना काम न करायची सवय खूप जुनी आहे. कसंतरी त्याच लक्ष गेलं त्या बिचाऱ्या साधूंकडे, मग साधूंनी त्याचे गाऱ्हाणे गायले. पुन्हा इंद्रातला बाबू जागा झाला आणि त्याने साधूंना पुढच्या टेबलवर (म्हणजे सिनियर देव विष्णूकडे) पाठवले. विष्णुपुढे परत एकदा साधूंनी गाऱ्हाणे गायले, पण विष्णू म्हणाले,"GR ब्रम्हाच्या ऑफिसमधून आलाय, हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही शंकराकडे जा!"
स्वर्गातील लालफित कारभाराला कंटाळून सातही ऋषी गेले शंकराकडे! हा देव बाकी त्यामानाने खूपच सहृदयी होता. त्याने साधूंचे गाऱ्हाणे ऐकले, ब्रम्हाने घातलेला घोळही पाहिला आणि तो भडकला. त्याने तत्काल ब्रम्हाला सक्तीने रिटायर करायची आज्ञा दिली व देवांमध्ये व एकूणच विश्वात निवृत्तीवयाची मर्यादा लागू केली, सोबतच इंद्र व विष्णू यांना 'कारणे दाखवा' नोटीस दिली (सदर माहिती आपणास कुठल्याही देवदरबारी मिळणार नाही, पण मणी-मल्ल नंतर इतक्या वर्षांत कुणालाही असा वर मिळाला नाही यावरून अभ्यासकास मिळालेली ही गोपनीय माहिती सत्य आहे हे सिद्ध होते!). स्वर्गातली लालफितशाही या क्रांतिकारी प्रशासकीय आदेशांनी आटोक्यात आणताच, शंकराने खंडोबाचा अवतार घेतला व मुक्काम जेजुरीला हलवला!
जेजुरीचे राज्य सांभाळताच खंडोबाने लोकप्रिय घोषणा व कार्यांचा धडाका (आपल्या योगींसारखा) लावत प्रजेला आपल्यासोबत केले. स्वत:चा ब्रँड निर्माण करण्यासाठी व सोबतच मनोरंजनासाठी "वाघ्या & मुरळी" नामक PR टीम उभारली जी घरोघर जाऊन खंडोबाचे गुणगान गायला लागली. खंडोबाची किर्ती आता नेवाश्यापर्यंत पोचली आणि तिथे असलेल्या तिर्मारशेठ वाण्याच्या मुलीला, म्हाळसा हिला खंडोबाने मागणी घातली. अत्यंत धुमधडाक्यात खंडोबा व म्हाळसाचा विवाहसोहळा पार पडला आणि सुखाने संसार सुरु झाला. देवगणात खंडोबाच्या विवाहाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा आवाजी मतदानाने पारित झाला. इंद्र, विष्णू व ब्रम्हाने त्यावेळेस जुना राग मनात धरून वॉकआऊट केले होते (मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालायचा उगम येथे आहे).
पण नेहमीप्रमाणे मणी व मल्ल यांनी खंडोबाच्या सुखात मिठाचा खडा टाकायला सुरुवात केली होती. खंडोबाने लागलीच म्हाळसाला सोबत घेत मणी-मल्लावर आक्रमण केले. स्त्रियांना युद्धात बरोबरीने (अगदी स्वतःच्या घोड्यावर) भाग घ्यायला संधी देणारा खंडोबा हा पहिला पुरुष. भारतातल्या स्त्रीमुक्तीवाल्या बायकांनी आता तरी 8 मार्च ऐवजी खंडेनवमीला "आंतरराष्ट्रीय महिला दिन" साजरा करायला हरकत नाही, आणि त्या "दंगल" सिनेमा वाल्यांनी महावीर फोगट च्या आधी खंडोबाचे नाव ऋणनिर्देश मध्ये दाखवायला हवे. पिकते तिथे विकत नाही हेच खरे! स्वतःची स्त्रीच काय अगदी कुत्र्याला सुद्धा खंडोबाने युद्धात सोबत नेले होते दैत्यांवर हल्ला करायला. "'तेरी मेहेरबानिया" व "राजाने वाजवला बाजा" वाल्यांनी तरी किमान खंडोबाचे कुत्रे आधी दाखवावे, पण नाही!! घमासान युद्धात बायको व कुत्रे यांच्या मदतीने (खराखुरा टीम लीडर) खंडोबाने मणी-मल्लला हरवले.
मरणासन्न मणी दैत्याला खंडोबाने विचारले,"मरने से पहले कोई आखरी ख्वाईश?" दैत्य मणीने खंडोबाची क्षमा मागितली, खंडोबाने त्याला "जा, तू भी क्या याद रखेगा की किस अमीर से पाला पडा था!" म्हणत त्याला एक बोकडाच्या नैवेद्याची सोय लावून दिली. मल्ल दैत्याने मात्र खंडोबाकडे सर्वनाशाची व नरमांसाची इच्छा केली. त्यावर खंडोबाने त्याचे मुंडके उडवून लावले, व स्वतःच्या देवळाच्या पायरीखाली पडेल अशी व्यवस्था केली की जेणेकरून प्रत्येक भाविक त्याला तुडवत वर जावा. "दोस्तों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया" असे म्हणत खंडोबाची स्वारी जेजुरीगडावर परत आली. "Mission accomplishment" नंतर खंडोबा आता विसावला होता. (इयान फ्लेमिंग प्रत्येक mission नंतर जेम्स बॉण्डला relaxation ला पाठवतो ते हेच पाहून), आता लवकरच नवीन mission खंडोबाला खुणावणार होते.
"कारणे दाखवा" नोटीस मिळालेला इंद्र परत खंडोबाच्या जवळ जाण्यास आधीपासूनच प्लॅन करत होता. त्याने आपल्या पुत्रीस एका धनगराच्या घरी बालरूपात पोचते केले तिचं नाव बानू! पूढे वयात आलेल्या अत्यंत रुपवती असणाऱ्या बानूस पाहून "बानू मेरी जान! मैं तुझपें कुर्बान!" ("जानु मेरी जान" हे नंतर चोरलेलं गीत) अशी काही खंडोबाची अवस्था झाली. बानूला मिळवण्यासाठी गडावरून दूर जाणे भाग होते. मग खंडोबाने सारीपाटात म्हाळसाकडून मुद्दाम हरत 12 वर्षे अज्ञातवास पत्करला ("हारकर जितनेवाले को बाजीगर कहते हैं!" हे वाक्य शाहरुखच्या तोंडी कुठून आलं कळलं आता?). खंडोबाच्या मनातील मांडे म्हाळसाला कळले व तिने त्याला वृद्धत्वाचा शाप दिला. अज्ञातवासात वृद्ध बनून बानूच्या बापाच्या घरी खंडोबा चाकरीला राहिले, अगदी बाजीगर सारखेच! आणि एके दिवशी बानूच्या धनगर बापाची सारी मेंढरे खंडोबाने जीव मारली, थोडक्यात सारी जायदाद मिट्टीमें! मग खंडोबाने धनगरापुढे अट ठेवली कि तो सगळी मेंढरे जिवंत करेल जर बानूचं त्याच्याशी लग्न लावून दिले तर!
बानूच्या धनगर बापाने खंडोबाच्या दाव्याबाबत संशय व्यक्त करताच खंडोबाने स्वतःच्या देवत्वाची, खऱ्या राजेशाही रूपाची एक झलक दाखवली. (पुढे हीच कथा Beauty & the beast च्या रूपाने इंग्रजांनी चोरली). शब्दानुरूप खंडोबाने भंडारा फुंकून सारी मेंढरे जिवंत केली (एक चुटकी भंडारा की किमत तुम क्या जानो?) आणि मग आजा धनगराने आनंदाने बानूचे खंडोबाशी लग्न लावून दिले. तिकडे इंद्राचा जीव भांड्यात पडला, कारण आता खंडोबा जावई झाला होता, त्यामुळे पुढची प्रशासकीय कार्यवाही टळणार होती. बानूला घेऊन खंडोबा जेजुरी गडावर आले, वाटले घरवापसी ला मोठा सत्कार होईल. पण, सवतीला पाहून म्हाळसा वैतागली आणि मग नवी अडचण आली. खंडोबाने पण हार मानली नाही आणि जेजुरी गडाचा वरचा भाग म्हाळसाला दिला व पायथ्याला बानूला घर दिले. डुप्लेक्स घरांचा शोध अशा रीतीने खंडोबाकडे जातो. फक्त तेवढेच नाही तर गडाच्या वरच्या थंड हवेने म्हाळसाचे डोके शांत राहील हा वैज्ञानिक विचारही त्यामागे होता. "सवत माझी लाडकी", "घरवाली बाहरवाली" इत्यादी सिनेमा आणि "माझ्या नवऱ्याची बायको" सारख्या सिरियल्सचे उगमस्थान याच कथेत आहे, पण वाङ्मयचौर्य करण्यात धन्यता मानणाऱ्या या देशात कुणी खंडोबाचे ऋण थोडेही मानले नाहीत याचा विषाद वाटतो.
उत्तर आयुष्यात खंडोबाने अजून तीन बायका केल्या रामबाई शिंपीन, फुलाई माळीण आणि कंडाई तेलीन (हे महेश कोठारेंना सांगू नका, नाहीतर अजून 5 वर्ष सिरीयल लांबायची!)! हे करण्यामागे बरीच कारणे होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधी म्हाळसाला फक्त बानूबद्दल मत्सर वाटायचा, आता तो मत्सर चार हिश्श्यात विभागला गेला व अत्यंत कमी व नंतर नाहीसा झाला. दुसरे असे की लिंगायत आणि धनगर समाजानंतर शिंपी, माळी व तेली समाजाशी संबंध जोडत खंडोबाने आपला जनाधार बळकट केला ("सबका साथ, सबका विकास" वाल्यांनी थोडा बोध घ्यावा, आणि राहुल गांधींनी तर खूपच जास्त विचार करावा यावर!). खंडोबाची पाचवी बायको ही मुस्लिम समाजाची आहे अशीही धारणा आहे त्यामुळे मुस्लिमही खंडोबाला आपले दैवत मानतात ("ह्यांची एक बरी घुसखोरी सगळीकडे!" - एक कडवा हिंदू). जात-धर्माच्या भिंती तोडत इतके मोठे सामाजिक अभिसरण करणे त्यानंतर कुठल्याही राजाला व पुरोगामी नेत्याला जमलेले नाहीये. सर्वसमावेशक लोकशाही काय असते हे लिंकनच्याही शेकडो वर्ष आधी श्री खंडोबाने दाखवले आहे. उगीच नाही खंडोबा महाराष्ट्राच्याही बाहेरसुद्धा आजही पुजला जात!
तेव्हा मंडळी, आपणास आता कळून चुकले असेल की राजकारण, समाजकारण, युद्धनीती, महिला सबलीकरण, व्यवस्थापन, प्रशासन आदी अनेक क्षेत्रांत श्री खंडोबा राजाचे योगदान मूलभूत, सक्रिय व अमूल्य आहे. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगावरून सुद्धा कित्येक मोठे सिनेमे व साहित्यकृती जगभर बनवल्या गेल्या, त्याही त्यांच्याप्रती कसलाही ऋणनिर्देश न करता!! किमान आपण तरी आता श्री खंडोबा रायाचे माहात्म्य ध्यानात घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे (त्यासाठी "समान नागरी कायदा", "लव जिहाद" व "द्विभार्या प्रतिबंधक कायद्या" ला विरोध करावा लागला तरी!)!!
येळकोट येळकोट, जय मल्हार !!!
- डॉ. विनय काटे
९ एप्रिल, २०१७
No comments:
Post a Comment