मी पाच-सहा वर्षाचा असताना 1989-90 सालच्या आसपास दूरदर्शनवर "पढना लिखना सिखो, ओ मेहनत करनेवालों" हे गाणे लागायचे. त्याचे शब्द, संगीत आणि चाल इतकी सुंदर होती की तेवढ्या लहानपणीसुद्धा मी ते गाणे कित्येकवेळा गुणगुणायचो. दुरदर्शनने ते गाणे तेव्हा प्रौढ साक्षरता मोहिमेसाठी वापरले होते. पुढे काही वर्षांनी मला कळले की दुरदर्शनने त्या मूळ गाण्याचा फक्त मुखडा/ध्रुपद वापरला होता व त्या मुखड्यापेक्षाही त्या गाण्याचा अंतरा/कडवी कित्येकपटीने स्फोटक व विचार करायला प्रवृत्त करणारा होता. त्याही काळात प्रसारमाध्यमांचे संपादक सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर कसे होते हे कळल्यावर वैषम्य वाटले. ते गाणे पूर्ण स्वरूपात खालीलप्रमाणे आहे -
पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो
क ख ग घ को पहचानो, अलिफ़ को पढ़ना सीखो
अ आ इ ई को हथियार बनाकर लड़ना सीखो ।।धृ।।
ओ सड़क बनाने वालो, ओ भवन उठाने वालो
खुद अपनी किस्मत का फैसला अगर तुम्हें करना है
ओ बोझा ढोने वालो ओ रेल चलने वालो
अगर देश की बागडोर को कब्ज़े में करना है ।।१।।
पूछो, मजदूरी की खातिर लोग भटकते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी सूखी रोटी गिद्ध लपकते क्यों हैं?
पूछो, माँ-बहनों पर यों बदमाश झपटते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी मेहनत का फल सेठ गटकते क्यों हैं? ।।२।।
पढ़ो, लिखा है दीवारों पर मेहनतकश का नारा
पढ़ो, पोस्टर क्या कहता है, वो भी दोस्त तुम्हारा
पढ़ो, अगर अंधे विश्वासों से पाना छुटकारा
पढ़ो, किताबें कहती हैं – सारा संसार तुम्हारा ।।३।।
पढ़ो, कि हर मेहनतकश को उसका हक दिलवाना है
पढ़ो, अगर इस देश को अपने ढंग से चलवाना है
पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो!
जवळपास तीस-चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या भारतातील आर्थिक विषमतेविरुद्ध, भांडवलशाहीविरुद्ध, जातीयतेविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आणि एकूणच व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांना जागृत करणारे हे गाणे लिहिले होते सफदर हाश्मीने!
1954 साली दिल्ली मध्ये जन्मलेल्या सफदरने दिल्लीतूनच BA व MA केले. विद्यार्थीदशेपासूनच सफदर कम्युनिस्ट विचारांनी भारलेला होता. अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी "जन नाट्य मंच" ची स्थापना केली, ज्या संस्थेने जवळपास 24 पथनाट्यांचे 4000 प्रयोग सर्वसामान्य लोकांसाठी केले. यातल्या बहुतांश नाटकांचे लेखन व जवळपास सर्वांचे दिग्दर्शन सफदरने केले. त्यातल्या कित्येक पथनाट्यांत त्यांनी स्वतः अभिनयही केला. इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात, त्यावेळच्या भ्रष्टाचाराविरोधात सफदरने "हल्ला-बोल", "कुर्सी, कुर्सी, कुर्सी" अशी अनेक पथनाट्ये केली.
आजच्या काळात कम्युनिस्ट कन्हैय्या कुमारच्या तोंडून "आझादी, आझादी! भूकमरीसे आझादी, सामंतवादसे आझादी!" हे ऐकून सरकारच्या पायाखालची वाळू सरकते व त्याला देशद्रोहाच्या खोट्या केसेसमध्ये गुंतवले जाते. मग तीस वर्षांपूर्वी सफदरने काय त्रास सहन केले असतील याची कल्पनाही करणे शक्य नाही. 1 जानेवारी 1989 ला असेच एक पथनाट्य करत असताना गाजियाबादमध्ये काँग्रेसच्या गुंडांनी सफदरवर खुनी हल्ला केला, ज्यात 2 जानेवारीला इस्पितळात सफदरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अगदी दोनच दिवसांनी 4 जानेवारीला सफदरच्या पत्नीने त्याच्या हत्येच्या ठिकाणी त्याच्या पथनाट्याचा प्रयोग पूर्ण करून स्वतःच्या पतीला श्रद्धांजली वाहिली होती. रात्रंदिवस बातम्यांच्या रतीब घालणारे शेकडो चॅनेल तेव्हा नव्हते म्हणून हे गाणे, ही घटना तेव्हा खूप कमी लोकांच्या माहितीत आली.
आज जर सफदर हाश्मी जिवंत असते तर सडकेपासून संसदेपर्यंत आणि टीव्हीच्या बातम्यांमध्येही हा कवी, नाटककार आजच्या सत्ताधीशांची, विरोधकांची, बिझनेसमन्सची आणि धर्माच्या ठेकेदारांची पिसे काढताना दिसले असते. किंवा कदाचित दाभोळकर, कलबुर्गी यांच्याही आधी गोळ्या खाऊन मेले असते.
सफदर, तू खरंच आज हवा होतास!
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment