कथेची सुरुवात अशी की ISRO आपला सगळा गाशा गुंडाळून पुण्यात येते. का? तर 'राघव शास्त्री' नामक कुणी एक महान consultant scientist एका राष्ट्रीय सुरक्षेच्या अत्यंत महत्वाच्या project वर काम करण्यासाठी अमेरिकेतून NASA मधून (तीच दिवाळीचे, रामसेतुचे फोटो काढणारी रिकामटेकडी संस्था) आलेले असतात. आता हे शास्त्रीबुवा एकदम brilliant माणूस. यांनी म्हणे एक असे रडार आणि त्यावर अशी एक frequency शोधलेली असते की ज्यावर अमेरिका आपल्या सागरी सीमांमध्ये असणाऱ्या जहाजांवर स्फोटके असतील तर दुरूनच ओळखतात आणि त्याची सूचना प्रसारित करतात.
आता भारताला हे तंत्रज्ञान हवंय म्हणून शास्रीबुवा इथे आलेत. आणि त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना औंध-बाणेर असल्या भागात कुठल्याशा सोसायटीत ठेवलेय जिथे एक स्वामी समर्थांचे देऊळ आहे. आणि त्या सोसायटीतल्या लोकांना त्या देवळाच्या समोर काकडारती, शेजारती करण्याशिवाय कसलाही दुसरा धंदा नाही. शास्रीबुवांच्या प्रोजेक्ट मध्ये या आरत्यांचा व्यत्यय येत असतो, म्हणून शास्रीबुवा आपले वजन वापरून स्वामी समर्थांचे देऊळ बंद करतात. आणि मग मध्यंतराला entry होते खुद्द स्वामी समर्थांची.
स्वामीजी मग आपल्या चमत्काराने राघव शास्त्रीच्या laptop चा password त्याच्या मुलीकरवी राघवला अज्ञात असा काहीसा करून ठेवतात. मग तो पासवर्ड crack करण्यासाठी hacker ची मदत घ्यायला राघव शास्त्री दक्षिण भारतातली दत्तगुरूंची स्थाने, गाणगापूर, त्र्यंबक असा काहीसा आडवळणी प्रवास करतो. दरम्यान राघवला मारण्यासाठी अतिरेकी बाँब घेऊन मागे असतात आणि त्यांच्या मागे बँडवाल्यांसारखे दिसणारे काही ATS चे ऑफिसर. या साऱ्या पळापळीत राघवला दुरावलेली आई मिळते, बापाच्या मृत्यूचे खरे कारण मिळते आणि स्वामीकृपेने पासवर्ड आणि आस्तिकता पण मिळते. देशाला राघवचे तंत्रज्ञान आणि स्वामींना आपले मंदिर परत मिळते हा गोड शेवट!
शास्त्रीय गोष्टींचे 'माता-भगिनी एकीकरण (हा शब्द माझी देण आहे मराठीला)' या चित्रपटात इतके बेमालूम केले आहे कि सामान्य प्रेक्षक भारावून जावेत. तर सभ्य स्त्री-पुरुषहो,
1. ISRO आणि NASA या दोन्ही संस्था अंतराळविज्ञानाशी संबंध ठेवतात. लष्करी, सुरक्षा प्रणालीसाठी तिकडे Pentagon आहे आणि इकडे DRDO. नासा आणि इसरो ला याच्याशी देणे घेणे नसते.
2. कुठल्याही लहरी पाठवून जहाजाच्या पोलादी भिंतीच्या आड, पोलादी कंटेनर मधली स्फोटके शोधणे आजच्या घडीला तरी दिवास्वप्न आहे. आणि कुणी ठरवलेच तरीही त्यासाठी इतका किरणोत्सर्ग करावा लागेल कि त्यापेक्षा एखादा अणुबाँम्बचा स्फोट परवडला.
3. बरं समजा असली काही frequency आपल्या शास्त्रीबुवांनी शोधली तरी ती पाठवायची किती ठिकाणी? भारताला 7000km लांबीचा किनारा आहे आणि पुढे अथांग समुद्र आहे. म्हणजे आपल्या शास्त्रीबुवांनी कुठे कुठे आणि किती रडार बसवायचे.
4. या राघव frequency चा transmission time किती? तर म्हणे 1 तास. अरे मेल्यांनो electro-magnetic किंवा radio waves एका सेकंदात पोचतील भारताच्या लांबीएवढ्या अंतरात. मग तासभर काय चारधाम यात्रा करणार आहेत का या लहरी??
5. स्वामी तर एकदम डेंजर आहेत. राईट बंधूनी आमच्या विमानाची idea चोरली. जगातल्या एडिसनच्या दिव्यांपेक्षा जास्त सूर्य मी पेटवले, मी प्रकाशाचा वेग बदलला तर आईनस्टाईनच सूत्र कोलमडेल असली भंकस ते फेकत राहतात. अहो स्वामीजी, ते सूर्यबिर्य राहू द्या, अक्कलकोटच्या नळाला उन्हाळ्यात पाणी आणता येतंय का ते बघा आधी. "Proton, electron, neurton म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश" हा स्वामींनी सांगितलेला शोध तर युनेस्को कढून नावाजला गेला पाहिजे.
6. ISRO चे शास्रज्ञ आहेत कि भजनी मंडळ असाच प्रश्न पडतो सिनेमा पाहताना. "आहोत आम्ही देवभोळे, तुमच्याकडे आहेच कि holy water, Pope" असले संवाद टाकून आमच्या आंधळ्या भक्तीचे आंधळे समर्थन. "Oxygen दिसत नाही तरी असतोच ना", "हिग्ज-बोसॉन च्या कणाला God particle हेच नाव का दिले?" असले बाळबोध तर्क. थोडक्यात आम्ही काहीही शोधणार नाही, पण तुमच्या शोधांच्या बोकांडी आमच्या अध्यात्माचे मढे टाकूच टाकू हि खात्री.
7. सिनेमात दाखवलेले ATS चे बँडवाले पोलीस, दळभद्री अतिरेकी संघटन, ISRO चे टुकार शास्त्रज्ञ आणि त्यांची तितकीच टुकार वैज्ञानिक भूमिका आणि संसाधने पाहून हसू अनावर होते, कीव येते.
8. अब्जावधी सूर्य पेटवणारे स्वामी, एका नास्तिक माणसाला आस्तिक बनवायला एवढा आटापिटा का करतात? एक देऊळ बंद झाले म्हणून इतका त्रास? हे म्हणजे जरा जास्तच झाले. यावरून स्वामींचा business अजून small scale आहे हे कळून येते, कारण एक शाखा बंद पडली तरी लगेच पळत यावे लागते, चमत्कार करावे लागतात.
थोडक्यात, ज्या देशात स्वामीजी कुठलाही चमत्कार करायला समर्थ आहेत त्या देशात कसलाही बॉम्बस्फोट होऊच कसा शकतो? कशाला तो राघव शास्त्री पाहिजे आणि त्याच ते रडार? होय ना?
समस्त देशाने फक्त "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" चा जयघोष करत थेट बॉम्बला भिडावे, अतिरेक्यांशी नडावे. बॉम्ब निकामी होईल, अतिरेकी जन्नतरवाणा होतील याची खात्री आहे. हाय काय आणि नाय काय!!
डॉ. विनय काटे
(टीप: या लेखामुळे होणाऱ्या संभाव्य कोर्ट केसेसचा खर्च, हा सिनेमा पाहावयास आणि त्याच्या review लिहावयास लावणारे श्री. अभिराम दीक्षित यांच्यावर राहील. भक्तांनी तसाही कोर्ट-कचेरीचा त्रास घेऊ नये, कारण त्यासाठी स्वामी समर्थ आहेत. मी, स्वामीजी आणि अभिराम बघून घेवू आमच्यात. तसेच माझ्या आयुष्यातील अमूल्य काही तास वाया घालवल्याबद्दल श्री.दीक्षित मला अमेरिकेचे रिटर्न तिकीट व १० दिवसांची trip प्रायोजित करत आहेत.)
- फेसबुक पोस्ट ( ११ जुलै २०१६, २१.३१ )
No comments:
Post a Comment