तस पाहायला गेल तर मी शक्यतो मराठीमधून लिहित नाही कारण मराठी keyboard वापरायची सवय नाही. हल्लीच मराठी मध्ये काही विधायक लिहायचा प्रयत्न केला आणि लोकांच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया पण आल्या. चांगले खूप जास्त होते हि समाधानाची गोष्ट. पण माणूस नेहमी वाईटाला किंमत देतो आणि त्याने व्यथित पण होतो. मी पण याला अपवाद नव्हतो आणि मग मी प्रतिक्रियेतून व्यक्त झालो जे मी सहसा होत नाही. शब्द अश्लाघ्य नव्हते पण भावना तीव्र होत्या. खर सांगू, मलाच वाईट वाटलं त्याच जास्त कारण कुणी कितीही खालच्या पातळीवर जावून टीका केली तरी आपण व्यथित व्हायच नाही हे माहित असून पण ते अनुभवायची किंवा तसे वागायची परीस्थिती अलीकडच्या काळात आली नव्हती. कदाचित सुसंकृत लोकांमध्ये जास्त वावर असल्याने हे प्रकार वाट्याला कमी आले होते. खूप अंतर्मुख झालो, खूप विचार केला कि यावर उपाय काय?
लहानपणी शिकलेली अंगुलीमालाची गोष्ट आठवली. "तोडणे सोपे, जोडणे अवघड" हा बुद्धाचा संदेश आठवला. आणि खर सांगू बुद्धापेक्षा किंबहुना जास्त अंगुलीमाल भावून गेला. एक निर्दयी खुनी दरोडेखोर, जो ९९ लोकांच्या धाय मोकलून रडण्याने पाघळला नाही तो बुद्धाच्या एका साध्या प्रश्नाने अंतर्मुख झाला, बदलून गेला अंतर्बाह्य. पूर्वाश्रमीचा खुनी असला तरी त्याच्याकडे एक अंतर्मन होते जे विचार करायला तयार होते आणि बदल स्वीकारायला तयार होते. आपण मात्र सगळेच अंगुलीमाल पेक्षा वाईट झालोय, आम्ही ना मनाची कवाडे उघडतो आणि नव्या विचारांना सामावून घेतो, ना स्वत:मध्ये बदल करतो. उलट आम्ही आमच्या आतल्या आणि आजूबाजूच्या वाईट वृत्तींचे समर्थन करतो, कधी उघड-उघड तर कधी सोयीस्कर मौन पाळून किंवा आमचे पंचेंद्रिये बंद करून. आजच्या काळात बुद्ध जरी आला असता तरी थोडा भांभावून गेला असता कारण आजकालचे अंगुलीमाल मुळात ऐकूनच घेत नाहीत समोरच्याच. उलट समोरच्याला लागलीच stereotype करून, label लावून त्यांच्यावर वैयक्तिक शेलक्या शब्दात टीका करून, झुंड गोळा करून हल्ले चढवतात आणि प्रसंगी हिंसा पण करतात. बुद्धा, वाचलास बाबा तू यांच्या कचाट्यातून !
खरच तोडणे किती सोपे आहे पहा ना ! देश, धर्म, वर्ण, जात, लिंग, पैसा, पोटजात, व्यवसाय, संघटना, पक्ष, विचारधारा ते महापुरुषांचा अनुनय, कित्ती गोष्टी आहेत लोकांना तोडायला! माझ्यासारख्या माणसाची (आणि बऱ्याच विवेकी लोकांची) खूप भयान अवस्था होते मग, कारण मी धर्म, जात, पक्ष, विचारधारा किंवा पैसा इत्यादी कशानेच लोकांना विभागत नाही. म्हणून जेव्हाही मी (किंवा तुम्ही सारे विवेकी लोक) जेव्हा काही लिहितो तेव्हा हलकल्लोळ माजतो कारण जगात असे कदाचित कुठलेच वाक्य नाही ज्याला विरोध करता येणार नाही. मग आम्ही करायचे काय? स्वत:ला व्यक्त करायचे कि नाही? तर एकच उत्तर …… जरूर करावे! कारण अभिव्यक्ती हा मुलभूत हक्क आहे घटनेने दिलेला आणि सोबत काही कायदे पण दिलेत आपल्याला शासन करायला जर आपली अभिव्यक्ती हि हिंसक, फुटीरतावादी किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या मुलभूत हक्कांवर गदा आणत असेल तर. तेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा विधायक मार्गाने वापर करा आणि लोकांना पण शिकवा त्यांच्यापुढे एक आदर्श ठेवून.
मग या आधुनिक अंगुलीमालांच करायचं काय? तर त्यांना दुर्लक्षून टाका. Block करा, unfriend करा, त्यांचे विखारी शब्द पुसून टाका जसे संसदेत कुणी अश्लाघ्य शब्द वापरले तर त्याची नोंद केली जात नाही तसे. आणि अजून एक, या विखारी वृत्तीला उघड किंवा छुपा पाठींबा देणारे पण उडवून लावा आपल्या आयुष्यातून, कारण हेच ते भीष्म, द्रोणाचार्य असतात जे द्रौपदीच वस्त्रहरण होताना मूकसंमती देतात आणि महाभारत घडवून आणतात. जगातल्या सगळ्या अतिरेकी संघटना हे या आजकालच्या भीष्म-द्रोणांच्या छुप्या पाठिंब्याची देण आहे. कमीत कमी तुमच्या माझ्या सारख्या विवेकी लोकांनी तरी यातून बाहेर पडले पाहिजे. आम्हाला हे दु:शासन नकोयत, ना भीष्म-द्रोण. का नाही आम्ही एक सुंदर समाजाच, एका विवेकी आणि एकजूट समूहाच चित्र निर्माण करू शकत? काय आडव येत आम्हाला? आम्ही हितसंबंधाबाहेर जावून जे योग्य त्याला योग्य, आणि जे अयोग्य त्याला अयोग्य म्हणायला कधी शिकणार आहोत? खरच अजूनही वेळ गेली नाहीये. रवींद्रनाथ टागोर लिहितात "Every child comes with the message that God is not yet discouraged of man." मग अजूनही वेळ गेलेली नाहीये मानवता आणि प्रेमाने जग जोडायची. चांगल लिहा, विधायक लिहा आणि "Agree तो disagree" ची तयारी ठेवून लिहा. आणि जर कुणी हीन शब्द वापरले तर झुकर्बर्ग ने दिलायचं कि block आणि unfriend चा पर्याय, खुशाल वापर तो.
आता राहिला वादविवादाची आमंत्रण येतील त्याच. लोक तुम्हाला tag करून भंडावून सोडतील, inbox मध्ये message करून शिव्या देतील आणि वादविवादाला यायचे आव्हान देतील. तर जसे बोलणे हा right to freedom of expression आहे, तसाच right to remain silent हा पण right to freedom of expression आहे. तेव्हा आपण शांत राहिलो किंवा उत्तर नाही दिले म्हणजे फार काही बिघडत नाही. पंचतंत्रा मध्ये एक गोष्ट आहे, थंडीच्या दिवसात काही माकडे काकडून बसलेली असतात. मग ती गुंजेच्या लाल बिया गोळा करून त्यांना विस्तव समजून शेकत बसतात. झाडावर पक्षी बसलेला असतो एक तो माकडांना खुपदा सांगतो कि बाबानो ह्या गुंजेच्या बिया आहेत विस्तव नाही. पण माकडे दाद देत नाहीत की पक्षी शांत बसत नाही. शेवटी एक माकड जोरात उडी मारून पक्ष्याला पकडते आणि त्याची मान पिरगाळून टाकते. यातून बोध असा कि मूर्खांना उपदेश करू नये फार आपलाच जीव जातो त्यात. तेव्हा आपल्यात काही जण असतात असे ज्यांच्या लेखी त्यांचा धर्म, देश, श्रद्धा, संस्कृती, विचार, महापुरुष, इतिहास, संघटन, पक्ष किंवा तत्वज्ञान हेच एकमेव योग्य आणि महान आहे अशी धारणा असते. अशांना अति समजवायच्या फंदात पडू नका. निसर्गाने निर्माण केलेल्या व्यवस्थेत जो कालानुरूप बदलतो तो टिकून राहतो मग तो धर्म असेना का इतर कुठलाही विचार प्रवाह किंवा व्यक्तिसमुह. असे अतिरेकी आणि आडमुठे लोक दिसले तर त्यांना एकटे सोडून पुढे निघून जा. तुम्ही जितकी त्यांना किंमत द्याल तितके त्यांचे उपद्रवमुल्य वाढते. त्यांना अदखलपात्र समजून टाकून देणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे.
आणि हो मी पण लिहित जाईन यापुढे मराठी मध्ये जसे जमेल तसे. जे सत्य आहे, सुंदर आहे आणि वाचनीय आहे ते तुमच्या पर्यंत पोचवत जाईन माझ्या कुवतीने. मला कुठला जात-धर्म-पक्ष कि विचारप्रवाह नाही, त्यामुळे मला विषयच बंधन नाही. जे सुचेल ते व्यक्त करत जाईन. आवडले तर दाद द्या, नाही आवडले तर दुर्लक्ष करा. आणि माझ्यापुरते सांगायचे तर मी कधीही like ची पर्वा करत नाही कारण या जगातले सगळे नवे विचार, संशोधन हे त्या त्या काळात अप्रिय होते. तेव्हा दिसामाजी काहीतरी मी लिहित राहीन कुणाशी कसलाही द्वेष न ठेवता, अभिनिवेश न ठेवता. कधी कधी स्वत:ला खूप नशीबवान समजतो जेव्हा सगळ्या जगात विखुरलेले माझे मित्र-मैत्रिणी पाहतो. म्हणून केशवसुतांची कवितेच्या काही ओळी आज माझ्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणींसाठी -
नव्या मनुतिल, नव्या दमाचा, शूर शिपाई आहे,
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
ब्राम्हण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा,
तेच पतित कि जे आखडीती प्रदेश साकल्याचा I
खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख,
कुपातील मी नच मंडूक I
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे,
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
तेच पतित कि जे आखडीती प्रदेश साकल्याचा I
खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख,
कुपातील मी नच मंडूक I
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे,
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
सर्वांना खूप सारे प्रेम.… आणि माझा द्वेष करणाऱ्यांना अजून जास्त प्रेम !!
- फेसबुक पोस्ट (१९ एप्रिल २०१६, १३.३४)
No comments:
Post a Comment