प्रिय शिंजो आबे (प्रधानसेवक, जपान) काका,
भारतातून 3 लाख युवकांना जपानला नेऊन त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन त्यातल्या काहींना तिथेच नोकरी देणार असला काही करार तुम्ही जपानी लोक आमच्या देशाशी करताय हे ऐकायला मिळालं. मला एक कळलं नाही की विश्वगुरु असणाऱ्या आमच्या देशातल्या युवकांना काही शिकवायची तुमची लायकी तरी आहे का? एकतर तुमची लोकसंख्या टीचभर, त्यामुळे "मेरे सवासों करोड देशवासीयों.." म्हणण्यातला गर्व तुम्हाला कधी कळणार नाही. त्यात तुमच्या एका येनला आमच्या ६० पैशाची किंमत (तुमचा GDP असेना का आमच्या अडीचपट, आम्हाला त्याच काय?), तुमच्या बुलेट ट्रेनच्या आधी कित्येक युगे आम्ही विमाने आणि अण्वस्त्रे बनवली आणि तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवणार?
आबे काका, तुमच्या भल्यासाठी सांगतो, आमचे 3 लाख युवक तिकडे नेण्यापेक्षा तुमच्या मागास देशाला आमच्या देशासारखा विश्वगुरु बनवण्यासाठी आम्ही आमच्या देशातील काही महान व्यक्तिमत्वे तुमच्याकडे "अष्टप्रधानमंडळ" या जबाबदारीवर कायमची पाठवायला तयार आहोत. त्यांचे कर्तृत्व ऐकून नाही तुमच्या घशात मोमो अडकला तर नाव बदलून ठेवेन स्वतःचे! आता हे अष्टप्रधानमंडळ बघा -
१) नरेंद्र मोदी - जगातल्या प्रत्येक देश आणि गाव हे त्यांचं "दुसरं घर" आहे आणि प्रत्येकाशी त्यांचा जुना संबंध आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला लाखोंची गर्दी होते आणि सोबत रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी! अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, कला, साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास, भूगोल आदी प्रत्येक गोष्टीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या दरवर्षीच्या "Vibrant Gujrat" मेळ्यात लाखो कोटी डॉलर्सचे MoU परकीय लोक करतात ("प्रत्यक्षात रुपया येत नाही" हे काय सांगताय आम्हाला?), त्यांनी गुजरातचा इतका विकास केला की भारतातल्या साऱ्या कंपन्या आणि शिकलेले लोक मुंबई, बंगलोर, दिल्ली, पुणे, हैद्राबाद सोडून आता फक्त अहमदाबादला जायला आतुर आहेत. तुमच्या टोकियोपेक्षा महाग फ्लॅट व जमीन अहमदाबाद मध्ये आहे. आणि आमच्या मोदीजींनी 70 वर्षे न सुटलेल्या आतंकवाद, काळे धन, स्त्रीभ्रूणहत्या अशा कित्येक समस्या नुसत्या सेल्फी घेऊन व रात्रीत नोटबंदी करून सोडवल्या आहेत. तूम्ही तुमच्या जागी मोदींना बसवा आणि बघा, गेल्या 70 वर्षांत तुम्हाला जे जमलं नाही ते आमचे मोदीजी चुटकीसरशी करून दाखवतील.
२) योगी आदित्यनाथ - वैराग्य आणि सत्ता यांचा इतका सुरेख संगम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जपानमधल्या वेगवेगळ्या मठातील साधूंना ते लवजिहाद थांबवणे वगैरे कामे देऊन त्यांना काही कामाला तरी लावतील. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागतिक दर्जाची हॉस्पिटल कशी चालवायची हे ते तुम्हाला शिकवतील. उगी तुमच्या लोकांना आजारपणाच्या उपचारासाठी गोरखपूरला यायची गरज नाही पडणार.
३) अरुण जेटली - अर्थशास्त्राचे यांचे ज्ञान इतके अगाध आहे की विचारू नका. रात्रीत केलेल्या नोटबंदीचे समर्थन कसे करावे, GST च्या गोंधळाला नावाजावे कसे हे ते तुम्हाला शिकवतील. त्यांच्या निर्णयांना विरोध करणारे लोक कसे संकुचित, छिद्रान्वेषी आणि राष्ट्रद्रोही आहेत हे ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकतात ते. ते तुमच्या अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकतील.
४) मोहन भागवत - तुमच्या देशाच्या दुःखाचे खरे कारण म्हणजे तुमची कमी असणारी लोकसंख्या आहे हे ते पटवून देतील. एका बाईने चार मुले जन्माला कशी व का घालावी यावर ते जपानी बायकांचे प्रबोधन करतील.
५) सुषमा स्वराज - उत्तर कोरियाच्या किम जोंगला व त्याच्या मिसाईलला घाबरायची गरज तुम्हाला पडणारच नाही. यांना घेऊन जा आणि बघा "एक मिसाईल के बदले दस मिसाईल" कशा सोडतात त्या ते.
६) राजनाथ सिंग - प्रत्येक कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्या घटनेवर काहीही न करता निष्काम कर्मयोगाने "कडी निंदा" कशी करावी याचे सुंदर प्रात्यक्षिक ते तुम्हाला देतील. त्यांच्या कड्या निंदेने मतपरिवर्तन होऊन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद वगैरे अतिरेकी व भारतातले नक्षलवादीही आजकाल अहिंसेच्या मार्गाने जाण्याच्या विचारात आहेत.
७) अनिल बोकील - इंजिनिअरिंग करून बेरोजगार राहण्यापेक्षा "हौशी अर्थशास्त्रज्ञ" बनून देश बदलता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे बोकील तुमच्या देशातल्या बेरोजगार इंजिनिअरना अर्थपूर्ण कामाला लावून तुमच्या देशातही अर्थक्रांती आणतील.
८) धर्मेंद्र प्रधान - अमेरिकेत आलेल्या वादळाने भारतात पेट्रोलचे भाव वाढतात हे महान संशोधन करणारे प्रधान भौगोलिक, खगोलीय घटना आणि त्याचे तेलाच्या किंमतीवर होणारे परिणाम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून तुमचे अब्जावधी येन येनकेनप्रकारेण वाचवतील.
शिंजो आबे काका, आमच्या देशात कुणाला काहीही देताना चांगले देतात. सबब कमी शिकलेले तीन लाख युवक तिकडे पाठवून तुमचा खर्च वाढवण्याऐवजी आम्ही हे अष्टप्रधानमंडळ तुमच्याकडे कायमचे पाठवायला तयार आहोत. मला माहित आहे की यात आमचे फार मोठे नुकसान आहे पण तुम्ही नाही का आम्हाला बुलेटट्रेन फुकटात दिली, म्हणून हे अष्टप्रधान मंडळ आम्ही तुम्हाला फुकटात देऊ इच्छितो. त्यांच्या जपानला जाण्याने आमच्या देशाचे होणारे संभाव्य नुकसान आम्ही कसेतरी भरून काढू. आणि आमचे अष्टप्रधान मंडळ तिकडे गेल्यावर हे जपानला जाणारे तीन लाख युवक भारतातच नोकरीला लागतील याची आम्हास खात्री आहे!
तेव्हा आबे काका अजिबात उशीर करू नका. पुढच्या विमानाने ह्यांना घेऊन जा आणि जपानला विश्वगुरू बनवून टाका. आम्हाला आता विश्वगुरू बनून राहायचा कंटाळा आलाय.
तुमचा शुभचिंतक -
डॉ. विनय काटे