Tuesday, April 25, 2017

जेनेरिक प्रिस्क्रिप्शनची सक्ती - MCI व नरेंद्र मोदींचा धाडसी व कौतुकास्पद निर्णय!

जेनेरिक औषधांबद्दल सध्या देशात सगळ्या डॉक्टर मंडळींनी व फार्मा कंपन्यांनी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची भीती दाखवायला सुरुवात केलीय, जी अत्यंत निराधार व व्यावसायिक हितसंबंधानी प्रेरित आहे. जेनेरिक या शब्दाला औषधांच्या क्षेत्रात काही वेगवेगळे संदर्भ आहेत ते खालीलप्रमाणे -

१) जेनेरिक "नावा"संदर्भात-
कुठल्याही औषधाला दोन प्रकारची नावे असतात. एक जेनेरिक नाव म्हणजे त्याचे रासायनिक नाव; आणि दुसरे व्यावसायिक/ब्रँड नाव. थोडक्यात, Paracetamol हे जेनेरिक नाव आणि Crocin हे ब्रँड नाव. Paracetamol हे औषध जगाच्या पाठीवर किमान हजारभर कंपन्या वेगवेगळ्या ब्रँड नावाने विकत असतील. ब्रँड नाव काहीही असलं तरी मूळ औषध, त्याची परिणामकारकता समान. ब्रँड नाव फक्त ते औषध कुठल्या कंपनीने बाजारात आणलंय हे सांगते; नीट वाचा 'बाजारात आणलंय' एवढंच सांगते. कारण, जगातल्या यच्चयावत मोठ्या औषध कंपन्या त्यांची कित्येक औषधे दुसऱ्या छोट्या कंपन्यांकडून बनवून घेतात व स्वतःच्या नावाने विकतात, स्वतःचे खर्च कमी करून फायदा वाढवायला. हिमाचल मधील बद्दी हे अशा अनेक छोट्या कंपन्यांचे माहेरघर आहे जिथून जगभरच्या नामांकित ब्रँडची औषधे तयार होतात.

२) जेनेरिक "संशोधना"संदर्भात -
जगात दोन प्रकारच्या औषध कंपन्या असतात, नवीन संशोधन करून "पेटंट" असणारी औषधे निर्माण करणाऱ्या इनोव्हेटर्स, आणि जेव्हा ह्या औषधांचे पेटंट संपते तेव्हा त्याच औषधांचे "जेनेरिक" उत्पादन करणाऱ्या. कुठलेही पेटंट (व्यावसायिक एकाधिकारशाही) हे 20 वर्षे चालते, पण औषधांच्या बाबतीत ते साधारण 7 वर्षेच बाजारात वापरता येते. पेटंटेड औषधे महाग असतात कारण त्यासाठी संशोधनावर प्रचंड खर्च येतो, अगदी 1 औषध बाजारात आणायला 1 बिलियन डॉलर्स (सात हजार कोटी रुपये) इतका. तो खर्च वसूल करण्यासाठी पेटंटेड औषधे महाग असणे क्रमप्राप्त व न्यायाचे असते. पण जेव्हा पेटंट संपते तेव्हा त्याच पेटंटेड औषधांची दुसऱ्या कंपन्यांनी बनवलेली जेनेरिक औषधे साधारणत: पेटंटेड औषधांच्या 15-20% किंमतीला बाजारात मिळतात.

वरील मुद्दा क्र १ व २ नुसार औषधांचे तीन प्रकार पडतात-
अ) पेटंटेड औषधे (जी साहजिकच ब्रँडेड असतात)
ब) ब्रँडेड जेनेरिक औषधे (यांना ब्रँडनाव असते)
क) जेनेरिक जेनेरिक औषधे (ब्रँडनाव नसणारी)

अमेरिकेत 10 पैकी 8 prescription या जेनेरिक (ब्रँडेड व जेनेरिक प्रकारच्या) औषधांच्या असतात. आणि खुद्द अमेरिकेचे FDA (अन्न व औषध प्रशासन विभाग) जेनेरिक औषधे ही पेटंटेड औषधांइतकीच प्रभावी आहेत हे Clinical Trial चा संदर्भ घेऊन सांगते. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातसुद्धा जेनेरिक औषधे लोकांच्या व सरकारच्या पसंतीस पात्र आहेत कारण ती स्वस्त व दर्जेदार आहेत. आफ्रिकेत HIV ला आळा घालण्यात भारतातील स्वस्त जेनेरिक औषधांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि म्हणूनच भारतातील नामांकित फार्मा कंपन्या जेनेरिक (ब्रँडेड व जेनेरिक) औषधे जगभर निर्यात करून गेल्या 10-15 वर्षात अतिश्रीमंत बनल्या आहेत. त्यामुळे कुणी जेनेरिक औषधांची quality चांगली नसते वगैरे ज्ञान द्यायला लागला तर त्याला विचारा "पेटंटेड औषधे बनवणारी भारतीय कंपनी कुठली?". तो एका सेकंदात गप्प बसेल कारण यच्चयावत भारतीय औषध कंपन्या ह्या जेनेरिक औषधांच्या व्यवसायात आहेत. ब्रँडेड म्हणजे काहीही विशेष मोठे नसते; www.ipindia.nic.in या सरकारी वेबसाईट वर कुणीही काही हजारांत स्वतःचा ब्रँड (Trademark) रजिस्टर करू शकते. औषधाला ब्रँडनेम दिल्याने त्याची परिणामकारकता वाढत नाही किंवा न दिल्याने कमी होत नाही!

आता येऊया सध्याच्या मुद्द्याकडे - Generic Prescription च्या सक्तीच्या. MCI (मेडिकल कौंन्सिल ऑफ इंडिया) ने 2016 साली एक आदेश काढून डॉक्टर्सना सूचित केले होते की प्रिस्क्रिप्शन मध्ये औषधांचे ब्रँड नाव न लिहिता जेनेरिक नाव लिहावे, ज्याला डॉक्टर्सनी हरताळ फासला होता. वास्तविक MBBS च्या दुसऱ्या वर्षाला फार्माकॉलॉजी व तिसऱ्या वर्षी समस्त क्लिनिकल विषयांत विद्यार्थी ज्या प्रिस्क्रिप्शन लिहितो त्यात कुठेही ब्रँडनेम नसते, जेनेरीकच नाव असते. पण जेव्हा हाच विद्यार्थी डॉक्टर बनून बाजारात उतरतो तेव्हा तो प्रिस्क्रिप्शन वर ब्रँडचे नाव टाकायला लागतो. कारण सोपे आहे... ब्रँड हा औषध कंपनीचा असतो आणि आपल्या ब्रँडचे प्रिस्क्रिप्शन लिहावे म्हणून औषध कंपनी त्यासाठी काही चीजवस्तू डॉक्टरांना देत असते (काही प्रामाणिक डॉक्टर्स अशा चीजवस्तू सरळ नाकारतात, पण ती संख्या थोडी आहे). कपडे, घरातल्या वस्तू, परदेशी वाऱ्या पासून ते अगदी महागड्या गाड्यांपर्यंत गोष्टी डॉक्टर्सना दिल्या गेलेल्या आहेत, अजूनही दिल्या जातात, भले MCI ने त्यावर कितीही निर्बंध आणले तरी.

आता समजा की मोदींच्या आणि MCI च्या सक्तीला धरून जर प्रिस्क्रिप्शन वर ब्रँडनेम लिहिता येत नसेल तर औषध कंपन्यांच्या MR (Medical Representative) ना कळणार कसे की कुठल्या डॉक्टरने किती बिझनेस दिलाय? आणि त्याला ते नाही कळले तर तो कंपनीला काय कळवणार? आणि तो ते नाही कळवू शकला, डॉक्टर्सशी व्यावसायिक हितसंबंध टिकवू नाही शकला तर त्या MR चा कंपनीला उपयोग काय?  IMS सारख्या प्रिस्क्रिप्शन मधील ब्रँडनेम चा सर्व्हे करणाऱ्या व्यापारी संस्था औषधकंपन्यांना कसला data विकणार? MCI च्या या निर्णयाने औषधांच्या व्यवसायाचा खूप जास्त कंट्रोल रुग्ण व retail (छोट्या) फार्मसी वाल्यांकडे येणार आहे जो आजवर डॉक्टर्स, गब्बर फार्मा स्टॉकिस्ट व फार्मा कंपन्यांकडे होता. भले यात काही लाख MR थोड्या काळासाठी भरडले जातील, पण हळूहळू छोट्या जेनेरिक औषध कंपन्या सुद्धा स्वतःचा माल विकायला या MR ना वापरू शकतील.

भारतात औषधांच्या निर्मितीला परवानगी द्यायला व त्यांची गुणवत्ता मानकांनुसार राखायला CDSCO (Central Drugs Standard Control Organization) ही केंद्रीय संस्था आहे (अगदी अमेरिकेच्या FDA सारखीच), जिच्या अंतर्गत प्रत्येक राज्यात FDA (अन्न व औषध प्रशासन) औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करते. कुठलेही औषध बनवायला कित्येक परवानग्या, ऑडिट, क्वालिटी टेस्टस यांतून प्रत्येक औषध कंपनीला (छोटी असो वा मोठी) वारंवार जावे लागते. खडूची भुकटी, उंदराचे औषध आदी ज्या गोष्टी सामान्य लोकांना भीती घालायला सांगितल्या जात आहेत त्या भेसळीच्या/नकली औषधांच्या घटना आहेत आणि त्या कुठल्याही औषध कंपनीच्या औषधाबाबत होऊ शकतात. Ranbaxy सारख्या नामांकित भारतीय कंपनीला सुद्धा 2013 साली अमेरिकेच्या FDA ने 500 मिलियन डॉलर्स चा दंड ठोठावला होता. अगदी गेल्या महिन्याच्या, मार्च 2017 च्या CDSCO च्या Drug Alert मध्ये D-Cold Total, Combiflam, Cadilose या मोठ्या औषध कंपन्यांच्या नामांकित ब्रँडेड औषधांच्या दर्जात कमी आढळल्याचे म्हणले आहे. CDSCO च्या प्रामाणिकतेबद्दल आणि औषध कंपन्यांच्या भुई धोपटायच्या वृत्तीबद्दल बोलायला हे पुरेसे आहे.

2013 साली मनमोहन सिंग सरकारने DPCO (Drug Price Control Order) आणत 628 जीवनावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रणात आणत सामान्य माणसाला दिलासा दिला होता. 2 महिने आधी मोदी सरकारने मूळ खर्चाच्या 5 ते 10 पट किंमतीला विकल्या जाणाऱ्या Medical Devices च्या किंमती आटोक्यात आणत कित्येक कंपन्या, हॉस्पिटल व डॉक्टर्सचे दुकान बसवले. याचाच पुढचा टप्पा म्हणजे 2016 च्या MCI च्या Generic Prescription च्या सक्तीला मोदींनी पाठिंबा देणे. हे करायला खूप मोठे धाडस व राजकीय ईच्छाशक्ती लागते जी मनमोहन सिंग व नरेंद्र मोदींनी दाखवलीय. फार्मा कंपन्यांच्या नेक्सस च्या विरोधात जाणे वाटते तितके सोपे नाही. जे ओबामांनी अमेरिकेत केले तेच या दोघांनी इथे भारतात केलेय. औषध कंपन्यांकडून सामान्यांची केली जाणारी लूट अमेरिकेला परवडत नाही, आपण तर त्यापुढे कितीतरी गरीब देश आहोत. भारतीय औषध कंपन्यांनी सुद्धा आता ब्रँडेड आणि अनब्रँडेड च्या नावाखाली सामान्य लोकांना भीती घालवण्याचे उद्योग बंद करत स्वतःचा धंदा वेगळ्या पद्धतीने व प्रामाणिकपणे करावा. MR हे औषधांची quality जपायला वगैरे असतात ही लोणकढी थाप आहे, MR हे सेल्समन आहेत हे जगजाहीर आहे, त्यापासून उगीच लपू नका.

राहता राहिला डॉक्टर्सचा भाग; कधी नव्हे ते एक सुवर्णसंधी चालून आलीय प्रामाणिकपणे व्यवसाय करत सामान्य लोकांच्या मनातून हरवला गेलेला विश्वास परत मिळवायची व तिचे सोने करायची. "कट प्रॅक्टिस" मुळे, फार्मा कंपन्यांसोबतच्या अभद्र युतीमुळे वैद्यकीय व्यवसाय, जो आधी खूप सन्मानाचा होता तो आता एक धंदा बनलाय. त्याला परत एक चांगले स्थान मिळवून द्यायला यासारखी संधी नाही. "ही औषधे नाही घेतली व औषधांमुळे गुण नाही आला तर आम्ही जबाबदार नाही" असल्या consent घ्यायच्या गप्पा काय करता तुम्ही? जर तुम्ही लिहिलेली औषधेच घेतली, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणीच तपासण्या केल्या तर पेशंट 100% बरा होईल याची खात्री घ्याल का तुम्ही?? या घडीलाही काही हजार/लाख रुपयांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सामान्य माणसाच्या भल्याच्या विरोधातच भूमिका घ्यायची असेल तर भवितव्य वाईट आहे. "MR ना प्रवेश नाही" व "आम्ही कुणाकडूनही Referral Charges स्विकारत नाही व देत नाही" अशी पाटी लावून वैद्यकीय व्यवसाय करणे खूप अवघड नाही. सगळ्यांनाच डॉ.प्रकाश आमटे व्हायला भामरागड ला जायची गरज नाही. Ethics व प्रामाणिकपणा सांभाळला तरी तुमच्या गावा-शहरात तुम्ही डॉ.आमटे व्हाल व पेशंटचे नातेवाईक तुमच्यावर हल्ले न करता तुमचे गुणगान गातील!

- डॉ. विनय काटे

(टीप- या लेखाचा लेखक मेरिटने MBBS व नंतर IIM अहमदाबाद मधून शिकलेला आहे. 3 वर्ष वैद्यकीय व्यवसाय व 3.5 वर्ष एका नामांकित फार्मा कंपनीत नोकरी करून सध्या इतर क्षेत्रात कार्यरत आहे. त्याचा संघ, भाजप, काँग्रेस व मोदींशी कसलाही संबंध नाही.)

Sunday, April 9, 2017

खंडोबा - साहित्य, सिनेमा, राजकारण इत्यादींचा आदिपुरुष

सांप्रतसमयी महाराष्ट्रदेशी "जय मल्हार" नामक दूरचित्रवाणी मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यामुळे प्रस्तुत अभ्यासकाची उत्सुकता शिगेला जाऊन त्याने श्री खंडोबा यांचे चरित्रअध्ययन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. अभ्यासाअंती अभ्यासकास असे जाणवले की भारत देशच नव्हे तर समस्त विश्वातील साहित्य, चित्रपट, जीवनशैली, स्थापत्य, व्यवस्थापन व राजकारण यांवर श्री खंडोबा यांचा मोठा प्रभाव आहे, थोडक्यात श्री खंडोबा हा सर्वांचाच आदिपुरुष आहे. सदर अभ्यासनिरीक्षणे आम्ही वाचकवर्गापुढे संक्षिप्त रुपात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रतसमयीचा वाचकवर्ग लक्षात घेता खालील सारांश हा बोली मराठीत (हिंदी, इंग्रजी मिश्रित) लिहिणे उचित समजत आहोत!

तर मंडळी, खूप खूप वर्षांपुर्वी दोन दैत्य, मणी आणि त्याचा  धाकटा भाऊ मल्ल, यांच्या तपाला प्रसन्न होऊन ब्रम्हदेवाने त्यांना अजेय राहण्याचा वर दिला, कारण प्रत्येक दैत्याच्या तपावर प्रसन्न होणे व त्यांना असला काहीतरी अभद्र वर देणे हे त्यांच्या विभागाचे कामच होते. हा वर देताना "Great powers come with great responsibilities" असंही ब्रम्हा बोलून गेले (पुढे हे वाक्य Spiderman वाल्यांनी चोरले, हलकट मेले Marvel वाले!), पण वर मिळायच्या आनंदात व पहिलीपासून इंग्रजी न शिकल्याने मणी व मल्ल यांना ते वाक्य कळले नाही. त्यांनी लागलीच पृथ्वीवर येऊन धुमाकूळ घालायला सुरुवात केली, ऋषी लोकांचे आश्रम उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. भयभीत सात ऋषी मिळून आधी इंद्राकडे गेले, तर तो बाबा मेनका, उर्वशीचे डान्स बघण्यात बिझी! सरकारी बाबूंना काम न करायची सवय खूप जुनी आहे. कसंतरी त्याच लक्ष गेलं त्या बिचाऱ्या साधूंकडे, मग साधूंनी त्याचे गाऱ्हाणे गायले. पुन्हा इंद्रातला बाबू जागा झाला आणि त्याने साधूंना पुढच्या टेबलवर (म्हणजे सिनियर देव विष्णूकडे) पाठवले. विष्णुपुढे परत एकदा साधूंनी गाऱ्हाणे गायले, पण विष्णू म्हणाले,"GR ब्रम्हाच्या ऑफिसमधून आलाय, हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, तुम्ही शंकराकडे जा!"

स्वर्गातील लालफित कारभाराला कंटाळून सातही ऋषी गेले शंकराकडे! हा देव बाकी त्यामानाने खूपच सहृदयी होता. त्याने साधूंचे गाऱ्हाणे ऐकले, ब्रम्हाने घातलेला घोळही पाहिला आणि तो भडकला. त्याने तत्काल ब्रम्हाला सक्तीने रिटायर करायची आज्ञा दिली व देवांमध्ये व एकूणच विश्वात निवृत्तीवयाची मर्यादा लागू केली, सोबतच इंद्र व विष्णू यांना 'कारणे दाखवा' नोटीस दिली (सदर माहिती आपणास कुठल्याही देवदरबारी मिळणार नाही, पण मणी-मल्ल नंतर इतक्या वर्षांत कुणालाही असा वर मिळाला नाही यावरून अभ्यासकास मिळालेली ही गोपनीय माहिती सत्य आहे हे सिद्ध होते!). स्वर्गातली लालफितशाही या क्रांतिकारी प्रशासकीय आदेशांनी आटोक्यात आणताच, शंकराने खंडोबाचा अवतार घेतला व मुक्काम जेजुरीला हलवला!

जेजुरीचे राज्य सांभाळताच खंडोबाने लोकप्रिय घोषणा व कार्यांचा धडाका (आपल्या योगींसारखा) लावत प्रजेला आपल्यासोबत केले. स्वत:चा ब्रँड निर्माण करण्यासाठी व सोबतच मनोरंजनासाठी "वाघ्या & मुरळी" नामक PR टीम उभारली जी घरोघर जाऊन खंडोबाचे गुणगान गायला लागली. खंडोबाची किर्ती आता नेवाश्यापर्यंत पोचली आणि तिथे असलेल्या तिर्मारशेठ वाण्याच्या मुलीला, म्हाळसा हिला खंडोबाने मागणी घातली. अत्यंत धुमधडाक्यात खंडोबा व म्हाळसाचा विवाहसोहळा पार पडला आणि सुखाने संसार सुरु झाला. देवगणात खंडोबाच्या विवाहाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव सुद्धा आवाजी मतदानाने पारित झाला. इंद्र, विष्णू व ब्रम्हाने त्यावेळेस जुना राग मनात धरून वॉकआऊट केले होते (मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालायचा उगम येथे आहे).

पण नेहमीप्रमाणे मणी व मल्ल यांनी खंडोबाच्या सुखात मिठाचा खडा टाकायला सुरुवात केली होती. खंडोबाने लागलीच म्हाळसाला सोबत घेत मणी-मल्लावर आक्रमण केले. स्त्रियांना युद्धात बरोबरीने (अगदी स्वतःच्या घोड्यावर) भाग घ्यायला संधी देणारा खंडोबा हा पहिला पुरुष. भारतातल्या स्त्रीमुक्तीवाल्या बायकांनी आता तरी 8 मार्च ऐवजी खंडेनवमीला "आंतरराष्ट्रीय महिला दिन" साजरा करायला हरकत नाही, आणि त्या "दंगल" सिनेमा वाल्यांनी महावीर फोगट च्या आधी खंडोबाचे नाव ऋणनिर्देश मध्ये दाखवायला हवे. पिकते तिथे विकत नाही हेच खरे! स्वतःची स्त्रीच काय अगदी कुत्र्याला सुद्धा खंडोबाने युद्धात सोबत नेले होते दैत्यांवर हल्ला करायला. "'तेरी मेहेरबानिया" व "राजाने वाजवला बाजा" वाल्यांनी तरी किमान खंडोबाचे कुत्रे आधी दाखवावे, पण नाही!! घमासान युद्धात बायको व कुत्रे यांच्या मदतीने (खराखुरा टीम लीडर) खंडोबाने मणी-मल्लला हरवले.

मरणासन्न मणी दैत्याला खंडोबाने विचारले,"मरने से पहले कोई आखरी ख्वाईश?" दैत्य मणीने खंडोबाची क्षमा मागितली, खंडोबाने त्याला "जा, तू भी क्या याद रखेगा की किस अमीर से पाला पडा था!" म्हणत त्याला एक बोकडाच्या नैवेद्याची सोय लावून दिली. मल्ल दैत्याने मात्र खंडोबाकडे सर्वनाशाची व नरमांसाची इच्छा केली. त्यावर खंडोबाने त्याचे मुंडके उडवून लावले, व स्वतःच्या देवळाच्या पायरीखाली पडेल अशी व्यवस्था केली की जेणेकरून प्रत्येक भाविक त्याला तुडवत वर जावा. "दोस्तों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया" असे म्हणत खंडोबाची स्वारी जेजुरीगडावर परत आली. "Mission accomplishment" नंतर खंडोबा आता विसावला होता. (इयान फ्लेमिंग प्रत्येक mission नंतर जेम्स बॉण्डला relaxation ला पाठवतो ते हेच पाहून), आता लवकरच नवीन mission खंडोबाला खुणावणार होते.

"कारणे दाखवा" नोटीस मिळालेला इंद्र परत खंडोबाच्या जवळ जाण्यास आधीपासूनच प्लॅन करत होता. त्याने आपल्या पुत्रीस एका धनगराच्या घरी बालरूपात पोचते केले तिचं नाव बानू! पूढे वयात आलेल्या अत्यंत रुपवती असणाऱ्या बानूस पाहून "बानू मेरी जान! मैं तुझपें कुर्बान!" ("जानु मेरी जान" हे नंतर चोरलेलं गीत) अशी काही खंडोबाची अवस्था झाली. बानूला मिळवण्यासाठी गडावरून दूर जाणे भाग होते. मग खंडोबाने सारीपाटात म्हाळसाकडून मुद्दाम हरत 12 वर्षे अज्ञातवास पत्करला ("हारकर जितनेवाले को बाजीगर कहते हैं!" हे वाक्य शाहरुखच्या तोंडी कुठून आलं कळलं आता?). खंडोबाच्या मनातील मांडे म्हाळसाला कळले व तिने त्याला वृद्धत्वाचा शाप दिला. अज्ञातवासात वृद्ध बनून बानूच्या बापाच्या घरी खंडोबा चाकरीला राहिले, अगदी बाजीगर सारखेच! आणि एके दिवशी बानूच्या धनगर बापाची सारी मेंढरे खंडोबाने जीव मारली, थोडक्यात सारी जायदाद मिट्टीमें! मग खंडोबाने धनगरापुढे अट ठेवली कि तो सगळी मेंढरे जिवंत करेल जर बानूचं त्याच्याशी लग्न लावून दिले तर!

बानूच्या धनगर बापाने खंडोबाच्या दाव्याबाबत संशय व्यक्त करताच खंडोबाने स्वतःच्या देवत्वाची, खऱ्या राजेशाही रूपाची एक झलक दाखवली. (पुढे हीच कथा Beauty & the beast च्या रूपाने इंग्रजांनी चोरली). शब्दानुरूप खंडोबाने भंडारा फुंकून सारी मेंढरे जिवंत केली (एक चुटकी भंडारा की किमत तुम क्या जानो?) आणि मग आजा धनगराने आनंदाने बानूचे खंडोबाशी लग्न लावून दिले. तिकडे इंद्राचा जीव भांड्यात पडला, कारण आता खंडोबा जावई झाला होता, त्यामुळे पुढची प्रशासकीय कार्यवाही टळणार होती. बानूला घेऊन खंडोबा जेजुरी गडावर आले, वाटले घरवापसी ला मोठा सत्कार होईल. पण, सवतीला पाहून म्हाळसा वैतागली आणि मग नवी अडचण आली. खंडोबाने पण हार मानली नाही आणि जेजुरी गडाचा वरचा भाग म्हाळसाला दिला व पायथ्याला बानूला घर दिले. डुप्लेक्स घरांचा शोध अशा रीतीने खंडोबाकडे जातो. फक्त तेवढेच नाही तर गडाच्या वरच्या थंड हवेने म्हाळसाचे डोके शांत राहील हा वैज्ञानिक विचारही त्यामागे होता. "सवत माझी लाडकी", "घरवाली बाहरवाली" इत्यादी सिनेमा आणि "माझ्या नवऱ्याची बायको" सारख्या सिरियल्सचे उगमस्थान याच कथेत आहे, पण वाङ्मयचौर्य करण्यात धन्यता मानणाऱ्या या देशात कुणी खंडोबाचे ऋण थोडेही मानले नाहीत याचा  विषाद वाटतो.

उत्तर आयुष्यात खंडोबाने अजून तीन बायका केल्या रामबाई शिंपीन, फुलाई माळीण आणि कंडाई तेलीन (हे महेश कोठारेंना सांगू नका, नाहीतर अजून 5 वर्ष सिरीयल लांबायची!)! हे करण्यामागे बरीच कारणे होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधी म्हाळसाला फक्त बानूबद्दल मत्सर वाटायचा, आता तो मत्सर चार हिश्श्यात विभागला गेला व अत्यंत कमी व नंतर नाहीसा झाला. दुसरे असे की लिंगायत आणि धनगर समाजानंतर शिंपी, माळी व तेली समाजाशी संबंध जोडत खंडोबाने आपला जनाधार बळकट केला ("सबका साथ, सबका विकास" वाल्यांनी थोडा बोध घ्यावा, आणि राहुल गांधींनी तर खूपच जास्त विचार करावा यावर!). खंडोबाची पाचवी बायको ही मुस्लिम समाजाची आहे अशीही धारणा आहे त्यामुळे मुस्लिमही खंडोबाला आपले दैवत मानतात ("ह्यांची एक बरी घुसखोरी सगळीकडे!" - एक कडवा हिंदू). जात-धर्माच्या भिंती तोडत इतके मोठे सामाजिक अभिसरण करणे त्यानंतर कुठल्याही राजाला व पुरोगामी नेत्याला जमलेले नाहीये. सर्वसमावेशक लोकशाही काय असते हे लिंकनच्याही शेकडो वर्ष आधी श्री खंडोबाने दाखवले आहे. उगीच नाही खंडोबा महाराष्ट्राच्याही बाहेरसुद्धा आजही पुजला जात!

तेव्हा मंडळी, आपणास आता कळून चुकले असेल की राजकारण, समाजकारण, युद्धनीती, महिला सबलीकरण, व्यवस्थापन, प्रशासन आदी अनेक क्षेत्रांत श्री खंडोबा राजाचे योगदान मूलभूत, सक्रिय व अमूल्य आहे. त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगावरून सुद्धा कित्येक मोठे सिनेमे व साहित्यकृती जगभर बनवल्या गेल्या, त्याही त्यांच्याप्रती कसलाही ऋणनिर्देश न करता!! किमान आपण तरी आता श्री खंडोबा रायाचे माहात्म्य ध्यानात घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे (त्यासाठी "समान नागरी कायदा", "लव जिहाद" व "द्विभार्या प्रतिबंधक कायद्या" ला विरोध करावा लागला तरी!)!!

येळकोट येळकोट, जय मल्हार !!!

- डॉ. विनय काटे
९ एप्रिल, २०१७

Saturday, April 1, 2017

शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला -

सतराव्या शतकात जेव्हा या देशात (तसं तेव्हा हा देशही नव्हता) समस्त स्वकीय,परकीय, हिंदू, मुस्लिम राजे, सरंजाम सत्तेच्या हव्यासाने, भोग-ऐश्वर्याच्या लालचीने आपापल्या प्रजेचे यथाशक्ती शोषण करत होते, तेव्हा सह्याद्रीच्या खोऱ्यात नुकतंच मिसरूड फुटलेला एक मुलगा रयतेच्या कल्याणाची भाषा करत होता; त्याच नाव शिवाजी! जेव्हा एका सामान्य सरदाराच्या घरात जन्माला आलेला हा मुलगा लोकांच्या कल्याणासाठी स्वतः राजा बनण्याची स्वप्ने पाहत होता आणि त्यानुरूप जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन समविचारी मावळ्यांचे संघटन करत होता, तेव्हा त्यास कडवा विरोध आणि कुचेष्टा सहन न कराव्या लागल्या तर नवलच होते. पण या सगळ्या स्वकीय-परकीय बलाढ्य विरोधकांना शक्ती व युक्तीने पुरून उरत हा मुलगा पुढे सार्वभौम छत्रपती झाला.

शिवाजी राजांचा हा सगळा प्रवास खरं तर सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे, अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. सतराव्या शतकातील शिवाजीराजे व त्यांचे कार्य एकोणिसाव्या शतकात म. फुलेंनी पोवाड्याच्या रूपाने परत जगासमोर आणले "बहुजनांचा राजा" अशा भूमिकेने आणि पुढे त्यांनी शिवजयंती हा उत्सव पण सुरु केला. लागलीच त्या उत्सवाला उत्तर म्हणून तोच शिवाजीराजा "गोब्राम्हणप्रतिपालक" व "मुस्लिमविरोधी" म्हणून दुसऱ्या विचारधारेने समोर आणला, इतिहासाचे विकृतीकरण आणि शिवाजीचे दैवतीकरण करत! विसाव्या शतकात याच शिवाजीराजाला एका राजकीय पक्षाने परडीत घालून मतांचा जोगवा मागितला. या पक्षासोबत बाकीच्याही पक्षातील सरंजामी नेत्यांनी स्वतःच्या राजकीय गणितांसाठी आणि जातीय-धार्मिक वर्चस्वासाठी शिवाजींचा हा विकृत इतिहास लोकांच्या भावना भडकवायला वापरत दलितांवर-मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार केले व शिवाजीला खऱ्या अर्थाने बदनाम केले.

१९६०-७० च्या सुमारास मा.म.देशमुख आणि गोविंद पानसरेनी शिवाजीचा खरा इतिहास, त्यांचे गुरु, त्यांचे आचार-विचार, सर्वधर्मसमभाव वगैरे गोष्टी जगापुढे आणल्या. पण अपेक्षेकृत त्या त्याच काळात खूप लोकांपर्यंत पोचल्या नाहीत कारण शिवाजीला राजकीय, धार्मिक, जातीय चौकटीत ज्या पद्धतीने सगळ्या लोकांनी कैद केले होते ते पाहता ही नवी संयत मांडणी वाचायला पण बरेच लोक तयार नव्हते. एकविसाव्या शतकात मात्र शिवाजीराजे हा अजूनच जास्त मोठा राजकीय विषय ठरले कारण त्यांना "कुळवाडीभूषण" आणि "गोब्राम्हणप्रतिपालक" असे दाखवणाऱ्या दोन्ही विचारधारा आता तुल्यबळ होत्या. दोन्ही बाजूने विखारी जातीय मते जाहीरपणे बोलली गेली, परदेशी इतिहासकारांच्या पुस्तकावरून व महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरन गदारोळ उठले. आणि गेल्या २ वर्षात तर शिवाजी फक्त ३५०० कोटींच्या स्मारकापुरतेच राहिले आहेत, त्या राज्यात जिथे ५-१० हजारांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात!

खूप मोठी प्रस्तावना झाली, मान्य आहे! कारण "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" पाहायच्या आधी या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. नाटकाची कथा कल्पना आणि वास्तव यांच्या मध्ये आहे. शिवाजींच्या चांगुलपणाने भयभीत होऊन देवांचा राजा इंद्र यमाला शिवाजींचे प्राण आणि त्यांचे विचार पृथ्वीवरून आणायला सांगतो. यम शिवाजींना सोबत घेऊन जातो, पण वाटेत गप्पा मारताना शिवाजीराजे यमाला "मी विचार पृथ्वीवरच विसरून आलो" अशी थाप टाकून तिथून पसार होतात. यमाला निलंबित केले जाते आणि मग सस्पेंड यम पृथ्वीवर शिवाजींचा आणि त्यांच्या विचारांचा शोध घेऊ लागतो. या शोधाच्या दरम्यान शिवाजींचा अतिरंजित पाठयपुस्तकी इतिहास प्रमाण मानणारा धर्मा शाहीर आणि त्याच्याच सोबतचा मिलिंद कांबळे ज्याने शिवाजींचा खरा इतिहास अभ्यासलेला असतो अशा दोघांचा "शाहिरी सामना" होतो एका राजकीय मंचावर! दोन्ही बाजूने शिवाजी सांगितला जातो, वेगवेगळ्या भूमिकेतून आणि वेगवेगळ्या संदर्भातून. शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचे, विचारांचे, आचारांचे, धोरणांचे आणि दूरदृष्टीचे एकेक पदर उलगडत जातात आणि मग अंडरग्राऊंड झालेला (खरंतर केलेला) शिवाजी आपणास नव्याने भेटतो एक कल्याणकारी, मानवतावादी, सर्वधर्मसमभावी राजा म्हणून!

दोन अंकाच्या या नाटकाची संकल्पना आहे शाहीर संभाजी भगत यांची, आणि लेखन आहे राजकुमार तांगडे यांचं. शाहिरी सामना ज्या पद्धतीने यात रंगवला गेला आहे तो लाजवाब आहे, कारण शब्द, आवाज, संगीत, सादरीकरण सगळेच एकदम बेहतरीन आहे. धर्मा शाहिराच्या भूमिकेत संभाजी तांगडे आणि मिलिंद कांबळेच्या भूमिकेत कैलास वाघमारेंनी जो शाहिरी आवाज, जे हावभाव दिलेत त्याला तोड नाहीये. यमाच्या भूमिकेत प्रवीण डाळिंबकरांनी हास्य आणि दाहक वास्तवाचं भान यांचा सुरेख संगम साधलाय. "शाहिरी ही फक्त मर्दांनीच करावी आणि ऐकावी" या सामाजिक संकेताला मिनाक्षी राठोडने मुळापासून सुरुंग लावलाय. संभाजी तांगडे आणि कैलास वाघमारेच्या इतकाच भाव मिनाक्षी खाऊन जाते. बाकीच्याही समस्त पात्रांनी त्यांचे काम तितक्याच ताकदीने केलेले आहे.

रंगमंचावर अजून एक व्यक्ती सतत अदृश्य स्वरूपात वावरते ती म्हणजे दिग्दर्शक नंदू माधव. ज्या तऱ्हेने मोजकीच पात्रे या नाटकात सगळे रंग भरतात त्याचे श्रेय निश्चितच नंदू माधव यांना जाते. रंगमंचाचा, प्रकाशयोजनेचा, संगीताचा आणि प्रत्येक पात्राचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतलाय. धर्मा शाहीर जेव्हा दारू पिऊन एकेक पायरी खाली येतो व जमिनीवर लोळण घेतो, त्यातून सांगितला गेलेला अर्थ खूप गूढ व खोल आहे. मुस्लिम असणारा पाशा जेव्हा त्याचे शिवाजीवरचे प्रेम आणि मुस्लिम सहकाऱ्यांनी राजांसाठी केलेले पराक्रम जेव्हा वर्णन करतो, त्यानंतर त्याच्या मागे जिरेटोप घेऊन जाणारा यम ही रूपके नंदू माधवांनी खूप सुंदर पद्धतीने सादर केलीयेत. कुठेही कसलाही आक्रस्ताळेपणा नाही, कसलेही रक्त पेटवणारे प्रसंग नाहीत... असतील तर फक्त शिवाजींचे कल्याणकारी आचार-विचार सांगून आपल्याला मूलभूत प्रश्न पाडणारे, जाती-धर्माच्या पलीकडे नेणारे सुसंवाद! याबद्दल राजकुमार तांगडे आणि नंदू माधव दोघांचेही करावे तेवढे कौतुक थोडे आहे.

वैयक्तिक बोलाल तर मला शिवाजीराजे खूपदा भेटले चौथीच्या पुस्तकात, मा.म. देशमुखांच्या आणि पानसरेंच्या पुस्तकात, पुरंदरेंच्या पुस्तकात व नाटकात, बाबासाहेब भोसलेंच्या पोवाड्यात, फुलेंच्या पोवाड्यात, कोकाटेंच्या भाषणात, सिरिअल व सिनेमात... आणि दरवेळेस मला त्या लेखकाच्या/शाहिराच्या जातीय-धार्मिक-राजकीय भूमिकांतून खरा शिवाजीराजा वेगळा करावा लागला, परत परत तपासावा लागला. माझा तो शोध आजही सुरु आहे आणि अजूनही सुरु राहील. शिवाजींना मी दैवत म्हणून पाहत नाही, उलट एक असामान्य माणूस, एक कल्याणकारी राजा म्हणून पाहतो. आणि शिवाजींना खरंच समजून घ्यायचं असेल तर शिवाजींना आधी जाती-धर्म-पक्ष यांच्या बंधनातून सोडवले पाहिजे, जे "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" खऱ्या अर्थाने करते. जाती-धर्म-पक्ष यांनी मिळून अंडरग्राउंड केलेल्या शिवाजीला हे नाटक परत तुमच्या समोर उभे करते, मानवी रुपात, जिथे तुम्ही त्यांचा अभ्यास करायला खऱ्या अर्थाने तयार असता. शिवाजीराजांसारख्या असामान्य माणसाला समजून घ्यायच पहिलं पाऊल हे नाटक तुम्हाला नक्की टाकून देत, बाकी पुढची पावलं तुम्हाला स्वतःला टाकावी लागतील डोळसपणे! आणि त्यासाठी एकदा डोळे उघडण्यासाठी तरी हे नाटक पाहणे क्रमप्राप्त आहे!!

- डॉ. विनय काटे

2 एप्रिल, 2017