सतराव्या शतकात जेव्हा या देशात (तसं तेव्हा हा देशही नव्हता) समस्त स्वकीय,परकीय, हिंदू, मुस्लिम राजे, सरंजाम सत्तेच्या हव्यासाने, भोग-ऐश्वर्याच्या लालचीने आपापल्या प्रजेचे यथाशक्ती शोषण करत होते, तेव्हा सह्याद्रीच्या खोऱ्यात नुकतंच मिसरूड फुटलेला एक मुलगा रयतेच्या कल्याणाची भाषा करत होता; त्याच नाव शिवाजी! जेव्हा एका सामान्य सरदाराच्या घरात जन्माला आलेला हा मुलगा लोकांच्या कल्याणासाठी स्वतः राजा बनण्याची स्वप्ने पाहत होता आणि त्यानुरूप जाती-धर्मांच्या पलीकडे जाऊन समविचारी मावळ्यांचे संघटन करत होता, तेव्हा त्यास कडवा विरोध आणि कुचेष्टा सहन न कराव्या लागल्या तर नवलच होते. पण या सगळ्या स्वकीय-परकीय बलाढ्य विरोधकांना शक्ती व युक्तीने पुरून उरत हा मुलगा पुढे सार्वभौम छत्रपती झाला.
शिवाजी राजांचा हा सगळा प्रवास खरं तर सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे, अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. सतराव्या शतकातील शिवाजीराजे व त्यांचे कार्य एकोणिसाव्या शतकात म. फुलेंनी पोवाड्याच्या रूपाने परत जगासमोर आणले "बहुजनांचा राजा" अशा भूमिकेने आणि पुढे त्यांनी शिवजयंती हा उत्सव पण सुरु केला. लागलीच त्या उत्सवाला उत्तर म्हणून तोच शिवाजीराजा "गोब्राम्हणप्रतिपालक" व "मुस्लिमविरोधी" म्हणून दुसऱ्या विचारधारेने समोर आणला, इतिहासाचे विकृतीकरण आणि शिवाजीचे दैवतीकरण करत! विसाव्या शतकात याच शिवाजीराजाला एका राजकीय पक्षाने परडीत घालून मतांचा जोगवा मागितला. या पक्षासोबत बाकीच्याही पक्षातील सरंजामी नेत्यांनी स्वतःच्या राजकीय गणितांसाठी आणि जातीय-धार्मिक वर्चस्वासाठी शिवाजींचा हा विकृत इतिहास लोकांच्या भावना भडकवायला वापरत दलितांवर-मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार केले व शिवाजीला खऱ्या अर्थाने बदनाम केले.
१९६०-७० च्या सुमारास मा.म.देशमुख आणि गोविंद पानसरेनी शिवाजीचा खरा इतिहास, त्यांचे गुरु, त्यांचे आचार-विचार, सर्वधर्मसमभाव वगैरे गोष्टी जगापुढे आणल्या. पण अपेक्षेकृत त्या त्याच काळात खूप लोकांपर्यंत पोचल्या नाहीत कारण शिवाजीला राजकीय, धार्मिक, जातीय चौकटीत ज्या पद्धतीने सगळ्या लोकांनी कैद केले होते ते पाहता ही नवी संयत मांडणी वाचायला पण बरेच लोक तयार नव्हते. एकविसाव्या शतकात मात्र शिवाजीराजे हा अजूनच जास्त मोठा राजकीय विषय ठरले कारण त्यांना "कुळवाडीभूषण" आणि "गोब्राम्हणप्रतिपालक" असे दाखवणाऱ्या दोन्ही विचारधारा आता तुल्यबळ होत्या. दोन्ही बाजूने विखारी जातीय मते जाहीरपणे बोलली गेली, परदेशी इतिहासकारांच्या पुस्तकावरून व महाराष्ट्रभूषण पुरस्कारावरन गदारोळ उठले. आणि गेल्या २ वर्षात तर शिवाजी फक्त ३५०० कोटींच्या स्मारकापुरतेच राहिले आहेत, त्या राज्यात जिथे ५-१० हजारांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात!
खूप मोठी प्रस्तावना झाली, मान्य आहे! कारण "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" पाहायच्या आधी या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. नाटकाची कथा कल्पना आणि वास्तव यांच्या मध्ये आहे. शिवाजींच्या चांगुलपणाने भयभीत होऊन देवांचा राजा इंद्र यमाला शिवाजींचे प्राण आणि त्यांचे विचार पृथ्वीवरून आणायला सांगतो. यम शिवाजींना सोबत घेऊन जातो, पण वाटेत गप्पा मारताना शिवाजीराजे यमाला "मी विचार पृथ्वीवरच विसरून आलो" अशी थाप टाकून तिथून पसार होतात. यमाला निलंबित केले जाते आणि मग सस्पेंड यम पृथ्वीवर शिवाजींचा आणि त्यांच्या विचारांचा शोध घेऊ लागतो. या शोधाच्या दरम्यान शिवाजींचा अतिरंजित पाठयपुस्तकी इतिहास प्रमाण मानणारा धर्मा शाहीर आणि त्याच्याच सोबतचा मिलिंद कांबळे ज्याने शिवाजींचा खरा इतिहास अभ्यासलेला असतो अशा दोघांचा "शाहिरी सामना" होतो एका राजकीय मंचावर! दोन्ही बाजूने शिवाजी सांगितला जातो, वेगवेगळ्या भूमिकेतून आणि वेगवेगळ्या संदर्भातून. शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचे, विचारांचे, आचारांचे, धोरणांचे आणि दूरदृष्टीचे एकेक पदर उलगडत जातात आणि मग अंडरग्राऊंड झालेला (खरंतर केलेला) शिवाजी आपणास नव्याने भेटतो एक कल्याणकारी, मानवतावादी, सर्वधर्मसमभावी राजा म्हणून!
दोन अंकाच्या या नाटकाची संकल्पना आहे शाहीर संभाजी भगत यांची, आणि लेखन आहे राजकुमार तांगडे यांचं. शाहिरी सामना ज्या पद्धतीने यात रंगवला गेला आहे तो लाजवाब आहे, कारण शब्द, आवाज, संगीत, सादरीकरण सगळेच एकदम बेहतरीन आहे. धर्मा शाहिराच्या भूमिकेत संभाजी तांगडे आणि मिलिंद कांबळेच्या भूमिकेत कैलास वाघमारेंनी जो शाहिरी आवाज, जे हावभाव दिलेत त्याला तोड नाहीये. यमाच्या भूमिकेत प्रवीण डाळिंबकरांनी हास्य आणि दाहक वास्तवाचं भान यांचा सुरेख संगम साधलाय. "शाहिरी ही फक्त मर्दांनीच करावी आणि ऐकावी" या सामाजिक संकेताला मिनाक्षी राठोडने मुळापासून सुरुंग लावलाय. संभाजी तांगडे आणि कैलास वाघमारेच्या इतकाच भाव मिनाक्षी खाऊन जाते. बाकीच्याही समस्त पात्रांनी त्यांचे काम तितक्याच ताकदीने केलेले आहे.
रंगमंचावर अजून एक व्यक्ती सतत अदृश्य स्वरूपात वावरते ती म्हणजे दिग्दर्शक नंदू माधव. ज्या तऱ्हेने मोजकीच पात्रे या नाटकात सगळे रंग भरतात त्याचे श्रेय निश्चितच नंदू माधव यांना जाते. रंगमंचाचा, प्रकाशयोजनेचा, संगीताचा आणि प्रत्येक पात्राचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतलाय. धर्मा शाहीर जेव्हा दारू पिऊन एकेक पायरी खाली येतो व जमिनीवर लोळण घेतो, त्यातून सांगितला गेलेला अर्थ खूप गूढ व खोल आहे. मुस्लिम असणारा पाशा जेव्हा त्याचे शिवाजीवरचे प्रेम आणि मुस्लिम सहकाऱ्यांनी राजांसाठी केलेले पराक्रम जेव्हा वर्णन करतो, त्यानंतर त्याच्या मागे जिरेटोप घेऊन जाणारा यम ही रूपके नंदू माधवांनी खूप सुंदर पद्धतीने सादर केलीयेत. कुठेही कसलाही आक्रस्ताळेपणा नाही, कसलेही रक्त पेटवणारे प्रसंग नाहीत... असतील तर फक्त शिवाजींचे कल्याणकारी आचार-विचार सांगून आपल्याला मूलभूत प्रश्न पाडणारे, जाती-धर्माच्या पलीकडे नेणारे सुसंवाद! याबद्दल राजकुमार तांगडे आणि नंदू माधव दोघांचेही करावे तेवढे कौतुक थोडे आहे.
वैयक्तिक बोलाल तर मला शिवाजीराजे खूपदा भेटले चौथीच्या पुस्तकात, मा.म. देशमुखांच्या आणि पानसरेंच्या पुस्तकात, पुरंदरेंच्या पुस्तकात व नाटकात, बाबासाहेब भोसलेंच्या पोवाड्यात, फुलेंच्या पोवाड्यात, कोकाटेंच्या भाषणात, सिरिअल व सिनेमात... आणि दरवेळेस मला त्या लेखकाच्या/शाहिराच्या जातीय-धार्मिक-राजकीय भूमिकांतून खरा शिवाजीराजा वेगळा करावा लागला, परत परत तपासावा लागला. माझा तो शोध आजही सुरु आहे आणि अजूनही सुरु राहील. शिवाजींना मी दैवत म्हणून पाहत नाही, उलट एक असामान्य माणूस, एक कल्याणकारी राजा म्हणून पाहतो. आणि शिवाजींना खरंच समजून घ्यायचं असेल तर शिवाजींना आधी जाती-धर्म-पक्ष यांच्या बंधनातून सोडवले पाहिजे, जे "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" खऱ्या अर्थाने करते. जाती-धर्म-पक्ष यांनी मिळून अंडरग्राउंड केलेल्या शिवाजीला हे नाटक परत तुमच्या समोर उभे करते, मानवी रुपात, जिथे तुम्ही त्यांचा अभ्यास करायला खऱ्या अर्थाने तयार असता. शिवाजीराजांसारख्या असामान्य माणसाला समजून घ्यायच पहिलं पाऊल हे नाटक तुम्हाला नक्की टाकून देत, बाकी पुढची पावलं तुम्हाला स्वतःला टाकावी लागतील डोळसपणे! आणि त्यासाठी एकदा डोळे उघडण्यासाठी तरी हे नाटक पाहणे क्रमप्राप्त आहे!!
- डॉ. विनय काटे
2 एप्रिल, 2017
No comments:
Post a Comment