रा.प.म. - प्रवाशांच्या सेवेसाठी!!
कधी एसटीतल्या कंडक्टर, ड्रायव्हर लोकांचे पगार विचारलेत कुणी? त्यात तो तर कंत्राटी असला तर विचारूच नका. कामाचे तास कधीही दिवसाला 8 पेक्षा कमी नसतात आणि ओव्हरटाईमला गाजराचा भाव मिळत नाही. दूर अंतराच्या गाडीने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहायला डेपोत जेलच्या तोडीची सोय असते. ना झोपायला गादी, ना चांगले जेवण, ना स्वच्छ टॉयलेटची सोय. स्वतःच्या घरून आणलेल्या सतरंज्या असल्या तर ठीक नाहीतर वर्तमानपत्राच्या घडीवर झोपायचे. एसटीच्या डेपोतल्या कँटीनमध्ये चांगले जेवण मिळत नाही, म्हणून मग कुठल्यातरी रोडलगतच्या ढाब्यावर अनधिकृत स्टॉप घेऊन थोडा पोटाला आधार दयायचा आणि प्रवासीपण खुश की किमान चांगल्या जागी खायला थांबलोय. डेपोत भरणा करताना रकमेत नजरचुकीने जरी तूट आली की रक्कम स्वतःच्या खिशातून भरा नाहीतर निलंबन आहेच!
जितक्या एसटीच्या गाड्या मोडकळीला आलेल्या आहेत, त्याहीपेक्षा जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांची आयुष्य फाटलेली आहेत. तुटपुंज्या पगारावर वर्षानुवर्षे काम करत एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रवाशांची व सामानाची ने-आण केलीय. पण याबदल्यात त्यांना ना व्यवस्थित पगार मिळाला, ना काही सोयीसुविधा. दिवसेंदिवस एसटीची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे कारण भ्रष्टाचार करण्यासाठी हे महामंडळ एक चांगले कुरण आहे. आणि प्रत्येक सरकारने कधीही एसटीला फायद्यात चालवावे यासाठी कसलेही प्रयत्न करायचे नाहीत यावर एकमत ठेवलंय.
गेले 2 दिवस, ऐन दिवाळीत एसटीचा संप चालू असताना सरकारला त्यामुळे होणारी गैरसोय दिसतच नाहीये. एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे याचा विसर सरकारला पडलेला दिसतोय. म्हणूनच कुणी शहाण्या मंत्र्याने त्यावर थोडीही काळजीपूर्वक भूमिका घेतली नाही. दिवाकर रावते म्हणतात की "सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. अजून 25 वर्षे तुम्हाला सातवा वेतन आयोग देता येणार नाही." वेतन आयोग दर दहा वर्षांनी येतो याची रावतेंना कल्पना नाहीये का? आणि पुढची 25 वर्षे तेच परिवहनमंत्री असणार आहेत हे काय त्यांच्या कपाळावर लिहिलंय का? ज्या सरकारकडे शिवाजींचा पुतळा उभारायला 3600 कोटी रुपये असतात, सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करायला द्यायला 300 कोटी रुपये असतात तिथे एसटी सारख्या सामान्य माणसाच्या अत्यावश्यक गोष्टीला द्यायला पैसे नाहीत? ही मुजोरी येते कुठून?
रावतेंच्याच पावलावर पाऊल ठेवून चंद्रकांत पाटील साहेब म्हणतायत की लोक एसटी कर्मचाऱ्यांना ठोकून काढतील. मंत्रीमहोदयांना एक आवर्जून सांगावे वाटते की इथले लोक गरीब व अशिक्षित दिसत असले तरी मूर्ख नाहीयेत की तुमच्या सरकारच्या पापाची फळं ते सामान्य एसटी कर्मचाऱ्यांना भोगायला लावतील. पाटील साहेब, तुम्ही निश्चिन्त राहा, कुठेही एसटी कर्मचाऱ्यांना सामान्य महाराष्ट्रीय माणूस मारहाण करणार नाहीये. पण, तुम्ही व रावते साहेब मिळून संप मिटवण्याऐवजी संप चिघळण्याची शक्यता जास्त होईल अशी वक्तव्ये करत राहिलात तर तुमचे पुढच्या वेळी निवडून येणे अवघड राहील. सत्तेत आल्यावर सामान्य माणसाला सामान्य एसटी कर्मचाऱ्याचा अंगावर सोडून आपण शांतपणे तमाशा बघावा हे तुमचे स्वप्न साकार होणार नाहीये. 25 वर्षे सोडा, 25 महिन्यांनी तुमच्याकडे ही खुर्ची असेल का याची चिंता करा!!
- डॉ. विनय काटे