Wednesday, October 18, 2017

एस टी

रा.प.म. - प्रवाशांच्या सेवेसाठी!!

कधी एसटीतल्या कंडक्टर, ड्रायव्हर लोकांचे पगार विचारलेत कुणी? त्यात तो तर कंत्राटी असला तर विचारूच नका. कामाचे तास कधीही दिवसाला 8 पेक्षा कमी नसतात आणि ओव्हरटाईमला गाजराचा भाव मिळत नाही. दूर अंतराच्या गाडीने जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहायला डेपोत जेलच्या तोडीची सोय असते. ना झोपायला गादी, ना चांगले जेवण, ना स्वच्छ टॉयलेटची सोय. स्वतःच्या घरून आणलेल्या सतरंज्या असल्या तर ठीक नाहीतर वर्तमानपत्राच्या घडीवर झोपायचे. एसटीच्या डेपोतल्या कँटीनमध्ये चांगले जेवण मिळत नाही, म्हणून मग कुठल्यातरी रोडलगतच्या ढाब्यावर अनधिकृत स्टॉप घेऊन थोडा पोटाला आधार दयायचा आणि प्रवासीपण खुश की किमान चांगल्या जागी खायला थांबलोय. डेपोत भरणा करताना रकमेत नजरचुकीने जरी तूट आली की रक्कम स्वतःच्या खिशातून भरा नाहीतर निलंबन आहेच!

जितक्या एसटीच्या गाड्या मोडकळीला आलेल्या आहेत, त्याहीपेक्षा जास्त एसटीच्या कर्मचाऱ्यांची आयुष्य फाटलेली आहेत. तुटपुंज्या पगारावर वर्षानुवर्षे काम करत एसटी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रवाशांची व सामानाची ने-आण केलीय. पण याबदल्यात त्यांना ना व्यवस्थित पगार मिळाला, ना काही सोयीसुविधा. दिवसेंदिवस एसटीची आर्थिक अवस्था बिकट होत चालली आहे कारण भ्रष्टाचार करण्यासाठी हे महामंडळ एक चांगले कुरण आहे. आणि प्रत्येक सरकारने कधीही एसटीला फायद्यात चालवावे यासाठी कसलेही प्रयत्न करायचे नाहीत यावर एकमत ठेवलंय.

गेले 2 दिवस, ऐन दिवाळीत एसटीचा संप चालू असताना सरकारला त्यामुळे होणारी गैरसोय दिसतच नाहीये. एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे याचा विसर सरकारला पडलेला दिसतोय. म्हणूनच कुणी शहाण्या मंत्र्याने त्यावर थोडीही काळजीपूर्वक भूमिका घेतली नाही. दिवाकर रावते म्हणतात की "सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. अजून 25 वर्षे तुम्हाला सातवा वेतन आयोग देता येणार नाही." वेतन आयोग दर दहा वर्षांनी येतो याची रावतेंना कल्पना नाहीये का? आणि पुढची 25 वर्षे तेच परिवहनमंत्री असणार आहेत हे काय त्यांच्या कपाळावर लिहिलंय का? ज्या सरकारकडे शिवाजींचा पुतळा उभारायला 3600 कोटी रुपये असतात, सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करायला द्यायला 300 कोटी रुपये असतात तिथे एसटी सारख्या सामान्य माणसाच्या अत्यावश्यक गोष्टीला द्यायला पैसे नाहीत? ही मुजोरी येते कुठून?

रावतेंच्याच पावलावर पाऊल ठेवून चंद्रकांत पाटील साहेब म्हणतायत की लोक एसटी कर्मचाऱ्यांना ठोकून काढतील. मंत्रीमहोदयांना एक आवर्जून सांगावे वाटते की इथले लोक गरीब व अशिक्षित दिसत असले तरी मूर्ख नाहीयेत की तुमच्या सरकारच्या पापाची फळं ते सामान्य एसटी कर्मचाऱ्यांना भोगायला लावतील. पाटील साहेब, तुम्ही निश्चिन्त राहा, कुठेही एसटी कर्मचाऱ्यांना सामान्य महाराष्ट्रीय माणूस मारहाण करणार नाहीये. पण, तुम्ही व रावते साहेब मिळून संप मिटवण्याऐवजी संप चिघळण्याची शक्यता जास्त होईल अशी वक्तव्ये करत राहिलात तर तुमचे पुढच्या वेळी निवडून येणे अवघड राहील. सत्तेत आल्यावर सामान्य माणसाला सामान्य एसटी कर्मचाऱ्याचा अंगावर सोडून आपण शांतपणे तमाशा बघावा हे तुमचे स्वप्न साकार होणार नाहीये. 25 वर्षे सोडा, 25 महिन्यांनी तुमच्याकडे ही खुर्ची असेल का याची चिंता करा!!

- डॉ. विनय काटे

Saturday, October 14, 2017

जपानच्या सेवेत भारतीय अष्टप्रधान मंडळ

प्रिय शिंजो आबे (प्रधानसेवक, जपान) काका,

भारतातून 3 लाख युवकांना जपानला नेऊन त्यांना प्रशिक्षण वगैरे देऊन त्यातल्या काहींना तिथेच नोकरी देणार असला काही करार तुम्ही जपानी लोक आमच्या देशाशी करताय हे ऐकायला मिळालं. मला एक कळलं नाही की विश्वगुरु असणाऱ्या आमच्या देशातल्या युवकांना काही शिकवायची तुमची लायकी तरी आहे का? एकतर तुमची लोकसंख्या टीचभर, त्यामुळे "मेरे सवासों करोड देशवासीयों.." म्हणण्यातला गर्व तुम्हाला कधी कळणार नाही. त्यात तुमच्या एका येनला आमच्या ६० पैशाची किंमत (तुमचा GDP असेना का आमच्या अडीचपट, आम्हाला त्याच काय?), तुमच्या बुलेट ट्रेनच्या आधी कित्येक युगे आम्ही विमाने आणि अण्वस्त्रे बनवली आणि तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवणार?

आबे काका, तुमच्या भल्यासाठी सांगतो, आमचे 3 लाख युवक तिकडे नेण्यापेक्षा तुमच्या मागास देशाला आमच्या देशासारखा विश्वगुरु बनवण्यासाठी आम्ही आमच्या देशातील काही महान व्यक्तिमत्वे तुमच्याकडे "अष्टप्रधानमंडळ" या जबाबदारीवर कायमची पाठवायला तयार आहोत. त्यांचे कर्तृत्व ऐकून नाही तुमच्या घशात मोमो अडकला तर नाव बदलून ठेवेन स्वतःचे! आता हे अष्टप्रधानमंडळ बघा -

१) नरेंद्र मोदी - जगातल्या प्रत्येक देश आणि गाव हे त्यांचं "दुसरं घर" आहे आणि प्रत्येकाशी त्यांचा जुना संबंध आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला लाखोंची गर्दी होते आणि सोबत रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी! अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, कला, साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहास, भूगोल आदी प्रत्येक गोष्टीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या दरवर्षीच्या "Vibrant Gujrat" मेळ्यात लाखो कोटी डॉलर्सचे MoU परकीय लोक करतात ("प्रत्यक्षात रुपया येत नाही" हे काय सांगताय आम्हाला?), त्यांनी गुजरातचा इतका विकास केला की भारतातल्या साऱ्या कंपन्या आणि शिकलेले लोक मुंबई, बंगलोर, दिल्ली, पुणे, हैद्राबाद सोडून आता फक्त अहमदाबादला जायला आतुर आहेत. तुमच्या टोकियोपेक्षा महाग फ्लॅट व जमीन अहमदाबाद मध्ये आहे. आणि आमच्या मोदीजींनी 70 वर्षे न सुटलेल्या आतंकवाद, काळे धन, स्त्रीभ्रूणहत्या अशा कित्येक समस्या नुसत्या सेल्फी घेऊन व रात्रीत नोटबंदी करून सोडवल्या आहेत. तूम्ही तुमच्या जागी मोदींना बसवा आणि बघा, गेल्या 70 वर्षांत तुम्हाला जे जमलं नाही ते आमचे मोदीजी चुटकीसरशी करून दाखवतील.

२) योगी आदित्यनाथ - वैराग्य आणि सत्ता यांचा इतका सुरेख संगम तुम्हाला कुठेही मिळणार नाही. जपानमधल्या वेगवेगळ्या मठातील साधूंना ते लवजिहाद थांबवणे वगैरे कामे देऊन त्यांना काही कामाला तरी लावतील. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागतिक दर्जाची हॉस्पिटल कशी चालवायची हे ते तुम्हाला शिकवतील. उगी तुमच्या लोकांना आजारपणाच्या उपचारासाठी गोरखपूरला यायची गरज नाही पडणार.

३) अरुण जेटली - अर्थशास्त्राचे यांचे ज्ञान इतके अगाध आहे की विचारू नका. रात्रीत केलेल्या नोटबंदीचे समर्थन कसे करावे, GST च्या गोंधळाला नावाजावे कसे हे ते तुम्हाला शिकवतील. त्यांच्या निर्णयांना विरोध करणारे लोक कसे संकुचित, छिद्रान्वेषी आणि राष्ट्रद्रोही आहेत हे ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकतात ते. ते तुमच्या अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकतील.

४) मोहन भागवत - तुमच्या देशाच्या दुःखाचे खरे कारण म्हणजे तुमची कमी असणारी लोकसंख्या आहे हे ते पटवून देतील. एका बाईने चार मुले जन्माला कशी व का घालावी यावर ते जपानी बायकांचे प्रबोधन करतील.

५) सुषमा स्वराज - उत्तर कोरियाच्या किम जोंगला व त्याच्या मिसाईलला घाबरायची गरज तुम्हाला पडणारच नाही. यांना घेऊन जा आणि बघा "एक मिसाईल के बदले दस मिसाईल" कशा सोडतात त्या ते.

६) राजनाथ सिंग - प्रत्येक कायदा सुव्यवस्था बिघाडणाऱ्या घटनेवर काहीही न करता निष्काम कर्मयोगाने "कडी निंदा" कशी करावी याचे सुंदर प्रात्यक्षिक ते तुम्हाला देतील. त्यांच्या कड्या निंदेने मतपरिवर्तन होऊन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद वगैरे अतिरेकी व भारतातले नक्षलवादीही आजकाल अहिंसेच्या मार्गाने जाण्याच्या विचारात आहेत.

७) अनिल बोकील - इंजिनिअरिंग करून बेरोजगार राहण्यापेक्षा "हौशी अर्थशास्त्रज्ञ" बनून देश बदलता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण असणारे बोकील तुमच्या देशातल्या बेरोजगार इंजिनिअरना अर्थपूर्ण कामाला लावून तुमच्या देशातही अर्थक्रांती आणतील.

८) धर्मेंद्र प्रधान - अमेरिकेत आलेल्या वादळाने भारतात पेट्रोलचे भाव वाढतात हे महान संशोधन करणारे प्रधान भौगोलिक, खगोलीय घटना आणि त्याचे तेलाच्या किंमतीवर होणारे परिणाम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजावून तुमचे अब्जावधी येन येनकेनप्रकारेण वाचवतील.

शिंजो आबे काका, आमच्या देशात कुणाला काहीही देताना चांगले देतात. सबब कमी शिकलेले तीन लाख युवक तिकडे पाठवून तुमचा खर्च वाढवण्याऐवजी आम्ही हे अष्टप्रधानमंडळ तुमच्याकडे कायमचे पाठवायला तयार आहोत. मला माहित आहे की यात आमचे फार मोठे नुकसान आहे पण तुम्ही नाही का आम्हाला बुलेटट्रेन फुकटात दिली, म्हणून हे अष्टप्रधान मंडळ आम्ही तुम्हाला फुकटात देऊ इच्छितो. त्यांच्या जपानला जाण्याने आमच्या देशाचे होणारे संभाव्य नुकसान आम्ही कसेतरी भरून काढू. आणि आमचे अष्टप्रधान मंडळ तिकडे गेल्यावर हे जपानला जाणारे तीन लाख युवक भारतातच नोकरीला लागतील याची आम्हास खात्री आहे!

तेव्हा आबे काका अजिबात उशीर करू नका. पुढच्या विमानाने ह्यांना घेऊन जा आणि जपानला विश्वगुरू बनवून टाका. आम्हाला आता विश्वगुरू बनून राहायचा कंटाळा आलाय.

तुमचा शुभचिंतक -

डॉ. विनय काटे

Wednesday, October 4, 2017

आयुष्य सुंदर आहे!

४-५ हजार वर्षांपूर्वीचे राम-कृष्ण, अडीच हजार वर्षांपूर्वीचे बुद्ध-महावीर, दोन हजार वर्षांपूर्वीचा येशू आणि दीड हजार वर्षांपूर्वीचा पैगंबर हे लोक त्यांच्या काळात, त्यावेळच्या समाजात खूप मोठे दार्शनिक/तत्त्ववेत्ते व विवेकाचा आवाज असतीलही. पण, आजच्या काळातल्या समस्त प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे निश्चितच नाहीयेत. प्रत्येक क्षणाला तंत्रज्ञानामुळे जग लहान होत चाललंय, विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतायत, नवीन प्रकारच्या मानवी क्रिया-प्रतिक्रिया निर्माण होतायत. आणि त्यामुळे प्रत्येक क्षणाला नवनवीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, तात्विक स्वरूपाच्या मानवी समस्या निर्माण होतायत.

या समस्या जर फक्त विशिष्ट धर्माच्या नितीमूल्यांनी आपण सोडवायला गेलो तर जगात फक्त धार्मिक/सांस्कृतिक लढे होतील, आणि ते आता होताना आपण पाहायला लागलोय. दुसऱ्या व्यक्तीला, धर्माला किंवा संस्कृतीला आम्ही tolerate (सहन) करतो किंवा आम्ही tolerant आहोत हेच मुळात दर्शवते की आम्हाला दुसरी व्यक्ती, त्याचा धर्म किंवा संस्कृती रुचत नाही. फक्त आम्हाला त्याच्याविरुद्ध काही करता येत नाही म्हणून आम्ही ते tolerate करतो. पण जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही आमच्यातले जनावर बाहेर येऊ देतो आणि दुसऱ्या माणसाला त्याच्या जाती, धर्म, देश, संस्कृती आदी गोष्टींवरून एखाद्या ठिकाणाहून हुसकून लावतो, बहिष्कृत करतो, बलात्कार करतो व प्रसंगी जीवही मारतो. आणि हे करायला आम्हाला धर्म किंवा राष्ट्रवाद एक फसवे नैतिक अधिष्ठान देतो.

धर्माच्या, संस्कृतीच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली आम्ही दुसऱ्या माणसाचे अस्तित्व संपवायला थोडेही मागेपुढे पाहत नाही. आमच्या मनात कधीही हा विचार चुकूनही येत नाही की ज्या धर्माची, देशाची किंवा संस्कृतीची पताका आम्ही खांद्यावर घेतलीय, त्या धर्मात, देशात, संस्कृतीत आमचा जन्म एका अपघाताने झालाय, तो काही आम्ही निवडलेला नाही. म्हणजे मला हिंदू, मुस्लिम वगैरे म्हणूनच आणि त्यातही भारत देशातच जन्मायचं होतं असं ठरवून कुणीही जन्मत नाही. पण मग जन्मल्यापासून आपलाच धर्म, देश, संस्कृती श्रेष्ठ हा अहंकार आपल्या नकळत्या मेंदूत मोठ्या व्यक्तींकडून ठासून भरला जातो. आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या मुर्खपणे सुरू राहते.

गंमतीचा भाग हा की बहुसंख्य लोकांना या धर्माच्या, देशाच्या, संस्कृतीच्या जोखडातून मुक्त व्हावे वाटते. पण संख्येने कमी असणाऱ्या कट्टर अभिमानी लोकांना काय वाटेल, ते आपल्यावर रागावतील, आपल्याला बहिष्कृत करतील याचा विचार करून भीतीने हे बहुसंख्य लोक निमूटपणे या व्यवस्थेत आपला सहभाग चालू ठेवतात. ही कळपाची मानसिकता माणसाला स्वतंत्रपणे आयुष्य कधी जगूच देत नाही. आपल्याला जर खरेच ह्या जगात शांतता पाहायची असेल तर सर्वांनाच ह्या धर्मप्रेमाच्या, राष्ट्रवादाच्या, सांस्कृतिक अभिमानाच्या बेड्या आपल्या हातापायांतून काढून फेकून स्वतःला व दुसऱ्या माणसाला फक्त माणूस म्हणून पाहावे लागेल. याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. मी तरी ह्या स्वातंत्र्यात आनंदाने जगायला सुरुवात केलीय, कारण कुठल्यातरी देव, देश, धर्म व संस्कृतीसाठी स्वतःच अमूल्य आणि एकदाच मिळणारे मानवी आयुष्य वाया घालवणे मला योग्य वाटत नाही. तुम्हाला जमतंय का बघा!

- डॉ. विनय काटे