आपण सर्वांनीच शालेय पाठयपुस्तकात पहिल्या पानावर छापलेली एक प्रतिज्ञा वाचली असेलच... "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..." वगैरे. माझ्या शाळेत तर आधी अंगणात उभा राहून प्रतिज्ञा म्हणा आणि मग बाकी गोष्टींना सुरुवात. कुणाला माहिती आहे ही प्रतिज्ञा कोठून आली? आंध्रप्रदेशातील पी.व्ही. सुब्बाराव नावाच्या एका सरकारी बाबूने १९६२ साली ही प्रतिज्ञा लिहिली आणि १९६३ साली ती काही शाळांमध्ये म्हणाली जाऊ लागली. पुढे ती प्रमुख भारतीय भाषांत भाषांतरित झाली आणि समस्त पाठयपुस्तकांत विराजमान झाली. या प्रतिज्ञेचा प्रवास आणि सत्यनारायणाच्या पूजेचा प्रवास बऱ्यापैकी एकाच पठडीतला आहे, कारण दोन्हींनाही अधिकृत मान्यता नाही आणि दोन्हीही बाष्कळ थोतांड आहेत! प्रतिज्ञा हा काय भंकस आहे हे आपण सविस्तर पाहूया.
सर्वांत प्रथम एक लक्षात ठेवा की, आपण एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक आहोत आणि आपला देश हा भारतीय संविधानानुसार चालतो, संविधानाला प्रमाण मानून चालतो. म्हणजे आपल्या देशाला "भारत" किंवा "India" म्हणायचं (हिंदुस्थान नाही) हे संविधान सभेने ठरवले आणि संविधानात ठरावपूर्वक संमतीनंतर लिहिले. "जन गण मन" हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत असेल हे सुद्धा संविधान सभेने २४ जानेवारी १९५० ला ठरावपूर्वक संमत केले. आणि ही प्रतिज्ञा ही १९६२ सालची आहे, आणि कुठलाही संवैधानिक संशोधन/दुरुस्ती करून ती संविधानात स्वीकारली गेलेली नाहीये किंवा तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा दिला गेलेला नाहीये. माझ्या आकलनानुसार तरी असे काही अध्यादेश अस्तित्वात नाहीयेत. थोडक्यात, हे एक सरकारी बाबूने त्याच्या मनाने लिहिलेले आणि अनधिकृतपणे सर्वांवर थोपवले गेलेले एक कागदपत्र आहे.
आता आपण एकेक करून या प्रतिज्ञेच्या ओळी पाहूयात.
"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..." देशाचे नाव हे संविधान आधीच सांगते. बंधुत्व पण संविधानाच्या प्रस्तावनेत आहेच. आणि देशावर प्रेम म्हणजे नेमकं काय? आणि ते प्रतिज्ञेवार सांगायचं म्हणजे काय? यात काय नवीन शोध लावलाय तुम्ही??
"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन..." थोडा विचार करा आणि सांगा कसली परंपरा?? सतीची परंपरा, देवदासीची परंपरा, भ्रूणहत्येची परंपरा, अस्पृश्यतेची परंपरा, हुंड्याची परंपरा की अजून काही महान परंपरा??? मला तरी माझ्या देशातल्या कुठल्या महान(?) परंपरांचा अभिमान नाहीये. आणि या असल्या परंपरांचा पाईक व्हायचं?? आणि तो पाईक व्हायला पात्रता??? काहीही हां!!! आमचे संविधान, आमचे दंडविधान असल्या कुठल्याही परंपरेला भीक घालत नाही. पण संविधान वाचते कोण? एकतर सिव्हिल सर्विसेस मध्ये जाणारी लोक किंवा वकिलीचे विद्यार्थी, तेही अभ्यासक्रम म्हणून... रुचीने नाही! आमची न्यायालये या परंपराना ठोकून काढतात आणि शिक्षण खाते म्हणते परंपरांचा पाईक व्हा! आणि लहानपणा पासून रोज डोक्यात भरलं गेलेलं हे प्रतिज्ञेतील परंपरेचं, तिच्या पाईक होण्याच्या आग्रहाचं भूत मानगुटीवर एकदा बसलं की मग सुरु होते लढाई संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध, मूलभूत हक्कांविरुद्ध! मग तोडले जातात पुतळे; झोडले जातात इतिहासकार, कलावंत, विचारवंत; मारले जातात दाभोळकर, पानसरे; आणि फोडल्या जातात इतिहास संशोधन संस्था!! कारण काय, तर प्रतिज्ञेत सांगितले आहे परंपरांचा अभिमान बाळगा, पाईक व्हा आणि त्यासाठी प्रयत्न करा! हो ना? संविधान थोडीच छापलंय पाठयपुस्तकात!
"मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन..." मी म्हणतो कशासाठी? पालकांनी रस्त्यावर टाकून दिले तरी मान ठेवायचा? गुरुजनांनी बलात्कार केले तरी मान ठेवायचा? वडीलधारी लोकांनी मनात जाती-धर्माचं विष कालवलं तरी मान द्यायचा? हे बोलायला, मूल्यशिक्षण म्हणून थोडा वेळ टाईमपास म्हणून ऐकायला ठीक आहे, पण प्रतिज्ञेवार हे बोलायचं? का बाबा? आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागायचं म्हणजे नेमकं काय? ते हिंदुत्ववादी संघटनांच्या पुस्तकांत "आदर्श बालक" ची चित्रे असतात ना आंघोळ, पूजा, नमस्कार करताना वगैरे, तसला हा प्रकार आहे.
"माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे." देशाशी निष्ठा राखणे म्हणजे नेमकं काय हे संविधान व्यवस्थित सांगते. आणि देशबांधवांशी निष्ठा म्हणजे नेमके काय हे तर संविधानाच्या प्रस्तावनेत खूप सुंदर पद्धतीने सांगितले गेले आहे. मग, हा नवीन खटाटोप कशासाठी?? देशावरचे प्रेम म्हणजे नेमके काय हे प्रतिज्ञा वाचून कळतच नाही, म्हणून तर आपल्या आजूबाजूला इतके विखारी देशभक्त दिसतात जे आपण काहीही बोललं की आपल्याला पाकिस्तानात पाठवायला तत्पर असतात, आपल्या आई-बहिणींना "सारे भारतीय माझे बांधव आहेत" हे विसरून शिव्या-शाप देतात. करणार काय शेवटी हे बिचारे लोक? त्यांना कुणी देशाशी निष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीशी, धर्माशी किंवा पक्षाशी निष्ठा नाहीये हे सांगतच नाही. ते बिचारे आपला नेता, पक्ष, धर्म यांनाच देश समजून त्यांच्याविरुद्ध मत व्यक्त करणाऱ्या लोकांना थेट देशद्रोही वगैरे बोलतात. चूक त्यांची नाही, चूक शिक्षण विभागाची आहे ज्यांनी एका बाबूने लिहिलेला बहुतांशी संविधानविरोधी कागद समस्त भारतीय मुलांच्या मेंदूत घुसवला, कसलाही विचार न करता!
भारतीय म्हणून खऱ्या अर्थाने आणि अधिकृतपणे जर कुठली प्रतिज्ञा आपण सर्वांनी केलेली आहे तर ती म्हणजे भारतीय संविधानाची प्रस्तावना "We the people of India..." महिन्यातून एकदा तरी हे संविधानाची प्रस्तावना आणि त्यातील एकेका शब्दाचा अर्थ जर गेल्या ६६ वर्षात शालेय मुलांना शिकवला गेला असता तर आज आपण लोकशाही म्हणून खूप प्रगत झालो असतो. घटनेतील मूलभूत हक्क आणि त्यासाठी असणारे थेट उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण हे जर देशातल्या प्रत्येकाला लहानपणा पासून कळले, समजावून सांगितले गेले आणि मुलांच्या अंगी बाणवले गेले तर आज जी भयावह परिस्थिती दिसतेय ती कदाचित दिसली नसती. देश म्हणजे काय, देशाशी निष्ठा म्हणजे काय, देशबांधव म्हणजे काय हे खूप सुंदर पद्धतीने संविधान सांगते, जे आमच्या देशातील पहिल्या पिढीतील शहाण्या लोकांनी सर्वसंमतीने बनवले आहे. पण त्याचे महत्व समजावून घेतो कोण? नागरिकशास्त्र हे थेट ८ वीला शिकवायचे आणि तेसुद्धा फक्त २५ मार्कांना! मग कशाला कुणी शहाणा नागरिक तयार होईल या देशात??
तुम्ही ती भाकड प्रतिज्ञा डोळे झाकून म्हणत बसा... मी तिला फाट्यावर मारतो. माझ्यासाठी संविधान पुरेसे आहे!
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment