Monday, February 6, 2017

निवडणूक -

ग्रामपंचायत सदस्य पासून राष्ट्रपतीपदापर्यंत,
रिऍलिटी शोच्या विजेत्यापासून सरकारी पुरस्कारापर्यंत,
प्रत्येक निवडीच्या आणि निवडणुकीच्या आधी -

धोक्यात आलेला असतो हिंदू धर्म,
जिहादचा एल्गार देत असतो ईस्लाम,
अस्तित्वासाठी धडपडतात बौद्ध-जैन-शीख व ईसाई,
पिचलेले असतात दलित-आदिवासी-स्त्रिया,
स्वाभिमान दुखावलेले असतात क्षत्रिय,
तोट्यात गेलेले असतात वैश्य,
आणि हवालदिल असतात ब्रम्हवृंद!

दुखावलेली असते प्रत्येक प्रादेशिक अस्मिता,
तोडलं जाणार असत एक शहर राज्यापासून,
संकटात सापडलेली असते प्रत्येक भाषा,
कला-साहित्यात सुद्धा शिरलेलं असतं राजकारण,
नाकारले गेलेले असतात राजकीय वारसाहक्क,
असमतोल झालेला असतो विकास,
आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या गळ्यात असतो फास!

म्हणून मग प्रत्येक निवड, निवडणूक असते एक संधी,
समस्त अन्यायांवर विजय मिळवायची,
समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणायची,
विकास आणि ऐश्वर्य आणायची,
अस्मितांना तेवत ठेवण्याची,
समस्त नागरिकांच्या हक्काला मिळवण्याची,
कुणाच्याही बापाला न भिता!

रंगतात भिंती, वाजतात भोंगे,
भावनिक आवाहनांची रेलचेल होते,
धुरळा उडतो आंधळे करून टाकण्याइतका,
प्रत्येक माणसाला, जाती-धर्माला, प्रांताला,
कुणीच कुणाला कमी नसतो मग,
मार्क्स, शिवाजी, गांधी, आंबेडकर पण उतरतात यात,
एकमेकांशी युती-युद्ध-तह करायला,
आणि दिसतो एक chaos सर्वत्र!

निकाल, निवडी जाहीर होतात शेवटी,
थांबतात चर्चांची एरंडाची गुऱ्हाळे,
धूसर होतात अस्मिता, वाद आणि भीती,
सुरळीत होतात आयुष्य आणि ताणलेले संबंध,
हरल्या-जिंकल्या उमेदवारांचे फ्लेक्स फाटून जातात,
रंगलेल्या भिंतींवर मुताचे ओघळ पुसून टाकतात,
सगळ्या वल्गना, प्रतिज्ञा, वचने आणि आश्वासने,
कपाटात जाऊन बसतात सगळे महापुरुष,
सुटकेचा निश्वास टाकतात समस्त भाषा, जाती, धर्म,
पुढच्या खेळाची तारीख जाहीर होईपर्यंत !

लोकशाहीचं तुंबलेल संडास फ्लश होऊन तयार असते,
परत नव्या घाणीचे सहर्ष स्वागत करायला!!

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment