काल SSC चा निकाल लागला आणि थोड्या घरात दिवाळी तर बहुसंख्य घरात शिमगा झाला असणार. यशाचे सगळे आईबाप असतात पण अपयश अनाथ असते असे म्हणतात. पण खरच एका परीक्षेतल यश-अपयश काय आयुष्य ठरवत का? माझा मुलगा/मुलगी किंवा मी हा नेहमी प्रथम क्रमांकावर असला पाहिजे किंवा नेहमी यशस्वी असला पाहिजे हा कसला अवास्तव अट्टाहास? खोलात जावून विचार करून बघा, किती विषय असतात SSC ला? तर ६, आणि त्यातले पण सर्वोत्तम ५ चे मार्क घेवून तुम्ही किंवा तुमचा पाल्य यशाचा टेंभा मिरवणार किंवा तोंड लपवून बसणार.
जगात ज्ञानाच्या असंख्य शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेत अमर्याद ज्ञान आहे. कुठल्या गाढवाने तुम्हाला सांगितलं की SSC किंवा HSC च्या ६ विषयातल्या मार्कांवर तुमचं करिअर, आयुष्य अवलंबून आहे. विद्यार्थ्याचे खेळातले प्राविण्य, संगीतातले कौशल्य, विनोदबुद्धी, साहित्यिक अभिरुची, चौकसबुद्धी, निरीक्षणक्षमता, संभाषणकौशल्य, सामाजिक जाणीव, कल्पनाशक्ती, ललितकला, शास्त्रीय दृष्टीकोन, नेतृत्वक्षमता, सांघिक कौशल्य, धाडस या सगळ्या गोष्टी कुठलीही SSC आणि HSC परीक्षा तपासत नाही. मग असल्या एखाद्या अर्धवट परीक्षेला आपण कधीपर्यंत प्रमाण माणून मुलांना हुशार किंवा मूर्ख अशी लेबल लावणार आहोत?
"अहो पण मेडिकल, IIT, IIM ला किंवा परदेशात जायला ते १० वी, १२ वी चे मार्क बघतात ना !" हे एक परवलीच वाक्य असते. आम्हाला मुले डॉक्टर, B.Tech, IAS आणि MBA बनवायची किंवा परदेशी पाठवायची भारी हौस ! त्यांनी खूप मोठे शोध लावावे म्हणून किंवा समाजाची सेवा करावी म्हणून नाही, तर त्यांनी वर्षाला किमान एक कोटी रुपयाच उत्पन्न मिळवाव म्हणून. मग काय होईल तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल आणि ताठ मानेने जगता येईल. गंमतीची गोष्ट म्हणजे हि मानसिकता फक्त आपल्याच देशात दिसते. युरोप, अमेरिका, चीन मध्ये मुलांच यशापयश आणि पालकांचं यशापयश किंवा आर्थिक उत्पन्न याचा संबंधच नसतो. कायद्याने सज्ञान झाला की आपली जबाबदारी आपल्यावर असते. आपल्यासारखे आईच्या पदराआड किंवा बापाच्या सावलीत लपायचा प्रकार या समाजात नाहीये आणि म्हणूनच तो समाज नव्या शक्यतांना जन्म देतो.
डोळे उघडून व्यवस्थित पहिल तर जगभरात तेच लोक यशस्वी किंवा लोकोत्तर झालेत ज्यांनी अपयश पाहिलंय आणि त्यातून ते स्वत:ला घडवत गेलेत. 'कल्पनाशक्तीचा अभाव' या कारणाने नोकरीवरून काढून टाकला गेलेला Walt Disney, 'TV साठी अयोग्य' म्हणून नोकरीवरून बाहेर फेकलेली Oprah Winfrey, सिनेमाच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला गेलेला Steven Spielberg, कॉलेज dropout बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स, टोयोटा कंपनीने इंजिनिअरच्या नोकरीसाठी नाकारलेला Soichiro Honda, १००० ठिकाणी नकार पचवलेला KFC चा Colonel Sanders, शिक्षकांनी मूर्ख असा ठप्पा मारलेला Thomas Edison, असंख्य निवडणुका हरलेला अब्राहम लिंकन, सात वर्षाचा होईस्तोवर वाचू न शकणारा आईनस्टाईन, "तूझी ट्रक चालवायचीच लायकी आहे" हे ऐकणारा Elvis Presley हे सगळे अपयशातूनच वर आले. भारतात सुद्धा धीरूभाई अंबानी, सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, रहमान, गुलझार अशी भली मोठी यादी निघेल ज्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काही महान नाहीये पण ते यशाचे मानक आहेत या देशात.
आता थोडं डोक खाजवून सांगा दरवर्षी देशातल्या ३० एक बोर्डात गेल्या ३०-४० वर्षात प्रथम क्रमांक पटकावणारे १०००-१२०० जण तुम्हाला सचिन, अंबानी, रहमान सारख्या यशवी लोकांच्या यादीत दिसतील? मी सांगू, एकही नाही आणि येणार पण नाही पुढच्या काही दशकात. कारण खूप सोप्प आहे, जेव्हा तुम्हाला प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हायची सवय लागते तेव्हा तुम्ही तुम्हाला काय आवडतं याचा विचार न करता फक्त एकामागून एक परीक्षा देत सुटता आणि शेवटी परीक्षा उरल्या नाहीत कि मग हातात मिळेल ती नोकरी करत बसता. तुमची आवड, तुमचं ध्येय तुम्हाला कधी कळूच शकत नाही कारण तुम्ही कुठे थांबून विचार करतच नाही. दिशाहीन गलबतासारख आपल वारे सुटेल तिकडे भरकटायच. आमच्या आई-बापानी ठरवायचं आम्ही काय व्हायचं ते, आणि त्यांनी दाखवेल त्या दिशेला सारासार विचार न करता पळत राहायच. अशा वेळी या परीक्षांमधले यश पण आत्मघातकी असते.
याउलट कधी कधी अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जाते. तुम्हाला तुमची न दिसणारी शक्तीस्थळे, तुमच्या सुप्त आवडी ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला भविष्यात खरच काय करायचं आहे याच सिंहावलोकन करून त्यानुसार नियोजन करायला छान वेळ देते. तुमच्या मर्यादा, तुमच्या गरजा, तुमची स्वप्ने आणि तुमच्याकडे असणारा वेळ यांची सुसंगती लावून योग्य निर्णय घ्यायला जो निवांतपणा लागतो ना तो अपयश देत, यश देत नाही. यश तुम्हाला सतत पुढे ढकलत राहतं सिकंदरासारखं आणि एके दिवशी जग जिंकून पण रितेपणा दिसायला लागतो आयुष्यात, कारण जो अट्टाहास धरून हि सारी घोडदौड चालली होती ती खरंच गरजेची होती का याला बरेचदा उत्तर नकारार्थी मिळत. पोथीनिष्ठ शिक्षणातले सातत्याचे यश तुमच्या डोळ्यांना झापड लावून एकाच दिशेत पुढे रेटते, याउलट एखाद अपयश तुमचे डोळे खाडकन उघडून तुम्हाला न दिसणाऱ्या वाटा पण दाखवते. म्हणून अपयश आले तर ते खूप आनंदाने स्वीकारा, त्यातून शिका, चुका सुधारा आणि स्वत:च्या आवडी-निवडीने नवे मार्ग शोधत स्वत:च आयुष्य घडवा. असं एक डोळस अपयश, १०० आंधळ्या यशांपेक्षा जास्त यशस्वी बनवेल तुम्हाला.
(टीप - मी स्वत: आयुष्यात खूप सारे शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक, आर्थिक अपयश पाहिलेय आणि मी त्याचा ऋणी आहे)
- फेसबुक पोस्ट ( ७ जून २०१६, ००.२२ )
No comments:
Post a Comment