Friday, March 3, 2017

गुलामगिरी

आज सकाळी कबीरची, माझ्या अडीच वर्षाच्या मुलाची तिचाकी सायकल थोडी खराब झाली होती. त्या सायकलला मागे एक हँडल असलेले दांडके होते जे सायकलच्या पुढच्या चाकाची दिशा बदलू शकते. हे दांडके तेव्हा कामाचे होते जेव्हा कबीर लहान होता आणि त्याला सायकलला दिशा देता यायची नाही किंवा पॅडल मारता यायचं नाही. तेव्हा त्या एका दांडक्याच्या हँडलला धरून मोठ्या माणसाला ती सायकल ढकलता यायची, हवी तशी वळवता यायची, कबीरने काहीही न करता. अलीकडे मात्र ते दांडके जरा बिनकामाचे झाले कारण कबीर स्वतः अगदी सराईतपणे पॅडल मारत, सायकल पाहिजे तशी पुढे आणि अगदी मागे सुद्धा नेऊ शकतो.

आज जेव्हा मी ती सायकल दुरुस्त करायला घेतली तेव्हा ते दांडके मी काढून टाकले कारण त्याचे काही स्क्रू पडले होते, आणि तशीही त्याची गरज राहिली नव्हती. जेव्हा मी सायकल दुरुस्त केली आणि कबीरला खेळायला सांगितले तेव्हा कबीरने आधी ते दांडके बाजूला पडलेले पाहिले. तो बसायला तयारच होईना, सतत म्हणू लागला की "सायकल तुटलीय". मी त्याला खूप समजावलं कि ती सायकल तुटलेली नाहीये, उलट अजून चांगली झालीय. पण, कबीर मानायला तयार नव्हता. त्याच्यासाठी ते दांडके त्या सायकलचा अविभाज्य भाग होते, जरी त्याचं काहीही काम नव्हतं. शेवटी मी ती सायकल दुसऱ्या मुलाला देईन अशी सौम्य धमकी दिल्यावर कबीर सायकलवर बसायला तयार झाला. आणि त्याला नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीने सायकल चालवता आली. संध्याकाळी घरी आलो तेव्हा तो पार्किंग मध्ये वेगात त्याची सायकल चालवताना दिसला आंनदात.

जे अडीच वर्षाचा कबीर करतो, तेच आपण सर्व व्यक्ती आणि समस्त मानवजातसुद्धा करतो आयुष्यात. आपल्या आयुष्यात काही गोष्टी या आपल्याला पुढे जाण्याला, दिशा देण्याला मदत करतात आणि आपण अभावितपणे त्या गोष्टींना इतके सरावून जातो की आपल्याला त्या गोष्टींशिवाय जगणंच अशक्य होऊन जातं. कधीकाळी जेव्हा आपण विज्ञानाच्या बाबतीत अडाणी होतो तेव्हा आपण काही देव निर्माण केले. आज विज्ञानाने सगळी कोडी उलगडली जगाची, पण तरीही देवावरचा भरवसा काही जात नाही. आम्हाला देवाच्या कुबडीशिवाय चालायची सवयच नाही, जरी आता आमच्या पायांत धावायची ताकत असली तरी!

कधी काळी आम्हाला चांगलं-वाईट कळायचं नाही, म्हणून थोडयाशा नीतिमत्ता शिकवायला धर्म-संस्कार आले. हळूहळू धर्मात राजकारण शिरलं, सत्तासमीकरणे आली, लिंगभेद आले, शोषण आले, वर्ण-जाती आल्या. आम्हाला या सगळ्या वाईट गोष्टीसुद्धा इतक्या सवयीच्या झाल्या की आता एकविसाव्या शतकात समस्त कायदे-व्यवस्था असतानाही, नितीमत्तेच्या-स्वातंत्र्याच्या छान संकल्पना असतानाही आम्हाला धर्मातून आलेले विकृत संस्कार टाकता येत नाहीत. वय कितीही असो, नव्या गोष्टींना सामावून घ्यायला आम्ही तयार आहोच कुठे? आम्हाला या धर्म-संस्काराशिवाय जगायला येतच कुठे? जन्मठेपेचे कैदी पायातल्या बेड्यांना सुद्धा जसे चकचकीत लख्ख ठेवतात, तशी आम्ही धर्माची-संस्कारांची पायातली बेडी प्रेमपणाने जपतो. काही कुंभार त्यांच्या गाढवाना पायाला फक्त बांधल्याचा अभिनय करतात आणि गाढव पायात कसलीही दोरी बांधलेली नसताना तिथे दोरी आहे असे समजून तिथून हलत नाही. आमची अवस्था सुद्धा वेगळी नाही, आम्ही फक्त शरीराने स्वतंत्र पण मनाने मात्र पूर्ण बंदिस्त!

हे सगळे देव, धर्म, संस्कार यांवरच थांबत नाही. आमचं कुटुंब, आई-बाप, नातेवाईक, विवाह, राजकीय व्यवस्था, समाज, शिक्षण, राहणीमान, नोकरी, व्यवसाय हे सगळे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या तुरुंगात बांधून टाकतात. कुणाचं मन मोडवत नाही, कुणी काय म्हणेल याची भीती, कुणाच्या विरोधात बोलायची हिंमत नाही, काही करायची लाज आणि आहे त्या स्थितीला आदर्श मानून ती टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण सारे करतो. आम्हाला आमच्या मनाला बांधून ठेवणाऱ्या समस्त गोष्टींची इतकी सवय झालीय की उद्या ती बंधने जरी कुणी क्षणात काढून टाकली तरी आम्हाला जगायला असमर्थ होऊ. आम्ही बुचकुळ्यात पडू, चांगले-वाईट ठरवत बसू, हतबल होऊ, निष्क्रिय होऊ..... कारण स्वतःच्या मनाला जे आवडतं ते जगायची कधी सवयच नाही. आमचं मन असंख्य अदृश्य साखळदंडानी बांधल गेलंय, जे मुक्तपणे जगायला घाबरून जाईल. आम्ही लहानपणापासून गुलाम बनत जातो आणि आम्हाला असंख्य गोष्टींच्या गुलामगिरीची सवय लागून जाते. दुसरा कुणी या गुलामगिरीतून मुक्त झाला तर आम्ही त्याला शिव्या-शाप देतो, दूषणे देतो... स्वाभाविक आहे ना!

एका इंग्रजी जाहिरातीत एक सुंदर वाक्य वापरलं गेलं होतं "गुलामगिरी संपलेली नाहीये, तुम्ही फक्त तिला ओळखायला विसरलाय!"

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment