Wednesday, January 4, 2017

बोधकथा - प्रौढांसाठी


कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. जंगलातले सारे प्राणी थंडीने हवालदिल झाले होते. माकडांच्या एका टोळीने गुंजेच्या झाडाखाली वस्ती केली होती. माकडांनी गुंजेच्या लालबुंद बिया गोळा करून ढीग केला व त्याच्याभोवती शेकोटी करायला बसतात तशी माकडे बसली.

एक स्थलांतरित पक्षी त्या झाडावर बसून हे सगळे पाहत होता. जे चाललेय ते बरोबर नाही हे त्याला कळत होते. पक्षी माकडांना बोलला,"अरे बाबांनो, या गुंजेच्या बिया आहेत. हे निखारे नाहीयेत. यांनी तुम्हाला ऊब मिळणार नाहीये. कशाला हा खटाटोप करताय? त्यापेक्षा एखाद्या उबदार गुहेत राहायला जा." पण, पक्ष्याचे हे बोलणे काही माकडांना रुचले नाही. एक माकड पक्ष्यावर खेकसले "तुला काय पडलंय रे आमचं? तुला जास्त अक्कल आहे का? आम्ही वेडे दिसतोय का तुला? तुझं काम तू बघ की!"

पक्ष्याला थोडं वाईट वाटलं. पण माकडांची थंडीने होणारी अवस्था त्याला पाहवली नाही. तसेच थंडी अजून जास्त वाढणार होती हेसुद्धा त्याला माहित होते. तो परत काळजीने म्हणाला,"अरे बाबांनो, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. ह्या गुंजेच्या बिया तुम्हाला कसलीही ऊब देणार नाहीयेत. तुम्ही गारठून मराल. तेव्हा लवकर चांगला उबदार आडोसा शोधा. या झाडाखाली वेळ वाया घालवू नका!" पक्ष्याची हे बोलणे आता काही माकडांच्या डोक्यात गेलं होतं. एक माकड त्वेषाने बोलले "कोण कुठला पक्षी येऊन आम्हाला अक्कल शिकवावा? आमच्या सामूहिक शहाणपणापेक्षा याला जास्त अक्कल आहे? याचा अधिकार तो काय? आणि आम्ही हे ऐकून का घेतोय या उपऱ्या पक्षाकडून??"

त्या माकडाचे हे त्वेषपूर्ण उद्गार ऐकून एका धिप्पाड माकडाने क्षणाचाही विचार न करता वरच्या दिशेने झेप घेतली आणि त्या स्थलांतरित पक्ष्याला पकडून त्याची मान पिरगाळून त्याचा जीव घेतला. बाकीची माकडे त्या धिप्पाड माकडाच्या शौर्याचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक करत त्यांच्या गुंजेच्या बियांच्या थंड शेकोटीभोवती आनंदाने बसून राहिली.

(पंचतंत्रातील एक गोष्ट)

तात्पर्य: आपल्या आजूबाजूला समाजात, कामाच्या ठिकाणी आणि अगदी घरातसुद्धा अशी अज्ञानातून आलेली दुर्दैवी परिस्थिती तुम्हाला दिसू शकते जिथे तुम्ही खूप चांगल्या भावनेने, दुसऱ्याचं भले व्हावे म्हणून सल्ला देता. माणुसकी म्हणून एकदा सल्ला देऊन पहा, त्यात वाईट काही नाही. पण ज्याला सल्ला देताय त्यांची ऐकून घ्यायची मानसिक तयारी नसेल किंवा ते स्वतःला सर्वज्ञ समजत असतील तर तुमचे वारंवार दिले गेलेले अत्यंत प्रामाणिक सल्ले तुम्हालाच अंगलट येतील. एकतर तुमच्या प्रामाणिक हेतूंवर शंका घेतली जाईल किंवा सामूहिकपणे तुम्हाला बाहेर केले जाईल. क्वचित वाईटप्रसंगी तुम्हाला कायमचे शांत सुद्धा केले जाऊ शकते. माझ्या स्वतःच्या घरातूनसुद्धा मला बाहेर केले गेलेय कित्येक वेळा माझ्या प्रामाणिक सल्ल्या साठी, आणि जिथे नंतर दुर्दैवी परिस्थिती आल्यावर माझ्या खरेपणाचे गोडवे गायले गेले, पण ते निरुपयोगी होते कारण वेळ निघून गेली होती आणि व्हायचे ते कायमचे नुकसान झालेले होते.

कुणालाही सल्ला देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसे असोत, समाज असो की कुठल्याही संस्था/संघटना.... त्या ज्या हलाखीच्या परिस्थितीत जाताना दिसतात, त्या बहुतांशी त्यांच्या स्वतःच्या conscious choice ने तशा स्थितीकडे चाललेल्या असतात. जर त्यांना स्वतःच्या पडझडीची कारणे अजिबातच शोधायची नसतील आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काहीही पूर्णतः वेगळे करायचे नसेल तर तुमचे सल्ले म्हणजे ह्या गोष्टीतल्या पक्षाची अंगलट येणारी चिवचिव आहे!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ८ ऑक्टोबर २०१६, ०९.४९ )

No comments:

Post a Comment