Saturday, May 27, 2017

देशभक्तीचे तुंबलेले गटार!

परवा दिवशी उज्माबाई भारतात दाखल झाल्या. भारतभूमीवर पाय ठेवताक्षणीच त्यांनी जमिनीचे चुंबन का काही घेतले. त्यानंतर सुषमाजींना भेटताना त्यांचे पाय धरले. लगोलग अर्धा डझन तिरंगे पाठीमागे लावून एक देशप्रेमी प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यात उज्माबाईंनी देशाचे गोडवे गायले, नरेंद्र मोदींना भेटायची इच्छा व्यक्त केली. वास्तविक पाहता परदेशात बंधक बनवून इच्छेविरुद्ध लग्न (थोडक्यात बलात्कार) झालेली स्त्री ही Post Traumatic Stress Disorder (PTSD) किंवा साध्या भाषेत तीव्र मानसिक धक्क्यात असायला हवी होती. पण उज्माबाई इथे वैयक्तिक आयुष्यात काहीच न घडल्यासारखे, एखाद्या राजकीय प्रवक्त्याच्या सहजतेने प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या. अगदीच डोळे दिपून जावे आणि मती गुंग व्हावी असा तो सोहळा होता.

उज्मा ही काही पहिली मुलगी नव्हे जी अशा प्रकारात फसली होती. मागे R R पाटील गृहमंत्री असताना पण सांगलीची एक हिंदू मुलगी इंटरनेटवर एका पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडून तिकडे जाऊन धर्म बदलून, लग्न करून नंतर काही महिन्यांनी पस्तावली आणि परत भारतात आली. तेव्हा प्रसारमाध्यमे देशभक्तीला एवढी आसुसली नसल्याने, सोशल मीडियाच्या अभावाने आणि केंद्रातल्या लोकांना इव्हेंट मॅनेजमेंटचे अनुभव आले नसल्याने स्थानिक पेपरातल्या २-४ फुटकळ बातम्यांपलीकडे त्याचा गवगवा झाला नाही. आणि अशा असंख्य मुली आजही सीमेच्या इकडे आणि तिकडे आजही असतील. या आंतरराष्ट्रीय प्रेमवीर सुनांच्या घरातली भांडणे जरा अति झाली की भारत-पाकिस्तान संबंधांतल्या तणावावर फोडणी म्हणून वापरता येतात. उद्या त्या सानिया मिरझाच्या घरी बिनसले तर दोन्ही देशांच्या वकीलाती, मीडिया आणि सामान्य लोक कित्येक दिवस त्याचा गुळ काढतील.

पाकिस्तानची सीमा ओलांडून (काहींच्या मते दारूच्या नशेत) गेलेला सरबजीत आणि त्यासाठी नंतर त्याच्या मृत्यूपर्यंत झालेला इमोशनल ड्रामा, नंतर ऐश्वर्याचा त्यावर आलेला सिनेमा यांतून आपल्याला नेमके मिळाले काय? अलीकडेच कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात अटक झाली व मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. त्यावर हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात आम्ही मुकाबला लढतोय. भारतातल्या 90% लोकांनी हरीश साळवेंचे नाव तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा ऐकले आणि 20-20 चा सामना पाहावा तसे ती कायदेशीर लढाई लोकांनी TV वर पाहिली. जिनिव्हा करार, मानवी हक्क, आंतरराष्ट्रीय राजकारण, Jurisdiction आणि Jurisprudence यातलं अवाक्षर माहीत नसणारी 99% जनता साळवेंनी कशी पाकिस्तानची जिरवली अशा आशयाच्या पोस्टी सोशल मीडियावर टाकत होती. एका व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित असणाऱ्या एका खटल्यावर आमच्या अडाणी जनांनी सोशल मिडियाकरवी राष्ट्रप्रेमाचे गोमूत्र शिंपडायला सुरुवात केली होती.

थोडा विचार करून बघा, भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे काही टोलनाका आहे का पाचपन्नास रुपये देऊन कुणीही पार करायला? आणि जर कुणी वैयक्तिक प्रेमाच्या, दारूच्या किंवा व्यवसायाच्या नशेत ती सीमा ओलांडली, तर त्यासाठी अख्ख्या देशाने देव पाण्यात का घालून बसावे? त्या व्यक्तीचे कुटुंब, दोन्ही देशांच्या वकीलाती आणि न्यायालये मिळून बघतील की काय करायचे ते. तुम्ही सोशल मीडियावर पिटीशन लिहून काय हातभार लावणार त्यात? जास्तीत जास्त तुम्ही मीडियाला TRP देणार आणि काही पत्रकार आणि जाहिरातदार यांचे भले करणार. दरवर्षी शेकडोे गरीब मच्छीमार लोक भारत पाकिस्तान सागरी सीमा नकळत ओलांडून दुसऱ्या देशाच्या तटरक्षक दलाच्या तावडीत फसतात आणि मरेपर्यंत दुसऱ्या देशात सडतात. त्यांच्यासाठी आपला मीडिया कधी बोंब मारत नाही, राजकारण्यांवर आपण दबाव आणत नाही किंवा कुणी हेगच्या न्यायालयात जात नाही. म्हणजे नकळत सीमा ओलांडून गेलेले मेले तरी चालतील, पण हौसेने काशी केलेले मात्र वाचले पाहिजेत ही आमची वृत्ती आणि प्राथमिकता!

बरं जाधव असोत, सरबाजीत असो की उज्मा, यांना वाचवण्यामागे, त्याचा गवगवा करण्यामागे आपल्या देशात मानवी आयुष्याची किंमत खूप जास्त आहे असे काही आहे का? अजिबात नाही! आमच्या देशात लाखो शेतकरी फास घेऊन मेले, मॅनहोल मध्ये श्वास कोंडून हजारो सफाईकामगार मेले, आदिवासींच्या कत्तली झाल्या, रस्त्यावर अपघातात हजारो जण मरतात, हुंड्यासाठी हजारो मुली जळतात...ते कधी "भारत के बेटे/बेटी" नसतात, त्यांच्यासाठी कुणी मीडिया कोकलत नाही, राजकारणी रडत नाहीत, कुठले वकील कोर्टात जात नाहीत. पाकिस्तानात जाऊन अत्याचार करून घेतले की मगच भारतातल्या लोकांना, मीडियाला आणि राजकारण्यांना त्याचा कळवळा!! इटालियन नाविकांनी निष्पाप भारतीय मच्छीमारांना भारतीय सीमेत गोळ्या मारून जीव मारले, पण त्यावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी राजकारण सोडून दुसरे काहीही केले नाही... कारण त्यात पाकिस्तान नव्हतं ना!

आमच्या देशाला, इथल्या लोकांना, मीडियाला, राजकारण्यांना आणि न्यायव्यवस्थेला माणसाच्या आयुष्याची कसलीही किंमत नाहीये. जोवर त्या मरणात कुठलातरी स्वार्थ, करमणूक किंवा प्रसिद्धी नाही तोवर इथे मरणसुद्धा स्वस्त आहे!

- डॉ. विनय काटे

Thursday, May 25, 2017

सोशल मीडियावरून कुस बदलतं राजकारण!

पारंपरिकरित्या काँग्रेस हा शेटजी-भटजींचा पक्ष राहिला आहे. तोंडी लावायला लोणचं असतं तसं ताटाखालचे मांजर असणारे एक-दोन मुस्लिम, बहुजन नेते सोडले तर अख्खी हायकमांड ही उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय अशीच राहिली आहे. नेहरूंच्या काळापासून ते अगदी सीताराम केसरींच्या काळात तळागाळाला जाईपर्यंत काँग्रेसची चाल, चरित्र आणि चेहरा हे शेटजी-भटजीच होते. 50-60 च्या दशकात ब्राम्हण-बनिया असणारे समीकरण आणीबाणीच्या नंतर ब्राम्हण-क्षत्रिय-बनिया असं झालं. पण, बहुजन हा काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या केंद्रापासून दूर अगदी परिघाबाहेर ठेवला. काँग्रेसच्या सगळ्या योजना या फक्त नावाला गरिबांसाठी होत्या, पण त्याने घरं फक्त उच्चवर्णीय व उच्चवर्गीय लोकांची भरली जात होती. काँग्रेसला बहुजनांशी कसलंही सोयरसुतक नव्हते.

बरं हे सगळे करताना काँग्रेसला विरोधक होते? बिलकुल होते. सामान्य राजकीय पक्ष विरोधकांचे मुद्दे खोडून काढतात, मूर्ख राजकीय पक्ष विरोधकांनाच नामशेष करतात आणि काँग्रेससारखे अतिचाणाक्ष पक्ष स्वतःच्या सोयीचे विरोधक उभे करतात. 1947 ते 1998 ही 51 वर्ष देशात आणि केंद्रात फक्त काँग्रेसचीच सत्ता होती. मोरारजी देसाई, चरण सिंग, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल हे सगळे गैरकाँग्रेसी PM सुद्धा मूळ काँग्रेसीच होते. ममता बॅनर्जी, शरद पवारांपासून ते अगदी जयप्रकाश नारायण यांच्या सारखे दिग्गज सुद्धा काँग्रेसच्याच वेलीची फळे. आडनावे टाकून दिली की डिकास्ट होता येतं हे समजणारे भंपक समाजवादी, कास्ट बद्दल काहीच न बोलणे म्हणजे डिकास्ट झालो हे समजणारे उच्चवर्णीय डावे, भाषीय/प्रांतीय अस्मितांना फुंकर घालणारे द्रविड/शिवसेना या सगळ्यांच्या मुळांशी खतसुद्धा टाकलं कुणी तर काँग्रेसने! हीच काँग्रेसची चाणाक्ष राजकीय खेळी होती, आपला विरोधक सुद्धा आपणच उभा करायची, आणि बहुजनाला राजकीय ओळख नाकारण्याची!

राजकारणात खरी सत्ता भोगायला गरज असते ती न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि प्रसारमाध्यमे यांत आपली माणसे ठेवायची. काँग्रेसच्या काळात ह्यात सगळीचकडे काँग्रेसिंचा भरणा होता. मा.म.देशमुखांनी त्यांच्या एका पुस्तकात 1970-80 च्या आसपासची संसदेतील खासदार आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांची जातवार संख्या दिलीय, ती स्तिमित करणारी आहे, बहुजन त्यात दुरदूरपर्यंत कुठेही दिसत नाहीे. आणि मीडिया मधली शेटजी-भटजींची सत्ता तर आपण आजही पाहतोच आहोत. कुठल्याही चर्चेसाठी मुद्दा ठरवणारे हेच, एखादया मुद्द्याच्या बाजूने बोलणारे हेच, विरोधात बोलणारे हेच, अँकर हेच, संपादक हेच, पक्षप्रवक्ते हेच, स्तंभलेखक हेच, टीकाकार हेच, समीक्षक हेच, भाष्यकार हेच आणि इतिहासकारही हेच! प्रिंटमीडिया आमचा, TV मीडिया आमचा आणि झालंच तर आताशा सोशल मीडिया सुद्धा आमचाच! आम्ही दाखवू ते मुकाट्याने पाहायचं आणि आमच्यातल्या सुमारपणाला सुद्धा तुम्ही टॅलेंट म्हणून डोक्यावर घेऊन नाचायच!

काँग्रेसच्या या नुरा कुस्तीतून सुटलेला "हिंदुत्व" नावाचा एक काडीपैलवान विचार पुढे वेगवेगळी नावे धारण करत शेवटी भाजप या नावाने थोडा स्थिरावला. काँग्रेसने सुरुवातीच्या काळात त्यालाही थोडे पाणी घालून मोठे केले; कारण स्वतःचा नसलेला सेक्युलॅरिझम दाखवायला भाजपचा बागुलबुवा सोयीस्कर होता. बाबरी मशीद पाडायची तयारी होत असताना, रथ यात्रा निघत असताना आणि प्रत्यक्ष ती पाडताना काँग्रेसच्या PM ना ते माहीत नव्हतं हे समजणे म्हणजे राजकीय दूधखुळेपणा आहे. संघाची विषवल्ली पोसायला, त्यावर भाजपचे फळ धरायला आणि त्यांनतर त्या कट्टर उच्चवर्णीय हिंदुत्ववादी मासिकतेच्या भाजपला मोठे करायला काँग्रेसने शक्य तितका हातभार लावलेला आहे. प्रत्येक सुपरहिरोला मोठे व्हायला एक सुपरव्हिलन लागतो, जो शेवटी त्याच्याकडून हरला जातो. काँग्रेसने भाजपला हरणारा सुपरव्हिलन म्हणून तयार केले होते, स्वतःच भंपक पुरोगामीत्व आणि सेक्युलॅरिसम ठसठशीत बनवायला.

1998 नंतर प्रथमत: या देशात वाजपेयींच्या रूपाने खऱ्या अर्थाने बिगरकाँग्रेसी सरकार आले. 2004 ला भाजपचा पाडाव करत परत काँगेस सत्तारूढ झाली. भारतातली जातीय समीकरणे पूर्णत: माहीत नसणाऱ्या सोनिया गांधींनी डॉ.मनमोहन सिंग यांना रबरस्टॅम्प समजून PM पदी बसवले. पण डॉ.सिंग यांनी दहा वर्षात वायफळ बडबड न करता, स्वतःच्या धोरणांनी या देशातल्या बहुसंख्य बहुजनवर्गाला आर्थिकदृष्टया कित्येक पायऱ्या वर आणून ठेवले. आणि ह्याचमुळे डॉ.सिंग हे समस्त शेटजी-भटजी मीडियाच्या, राजनेत्यांच्या शत्रूयादीत अव्वल राहिले. 2011-12 च्या आसपास भारतात आलेल्या सोशल मीडियाने कित्येक लोकांना आवाज दिला. मुख्य मीडियातील संपादक लोकांनी सुरुवातीच्या काळात या सोशल मीडियाला आकार द्यायची भूमिका घेतली आणि त्यात भक्त लोक जन्माला आले. 2014 च्या मोदी लाटेला या भाजपसमर्थक उच्चवर्णीय, उच्चवर्गीय भक्तांचा सगळ्यात मोठा सहारा होता. पण, "तंत्रज्ञानाला बांधून ठेवता येत नाही" या न्यायाने सोशल मीडियावर बहुजन समाजाने पण मोठ्या प्रमाणावर स्वतःला व्यक्त करायला सुरुवात केली.

आजच्या घडीला बहुजन समाजामधील काँग्रेसची विश्वासार्हता संपलेली आहे. मिडियामधील शेटजी-भटजींचे वर्चस्व येत्या काही वर्षात मोडून पडणार आहे. कॉर्पोरेटच्या जीवावर मोठे इव्हेंट साजरे करून स्वतःचे महिमामंडन करणाऱ्या मोदींचे पाय आता हळूहळू जमिनीला टेकायला लागले आहेत. सोशल मीडिया येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ करणार आहे. कन्हैय्या असो, रोहित वेमुला असो, हार्दिक पटेल असो, जिग्नेश मेवानी असो, जस्टीस कर्णन असो किंवा अगदी गेल्या आठवड्यापासून माध्यमांनी दखल घेतलेला भीम आर्मीचा चंद्रशेखर आजाद असो... हे सगळे सोशल मीडियावर बहुसंख्य असणाऱ्या बहुजन समाजाच्या अभिव्यक्तीने मोठ्या झालेल्या व्यक्ती आहेत. काँग्रेसने भाजपच्या रुपात स्वतःला न झेपणारा विरोधक उभा केला, तसाच भाजपने सोशल मीडियावरून सत्तेला गवसणी घालता येते हे दाखवून स्वतःला न झेपणारा विरोधक "सोशल मीडिया"च्या रुपात उभा करून ठेवलाय. या देशातील बहुसंख्येने असणारा बहुजन युवक येत्या काळात या देशातील राजकारणाला मोठे हादरे देणार आहे. सावध रहा... ही तुफानाची सुरुवात आहे!!

- डॉ. विनय काटे

Tuesday, May 23, 2017

Page-3 लोकशाहीवादी स्त्रीवाद!

काल एका महान विदुषींची एक पोस्ट वाचण्यात आली की मोदींविरोधी मत व्यक्त करणाऱ्या स्त्रियांबद्दल इथे जाहीरपणे "रांड" वगैरे शब्दांत वाईट बोलले गेलेय आणि त्या अतीव उपहासाने लिहितात की त्या स्त्रियांच्या योनीत खंजीर खुपसला पाहिजे!

एक कळेना झालंय, या महान लोकशाहीवादी, स्त्रीवादी लोकांना शिव्या घालायचा हा प्रकार हा फक्त 2014 नंतर आलाय असे का वाटत राहते? म्हणजे 2014 आधी भारतात बलात्कार नव्हते, छेडछाड नव्हती, आईबहिणीवरून शिव्या नव्हत्या... आणि अचानक 2014 ला मोदी किंवा संघ हे सगळे गैरवर्तन घेऊन आला! असं काही आहे का?

बाईंनी वानगीदाखल दिलेली उदाहरणे आपण एकेक करत घेऊया. बरखा दत्त या कितीही मोठ्या पत्रकार असल्या तरी "नीरा राडीया टेप्स" मध्ये या बाई 2008-09 ला "कॉर्पोरेट लॉबिंग" चे पुण्यकर्म करत होत्या हे जगाने पाहिले आहे. तिस्ता सेटलवाड यांनी 2002 च्या गोध्रा दंगलीतील लोकांना न्याय मिळवून देण्यात मोठे प्रयत्न केलेत, पण त्याचसोबत स्वतःच्या NGO ची किती चांदी करून घेतली हेही एकदा तपासून घ्यावे लागेल. आणि जर विदुषींना वाटते तितके वाईट दिवस असतील तर 2002 पासून आजवर तिस्ता सेटलवाड वर किती वेळा प्राणघातक हल्ले झाले गुजरात मध्ये? अरुंधती रॉय या नक्कीच महान लेखिका आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीने नक्षलवादाची भलावण केलीय ते कुणाला पटेल? ट्विंकल खन्ना, शैला रशीद, सागरिका, नंदिता दास, गुरमेहर कौर यांचे भारतीय लोकशाहीत काय मोठे योगदान आहे हे मला तरी अजून समजायचे आहे!

बाईसाहेब, तुम्ही असा वा तुम्ही ज्यांच्या बाजूने बोलताय त्या सर्व महान विदुषी असोत (आणि तुमच्या विरोधी पक्षातल्या पण) .... तुम्ही सगळ्या हस्तिदंती मनोऱ्यात जन्मलेल्या आहात. तुम्हाला लोकशाहीशी, स्त्रियांशी काही कर्तव्य असतं तर 2014 च्या आधीही तुम्ही कर्णकर्कशपणे ओरडू शकला असतात. पण तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षीय विचारधारेशी बांधील असल्याने सारं काही आलबेल असल्याच्या आनंदात निवांत होतात. त्या काळात तुम्हाला 5-10 हजारांसाठी विकल्या गेलेल्या अजाण मुली, सोनी सोरी सारख्या अत्याचारग्रस्त आदिवासी स्त्रिया, हॉस्पिटलच्या अभावी मरणाऱ्या गरोदर खेडूत स्त्रिया, काही हजारांसाठी वेठबिगार बनलेल्या माता-भगिनी दिसल्या नाहीत! दिसतील तरी कशा, कारण तेव्हा तुम्ही सत्ताकेंद्राच्या जवळ होता, आणि आपली सत्ता असताना काहीही अन्याय घडलाच नाही अशा सुरात बोलायचे असते. अगदी तसेच जसे 2012 ला डाळ 100 रुपये किलो झाली म्हणून शिमगा करणारी हेमामालिनी 2015 ला डाळ 200 रुपयांची झाली तरी मूग गिळून बसली होती!

मिडिया आणि सोशल मिडिया व्यापून राहिलेल्या सर्वपक्षीय विदुषींनो, तुम्ही TV वरील चर्चासत्रात कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला बसून तुमच्या महागड्या साडीची घडी न मोडू देता, या देशातल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि अब्रूची सुरक्षितता या प्राथमिक गरजा न भागलेल्या भारतीय स्त्रियांच्या कैवारी म्हणून अशाच बोलत राहणार वर्षानुवर्षे! सत्तेचे सोपान जसे हलतील तशा तुमच्या भूमिका आणि भाषा बदतलील, पदांसाठी, पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी! तुम्हाला या देशातील लोकशाहीशी, स्त्रियांच्या प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाहीये. तुम्हाला या देशातील स्त्रियांचा आवाज आणि चेहरा म्हणून दाखवण्यात समस्त राजकीय पक्ष आणि मिडीयाचे हितसंबंध आहेत. त्यामुळे तुमच्या चर्चांनी आणि विकतच्या रडारडीने कुणाला घंटा फरक पडत नाही; आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता (जे तुम्ही कधीच करत नाही) ना तेव्हा तुमच्या मागे काळे कुत्रे सुद्धा चालत नाही खायला दिल्याशिवाय!

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुणी "रांड" म्हणलं याचा एवढा राग का यावा?? मला वैयक्तिक विचाराल तर मला "रांड" या शब्दात पण काहीही वाईट दिसत नाही. नाईलाजाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या माझ्या माता-भगिनींना मी अजिबात तुच्छ लेखत नाही, कारण मी Page-3, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित, शुचितावादी वगैरे स्त्रीवादी विचारवंत नाहीये ना! पैसा, पद आणि प्रसिद्धीसाठी राजकीय पक्षांना स्वतःचा आत्मा विकणाऱ्या तुम्हा Page-3 विदुषींपेक्षा स्वतःच्या मुलाबाळांची पोट भरण्यासाठी शरीर विकणाऱ्या माझ्या रांड/वेश्या म्हणवल्या जाणाऱ्या माता-भगिनी मला जास्त आदरणीय आणि प्रिय आहेत, कारण त्या खऱ्या आहेत!

- डॉ. विनय काटे

Monday, May 22, 2017

कायदा व सुव्यवस्था - कुठल्या गाढविणीच नाव?

उल्हासनगर मध्ये दुकानातून 2 रुपयांची चकली चोरली म्हणून 2 लहान बाळांचे डोके भादरून, त्यांना मारहाण करत त्यांचा व्हिडीओ दुकानदाराने बनवला. TV वर ती बातमी पाहताना अक्षरशः मी सुन्न झालो. खरंच समाज म्हणून इतक्या नीच स्तराला पोचलोय का आपण? स्वतःला काय समजायला लागलोय आपण की आपण कायदे हातात घ्यावेत? ५-६ वर्षांची मुले आम्हाला गुन्हेगार दिसायला लागावी?

कुणी अमक्या-तमक्याने बीफ खाल्ले अशी अफवा उडवावी आणि आम्ही त्याला जीव माराव? कुणी बांग्लादेशी गुप्तहेर आहे म्हणून अफवा उडवावी आणि आम्ही त्या भारतीय माणसाला जाहीररीत्या धिंड काढून जीव मारावे? गाय विकायला चाललेल्या 12 वर्षांच्या मुलाला आम्ही फास देऊन मारावे? "मुले पळवणारी टोळी आहे" असा आरोप करत आम्ही लोकांना जीव जाहीर दगडाने ठेचून मारावे? महापुरुषांची बदनामी केली म्हणून आम्ही लोकांना ठेचून मारावे?

कधी पाकिस्तानचा द्वेष, कधी काश्मीरींचा द्वेष, कधी बांगलादेशी लोकांचा द्वेष, कधी मुस्लिमांचा द्वेष, कधी आदिवासींचा द्वेष, कधी दलितांचा द्वेष, कधी ब्राम्हणांचा द्वेष, कधी ईशान्य भारतीयांचा द्वेष, कधी UP/बिहारींचा द्वेष, कधी प्रेमी युगुलांचा द्वेष, कधी आंतरजातीय/धर्मीय विवाह करणाऱ्यांचा द्वेष .... सगळा द्वेष करत करत आता आम्ही ५-६ वर्षांच्या लेकरांना सुद्धा जमावाने शिक्षा द्यायला लागलो!

या देशाने लोकशाही, मानवता, कायद्याचे राज्य, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मानवी मूल्यांनाच तिलांजली द्यायचे ठरवलेले दिसतेय एकंदरीत. आणि जो कोणी हे बोलून दाखवेल तो आमच्यालेखी देशद्रोही! आजच्या भारतात गांधी, नेहरू किंवा आंबेडकर यांच्यासारखे शहाणे लोक जन्मले असते तर ते नथुरामच्या गोळीने किंवा नैसर्गिक मृत्यूने न मरता, दुःखाने हताश होत आत्महत्या करून मेले असते.

अमेरिकेपेक्षाही प्रगत लोकशाहीचे संविधान असणारा देश जेव्हा सौदी अरेबिया सारख्या देशांच्या अनुकरणात धन्यता मानायला लागतो; तेव्हा तिथे अखलाक मारला जातो, लहान मुले गुन्हेगार दिसू लागतात, कायदा षंढ बनून पाहत राहतो, गांधी पुचाट वाटतो आणि नथुरामचे स्मारक उभा राहायला लागते!

- डॉ. विनय काटे

Friday, May 19, 2017

वकील

सध्याच्या काळातील काही प्रथितयश वकिलांची नावे सांगतो -
१) राम जेठमलानी
२) हरीश साळवे
३) कपिल सिब्बल
४) पी चिदंबरम
५) अरुण जेटली
६) रवीशंकर प्रसाद
७) मजीद मेमन
८) महेश जेठमलानी
९) प्रशांत भूषण
१०) शांती भूषण
११) अभिषेक मनू सिंघवी

इतिहासातील काही प्रख्यात भारतीय वकिलांची नावे सांगतो -
१) मोतीलाल नेहरू
२) जवाहरलाल नेहरु
३) बॅ. मोहनदास करमचंद गांधी
४) बॅ. मोहम्मद अली जिना
५) बॅ. भिमराव रामजी आंबेडकर

आता आपले सर्व ज्ञान पणाला लावून बघत बसा यातले कोण कुठल्या पक्षांशी संबंधित आहे आणि त्यांनी भारताच्या राजकीय वर्तुळावर किती प्रभाव ठेवला आहे ते!

वकिलांशिवाय राजकारण होऊ शकत नसते बेंबट्या !!

- डॉ. विनय काटे

Wednesday, May 17, 2017

अनलिमिटेड बुफे मागचं अर्थशास्त्र व वैद्यकशास्त्र! (पैसे वसूल करायचे असतील तर नक्की वाचा)


काही ठराविक किंमतीत अनलिमिटेड बुफे लंच/डिनर हा प्रकार तुम्ही कित्येकदा अनुभवला असेल. जेवणाचा प्रकार (शाकाहारी, मांसाहारी इ.) कोणता आहे यावरून बुफेच्या किंमती थोड्याशा बदलतात, पण जास्त फरक नसतो. प्रत्येक बुफे हा अर्थशास्त्रीय भाषेत surplus साठीच छोटेखानी युद्ध असते. Consumer Surplus जितका कमी करता येईल तितका हॉटेलचा फायदा असतो; आणि मोजक्या पैशात जितके जास्त अन्न खाता येईल (थोडक्यात consumer surplus वाढवता येईल) तितका ग्राहकाचा फायदा असतो. आणि या सगळ्या अर्थशास्त्रीय युद्धाला वैद्यकाच्या काही नियमांची जोड असते. कसे ते पाहूया!

१) बुफेची किंमत कशी ठरते? - साधारणपणे मनुष्याच्या जठराची (stomach) कमाल क्षमता असते १.५ लिटर. थोडक्यात कितीही मी-मी म्हणणारा बकासुर १.५ लिटर पेक्षा जास्त अन्न एका वेळेस खाऊ शकत नाही. आता बुफे मधल्या 100 पदार्थांपैकी सगळ्यात महागडा पदार्थ किलोच्या भावात घ्या आणि त्याची १.५ किलोची किंमत बुफेला लावून टाका. BBQ Nation मध्ये सगळ्यात महाग काय असते तर Prawns, साधारण ५०० रुपये किलो, म्हणून BBQ Nation चा मांसाहारी बुफे ७५०-८०० रुपयांपासून सुरू होतो. तुम्ही पोटभर prawns खाल्ले तरी त्यांना नुकसान नाही.

२) वेलकम ड्रिंक, सूप चे मायाजाल - सगळ्या बुफेच्या ठिकाणी self service असली तरी welcome drink किंवा सूप मात्र तुम्हाला टेबल वर दिले जाते. त्यात तुमचे खूप काही आदरातिथ्य करायचा हेतू नसतो. गोड welcome drink ने तुमच्या मेंदूला एक छान साखरेचा डोस मिळतो आणि तुमचा मेंदू तुमची भुकेची मात्रा कमी करून टाकतो, पोट रिकामं असलं तरी. सूप तुमच्या पोटात भरपूर जागा व्यापून टाकतात आणि मग परत जास्त खायची इच्छा राहत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी देण्यात हॉटेलवाला तुम्हाला तुमची १.५ लिटर जठरक्षमता वापरण्यापासून थांबवत असतो.

३) वेटर, एक उपद्रवी सैनिक - तुम्ही BBQ Nation मध्ये non-veg grill लावायला सांगा आणि गंमत पहा. येणारा वेटर तुम्हाला जास्तीत जास्त चिकन किंवा फिश (दोन्ही १२० रुपये किलो) खायला आणून देत जाईल. तुम्ही मटण किंवा Prawns (४५० ते ५०० रुपये किलो) कितीही मागत राहा, तुम्हाला ते अत्यंत कमी आणि खूप उशीराने दिले जाते. अपेक्षा एवढीच असते की तुम्ही भुकेच्या तडाख्यात दुसरे काहीतरी खायला घ्यावे आणि तुमचा surplus कमी करून घ्यावा. ५०० रुपये किलोच्या prawns च्या जागी तुम्ही १२० रुपये किलोचे चिकन खाल्ले तर ७५० रुपयांतले तुम्ही जास्तीत जास्त २०० रुपये वसूल करणार, बाकी हॉटेलचा फायदा.

४) चाट, आईसक्रीम - कित्येक बुफेच्या ठिकाणी चाट, पापडीवाला ठेला हमखास लावलेला असतो. बायका आपल्या नैसर्गिक स्वभावाने तिकडे जाऊन पाणीपुरी खाऊन पोट भरतात. डोक्यावरून पाणी, ५० रुपयांत एका बाईला चुरमुरे असलेली भेळ/चाट किंवा पाणीपुरी देऊन तिचे उरलेले पैसे हॉटेलवाला स्वतःकडे खेचत असतो. आईस्क्रीमची अवस्थाही तीच! स्वस्तातले फॅमिली पॅक वाले आईसक्रीम (२०० रुपये किलो) तुम्हाला नावाला डायफ्रूट शिंपडून चारायला हॉटेलवाल्याचा फायदाच असतो.

५) फळे, सॅलड - कितीही आरोग्यदायी असली तरी तुम्हाला ४० रुपये किलोचे कलिंगड, खरबूज, गाजर, काकडी चारण्याइतका आनंद हॉटेलवाला दुसऱ्या कशातच घेऊ शकत नाही. त्यामुळे हे हमखास तिथे मुबलक असणार.

६) गोडधोड/डेझर्ट - कितीही अट्टल खाणारा पाव किलोपेक्षा जास्त गोडधोड नाही खाऊ शकत, मेंदू खाऊच देत नाही. बुफेमधल्या डेझर्टच्या किमती पाहिल्या तर जास्तीत जास्त १०० रुपयांचे गोडधोड तुम्ही खाऊ शकता.

७) शाकाहारी लोक - तुम्ही समस्त बुफेवाल्यांसाठी हक्काचे बकरे असता. १० रुपये किलोचा बटाटा "तंदूर आलू" म्हणून तुम्हाला खाताना पाहून हॉटेलवाले ऑर्गझमीक आनंद घेत असतात. पनीर खा, स्वीट खा, फळे खा ... काहीही खा! तुमच्यासाठी हॉटेलवाला ३००-३५० च्या वर काहीही खर्चत नाही, आणि तुम्ही ७०० रुपये दक्षिणा देऊन येता.

तेव्हा खवय्यांनो, बुफेचा पैसा खऱ्या अर्थाने वसूल करायचा असेल तर फक्त महागातले अन्न, पोटभर खाऊन यावे. आणि तुम्हाला जर फक्त हौसेसाठीच बुफे खायचं असेल तर मग ५० रुपयांचे चाट खाऊन ८०० रुपये देऊन या... कुणाचं काहीही जात नाही!

- डॉ. विनय काटे