Tuesday, May 23, 2017

Page-3 लोकशाहीवादी स्त्रीवाद!

काल एका महान विदुषींची एक पोस्ट वाचण्यात आली की मोदींविरोधी मत व्यक्त करणाऱ्या स्त्रियांबद्दल इथे जाहीरपणे "रांड" वगैरे शब्दांत वाईट बोलले गेलेय आणि त्या अतीव उपहासाने लिहितात की त्या स्त्रियांच्या योनीत खंजीर खुपसला पाहिजे!

एक कळेना झालंय, या महान लोकशाहीवादी, स्त्रीवादी लोकांना शिव्या घालायचा हा प्रकार हा फक्त 2014 नंतर आलाय असे का वाटत राहते? म्हणजे 2014 आधी भारतात बलात्कार नव्हते, छेडछाड नव्हती, आईबहिणीवरून शिव्या नव्हत्या... आणि अचानक 2014 ला मोदी किंवा संघ हे सगळे गैरवर्तन घेऊन आला! असं काही आहे का?

बाईंनी वानगीदाखल दिलेली उदाहरणे आपण एकेक करत घेऊया. बरखा दत्त या कितीही मोठ्या पत्रकार असल्या तरी "नीरा राडीया टेप्स" मध्ये या बाई 2008-09 ला "कॉर्पोरेट लॉबिंग" चे पुण्यकर्म करत होत्या हे जगाने पाहिले आहे. तिस्ता सेटलवाड यांनी 2002 च्या गोध्रा दंगलीतील लोकांना न्याय मिळवून देण्यात मोठे प्रयत्न केलेत, पण त्याचसोबत स्वतःच्या NGO ची किती चांदी करून घेतली हेही एकदा तपासून घ्यावे लागेल. आणि जर विदुषींना वाटते तितके वाईट दिवस असतील तर 2002 पासून आजवर तिस्ता सेटलवाड वर किती वेळा प्राणघातक हल्ले झाले गुजरात मध्ये? अरुंधती रॉय या नक्कीच महान लेखिका आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीने नक्षलवादाची भलावण केलीय ते कुणाला पटेल? ट्विंकल खन्ना, शैला रशीद, सागरिका, नंदिता दास, गुरमेहर कौर यांचे भारतीय लोकशाहीत काय मोठे योगदान आहे हे मला तरी अजून समजायचे आहे!

बाईसाहेब, तुम्ही असा वा तुम्ही ज्यांच्या बाजूने बोलताय त्या सर्व महान विदुषी असोत (आणि तुमच्या विरोधी पक्षातल्या पण) .... तुम्ही सगळ्या हस्तिदंती मनोऱ्यात जन्मलेल्या आहात. तुम्हाला लोकशाहीशी, स्त्रियांशी काही कर्तव्य असतं तर 2014 च्या आधीही तुम्ही कर्णकर्कशपणे ओरडू शकला असतात. पण तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षीय विचारधारेशी बांधील असल्याने सारं काही आलबेल असल्याच्या आनंदात निवांत होतात. त्या काळात तुम्हाला 5-10 हजारांसाठी विकल्या गेलेल्या अजाण मुली, सोनी सोरी सारख्या अत्याचारग्रस्त आदिवासी स्त्रिया, हॉस्पिटलच्या अभावी मरणाऱ्या गरोदर खेडूत स्त्रिया, काही हजारांसाठी वेठबिगार बनलेल्या माता-भगिनी दिसल्या नाहीत! दिसतील तरी कशा, कारण तेव्हा तुम्ही सत्ताकेंद्राच्या जवळ होता, आणि आपली सत्ता असताना काहीही अन्याय घडलाच नाही अशा सुरात बोलायचे असते. अगदी तसेच जसे 2012 ला डाळ 100 रुपये किलो झाली म्हणून शिमगा करणारी हेमामालिनी 2015 ला डाळ 200 रुपयांची झाली तरी मूग गिळून बसली होती!

मिडिया आणि सोशल मिडिया व्यापून राहिलेल्या सर्वपक्षीय विदुषींनो, तुम्ही TV वरील चर्चासत्रात कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला बसून तुमच्या महागड्या साडीची घडी न मोडू देता, या देशातल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि अब्रूची सुरक्षितता या प्राथमिक गरजा न भागलेल्या भारतीय स्त्रियांच्या कैवारी म्हणून अशाच बोलत राहणार वर्षानुवर्षे! सत्तेचे सोपान जसे हलतील तशा तुमच्या भूमिका आणि भाषा बदतलील, पदांसाठी, पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी! तुम्हाला या देशातील लोकशाहीशी, स्त्रियांच्या प्रश्नांशी काहीही घेणेदेणे नाहीये. तुम्हाला या देशातील स्त्रियांचा आवाज आणि चेहरा म्हणून दाखवण्यात समस्त राजकीय पक्ष आणि मिडीयाचे हितसंबंध आहेत. त्यामुळे तुमच्या चर्चांनी आणि विकतच्या रडारडीने कुणाला घंटा फरक पडत नाही; आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता (जे तुम्ही कधीच करत नाही) ना तेव्हा तुमच्या मागे काळे कुत्रे सुद्धा चालत नाही खायला दिल्याशिवाय!

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुणी "रांड" म्हणलं याचा एवढा राग का यावा?? मला वैयक्तिक विचाराल तर मला "रांड" या शब्दात पण काहीही वाईट दिसत नाही. नाईलाजाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या माझ्या माता-भगिनींना मी अजिबात तुच्छ लेखत नाही, कारण मी Page-3, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, उच्चशिक्षित, शुचितावादी वगैरे स्त्रीवादी विचारवंत नाहीये ना! पैसा, पद आणि प्रसिद्धीसाठी राजकीय पक्षांना स्वतःचा आत्मा विकणाऱ्या तुम्हा Page-3 विदुषींपेक्षा स्वतःच्या मुलाबाळांची पोट भरण्यासाठी शरीर विकणाऱ्या माझ्या रांड/वेश्या म्हणवल्या जाणाऱ्या माता-भगिनी मला जास्त आदरणीय आणि प्रिय आहेत, कारण त्या खऱ्या आहेत!

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment