वळवाचा पाऊस पडला असेल गावाकडं,
आज्याच्या घराची कौल भिजली असतील,
पाण्याच्या रेषा कौलातून भुईत गेल्या असतील,
अंगणात चिखलातून लाल पाणी वाहत असेल,
आज्याला जाऊन आता एकवीस वर्ष झाली,
तेव्हापासून कडब्याची गंज अंगणात लागली नाही,
किर्लोस्करचा जुना नांगर कधी हलला नाही,
दावणीला एक बैल त्यानंतर कधी डुरकला नाही,
पण तरीही ते आज्याचं घर होतं, सोपान आबाचं,
कारण धोंडूम्हातारी अजून त्या घरात राहत होती,
अंगण्यातला रांजणावर करवंटीचा पेला होता,
कुणी तरी पैसे घेऊन का होईना घरअंगण झाडून देत होतं,
यंदाच्या उन्हाळ्यात म्हातारी सुद्धा दादल्याकडं गेली,
आता त्या अंगणात कसलीच हालचाल होत नसेल,
वळवाच्या पावसाला गाणी ऐकवायला कुणीही नाही,
रानात पाणी पडलं असेल याचा कुणाला आनंद नसेल,
कडब्याची गंज झाकायची कुणाला घाई नसेल,
बैलाला आडोश्याला बांधायला कुणीही नसेल,
नांगरावर ताडपत्री टाकायची गरज नसेल,
कोंबड्या डालायला कुणी लगबगीत नसेल,
तो नांगर, तो कडबा, ते बैल, ती दावण, ती कौलं,
त्या कोंबड्या, ती डाल, तो रांजण व त्यावरची करवंटी,
तो आजा आणि ती आजी, यातलं यंदा काहीही नाही,
वळवाचा पाऊस यंदा त्या घरासारखाच बेवारस आहे!
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment