Monday, May 22, 2017

कायदा व सुव्यवस्था - कुठल्या गाढविणीच नाव?

उल्हासनगर मध्ये दुकानातून 2 रुपयांची चकली चोरली म्हणून 2 लहान बाळांचे डोके भादरून, त्यांना मारहाण करत त्यांचा व्हिडीओ दुकानदाराने बनवला. TV वर ती बातमी पाहताना अक्षरशः मी सुन्न झालो. खरंच समाज म्हणून इतक्या नीच स्तराला पोचलोय का आपण? स्वतःला काय समजायला लागलोय आपण की आपण कायदे हातात घ्यावेत? ५-६ वर्षांची मुले आम्हाला गुन्हेगार दिसायला लागावी?

कुणी अमक्या-तमक्याने बीफ खाल्ले अशी अफवा उडवावी आणि आम्ही त्याला जीव माराव? कुणी बांग्लादेशी गुप्तहेर आहे म्हणून अफवा उडवावी आणि आम्ही त्या भारतीय माणसाला जाहीररीत्या धिंड काढून जीव मारावे? गाय विकायला चाललेल्या 12 वर्षांच्या मुलाला आम्ही फास देऊन मारावे? "मुले पळवणारी टोळी आहे" असा आरोप करत आम्ही लोकांना जीव जाहीर दगडाने ठेचून मारावे? महापुरुषांची बदनामी केली म्हणून आम्ही लोकांना ठेचून मारावे?

कधी पाकिस्तानचा द्वेष, कधी काश्मीरींचा द्वेष, कधी बांगलादेशी लोकांचा द्वेष, कधी मुस्लिमांचा द्वेष, कधी आदिवासींचा द्वेष, कधी दलितांचा द्वेष, कधी ब्राम्हणांचा द्वेष, कधी ईशान्य भारतीयांचा द्वेष, कधी UP/बिहारींचा द्वेष, कधी प्रेमी युगुलांचा द्वेष, कधी आंतरजातीय/धर्मीय विवाह करणाऱ्यांचा द्वेष .... सगळा द्वेष करत करत आता आम्ही ५-६ वर्षांच्या लेकरांना सुद्धा जमावाने शिक्षा द्यायला लागलो!

या देशाने लोकशाही, मानवता, कायद्याचे राज्य, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मानवी मूल्यांनाच तिलांजली द्यायचे ठरवलेले दिसतेय एकंदरीत. आणि जो कोणी हे बोलून दाखवेल तो आमच्यालेखी देशद्रोही! आजच्या भारतात गांधी, नेहरू किंवा आंबेडकर यांच्यासारखे शहाणे लोक जन्मले असते तर ते नथुरामच्या गोळीने किंवा नैसर्गिक मृत्यूने न मरता, दुःखाने हताश होत आत्महत्या करून मेले असते.

अमेरिकेपेक्षाही प्रगत लोकशाहीचे संविधान असणारा देश जेव्हा सौदी अरेबिया सारख्या देशांच्या अनुकरणात धन्यता मानायला लागतो; तेव्हा तिथे अखलाक मारला जातो, लहान मुले गुन्हेगार दिसू लागतात, कायदा षंढ बनून पाहत राहतो, गांधी पुचाट वाटतो आणि नथुरामचे स्मारक उभा राहायला लागते!

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment