Thursday, September 28, 2017

Hugh Hefner - अमेरिकन प्लेबॉय

1940-50 च्या दशकात हॉलीवूडच्या सिनेमात नवरा-बायकोचे पात्र साकारणारे नट आणि नटीसुद्धा एका बेडमध्ये दाखवले जात नसत इतका संकुचितपणा अमेरिकन समाजात होता. त्याकाळी Esquire नावाच्या त्यावेळच्या सर्वात जास्त खपाच्या पुरुषांच्या मासिकात ह्यु हेफनर कॉपीराईटर म्हणून काम करायचा. 1952 साली फक्त 5 डॉलरने पगार वाढवावा म्हणून त्याने केलेली मागणी मासिकाने धुडकावून लावली आणि ह्युने नोकरी सोडली. कर्ज काढून 600 डॉलर, स्वतःच्या आईकडून 1000 डॉलर आणि अजून काही गुंतवणूकदारांकडून उरलेले असे एकूण 8000 डॉलर जमा करून पुढच्याच वर्षी 1953 साली ह्युने स्वतःचे मासिक सुरू केले, नाव होते "Playboy". हे नावसुद्धा आधी वेगळे ठरवले होते पण कॉपीराईटच्या समस्येमुळे अगदी शेवटच्या क्षणी प्लेबॉय या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.

प्लेबॉयच्या पहिल्या कव्हर फोटोसाठी ह्युला एक खास फोटो हवा होता. त्यासाठी असंख्य पिन-अप गर्ल्सचे फोटो त्याने नजरेखालून पाहिले पण त्यातला एकही त्याला पसंत येईना. त्यावेळेस त्याला कळले की मेरिलीन मोन्रोने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एक न्यूड फोटोशूट केले होते व ते फोटो अजून कुठेही प्रसिद्ध झाले नव्हते. मेरिलीनच्या सौंदर्याने तेव्हा अख्ख्या जगाला भुरळ पाडली होती व तिचे नाणे हॉलीवूडमध्ये चालायचे. ह्युने त्या फोटोग्राफर कडून अत्यंत चलाखीने मेरिलीनच्या एका नग्न फोटोचे हक्क विकत घेतले, आणि ते झाले प्लेबॉयच्या पहिल्या अंकाचे कव्हर! हातोहात प्लेबॉयच्या 50,000 प्रती खपल्या आणि प्लेबॉय हे नाव जगभराला माहीत झाले. पुढे अवघ्या 2-3 वर्षात प्लेबॉयने Esquire ला सुद्धा खपाच्या बाबतीत मागे टाकले.

प्लेबॉयचा प्रत्येक अंक ह्यु स्वतः संपादित करायचा, आणि त्यात लिहायचा सुद्धा. प्रत्येक अंकाचे डिझाईन हे ह्युच्या नजरेत निर्दोष असल्याशिवाय तो अंक छापला जायचा नाही. लाइफस्टाइल, कला, साहित्य, राजकारण, विज्ञान, रहस्यकथा, मानवी हक्काचे लढे, खेळ, फॅशन, सेक्स अशा विविध विषयांबद्दल मते, माहिती देणारे धाडसी लेख ह्युने कशाचीही पर्वा न करता छापले. ह्युने प्लेबॉयसाठी घेतलेल्या महान नेत्यांच्या व कलाकारांच्या मुलाखती तर विशेष गाजल्या. वर्णद्वेषाविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या माल्कम एक्स आणि अहिंसेने लढा देणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, या दोघांच्या बेधडक मुलाखती ह्युने घेतल्या व छापल्या. फिडेल कॅस्ट्रो पासून जॉन लेनन पर्यंत जगप्रसिद्ध लोक ह्युच्या प्लेबॉयशी कसलाही आडपडदा न ठेवता व्यक्त झाले.

प्लेबॉय मासिकाच्या यशानंतर ह्युने स्वतःचे प्लेबॉय क्लब जगभर उभे केले. तिथे काम करणाऱ्या वेट्रेस मुलींना Bunny म्हणतात. या बनीजचा ड्रेस डिझाईन करण्यातसुद्धा ह्युचा सिंहाचा वाटा होता. ग्राहकाला कसे बोलावे, ड्रिंक कसे द्यावे यासाठी बनीजचे खूप उच्चप्रतीचे ट्रेनिंग झाले होते. जेव्हा पहिल्यांदा बनी बनण्यासाठी ह्युने जाहिराती दिल्या तेव्हा तिथे ऑडिशन देण्यासाठी अख्ख्या अमेरिकेतून आलेल्या मुलींची झुंबड उडाली. प्लेबॉय क्लब हे जगप्रसिद्ध झाले होते. पूढे याच बनीजना त्याने प्लेबॉयच्या कव्हरवर सुद्धा स्थान दिले आणि त्यातून कित्येक सुपरमॉडेल, अभिनेत्री हॉलीवूडला मिळाल्या. याच्या पुढचा भाग होता "Playboy Mansion". ह्युने स्वतःच्या भल्यामोठ्या घरालाच एका क्लबमध्ये बदलून टाकले जिथे तो कामही करायचा आणि जगभरातून आलेल्या सेलेब्रिटीचे आदरातिथ्यही करायचा. त्याच्या मँशन मध्ये प्रवेश मिळावा म्हणून मोठेमोठे सेलेब्रिटी, राजकारणी, बिझनेसमन लोक वाट पाहत राहायचे. त्यानंतर एक पाऊल पुढे जात ह्युने स्वतःचे भलेमोठे विमानही विकत घेतले आणि प्लेबॉयच्या स्टाईलने प्रवास करायला जगभरातून लोक त्यात दाखल झाले.

जेव्हा अमेरिकेतला वर्णद्वेषी श्वेतवर्णीय समाज काळ्या कलाकारांना मंच नाकारत होता, तेव्हा ह्युने प्रवाहाच्या विरोधात जायची मोठी जोखीम घेत त्या कलाकारांना प्लेबॉय मासिकात, टीव्हीवर आणि त्याच्या प्लेबॉय क्लबमध्ये व्यक्त व्हायची संधी दिली. ह्युचे हे सगळे प्रयोग क्रांतिकारी, काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे होते. मॉडेलच्या नग्न फोटोंमुळे ह्युवर फेमिनिस्ट लोकांनी भरभरून टीका केली पण त्यामुळे ह्युने कधी त्यांचा राग केला नाही, उलट त्याने खुलेपणाने त्याच्या घोर विरोधी असणाऱ्या महिला पत्रकारांनासुद्धा दिलखुलास मुलाखती दिल्या. गे लोकांचे हक्क असोत, गर्भपाताला समर्थन असो, फेमिनिझम असो की व्हिएतनाम युद्धाला विरोध असो, ह्युने प्रत्येक वेळी धाडसी, प्रवाही आणि भविष्यवेधी भूमिका घेतल्या. एकीकडे व्हिएतनाम युद्धासाठी सरकारला विरोध करत, दुसरीकडे त्याने व्हिएतनाम मध्ये अडकलेल्या अमेरिकन सैन्याचे मनोबल वाढवायला स्वतःच्या विमानाने त्याच्या सुंदर प्लेमेट (मॉडेल) प्लेबॉयचा नवा अंक घेऊन पाठवल्या. सरकारी धोरणाला विरोध आणि पण सरकारच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींचा आदर हे दोन्ही तो एकाचवेळी अत्यंत सभ्यपणे करत होता.

हे सगळे होत असताना ह्युला उत्तान चित्रे छापली म्हणून अटकही झाली. प्लेबॉय क्लबसाठी त्याने एका शहराच्या मेयरने मागितलेली लाच दिली म्हणून त्याच्यावर खटलाही झाला, पण त्याने प्रामाणिकपणे स्वतःची चूक मान्य करत स्वतःचे साम्राज्य वाचवले. ह्युच्या मदतनीस मुलीवर ड्रग्ज विकल्याचा खोटा आरोप ठेवून ह्युला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ह्यु पुरून उरला. त्याचे व्यक्तिगत आयुष्य अत्यंत घडामोडीचे राहिले. पहिल्या घटस्फोटानंतर ह्युने कधीही लग्न केले नाही, पण त्याच्या आयुष्यात असंख्य स्त्रिया येत जात राहिल्या. या सगळ्यात ह्युने प्लेबॉयच्या साम्राज्याला कुठेही धक्का लागू दिला नाही. Esquire सारख्या सेक्स मॅगझीनला टक्कर देत, लाइफस्टाइल मॅगझीन हा नवा प्रकार ह्यु हेफनरने प्लेबॉयच्या रूपाने जगापूढे आणला व त्याला व्यावसायिक यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. एक हाडाचा उद्योजक, एक धडाडीचा संपादक, लेखक आणि विविध चळवळींना जगासमोर ठेवणाऱ्या ह्युने अमेरिकेच्या सांस्कृतिक व राजकीय जाणिवा मुळापासून हादरवून सोडल्या, नव्याने परिभाषित केल्या.

आज महान Playboy Hugh Hefner वयाच्या 91 व्या वर्षी निधन पावला. त्याच्या पहिल्या कव्हर गर्लच्या मेरिलीन मोन्रोच्या थडग्याशेजारीच ह्युला दफन केले जाईल. "Life is too short to be living someone else's dream." हे स्वतःचे शब्द ह्युने शेवटच्या क्षणापर्यंत जगून दाखवले. त्याला Rest In Peace वगैरे मी म्हणणार नाही. जर चुकून स्वर्ग नावाची कल्पना खरी असेल आणि त्यात सुंदर अप्सरा असतील तर "हे स्वर्गस्थ अप्सरांनो, खुश व्हा! तुमचा प्लेबॉय येतोय!"

- डॉ. विनय काटे

Monday, September 18, 2017

सफदर, तू आज हवा होतास!

मी पाच-सहा वर्षाचा असताना 1989-90 सालच्या आसपास दूरदर्शनवर "पढना लिखना सिखो, ओ मेहनत करनेवालों" हे गाणे लागायचे. त्याचे शब्द, संगीत आणि चाल इतकी सुंदर होती की तेवढ्या लहानपणीसुद्धा मी ते गाणे कित्येकवेळा गुणगुणायचो. दुरदर्शनने ते गाणे तेव्हा प्रौढ साक्षरता मोहिमेसाठी वापरले होते. पुढे काही वर्षांनी मला कळले की दुरदर्शनने त्या मूळ गाण्याचा फक्त मुखडा/ध्रुपद वापरला होता व त्या मुखड्यापेक्षाही त्या गाण्याचा अंतरा/कडवी कित्येकपटीने स्फोटक व विचार करायला प्रवृत्त करणारा होता. त्याही काळात प्रसारमाध्यमांचे संपादक सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर कसे होते हे कळल्यावर वैषम्य वाटले. ते गाणे पूर्ण स्वरूपात खालीलप्रमाणे आहे -

पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो
क ख ग घ को पहचानो, अलिफ़ को पढ़ना सीखो
अ आ इ ई को हथियार बनाकर लड़ना सीखो ।।धृ।।

ओ सड़क बनाने वालो, ओ भवन उठाने वालो
खुद अपनी किस्मत का फैसला अगर तुम्हें करना है
ओ बोझा ढोने वालो ओ रेल चलने वालो
अगर देश की बागडोर को कब्ज़े में करना है ।।१।।

पूछो, मजदूरी की खातिर लोग भटकते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी सूखी रोटी गिद्ध लपकते क्यों हैं?
पूछो, माँ-बहनों पर यों बदमाश झपटते क्यों हैं?
पढ़ो,तुम्हारी मेहनत का फल सेठ गटकते क्यों हैं? ।।२।।

पढ़ो, लिखा है दीवारों पर मेहनतकश का नारा
पढ़ो, पोस्टर क्या कहता है, वो भी दोस्त तुम्हारा
पढ़ो, अगर अंधे विश्वासों से पाना छुटकारा
पढ़ो, किताबें कहती हैं – सारा संसार तुम्हारा ।।३।।

पढ़ो, कि हर मेहनतकश को उसका हक दिलवाना है
पढ़ो, अगर इस देश को अपने ढंग से चलवाना है
पढ़ना-लिखना सीखो, ओ मेहनत करने वालो
पढ़ना-लिखना सीखो, ओ भूख से मरने वालो!

जवळपास तीस-चाळीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या भारतातील आर्थिक विषमतेविरुद्ध, भांडवलशाहीविरुद्ध, जातीयतेविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध आणि एकूणच व्यवस्थेविरुद्ध सामान्य लोकांना जागृत करणारे हे गाणे लिहिले होते सफदर हाश्मीने!

1954 साली दिल्ली मध्ये जन्मलेल्या सफदरने दिल्लीतूनच BA व MA केले. विद्यार्थीदशेपासूनच सफदर कम्युनिस्ट विचारांनी भारलेला होता. अवघ्या 19 व्या वर्षी त्यांनी "जन नाट्य मंच" ची स्थापना केली, ज्या संस्थेने जवळपास 24 पथनाट्यांचे 4000 प्रयोग सर्वसामान्य लोकांसाठी केले. यातल्या बहुतांश नाटकांचे लेखन व जवळपास सर्वांचे दिग्दर्शन सफदरने केले. त्यातल्या कित्येक पथनाट्यांत त्यांनी स्वतः अभिनयही केला. इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात, त्यावेळच्या भ्रष्टाचाराविरोधात सफदरने "हल्ला-बोल", "कुर्सी, कुर्सी, कुर्सी" अशी अनेक पथनाट्ये केली.

आजच्या काळात कम्युनिस्ट कन्हैय्या कुमारच्या तोंडून "आझादी, आझादी! भूकमरीसे आझादी, सामंतवादसे आझादी!" हे ऐकून सरकारच्या पायाखालची वाळू सरकते व त्याला देशद्रोहाच्या खोट्या केसेसमध्ये गुंतवले जाते. मग तीस वर्षांपूर्वी सफदरने काय त्रास सहन केले असतील याची कल्पनाही करणे शक्य नाही. 1 जानेवारी 1989 ला असेच एक पथनाट्य करत असताना गाजियाबादमध्ये काँग्रेसच्या गुंडांनी सफदरवर खुनी हल्ला केला, ज्यात 2 जानेवारीला इस्पितळात सफदरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अगदी दोनच दिवसांनी 4 जानेवारीला सफदरच्या पत्नीने त्याच्या हत्येच्या ठिकाणी त्याच्या पथनाट्याचा प्रयोग पूर्ण करून स्वतःच्या पतीला श्रद्धांजली वाहिली होती. रात्रंदिवस बातम्यांच्या रतीब घालणारे शेकडो चॅनेल तेव्हा नव्हते म्हणून हे गाणे, ही घटना तेव्हा खूप कमी लोकांच्या माहितीत आली.

आज जर सफदर हाश्मी जिवंत असते तर सडकेपासून संसदेपर्यंत आणि टीव्हीच्या बातम्यांमध्येही हा कवी, नाटककार आजच्या सत्ताधीशांची, विरोधकांची, बिझनेसमन्सची आणि धर्माच्या ठेकेदारांची पिसे काढताना दिसले असते. किंवा कदाचित दाभोळकर, कलबुर्गी यांच्याही आधी गोळ्या खाऊन मेले असते.

सफदर, तू खरंच आज हवा होतास!

- डॉ. विनय काटे

Sunday, September 17, 2017

हुसेनविषयी काही मनातलं

कधी मुंबईच्या ताजमहाल हॉटेलच्या हेरिटेज बिल्डींगचे रिसेप्शन पाहून या. त्या भल्या मोठ्या रिसेप्शन डेस्कच्या मागे एका मोठ्या कॅनव्हास वर भारताची संस्कृती एका मोठ्या चित्रकाराने रंगवलीय. सालारजंग म्युजियम, हैद्राबाद मधल्या भारतीय पेंटींग्जच्या गॅलरीत हाच चित्रकार स्वागताला पहिले पेंटिंग ठेवून असतो. जुन्या अहमदाबादच्या "लकी रेस्टॉरंट" मध्ये, जिथे आत दोन थडगी आहेत अशा विचित्र व प्रसिद्ध हॉटेलात एक चित्र आहे दोन उंटांचं ज्यावर कुराणातील काही आयाती आहेत, ते चित्रही याचेच. अहमदाबादमधील माझ्या एका सिनियर मित्राच्या घरी तर मला या चित्रकाराची 3 पेंटिंग्ज पाहायला मिळाली, वीणा वाजवणारा गणेश, बासरी वाजवत गायीच्या पुढे उभा कृष्ण आणि करुणेने भरलेल्या मदर टेरेसा. हा चित्रकार दुसरा तिसरा कुणीही नाही, तर पंढरपूरसारख्या छोट्याशा गावात 17 सप्टेंबर 1915 साली जन्मलेला एक मुलगा जो नंतर भारतातील सर्वोत्कृष्ट आणि जागतिक स्तरावर नावाजलेला चित्रकार बनला असा मकबूल फिदा म्हणजेच एम्. एफ. हुसेन!

मी अगदी दुसरी-तिसरीत असताना भारतातल्या काही महान पेंटर्सबाबत वाचलं त्यातले प्रकर्षाने लक्षात राहिलेले म्हणजे राजा रवी वर्मा, गायतोंडे आणि हुसेन, त्यातले फक्त हुसेन तेव्हा हयात होते. सिनेमाची पोस्टर रंगवण्यापासून ते अगदी रस्त्याकडेला बसून चित्रे काढून देणारे हुसेन हे आंतरराष्ट्रीय किर्तीला पोचणे हे खरेच विशेष वाटावे असे होते. पुढे आयुष्यात हुसेन मला त्यांच्या असंख्य चित्रांतून वेगवेगळ्या ठिकाणी भेटत राहिले; कधी गणेश, कधी गांधी, कधी तेरेसा, कधी भारतमाता, कधी माधुरी तर कधी त्यांच्या आवडत्या घोड्याच्या पेंटींग्जने भुरळ पाडत राहिले. त्यांच्याबद्दल असंख्य मोठ्या लोकांकडून भरभरून ऐकलं. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हुसेन कामगार चळवळीतल्या कवींसोबत, शाहिरांच्या सोबत पुरोगामी विचारांच्या प्रसाराचे काम कसे करत होते ते नारायण सुर्वेंकडून ऐकले. पुढे आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण वगैरे मिळाले आणि अमाप पैसा मिळाला तरी कलाकार म्हणून हा माणूस या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त कसा होता हेही ऐकले.

राजा रवी वर्मांसारखेच हुसेनसुद्धा मनस्वी चित्रकार आणि त्यामुळे ओघानेच प्रयोगशील होते. चित्रकार लोकांना दिसणारे जग आणि सामान्य लोकांना दिसणारे जग हे खूप वेगळे असते. चित्रकारांच्या दृष्टीला दिसणारी रूपके, आकार, व्यक्ती, रंग आणि त्यांचे दृष्टिकोन हे खूप वेगळे असतात आणि म्हणूनच रवी वर्मा आणि हुसेन या दोघांचीही चित्रे, त्यांचे प्रयोग हे अत्यंत वादळी ठरले. त्यांनी चितारलेली नग्न भारतमाता आमच्या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना पचनी पडली नाही. बाकी या देशातल्या गरिबीमुळे कपडे न मिळणाऱ्या, बलात्कार होणाऱ्या असंख्य भारतमाता मात्र या चित्राबद्दल आक्षेप असणाऱ्या हिंदुत्ववादी लोकांना दिसल्या नाहीत. खजुराहोपासून ते अगदी भारतभरातील देवळांतून दिसणाऱ्या हिंदू देवींच्या अर्धनग्न मूर्तींना विसरलेले हिंदुत्ववादी, हुसेनच्या अर्धनग्न देवीच्या चित्रावर पेटून उठले. "मिनाक्षी" या हुसेनच्या सिनेमात कुराणातील आयात गाण्यात वापरली म्हणून समस्त कट्टर मुस्लिम संघटनांनी हुसेनला इशनिंदेचा दोषी ठरवले. हिंदूंनी हुसेनवर हल्ले केले, केसेस केल्या, त्यांची चित्रे फाडली. भारत ईस्लामी देश असता तर मुस्लिमांनी त्यांना इशनिंदेसाठी जीवही मारलं असतं. धार्मिक कट्टरतेच्या बाबतीत भारतातील हिंदू आणि मुस्लिम एकमेकांना कुठेही कमी नाहीत हे हुसेनइतके क्वचितच कुणी अनुभवले.

ज्या मनस्वी पद्धतीने हुसेननी चित्रे काढली तेवढ्याच मनस्वीपणे त्यांनी काही शॉर्टफिल्म आणि सिनेमेसुद्धा बनवले. त्यांच्या पहिल्या शॉर्टफिल्मला 1967 साली आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पुढे माधुरीला घेऊन त्यांनी "गजगामीनी" हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा सिनेमा बनवला. हुसेन यांचं माधुरीवरचं प्रेम आणि त्यांनी तिची काढलेली चित्रे ही त्या काळात समस्त मीडियाच्या आणि परंपराप्रिय भारतीय लोकांच्या चर्चेचा विषय होती. पुढे हुसेननी तब्बूसोबत "मिनाक्षी" बनवला, जो पुन्हा एक हटके सिनेमा होता. हुसेनचे सिनेमे थिएटरमध्ये चालणार नव्हते हे त्यांना माहीत होते व ते तेव्हाही म्हणले होते की ते स्वतःसाठी सिनेमा बनवतात. हुसेनने जे जे केलं ते भारतात वादग्रस्त बनून राहिलं आणि बाकी जगभरात नावाजल गेलं. कदाचित हुसेन एका चुकीच्या समाजात, चुकीच्या काळात जन्माला आले होते जिथे त्यांचे "भारतीय रेनेसौं"चे प्रयोग हे क्वचितच नावाजले जाणार होते.

स्वतःवर झालेल्या असंख्य केसेस, स्वतःच्या नावाने निघणारे वारंट या तमाम कटकटींना वैतागून "भारताचा पिकासो" म्हणून नावाजला गेलेला हा चित्रकार 2007 साली भारत सोडून परदेशात आश्रय घेता झाला. कतार आणि इंग्लंडमध्ये हुसेननी आयुष्याची उरलेली वर्षे घालवली. 2011 साली इंग्लंडमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. त्यांच्या मृत्यनंतर भारतात काही लोकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला तर काही नामवंत कलाकारांनी त्यांच्या मरणाने काही विशेष फरक पडत नाही वगैरे शब्दही बोलले. हुसेनबाबत कुणी कितीही टोकाची मते व्यक्त केली तरी त्यांच्या कलेच्या महानतेच्या बाबतीत खचितच कुणाचे दुमत असेल.

आयुष्यभर अनवाणी चालणारा, 8 कोटी रुपयांची बुगाती वेरॉन चालवणारा, हिंदूंचे आणि मुस्लिमांचे दोघांचेही धर्मग्रंथ कोळून पिलेला, स्वतःला व्यक्त करण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा एम्. एफ. हुसेन हा निःसंशय एक खराखुरा कलाकार होता. आज हुसेनचा 101 वा जन्मदिवस आहे. हुसेन शरीराने गेले असले तरी त्यांच्या चित्रांमधून अजूनही मला भेटत राहतात व भविष्यात भेटत राहतील.

हॅप्पी बर्थडे हुसेनसाब 💐🎂

- डॉ. विनय काटे

Saturday, September 16, 2017

बुलेट ट्रेन - एक पांढरा हत्ती!

जपानची लोकसंख्या आहे जवळपास 13 कोटी, आणि भारताची 130 कोटी. जपानच्या भूभागापेक्षा भारताचा भूभाग जवळपास 9 पट आहे. जपान हा एक चिंचोळ्या पट्टीच्या आकाराचा देश आहे ज्यात कुठल्याही ठिकाणापासून समुद्रकिनारा 150 किमी पेक्षा जास्त दूर नाहीये. जपानची 94% लोकसंख्या शहरात राहते तर भारताची 32% लोकसंख्या शहरी आहे. जपानचा GDP 4.9 ट्रीलियन डॉलर आहे तर भारताचा 2.3 ट्रीलियन डॉलर, थोडक्यात जपानचा GDP भारताच्या दुपटीपेक्षाही अधिक आहे. जपानमधील छोट्याशा भूभागावर असणारी मोठी शहरे ही तिथल्या व्यापाराची, तंत्रज्ञानाची, उद्योगांची केंद्रे आहेत जिथे जगभरातून लोक व्यावसायिक कारणाने येत असतात. आणि म्हणूनच एवढ्याशा जपानमध्ये 98 विमानतळ आहेत ज्यापैकी जवळपास 29 विमानतळ हे मोठे आहेत, ज्यात 5 आंतरराष्ट्रीय तर 24 देशांतर्गत विमानतळ आहेत.

जर जपानमध्ये एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त विमानाने जायचे असेल तर राहत्या ठिकाणापासून एअरपोर्टला जाणे, तिथे सेक्युरिटी, बोर्डिंग, फ्लाईंग टाईम, डीप्लेनिंग आणि पुढे इप्सित ठिकाणी जाणे हा एकूण काळ बरेच वेळा बुलेट ट्रेनच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळेच्या आसपास येतो. आणि तिथे बुलेट ट्रेनपेक्षा विमानाचे भाडे हे साधारण दीडपट आहे. त्यामुळे बरेच लोक विमानाने जाण्यापेक्षा सोय आणि कमी खर्च हे पाहून बुलेट ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे साहजिकच ह्या चिंचोळ्या देशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बुलेट ट्रेनचा मार्ग ठेवणे हे वेळ, पैसा आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर पडते व पडले आहे.

याउलट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबद्दल मात्र काही गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत त्या अशा -

१) व्याजदर: या प्रकल्पाचा एकूण खर्च 110,000 कोटी रुपये आहे. त्यातले 88000 कोटी आपल्याला 0.1% दराने कर्जाने मिळणार. थोडक्यात 22,000 कोटी रुपये आपल्याला आता द्यायचे आहेत जी मोठी रक्कम आहे. उरलेल्या 88,000 कोटींवर दिलेले 0.1% व्याज हे जपानमधल्या सरकारी व्याजदराच्या 10 पट महाग आहे. आणि येनच्या तुलनेत भारताचा वधारत चाललेला रुपया पाहून हा व्याजदर प्रत्यक्षात 4-5% च्या आसपास पडू शकतो. मोदींनी सांगितल्याप्रमाणे हा काही फुकटचा नाही तर उलट खूप महाग सौदा आहे.

२) वेळ: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जायला साधारण अडीच तास वेळ लागणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद विमानाने गेले तरी सिक्युरिटी, बोर्डिंग, फ्लाईंग हा सगळा वेळ पण तेवढाच पडतो. त्यामुळे यात खूप विशेष अशी वेळेची बचत होणार नाहीये.

३) भाडे: मुंबई-अहमदाबादचे विमानाचे भाडे सध्या 2 ते 3 हजार रुपयांच्या आसपास आहे. याउलट बुलेट ट्रेनचे भाडे 3 ते 5 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. साहजिकच कुणीही विमानाचा प्रवास सोडून, दुप्पट खर्चाने रेल्वेने जायच्या भानगडीत पडणार नाही.

४) प्रवासीसंख्या: सरकारी अनुमानानुसार सुरुवातीला वर्षाला 1.6 कोटी लोक या ट्रेनने प्रवास करतील, म्हणजे दिवसाला जवळपास 45000 लोक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जातील, जिचे तिकीट विमानापेक्षा महाग आहे. मुंबई-अहमदाबाद हवाई मार्गावर आजच्या घडीला दररोज 15 ते 17 वनवे फ्लाईट आहेत. रिटर्न फ्लाईट धरून दिवसाला 30-35 विमाने या मार्गावर थेट उडतात. दर विमानात 180 प्रवासी धरले तरी सरासरी 5 ते 6 हजार प्रवासी दररोज मुंबई-अहमदाबाद विमानाने जातात. अजून 5 वर्षात (2022च्या उदघाटन दिनापर्यंत) असे काय होणार आहे की अचानक हा आकडा 5-6 हजारांवरून थेट 45 हजारांवर जाईल.

इथे विमानाशी तुलना यासाठी केलीय कारण वेळ आणि तिकीट यांच्याबाबतीत बुलेट ट्रेनची साध्या रेल्वेशी तुलना करणे योग्य नाहीये. 2050 साली तर हा आकडा दिवसाला चक्क 1.6 लाख प्रवासी असा अव्वाच्या सव्वा फुगवून सांगितला आहे. हे इतके लाखो प्रवासी अचानक दररोज मुंबईहून अहमदाबादला का जाऊ लागतील? अहमदाबादमध्ये अशी किती खासगी कंपन्याची किंवा सरकारी ऑफिसेस आहेत की त्यासाठी इतक्या संख्येने लोक तिथे जावे? आणि तेसुद्धा विमानापेक्षा महाग तिकीट काढून?

५) तंत्रज्ञान: बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारताला मिळेल म्हणून जो गवगवा केला जातोय त्यातही विशेष दम नाहीये. युरोपातल्या व चीनमधल्या सुपरफास्ट ट्रेन या बुलेट ट्रेनपेक्षाही प्रगत तंत्रज्ञानावर, Magnetic Levitation वर चालत आहेत. बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान हे जवळपास 50 वर्षे जुने आहे आणि ते जपान आपल्याला भरभक्कम पैसे घेऊन उगीचच गळ्यात मारत आहे.

६) नफा-नुकसान: IIM अहमदाबादने केलेल्या एका अभ्यासानुसार या बुलेट ट्रेनला तिचा झालेला खर्च भरून काढायला जवळपास 100 वर्ष लागणार आहेत. म्हणजे थोडक्यात सरकारने दिलेले प्रवासी संख्येचे आकडे आणि तिकिटातून मिळणारे उत्पन्नाच्या वल्गना या केवळ धूळफेक आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कुठल्याच प्रकारे उपयुक्त व फायदेशीर दिसत नाहीये. ह्या प्रकल्पाचा जनक किंवा ही कल्पना कुणाची का असेना, त्यात मोदींनी घेतलेला रस हा त्यांच्या प्रादेशिक राजकारणातल्या हेतूंनी प्रेरित आहे, त्याचा देशाच्या विकासाशी किंवा लोकांच्या पैशाच्या योग्य विनिमयाच्या कर्तव्याशी काहीही संबंध नाही. भलेमोठे कर्ज काढून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवून गुजरातचा विकास केला म्हणण्यापेक्षा, त्याच्या 10-15% खर्चात सुरत, भडूच वगैरे ठिकाणी छोटे विमानतळ बांधून त्यांवर स्वस्तात सरकारी विमाने चालवून तिथल्या उद्योगांना उभारी देणे शहाणपणाचे आहे.

हातात सत्ता असली किंवा जनतेने निवडून सरकार चालवायचा आदेश दिला की जनतेच्या पैशाची कशीही उधळपट्टी करायचा हक्क मिळत नसतो हे आमच्या प्रधानसेवकांना कोण समजावून सांगणार? त्यांच्या एका तुघलकी नोटबंदीने अर्थव्यवस्थेचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टमध्ये उघडच 1.1 लाख कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे. हे बजेट भारताच्या आरोग्यासाठी होणाऱ्या 3 वर्षाच्या खर्चाइतके मोठे आहेत. भारतीय रेल्वेची सध्याची दयनीय स्थिती या पैशात सुधारता आली असती. अनेक मोठ्या शहरांत त्यातून मेट्रो रेल्वे उभारता आल्या असत्या. कित्येक मोठी हॉस्पिटल बांधता आली असती. पण आम्हाला प्रादेशिक निवडणुका जिंकायच्या आहेत, आम्हाला दिखाऊगिरी करायची आहे आणि त्यामुळे असले प्रश्न ऐकून घ्यायचे नसतात. नोटबंदीचे नुकसान पाहायला मोदी सत्तेत होते, पण रिकामी बुलेट ट्रेन धावताना पाहायला व त्यात झालेलं 1.1 लाख कोटींचे नुकसान पाहायला ते सत्तेत नसावेत ही प्रामाणिक इच्छा!

- डॉ. विनय काटे