जपानची लोकसंख्या आहे जवळपास 13 कोटी, आणि भारताची 130 कोटी. जपानच्या भूभागापेक्षा भारताचा भूभाग जवळपास 9 पट आहे. जपान हा एक चिंचोळ्या पट्टीच्या आकाराचा देश आहे ज्यात कुठल्याही ठिकाणापासून समुद्रकिनारा 150 किमी पेक्षा जास्त दूर नाहीये. जपानची 94% लोकसंख्या शहरात राहते तर भारताची 32% लोकसंख्या शहरी आहे. जपानचा GDP 4.9 ट्रीलियन डॉलर आहे तर भारताचा 2.3 ट्रीलियन डॉलर, थोडक्यात जपानचा GDP भारताच्या दुपटीपेक्षाही अधिक आहे. जपानमधील छोट्याशा भूभागावर असणारी मोठी शहरे ही तिथल्या व्यापाराची, तंत्रज्ञानाची, उद्योगांची केंद्रे आहेत जिथे जगभरातून लोक व्यावसायिक कारणाने येत असतात. आणि म्हणूनच एवढ्याशा जपानमध्ये 98 विमानतळ आहेत ज्यापैकी जवळपास 29 विमानतळ हे मोठे आहेत, ज्यात 5 आंतरराष्ट्रीय तर 24 देशांतर्गत विमानतळ आहेत.
जर जपानमध्ये एखाद्या शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त विमानाने जायचे असेल तर राहत्या ठिकाणापासून एअरपोर्टला जाणे, तिथे सेक्युरिटी, बोर्डिंग, फ्लाईंग टाईम, डीप्लेनिंग आणि पुढे इप्सित ठिकाणी जाणे हा एकूण काळ बरेच वेळा बुलेट ट्रेनच्या प्रवासाला लागणाऱ्या वेळेच्या आसपास येतो. आणि तिथे बुलेट ट्रेनपेक्षा विमानाचे भाडे हे साधारण दीडपट आहे. त्यामुळे बरेच लोक विमानाने जाण्यापेक्षा सोय आणि कमी खर्च हे पाहून बुलेट ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे साहजिकच ह्या चिंचोळ्या देशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बुलेट ट्रेनचा मार्ग ठेवणे हे वेळ, पैसा आणि दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर पडते व पडले आहे.
याउलट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबद्दल मात्र काही गोष्टी विचार करण्याजोग्या आहेत त्या अशा -
१) व्याजदर: या प्रकल्पाचा एकूण खर्च 110,000 कोटी रुपये आहे. त्यातले 88000 कोटी आपल्याला 0.1% दराने कर्जाने मिळणार. थोडक्यात 22,000 कोटी रुपये आपल्याला आता द्यायचे आहेत जी मोठी रक्कम आहे. उरलेल्या 88,000 कोटींवर दिलेले 0.1% व्याज हे जपानमधल्या सरकारी व्याजदराच्या 10 पट महाग आहे. आणि येनच्या तुलनेत भारताचा वधारत चाललेला रुपया पाहून हा व्याजदर प्रत्यक्षात 4-5% च्या आसपास पडू शकतो. मोदींनी सांगितल्याप्रमाणे हा काही फुकटचा नाही तर उलट खूप महाग सौदा आहे.
२) वेळ: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जायला साधारण अडीच तास वेळ लागणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद विमानाने गेले तरी सिक्युरिटी, बोर्डिंग, फ्लाईंग हा सगळा वेळ पण तेवढाच पडतो. त्यामुळे यात खूप विशेष अशी वेळेची बचत होणार नाहीये.
३) भाडे: मुंबई-अहमदाबादचे विमानाचे भाडे सध्या 2 ते 3 हजार रुपयांच्या आसपास आहे. याउलट बुलेट ट्रेनचे भाडे 3 ते 5 हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. साहजिकच कुणीही विमानाचा प्रवास सोडून, दुप्पट खर्चाने रेल्वेने जायच्या भानगडीत पडणार नाही.
४) प्रवासीसंख्या: सरकारी अनुमानानुसार सुरुवातीला वर्षाला 1.6 कोटी लोक या ट्रेनने प्रवास करतील, म्हणजे दिवसाला जवळपास 45000 लोक मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने जातील, जिचे तिकीट विमानापेक्षा महाग आहे. मुंबई-अहमदाबाद हवाई मार्गावर आजच्या घडीला दररोज 15 ते 17 वनवे फ्लाईट आहेत. रिटर्न फ्लाईट धरून दिवसाला 30-35 विमाने या मार्गावर थेट उडतात. दर विमानात 180 प्रवासी धरले तरी सरासरी 5 ते 6 हजार प्रवासी दररोज मुंबई-अहमदाबाद विमानाने जातात. अजून 5 वर्षात (2022च्या उदघाटन दिनापर्यंत) असे काय होणार आहे की अचानक हा आकडा 5-6 हजारांवरून थेट 45 हजारांवर जाईल.
इथे विमानाशी तुलना यासाठी केलीय कारण वेळ आणि तिकीट यांच्याबाबतीत बुलेट ट्रेनची साध्या रेल्वेशी तुलना करणे योग्य नाहीये. 2050 साली तर हा आकडा दिवसाला चक्क 1.6 लाख प्रवासी असा अव्वाच्या सव्वा फुगवून सांगितला आहे. हे इतके लाखो प्रवासी अचानक दररोज मुंबईहून अहमदाबादला का जाऊ लागतील? अहमदाबादमध्ये अशी किती खासगी कंपन्याची किंवा सरकारी ऑफिसेस आहेत की त्यासाठी इतक्या संख्येने लोक तिथे जावे? आणि तेसुद्धा विमानापेक्षा महाग तिकीट काढून?
५) तंत्रज्ञान: बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान भारताला मिळेल म्हणून जो गवगवा केला जातोय त्यातही विशेष दम नाहीये. युरोपातल्या व चीनमधल्या सुपरफास्ट ट्रेन या बुलेट ट्रेनपेक्षाही प्रगत तंत्रज्ञानावर, Magnetic Levitation वर चालत आहेत. बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान हे जवळपास 50 वर्षे जुने आहे आणि ते जपान आपल्याला भरभक्कम पैसे घेऊन उगीचच गळ्यात मारत आहे.
६) नफा-नुकसान: IIM अहमदाबादने केलेल्या एका अभ्यासानुसार या बुलेट ट्रेनला तिचा झालेला खर्च भरून काढायला जवळपास 100 वर्ष लागणार आहेत. म्हणजे थोडक्यात सरकारने दिलेले प्रवासी संख्येचे आकडे आणि तिकिटातून मिळणारे उत्पन्नाच्या वल्गना या केवळ धूळफेक आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कुठल्याच प्रकारे उपयुक्त व फायदेशीर दिसत नाहीये. ह्या प्रकल्पाचा जनक किंवा ही कल्पना कुणाची का असेना, त्यात मोदींनी घेतलेला रस हा त्यांच्या प्रादेशिक राजकारणातल्या हेतूंनी प्रेरित आहे, त्याचा देशाच्या विकासाशी किंवा लोकांच्या पैशाच्या योग्य विनिमयाच्या कर्तव्याशी काहीही संबंध नाही. भलेमोठे कर्ज काढून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवून गुजरातचा विकास केला म्हणण्यापेक्षा, त्याच्या 10-15% खर्चात सुरत, भडूच वगैरे ठिकाणी छोटे विमानतळ बांधून त्यांवर स्वस्तात सरकारी विमाने चालवून तिथल्या उद्योगांना उभारी देणे शहाणपणाचे आहे.
हातात सत्ता असली किंवा जनतेने निवडून सरकार चालवायचा आदेश दिला की जनतेच्या पैशाची कशीही उधळपट्टी करायचा हक्क मिळत नसतो हे आमच्या प्रधानसेवकांना कोण समजावून सांगणार? त्यांच्या एका तुघलकी नोटबंदीने अर्थव्यवस्थेचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टमध्ये उघडच 1.1 लाख कोटी रुपयांचा चुराडा होणार आहे. हे बजेट भारताच्या आरोग्यासाठी होणाऱ्या 3 वर्षाच्या खर्चाइतके मोठे आहेत. भारतीय रेल्वेची सध्याची दयनीय स्थिती या पैशात सुधारता आली असती. अनेक मोठ्या शहरांत त्यातून मेट्रो रेल्वे उभारता आल्या असत्या. कित्येक मोठी हॉस्पिटल बांधता आली असती. पण आम्हाला प्रादेशिक निवडणुका जिंकायच्या आहेत, आम्हाला दिखाऊगिरी करायची आहे आणि त्यामुळे असले प्रश्न ऐकून घ्यायचे नसतात. नोटबंदीचे नुकसान पाहायला मोदी सत्तेत होते, पण रिकामी बुलेट ट्रेन धावताना पाहायला व त्यात झालेलं 1.1 लाख कोटींचे नुकसान पाहायला ते सत्तेत नसावेत ही प्रामाणिक इच्छा!
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment