भाऊ, आपला जन्म गेला पंढरपूरात. शालेय शिक्षणाच्या तासाला पटांगणात खडे,
कागदाचे तुकडे, बोराच्या बिया (आटोळ्या म्हणतात आमच्याकडे त्याला) इत्यादी
जिन्नस उचलणे आणि मैदान साफ करणे हे आमच्या शाळेचं क्रीडाविषयक धोरण.
त्याच्यात कुणी पळाला नाही, खेळला नाही की लै मोठा खेळाडू व्हायची स्वप्ने
कुणाला पडली नाहीत. पळण्याचा आणि आमचा संबंध फक्त शाळेतून खिडकीतून दप्तर
टाकून पळून जाणे एवढाच होता. कधी काळी एकदा खोखो खेळलो मुली विरुद्ध मुले
असा आणि त्यात पळणाऱ्या विद्यार्थिनीचा स्कर्ट पकडला गेला, तेव्हापासून तो
खेळ पण बंद!
शाळेबाहेरचे खेळ बघावे तर आट्यापाट्या जिथे उनाड
पोरांचा भरणा म्हणून आईबाप नको म्हणायचे. गोट्या थोडा काळ खेळलो पण त्यात
आपले शेजारच्या खेडेगावचे भिडूलोक आमचा कचरा करत म्हणजे आम्ही फक्त
हारायला. विटीदांडू बरा जमायचा, उन्हातान्हात राज्य घेणारा आणि देणारा दोघे
उपाशीपोटी बोंबलत फिरायचे. त्यात पण घराच्या काचा फोडल्यावर तो खेळ बंद
झाला. भोवरे वगैरे खेळ जास्त हिट नव्हते. सुरपारंबी खेळायला जाऊन हात पाय
मोडून घ्यायची रिस्क आपण कधी घेतली नाही. विहिरीत पोहायला शिकलो, खूपशी
मारायला (dive करायला तुमच्या भाषेत) गेलो तर खाली तळाला जाऊन
कपाळमोक्ष...तिथल्या तिथे ओल्या अंगाने आधी बापाचा मार खाल्ला आणि मग जखमेत
चुना भरून औषधोपचार.
आमच्या नदीला पाणी हे फक्त वारीत सोडत आणि
त्यात 5 रुपये दिले की चक्कर मारून मिळायची त्यामुळे ते रोईंग, रॅफ्टिंग
वगैरे धाडसी खेळ आम्ही केले नाहीत. नदीच्या घाण पाण्यात पोहायला
जाण्यापेक्षा तेच पाणी शुद्ध होऊन नळाने घरी आल्यावर आम्ही त्यात तांब्या
बादलीने अंघोळ करायचो. धनुष्य करायचो लिंबाचा आणि त्याला ज्वारीच्या ताटाची
काडी जिला पुढे शेळीच्या लेंडीने बाभळीचा काटा जोडलेला असायचा, आणि त्या
बाणाने सरडे मारायचा कार्यक्रम चालायचा. पुढे आमचे हे धाडसी खेळ पाहून आमचे
कोदंड आईबापांनी जप्त केले आणि मग आम्ही स्वतः वनवासात जाऊन गजगे आणायचो
आणि ते घासून एकमेकांना चटके द्यायचो आणि व्यवस्थेवर सूड उगवायचो.
ज्युनिअर कॉलेजला गेलो, ते पण science ला. त्यामुळे आम्ही खेळात वेळ वाया
घालवू नये ही तो श्रींची ईच्छा!! त्यातून पण 12 वीच्या मार्कांसाठी एकदा
खेळायला नेण्यात आले. शर्यत लावण्यात आली, त्यात 100 किलो वजनाच्या
मित्राला साथ द्यायला हळूहळू पळालो. गोळाफेक करताना त्या कंसकृती रेषेकडे
गोळा न टाकता मास्तरांच्या पायावर नेम गेला चुकून. तेवढ्यानेच दिग्मूढ होऊन
मास्तरांनी तुला बाकीचे मार्क देऊन टाकतो, घरी गेलास तरी चालेल असे सांगून
रवानगी केली. पुढे मेडिकल कॉलेजला गेल्यावर मुलींच्या अंडरआर्म क्रिकेट
सामन्यात पंच ही भरीव कामगिरी केली आणि खेळाला रामराम केला.
तर भाऊ
हा आहे आपला क्रीडाविषयक इतिहास. असल्या फाटक्या माणसाने काय म्हणून
ऑलिम्पिक साठी नाचावे? Yonex चं बॅडमिंटन racket आणि shuttle जिथे आपल्याला
परवडली नाहीत, तिथे कशाला ते सायना, सानिया, राफा आणि जोको करून नाचावे?
हॉकीची स्टिक ही मारामारी करायला असते हा ठाम ग्रह होता कित्येक वर्षे!
Volleyball ला फुटबॉल म्हणून खेळायचो, कारण स्वस्तात मिळायचा. आणि क्रिकेट
tennis ball वर कारण ते लेदर बॉल (आम्ही त्याला दगडी बॉल म्हणत असू) ना
खिशाला परवडायचे, ना दुखापतीला. असल्या लोकांनी कुठे ते बिंद्रा सारखी
10-15 लाखाची बंदूक पाळावी? इथे वारीत 10 रुपये देऊन छऱ्याच्या बंदुकीने
फुगे फोडायला नेम लागेना लवकर!
आपल्याला ते 3-4 लाख रुपयांचे धनुष्य
झेपत नाहीत. 10-15 लाखांच्या बंदुका पण आणि लाखो रूपयांची टेनिस, बॅडमिंटन
ची रॅकेट. ऑलिम्पिक चा खेळ आपन खेळलो ते व्हिडीओ गेम मध्ये... 1997 च्या
आसपास, घरबसल्या. बाकी 10 मीटर मध्ये मेडल जिंकलं म्हणून 200 कोटींचे हॉटेल
भेट मिळायला आपल्या घरात बिंद्रा सारखी श्रीमंती उतू चालली नाही, कि ना
आपला बाबा कलमाडी आणि आई अंबानी आहे की काही कामधंदा नसला तरी उगीच त्या
ऑलिम्पिक पथकात झेंडा वगैरे घेऊन पुढे पाठवेल. आणि एवढे सगळे करून मिळवायचे
काय तर सोन्याचे, चांदीचे पदक?? पुण्यातल्या एखाद्या गुंठामंत्र्याला
झटकला तरी त्याच्या अंगावर सगळ्या ऑलिम्पिक पेक्षा जास्त सोने निघेल कधीपण
!!
तेव्हा भाऊ, तू आणि तुझ ऑलिम्पिक ... गेले उडत!!
डॉ. विनय काटे
(नम्र सूचना - फक्त विनोद म्हणून घ्या

)
- फेसबुक पोस्ट ( ०८ ऑगस्ट २०१६, २०.१२ )