आपण शाकाहारी आहोत म्हणजे खूप पुण्यवान किंवा सात्विक वृत्तीचे आहोत आणि मांसाहारी लोक हे पापी आणि तामसी असतात अशा अविर्भावात भारतातला किंबहुना जगातला बराचसा शाकाहारी समाज वावरत असतो. शाकाहारच स्तोम भारतात साधारण जैन-बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळात आणि वैदिक धर्माच्या उतरणीच्या काळात सुरु झालं कारण खूप उलथापालथ होत होती धार्मिक क्षेत्रात. यज्ञातली प्राणीहत्या महावीर आणि बुद्धाने अव्हेरली आणि तिथून महावीर कट्टर प्राणिहत्याविरोधी झाले तर बुद्ध सोयीस्कर मिश्राहारी. गंमतीचा भाग हा कि "जीववहो अप्पवहो (जीवाचा वध स्वत:चा वध आहे)" हे सांगणारे महावीर आणि त्यांना समांतर मध्यममार्गी बुद्ध या दोघांनाही त्या काळात वनस्पतीला सुद्धा भावना, संवेदना असतात हे माहीतच नव्हतं. ते कळायला 2500 वर्ष जाऊन जगदीशचंद्र बोस जन्मावे लागले.
बोस यांनी केलेलं वनस्पतींवरच संशोधन आता पुढे अजून प्रगल्भ होत चाललंय. अलीकडे काही संशोधकांनी वनस्पतीना स्मरणशक्ती असते आणि त्या सतत घडणाऱ्या निरुपद्रवी गोष्टीकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकतात इथवर निष्कर्ष काढलेत. संवेदनासाठी मेंदू किंवा न्यूरॉन यांचीच जरुरी नाही असे शोध येतायत. थोडक्यात वनस्पतींना सुद्धा जीव, संवेदना असतात हे आता सर्वमान्य सत्य आहे. मग अशा सजीव वनस्पतीला मुळापासून उपटणे, कापून खाणे आणि एखाद्या प्राण्याला खाणे यात कसलाही तात्विक फरक नाही. वनस्पतीची तडफड, आक्रोश तुम्हाला जाणवत नाही म्हणून तुम्ही अज्ञानात सुख मानून त्यांना खाता. भाज्या-वनस्पती कापताना सांडणारे त्यांचे हिरवे रसरुपी रक्त तुम्हाला बधिर, भयग्रस्त करत नाही कारण तुमच्या धमन्यात लाल रक्त आहे. लाल रक्त निघाले कि वेदना झाल्या हे गणित सस्तन प्राण्यांचे आहे, वनस्पतींचे नाही.
एक पाऊल पुढे जावून मी म्हणेन कि सांख्यिकदृष्ट्या विचार केला तर शाकाहारी लोक जास्त जीवांचा वध करतात पोट भरण्यासाठी मांसाहारी लोकांच्या तुलनेत. एका वाटी पालेभाजीमध्ये किमान १०-१५ जीवात्मे (भाजीची रोपे) शाकाहारी लोक मारून खातात. याउलट एका बकरीत पन्नासेक लोक पोट भरून घेतात. एका चपातीसाठी शेकडो वनस्पतीची बीजे दळून खावी लागतात, तर दुसरीकडे २-३ अंड्यात एकवेळच जेवण होत. कुणी म्हणेल "कोंबड्या माणसासाठी अंडी घालत नाहीत", अगदी मान्य! त्याच न्यायाने वनस्पती पण माणसाने आम्हाला खावं म्हणून वाढत नाहीत कि फळ धरत नाहीत. पक्ष्यांच्या-प्राण्यांच्या विष्ठेतून बिजप्रसार होतो, पाश्चिमात्य शौचालयात जाणाऱ्या किंवा फळे खावून बिया उकिरड्यात टाकणाऱ्या माणसांमुळे नाही. माणसाने प्यावे म्हणून गायी-म्हशी दुध देत नाहीत. अंडी मांसाहारी म्हणून दुध पूर्णान्न-पवित्र मानणे हा अजून एक सोयीस्कर भंपकपणा.
"जीवो जीवस्य जीवनम" हा निसर्गाचा नियम आहे. कुठलाही जीव, अगदी bacteria पासून ते वनस्पती, प्राण्यापर्यंत सर्व जीव एकदुसऱ्यावर जगत असतात. शरीराला लोहाची गरज आहे म्हणून लोखंड चघळून जगू शकत नाही कुणी. माणूस हा मिश्राहारी, आणि त्यात पण जास्त मांसाहारी प्राणी आहे. शाकाहारी प्राण्यांसारखी लांब आतडी आम्हाला नाहीयेत, म्हणून पोट लहान होऊन आम्ही दोन पायावर चालू शकलो हे उत्क्रांती सांगते. आम्हाला समस्त शाकाहारी प्राण्यासारखे cellulose पचवताच येत नाही, कारण त्यासाठीची enzymes नाहीयेत आमच्या आतड्यात. आम्हाला सुळे सुद्धा आहेत. मिश्राहारी असण्याशिवाय माणसाला पर्याय नाही, कारण महत्वाची सारी amino acids (प्रथिने), शाकाहारात मिळत नाहीत आणि सारी विटामिन/fiber मांसाहारात मिळत नाहीत. शाकाहारी माणसाच्यासुद्धा प्रत्येक श्वासात, त्याच्या आतड्यात दर सेकंदाला करोडो जीवाणू मरत असतात.
आता सगळ्यात महत्वाचे कि हिंसा कशाला म्हणायचं? दुसऱ्या जीवाला जाणीवपूर्वक त्रास देणे म्हणजे हिंसा. जरुरी नाही की दर वेळेस कुणाच रक्तच सांडायला हवं, मारहाण करायला हवी कि जीव जायलाच हवा ! एखाद्याबद्दल हेतुपुरस्सर वाईट बोलणे, वाईट वागणे, वाईट चिंतने हि हिंसा आहे. कुणाला दुख्ख देवून त्या व्यक्तीच्या डोळ्यातून काढलेले अश्रू हे त्याचे रक्त सांडण्यासारखेच आहे. स्वत:च आणि कुटुंबाच पोट भरण्यासाठी शिकार करणारा आफ्रिकेतला Bushmen आदिवासी जेव्हा त्या जनावराला मारायच्या आधी त्याची मनापासून माफी मागतो, तेव्हा त्या मांसाहारात सुद्धा हिंसा नसते. याउलट कुणाला वाईट बोलून, वागवून जे दुख्ख आम्ही दुसऱ्यांना देतो ते मात्र पुरेपूर हिंसक आहे. हिंसा हि शारीरिकपेक्षा पण जास्त मानसिक/वैचारिक असते, एखाद्या बलदंड पण शांत पहिलवानापेक्षा अंथरुणात पंगु होवून पडलेला एखादा वाईट बोलणारा, चिंतणारा माणूस जास्त हिंसक असतो.
शस्त्र हा ज्याच्या त्याच्या आर्थिक औकातीचा भाग आहे, हिंसक विचार मात्र आपणा सर्वांना समसमान उपलब्ध आहेत, तेही फुकट! आणि आम्ही ते हिंसक विचार प्रसवत सारे जग दुख्खाने भरत जातो. हिंसक विचारांचा आणि आहाराचा तर कसलाही दुरदुरपर्यंत संबंध नाही, कारण तसे असते तर शाकाहारी हिटलरने लाखो लोकांना मारले नसते आणि 'सजन कसाई' संतत्वाला पोचले नसते. संत कबीर उगाच म्हणत नाहीत "बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलीया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय !"
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १५ जून २०१६, १५.१८ )
No comments:
Post a Comment