परवा एका TVवरील चर्चासत्रात आलेला एक टुकार अभिनेता (एका माथेफिरू खुन्याची नाटकातील एकांगी भूमिका हे यांच आयुष्याचं संचित) संयतपणे प्रश्न विचारणाऱ्या संपादकाला विनाकारण तावातावाने "म्हणजे तुम्हाला विवेकानंदांपेक्षा जास्त अक्कल आहे का?" असे विचारू लागला. काल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पण त्याच थाटात अप्रत्यक्षपणे "सुप्रीम कोर्टाला आमच्या कुराणपेक्षा जास्त कळतं का?" हे बोलतं झालं. गेल्या आठवड्यात मी शाकाहारावर लिहिलं तेव्हा काहींनी मला "तुम्हाला बुद्धापेक्षा जास्त कळतं का?" म्हणून लिहिलं. थोडक्यात पोथीनिष्ठ मूर्खपणा कुणा एका समाजाची मक्तेदारी नाहीये.
मी सांगतो, मला (आणि तुम्हालाही) आजच्या घडीला कृष्ण, बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर आणि विवेकानंद इत्यादी लोकांपेक्षा बऱ्याचशा क्षेत्रात जास्त कळतं आणि कळायलाच पाहिजे. कारण खूप सोपं आणि स्पष्ट आहे... आपण आजच्या जगात जगतोय आणि हे महापुरुष भूतकाळात होऊन गेलेत. येणारी पिढी हि आधीच्या पिढीपेक्षा जास्त हुशार नसती तर मानववंश उत्क्रांतच झाला नसता. येणारा प्रत्येक दिवस एक नवं ज्ञान घेऊन सामोरा येतोय जे काल अज्ञात होतं. कालचे तथाकथित चमत्कार आज एकतर विज्ञानाने उलगडून दाखवता येतात किंवा सरळ कचऱ्यात टाकून देता येतात.
कृष्ण 3-4 हजार वर्ष, बुद्ध-महावीर 2500 वर्ष, येशू 2000 वर्ष तर पैगंबर 1400 वर्षे जुने आहेत. आणि तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या 90% वस्तू आणि व्यवस्था ह्या गेल्या दीडशे-दोनशे वर्षात आल्यात. ह्या सगळ्या महापुरुषांनी तत्कालीन समाजात माणसाने वैयक्तिक किंवा सार्वजनिक आयुष्यात स्वतःशी व दुसऱ्यांशी कसे वागावे हे शिकवायचा प्रयत्न केला. पण त्या काळात त्यांच जग खूप छोटं आणि संथ होतं. त्यांच्या समाजाची लोकसंख्या कमी होती आणि सामाजिक, सांस्कृतिक राजकीय, भौगोलिक वैविध्य जवळपास नसल्यात जमा होतं. म्हणून त्या काळात सुसंगत असणारे हे महापुरुष आजच्या गतिमान, वैविध्यपूर्ण आणि एकमेकांत पूर्णपणे सरमिसळ झालेल्या जगात आजचे प्रश्न सोडवायला अपुरे पडतात.
"Mutual fund मधील व्याज घ्यावं का? मोबाईल वरून दिलेला तलाक मानायचा का? विमानाने हजयात्रा केली तर चालेल का?" या प्रश्नांवर कुराण शांत आहे. "वनस्पतींना भावभावना असतात, जीव असतो मग त्यांना खाऊन हिंसा होते का?" यावर महावीराकडे उत्तर नाही. "स्रीमुक्तीच्या काळात भिक्कूसंघात महिलांना प्रवेश न देण हे प्रतिगामी आहे का?" इथे बुद्ध अतार्किक आहे. "पृथ्वी सपाट आहे सांगणारं बायबल खोटं आहे का?" यावर येशू हात वर करेल. "पृथ्वी शेषाच्या फण्यावर आहे म्हणणारी पुराणे खरी कशी? संजयाची तथाकथित दिव्यदृष्टी आजच्या काळात किती सामान्य वाटते ना?" यावर कृष्ण उत्तर देऊ शकणार नाही.
विज्ञानाने पोथी-धर्मग्रंथांमधली सगळी मिथके मोडून काढलीयेत. तंत्रज्ञानाने, दळणवळणाच्या साधनांनी, दुरसंचाराने सगळं जग एका खेड्यासारखं करून टाकलंय. हवेत उडणे, एका जागी बसून दुसऱ्या ठिकाणी काय घडते हे पाहणे, भूतकाळातल्या गोष्टी दृक्श्राव्य पाहणे, नजरेपल्याडच्या माणसाशी संवाद साधणे हे कालचे तथाकथित चमत्कार आज तुम्हीआम्ही विज्ञानाच्या माध्यमातून रोज करतो. आमचं भौतिक आणि भावनिक जग प्रचंड विस्तारलंय. आजच जग नवं आहे, व्यवस्था नव्या आहेत, वस्तू नव्या आहेत, संशोधन नवं आहे, जाणिवा नव्या आहेत, प्रश्न नवे आहेत आणि स्वप्ने नवी आहेत. कुठलीही पोथी-धर्मग्रंथ किंवा पौराणिक महापुरुष आजच्या मानवाच्या साऱ्या प्रश्नांचं, जिज्ञासेच, समस्यांच किंवा अपेक्षांच समाधान करू शकत नाही.
कृष्ण, बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर यांच्या काळात अस्तित्वात नसणाऱ्या शेकडो ज्ञानाच्या शाखा आज अस्तित्वात आहेत. आणि ज्ञान प्रचंड वेगाने वाढतंय. आजच्या काळात जगणारे तुम्ही आम्ही सामान्य लोक सुद्धा आजच्या आमच्या भौतीक-भावनिक प्रश्नांबाबत आणि त्यांच्या समस्येबाबत कुठल्याही भूतकालीन महापुरुषापेक्षा निःसंशय जास्त ज्ञानी आहोत. आमचा समाजकारण, राजकारण जागतिक व्याप्तीच आहे, आणि आम्हाला त्यातले प्रश्न आमच्या बुद्धीने सोडवावे लागतील. आमचाच महापुरुष सार्वकालिक सर्वज्ञानी, सदासत्य आणि उपयोगी म्हणणारे लोक हे "मी कोंबडा झाकून ठेवला तर सूर्य उगवणार नाही" म्हणणाऱ्या म्हातारीइतकेच मूर्ख आहेत. तुमच्या कोंबडे झाकण्याने उगवणारा सूर्य थांबणार नाही!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २२ जून २०१६, २१.०१ )
No comments:
Post a Comment