मोर या प्राणी मला फार काही विशेष वाटत नाही. एकतर पक्षी असून याला उडता येत नाही. अन्नसाखळीत पण याचं स्थान काही विशेष गरजेच नाही. याची अंडी आणि मांस खायला बेचव (ऐकीव अनुभव - नाहीतर पाठवाल पोलीस!). आवाजात कोकिळे सारखा गोडवा पण नाही, उगीच आपला पाठीत धपाटा खाल्लेल्या किरट्या पोराने बोंब मारल्यासारखे 'म्यांव' चा केकारव! आवाजाच्या नकला करून मनोरंजन करणे, पहाटे लोकांना उठवणे, चिठ्ठया पोचवणे वगैरे उपयुक्तता नाहीच उलट शेतकऱ्यांची पिके नासधूस करायचा उपद्रव.
नर मोराकडे थोडा विशेष मानला जाणारा चकाकता निळा रंग आणि पाऊस आल्यावर फुलवून नाचायचा पिसारा एवढाच काय तो जन्मामुळे मिळालेला वारसा. बरं हा पाऊस आल्यावर नाचत नसून उन्हाळयात धुळीने माखलेली पिसे धुवून घेतो असा संशय मला आहे. त्यामुळे त्याच्यात आणि चिमण्या-कावळ्यात 'आंघोळ करणे' याबाबतीत पण विशेष फरक नाही. आणि भरीस भर म्हणजे ज्या सौंदर्यशास्त्रात नर मोर सर्वात सुंदर आहे त्याच्याच कसोटीवर याची मादी म्हणजे कुरुपतेच दुसरं टोक. एकही उपयुक्तता नसताना, फक्त दिसण्याच्या जोरावर हा नर पक्षी उगीचच भाव खाऊन गेलाय काही मूर्ख माणसांच्या जगात.
आता कोंबडीकडे बघा. एवढा छोटासा जीव पण किती कामाचा. सकाळी सगळ्यात आधी उठून कोंबडा बांग देतो आणि लोकांना उठवून कामाला लावतो. 'सूर्य उगवला' यापेक्षा 'कोंबड आरवल' हा दिवसाच्या सुरुवातीचा मानदंड आहे ग्रामीण भारतात! विशेष उडता येत नसले तरी झाडावर, पोत्यांच्या ढिगावर, घरावर उडत जाऊन लोकांना अडचण कमी करतो हा पक्षी. राहायला उपडी टाकलेली एखादी डाल पण चालते यांना, उगीच पिंजरा बनवा वगैरेच्या खर्चिक मागण्या नाहीत. खाण्याच्या बाबतीत तर कसलाच आग्रह नाही यांचा. वाया गेलेले धान्य, पिठातला कोंडा, वावरातल्या किडे-आळ्या पासून ते उकिरड्यातले अन्नकण पण हा जीव स्वतःच्या मेहनतीने हुडकून खातो.
तुम्ही खाणार आहात हे माहित असून पण इमाने-इतबारे हा जीव अंडी देत राहतो. यांच्या अंडी देण्याची महती इतकी आहे कि 2 दिवस मित्रांना न भेटलेल्या माणसाला पण लोक म्हणतात "घरात बसून काय अंडी घालत होतास का?" अंडी द्यायचे बंद झाले तरी मांस कुठेही गेले नाही. स्वतःच बलिदान देऊन माणसाची भूक इतक्या चवदार पद्धतीने भागवणारा जीव आहे दुसरा कुठला? अंडी म्हणजे SIP आणि मांस म्हणजे FD असा दुहेरी रिटर्न देणारा हा पाळीव पक्षी आहे. सगळ्यात महत्वाच म्हणजे माणूस आपल्याला कशासाठी पाळतोय हे माहीत असताना पण हा पक्षी पळून जात नाही, उलट मोर आदर-सत्कार करून पण माणसाच्या जवळपास येत नाही.
"जावईबापू साठी मस्त गावरान कोंबडी करा" ह्या वाक्याने कितीतरी नातेसंबंध वृद्धिंगत झालेत. दारूच्या सोबतीने ह्या पक्षाने आजवरच्या साऱ्या निवडणुकात सर्व पक्षांच्या (राजकीय बरे) कार्यकर्त्यांना कामाला लावत लोकशाही जिवंत ठेवलीय या देशात. देशी गायीचे तूप असो कि युरोपातून आलेलं ऑलिव्हच तेल, कोंबडी सगळ्यात तळून घेते आणि खाणाऱ्याच्या पोटाची शांती करते. उकडून खा, भाजून खा किंवा तळून खा, तिची लज्जत सगळीकडे अप्रतिम असते. कित्येक लोकांच्या मैत्रीची वीण या कोंबडीने आणखीणच घट्ट केलीय. अवघ्या काही महिने किंवा 1-2 वर्षाच्या अल्पशा आयुष्यात हा जीव मानवी समाजावर अनंत उपकार करत स्वतःच बलिदान देतो.
अशा परोपकारी, मैत्रीचे पूल बांधणाऱ्या, निष्काम कर्मयोगाने जगणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या कोंबडीला दुर्लक्षून, उपद्रवी मोराच्या दिखाऊपणाला भुलून त्याला 'राष्ट्रीय पक्षी' घोषित करणाऱ्या देशाच्या कृतघ्नपणाची आणि बौद्धिक दिवाळखोरीची मला कीव येते. हे चित्र बदलायला हवं!
- फेसबुक पोस्ट ( ५ जून २०१६, १८.५३ )
No comments:
Post a Comment