Wednesday, December 28, 2016

श्रम - प्रतिष्ठा आणि मुल्य

सायकल-रिक्षा हा प्रकार मी आयुष्यात प्रथम लातूर जिल्ह्यात पहिला साधारण १९९७ च्या सुमारास. माझा एक दूरचा अशिक्षित मामा बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ती चालवायचा तेव्हा. सहज चालवून पाहावी असा विचार करून तिच्यावर बसलो आणि ५-६ वेळा रिकाम्या सायकल-रिक्षाला paddle मारल्यावर कळल कि किती कष्ट आहे त्यात. तेव्हापासून त्या वाहनाबद्दल एक चीड निर्माण झाली कारण तो एक प्रकारचा अत्याचार-शोषण वाटलं मला.

२००८ मध्ये उत्तर प्रदेशात आणि त्यातही बुंदेलखंडात (विकासाच्या बाबतीत विदर्भाचा मोठा भाऊ) बांदा जिल्ह्यात वर्षभर नोकरी केली तेव्हा ह्या सायकल रिक्षा रोज दिसायच्या. Railway station च्या आवारात हाडे गोठविणाऱ्या थंडीत रात्रभर रिक्षात झोपून भाड्याची वाट पाहणारे छातीचा पिंजरा झालेले आणि कित्येक वयस्कर रिक्षावाले पाहिले कि अतीव दु:ख व्हायचं. रिक्षात का झोपायचं, तर घर नाही म्हणून. रिक्षा सुद्धा स्वतःची नसायची, तिचे दिवसाचे ठराविक भाडे मालकाला देवून उरलेली मजुरी स्वत:ला ठेवत आयुष्य जगायचं किंवा आजचं मरण टाळायचं. बांदा, अलाहाबाद, कानपूर, लखनऊ या सगळ्या ठिकाणी राहूनही मी कधीही बसलो नाही या सायकल-रिक्षात, कारण तो विचार सुद्धा क्रूर वाटायचा.

याच्याही पेक्षा भयाण प्रकार म्हणजे हाताने ओढायची रिक्षा. एका कमजोर माणसाला घोड्या-बैलासारखे जुंपून, दुसऱ्या मुजोर माणसाची इकडून तिकडे प्रवास करायची (गैर)सोय. सिमल्यापासून सुरु होवून १९१४ मध्ये कल्कत्यात राजमान्यता पावलेले हे आणखी एक क्रूर वाहन. माझी एक बंगाली मैत्रीण खळखळून हसून सांगत होती कि कशी तिची जाडजूड मावशी त्या रिक्षात बसल्यावर रिक्षाचा जू वर गेला आणि त्याला रिक्षावाला कसा लोंबकळत होता. काही क्षण मीही हसून तिच्या विनोदी किस्याला दाद दिली पण मनात वाटलं कि "हा कसला अत्याचार?". झर्रकन डोळ्यांसमोर 'दो बिघा जमीन' मध्ये बिमल रॉय नी चितारलेली rickshaw-pullers ची करून कहाणी आठवली.

२०१४ साली जिवलग मैत्रिणीच्या लग्नाला लखनऊला गेलो होतो. टुंडे कबाबी कडे लंचला जायचं ठरलं आणि पायाला दुखापत झाली असल्याने रिक्षा घेणे भाग होते. अमिनाबादच्या अरुंद गल्ल्यात फक्त सायकल-रिक्षा हे एकाच वाहन चालु शकत होते, मग नाईलाजाने आयुष्यात पहिल्यांदा सायकल-रिक्षात मागे बसलो. माझ्याच सोबतचा IIM मधून शिकलेला Investment Banker मित्र जेव्हा त्या रिक्श्वाल्याशी "३० नाही, २० रुपये घे" अशी घासाघीस करायला लागला तेव्हा त्या मित्राला काय बोलावे हेच मला कळेना. ३ रिक्षांमध्ये मिळून ७ जन आम्ही रवाना झालो. वाटेत तो मित्र त्याची रिक्षा चालवणाऱ्या साठी पार केलेल्या माणसाला "तेज चलो भैय्या, वो दुसरा रिक्षा आगे निकाल गया!" असेही बरळत होता. 'दो बिघा जमीन' मध्ये बलराज साहनीना एका जोडप्याच्या आग्रहाने घोड्यासारखे पळावे लागून अपघात होतो, तो सीन मी प्रत्यक्षात पाहत होतो.

ईप्सित स्थळी तिथे पोचल्यावर मित्राने त्या रिक्श्वाल्याला २० रुपये दिले आणि मी ५० रुपये वरून दिले, मोठेपणा किंवा उपकार म्हणून नाही तर माझी अगतिकता लपवायला कि मी त्याच्यासाठी दुसरे काहीही करू शकत नव्हतो. खूप खुश होवून गेला तो आणि मी विचारमग्न होतो ती अमानुष व्यवस्था पाहून ! तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळात वस्ती करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या जगात आजपण माणूस वाहनाला जुंपला जातो हे चित्र हृदयद्रावक आहे. खरी प्रगती माणसांकडून कौशल्याची, सृजनाची, कलात्मक आणि वैचारिक कामे घडवून घेणारी असते, त्यांना ढोर-मेहनत करायला लावणारी नसते. शेतमजूर, कुली, माथाडी कामगार, रिक्षा ओढणारे, सफाई-कामगार, गवंडी, घरकाम करणारे गाडी-बाया, पहारेकरी, घरपोच मालाची डिलिव्हरी देणारे इत्यादी लोकांच्या श्रमाला आम्ही कधी किंमत देणार आहोत? मानवी श्रमाला प्रतिष्ठा आणि योग्य मुल्य देणारा समाज म्हणून आम्ही कधी प्रगत होणार आहोत?

- फेसबुक पोस्ट ( २४ मे २०१६, १३.१५ )

No comments:

Post a Comment