Thursday, December 29, 2016

उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे!


नाना पोलीस दलातून उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले. देव-धर्म किंवा पेन्शनर लोकांचे क्लब वगैरे मध्ये कसलाही रस नसल्याने सेवानिवृत्तीनंतर पत्नी आणि दोन विवाहित मुली हेच त्यांच विश्व. तरुण आणि मध्यम वयात स्वतःच्या किडनीच्या आजाराची कित्येक ऑपरेशन या माणसाने लीलया सहन केली आणि त्यातून बरे पण झाले. रिटायर झाल्यावर काही वर्षांनी नानांच्या पत्नीला (मी त्यांना आजी म्हणे) दोन्ही पायांना गँगरिन झाला. जीव वाचवण्यासाठी आजींचे दोन्ही पाय गुडघ्याच्या खालून कापावे लागले. उतारवयात त्या जोडप्यावर हा एक मोठा आघातच होता.

पण आजी हे रसायनच वेगळं होतं. व्हीलचेअर वर असून पण आजींचा उत्साह कमी झाला नाही. घरातली काम, वाचन, पूजा-अर्चा हे त्यांचं आधीच आयुष्य त्यांनी नंतरही चालू ठेवलं. बाहेर जाताना फक्त थोडी अडचण व्हायची एवढंच. आजींच्या या सगळ्या नित्यक्रमाला पुरेपूर साथ देण्याचं कर्तव्य नानांनी नेहमी पार पाडल. स्वतःच्या शारीरिक अपंगत्वाची कसलीही जाणीव आजींनी नानांना होऊ दिली नाही कधी. आणि स्वतःच्या वयाची आणि भूतकाळातील आजारांनी त्रस्त शरीराची जाणीव नानांनी पण कधी आजीला होऊ दिली नाही. व्हीलचेअर वर आजी जवळपास 14-15 वर्ष हसतमुख जगल्या आणि एके दिवशी अचानक ह्रदयविकाराने परलोकी गेल्या.

त्या दिवसानंतर नानांच आयुष्य बदललं. मुली-जावई, नातवंडे सगळे सोबत असताना आणि प्रेमाने सांभाळत असताना पण नाना आतुन एकटे पडले. 50 वर्षाची सहचारिणी सोबत नसल्याचं दुःख बाकी कुणीही भरून काढू शकल नाही. नानांच्या शरीराने आता असहकार पुकारायला चालू केला. हर्निया झाला पण वयामुळे आणि आधीच्या ऑपरेशन्स मुळे आता नवीन ऑपरेशन करणे शक्य नव्हते. आजी सोबत असताना कितीही मोठी संकट आणि दुःख लीलया पेलणारे नाना आता एका छोट्याश्या आजारपुढे हतबल झाले, चिडचिडे झाले. नानांचे आयुष्य आजीशिवाय आयुष्यच राहिले नव्हते.

आजींच्या पहिल्या वर्षश्राध्दानंतर काही दिवसानीच नानांनी आयुष्याला आणि आजाराला कंटाळून स्वतःला पोटात भोसकून घेऊन संपवायचा प्रयत्न केला. खूप रक्तस्त्राव झाला पण तात्काळ ऑपरेशन झाल्यामुळे नाना त्या दिवशी वाचले. पण त्या घावामुळे सेप्टीसिमिया होऊन आठवड्यातच त्यांना परत ICU मध्ये भरती करावं लागलं. ICU मध्येच त्यांना पक्षाघात झाला. हळूहळू एकेक अवयव निकामी होत चालला होता. एक आठवडाभर ICU मध्ये घालवून शेवटी एका हृदयविकाराच्या धक्क्याने नाना गेले. घरच्यांनी, डॉक्टरांनी कितीही शर्थ केली तरी नानांना कुणी वाचवू शकले नाही, कारण त्यांच मन आजीसोबत वर्षभर आधीच निवर्तल होत, मागे राहिलं होतं ते फक्त शरीर. त्या शरीराला पण नानांनी सोडून दिलं.

तारुण्यातला जगाशी संघर्ष करणारा पुरुष, आणि त्या संघर्षानंतर त्याच्या जखमांवर प्रेमाची फुंकर घालणारी त्याची सहचारिणी हे एक नितांत सुंदर नाते आहे. उतारवयात पुरुषाला जगाशी करायचा संघर्ष कमी होतो पण ती प्रेमाची फुंकर मात्र अजून जास्त हवी असते. आणि जेव्हा प्रेमाची फुंकर देणारी ती सहचारिणी सोबत नसते तेव्हा मात्र त्या वृद्धाला स्वतःच अस्तित्व सुद्धा एक संघर्ष वाटायला लागतं. आयुष्यात कुठेही हार न माननारा पुरुष तेव्हा दगडी कमानीचा मध्यावरचा चिरा काढल्यासारखा कोसळतो, कधीही न उठण्यासाठी!

- फेसबुक पोस्ट ( ५ जून २०१६, ०८.०५ )

No comments:

Post a Comment