Friday, December 30, 2016

हिंसा, दहशतवाद आणि दांभिक समर्थक/निषेधकर्ते:


१. हिंसा ही गुणात्मक असते, संख्यात्मक नाही.
एका निष्पाप माणसाचा खून असो की शंभर निष्पापांचा, त्याने क्रौर्य कमी होत नाही.

२. हिंसा ही शस्त्रांपेक्षाही मानसिक विकृती जास्त असते.
शस्त्र कुठले वापरायचे हे औकातीचा आणि त्यावेळच्या उपलब्धतेचा भाग असतो. हिंसा अगदी शब्दांनी सुद्धा होत असते.

३. संघटित हिंसा हा दहशतवाद असतो.
संघटन २-४ लोकांचे असो किंवा २-४ हजार लोकांचे, त्यामागे एक विकृत विचार असतो. संघटनेतील संख्याबळ हे काळाच्या ओघात आणि समाजाच्या डोळेझाक/उदोउदो करण्याने कैक पटीत वाढत जाते.

४. हिंसा सर्व कारणांसाठी निषेधास पात्र आहे.
धर्मासाठी असो, राजकीय पक्षासाठी असो की देशाच्या साम्राज्यवादी विस्तारासाठी.

कुणी आपल्या जीवावर उठले तर तेवढ्यापुरते फक्त आत्मसंरक्षणासाठी केलेला बचाव हिंसा होत नाही. पण त्याचे मानक न्यायालय ठरवते.

बाकी सर्वच हिंसाना आपले-तुपले बघून सोयीस्कर मौन बाळगणारे किंवा कडक शब्दांत निषेध आळीपाळीने करणारे लोक दांभिक, खोटारडे आणि मुळात हिंसेचे समर्थक असतात.

हे तेच लोक असतात ज्यांना 1984 अतिरेकी हिंसा वाटते आणि 2002 प्रतिक्षिप्त क्रिया किंवा vice versa.
हे तेच लोक असतात जे ISIS चा निषेध करतात आणि बजरंग दलाचे छुपे समर्थन किंवा vice versa.
हे तेच लोक असतात जे एका राजकीय संघटनेने केलेल्या "एका विशिष्ट जातीच्या बायकांचे बलात्कार करा" या आवाहनाचा निषेध करतात आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृतीचे छुपे समर्थन किंवा vice versa.

अशा समस्त दांभिकाना एकच सल्ला, काळ परिवर्तनीय असतो. आज तुमच्या धर्माकडे, पक्षाकडे, संघटनेकडे झुकते पारडे आहे म्हणून जर तुम्ही सोयीस्कर मौन पाळत असाल किंवा छुपे समर्थन करत असाल तर उद्या हे पारडे दुसऱ्या बाजूला झुकणार आहे हे ध्यानात राहू द्या. आणि तुमच्यासारखे दांभिक त्या बाजूला पण असतील जे त्यावेळेस दुसऱ्या बाजूने केलेल्या हिंसेचे तेव्हा असंच मूक समर्थन करतील. तेव्हा आजच शहाणे व्हा आणि ही मुकसमर्थनाची विकृत परंपरा मोडून काढा. तुमच्यात आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होताना गप्प राहणाऱ्या भीष्म-द्रोणात काहीही गुणात्मक फरक नाहीये. त्यांचा शेवट काय झाला तुम्हाला चांगला माहित आहे.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ०२ ऑगस्ट २०१६, १७.१४ )

No comments:

Post a Comment