Friday, December 30, 2016

सिरियल (किलर) भाग -१: कौटुंबिक सिरीयल


खूप मोजके सन्माननीय अपवाद वगळता भारतीय TV सिरीयल हा प्रकार तद्दन टाकाऊ आहे. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात TV सिरीयल जरा बऱ्या असायच्या. खासगी TV चॅनेल आल्यापासून, त्यातल्या त्यात बालाजी कृपेने 'क' पासून सुरुवात होणाऱ्या एकता कपूरच्या सिरियलनी दर्जाच्या घसरणीचा वेग प्रचंड वाढला आणि तो आजही अखंड वाढतोय. ना कथानक, ना संवाद, ना लोकेशन्स, ना अभिनय, ना दिग्दर्शन आणि ना कुठलं निर्मितीमूल्य, तरीही हा मूर्खपणा अव्याहत चालूच आहे. आजच्या भागात फक्त कौटुंबिक सिरीयलची चिकित्सा करू.

'नुक्कड', 'हमलोग', 'वागळे की दुनिया' अशा दर्जेदार मध्यमवर्गीय सिरीयलनंतर महेश भट्ट - शोभा डे जोडगोळीने १९९५ साली 'स्वाभिमान' द्वारे अतिश्रीमंत समाजाशी संबंधित सिरीयलचा पाया भरला. पुढे त्या पायावर एकता कपूरने २००० साली 'क्यून्की साँस भी कभी बहु थी' चा कळस रचला आणि पाहता पाहता एकताच हे 'क'र्मदरिद्री पण 'क'मावते मॉडेल साऱ्या TV इंडस्ट्रीने कायमच कनवटीला मारून ठेवलं. २४ तास भरजरी साड्या आणि पाटीभर दागिने घालून कुठलेही घरकाम न करणाऱ्या बायका, लग्नात घालाव्या तशा शेरवानी घालून आजन्म घरात बसणारे बेरोजगार पुरुष आणि ह्या सगळ्यांची कटकारस्थान, लफडी, कुरापती, टोमणे हा या तथाकथित कौटुंबिक सिरीयल चा आत्मा. यांना मुले कधीही नसतात त्यामुळे त्यांच्या शाळा, अभ्यास, आजारपण असले काही फालतू काम नाही. यांच्या कामवाल्या कधी दांडी मारत नाहीत. स्वयंपाक नाही, झाडलोट नाही, पाहुणे नाहीत, कसली कसली म्हणून अडचणच नाही ज्यासाठी कुणी हात पाय हलवावे, त्यामुळे या सिरीयलच्या प्रेक्षकांइतकाच यातल्या पात्रांकडे वेळच वेळ असतो.

बर वास्तविक जीवनाशी या सिरीयलचा अर्थाअर्थी कसलाही संबंध नसतो (याबाबतीत हे प्रामाणिक लोक आहेत कारण ते स्वतःच सुरुवातीला लिहून सांगतात पण वाचतोय कोण?). यातल्या बायकांची प्रेग्नन्सी हत्तीनीच्या प्रेग्नन्सी (२ वर्ष) पेक्षा जास्त काळ घेते कारण मूल जन्मल की सिरीयल बंद!. पुनर्जन्म काय, पाहिजे तसे चेहरे बदलणाऱ्या प्लास्टिक सर्जरी काय, मेलेल्या नटाला जिवंत करणे काय ... सगळे नवलच! कधी कधी या सिरीयलच्या लेखकांच्या आत्मविश्वासाचे कौतुक करावे वाटते. एकहाती सत्तेचे विफल स्वप्न घेऊन ठाकरे आणि पवार सुद्धा ३ दशके तळमळले पण आशालताबाई (चार दशक सासूचे वाल्या) घरी बसून १४५+ आमदार खिशात घालून "मुख्यमंत्री कोण होणार हे मी ठरवणार!" असली धाडसी विधाने करतात. कुठून येतो इतका आत्मविश्वास खरंच कळत नाही!

अभिनयाच्या बाबतीत या सिरियल्स मध्ये प्रचंड मोठा दुष्काळ असतो. यातल्या नट-नट्यांचे इंचभर जाड मेकअप केलेले, मख्ख चेहरे पाहिले की सुनील शेट्टी आणि संगीता बिजलानी सुद्धा अभिनय सम्राट-सम्राज्ञी वाटावे. निर्मितीमूल्य म्हणाल तर मान वळवतानाची ३ सेकंदाची निरर्थक हालचाल १० वेळा रिपीट करून त्याला घाणेरडे, कर्कश संगीत देत संवादाच्या फाटक्या घोंगडीला ठिगळ लावायचे. बिनकामाचे झूम, इतके की पार बुबुळातली रचना दिसावी आणि तरी पण त्यात ना राग दिसतो, ना प्रेम. कथानकापुढे तर वस्त्रहरणावेळची द्रौपदीची साडी सुद्धा अपुरी पडावी. तुम्ही पाहून पाहून मेलात तरी सिरीयल संपणार नाही याची खात्री आहे. जरा TRP घसरला की आण नवीन पात्र किंवा वाढवा अजून एक गुंता. पार्श्वसंगीत सुचेनाय... मग घ्या हिंदी सिनेमाचं गाणं आणि दाखवा त्यावर सिरीयल मधले नट-नटी. अजून TRP घसरला की उडवा नट-नटीच्या प्रेमाची वावडी किंवा द्या पाठवून त्यांना रिऍलिटी शो मध्ये नाचायला थोडे दिवस. पण जोवर चॅनेल बंद करायला सांगत नाही तोवर सिरीयल चालूच राहणार.

ज्यांना ना धड शिकता आलं, ना नाटक गाजवता आल, ना सिनेमात काम करायला आल अशा सगळ्या बाजारबुणग्या, पोटभरू नट-नट्या, दिग्दर्शक, संगीतकार, लेखकांची यशस्वी 'रोजगार हमी योजना' म्हणजे आजकालच्या या गल्लाभरू सीरियल. आणि जोवर पोटच्या पोरांना आणि स्वतःला पण उपाशी ठेवून संध्याकाळी ७ ते १० या वेळेत सिरीयल पाहणारा महिला-पुरुष वर्ग आहे तोवर ही योजना अशीच चालू राहणार आहे. स्वतःच्या दिवाणखान्यात बसून स्वतःच्या हसत्या-खेळत्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून या असल्या कपटी, भांडकुदळ पात्रांनी भरलेल्या अर्थशून्य सिरीयल लोक पाहतात तरी कसे हा मला न सुटलेला प्रश्न आहे. असले कुणी कट्टर प्रेक्षक लोक तुमच्या घरात असतील, तर माझ्या संवेदना तुमच्या सोबत आहेत. (रमेश) देव तुमचं भलं करो!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ३० जून २०१६, २१.२७ )

No comments:

Post a Comment