Thursday, December 29, 2016

वटसावित्री - काही प्रश्न


1. सत्यवान जर वडाच्या झाडावरून न पडता बाभळीच्या झाडावरून पडून मेला असता तर या व्रतास 'बाभूळसावित्री' म्हणले गेले असते का?

2. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणल्यावर, उत्तर आयुष्यात नवराबायकोत काही वाजल्यावर सावित्रीला कधी पश्चाताप झाला का कि कशाला हा उपद्व्याप केला?

3. बर्फाळ टुंड्रा प्रदेशात किंवा सहारा वाळवंटात जर एखाद्या पतीव्रतेला 7 जन्म तोच नवरा हवा असेल पण आजूबाजूला वडाचे झाड उपलब्ध नसेल तर तिने कुठल्या झाडाला फेऱ्या माराव्यात?

4. वडाचे झाड उपलब्ध नसेल तेव्हा भारतातील स्त्रिया वडाची फांदी किंवा चित्र आणून पूजा करतात, त्याने वडाच्या आशीर्वादाची ताकत कमी होते का? (म्हणजे सातच्या जागी फक्त दोन जन्म वगैरे)

5. "जन्मोजमी हाच पती मिळावा" हे स्त्रीचे म्हणणे ऐकून, तिच्या नवऱ्याला न विचारता "तथास्तु" नावाचा 'वट'हुकूम काढायचा वटवृक्षाचा अधिकार पुरुषांवर अन्यायकारक नाही का?

6. वडाला दोरे गुंडाळताना त्या स्त्रीचा सध्याचा जन्म सध्याच्या नवऱ्यासोबतचा कितवा जन्म आहे याबद्दल वड काही माहिती पुरवतो का?

7. एखाद्या संसारी पुरुषाने खूप तपश्चर्या करून जन्म-जन्मांतरातून मुक्ती मिळवायचे वरदान देवाला मागितले तर "याचे सध्याच्या बायकोसोबत 5 जन्म राहिलेले आहेत, देवा याला मुक्ती देऊ नकोस" अशी नकोशी वटवट वटवृक्ष तिथे येऊन करतो का?

8. गुंडाळलेल सूत उलट्या प्रदक्षिणा मारत सोडवल तर वडासोबतचा करार संपुष्टात येतो का?

9. कजाग बायकोच्या 'वटसावित्री' व्रताला उःशाप म्हणून गरीब नवऱ्यांना सुटकेसाठी एखादे व्रत आहे का?

10. एखाद्या बाईने काही कारणास्तव वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळी वडाची झाडे पुजली तर तिची पुनर्जन्माची फाईल या वडाकडून त्या वडाकडे ट्रान्सफर होते का?

वरील प्रश्नांचा अभ्यास सुरु आहे. उत्तरे मिळाली कि कळवण्यात येतील. या जन्मी नाही कळाली तर पुढच्या जन्मी तरी नक्की हुडकून कळवेन.
वडाशप्पथ !!

-  फेसबुक पोस्ट ( १९ जून २०१६, १६.३० )

No comments:

Post a Comment