Friday, December 30, 2016

लिखाण बंद !


मी कुठलाही देव, देश, धर्म मानवतेपेक्षा मोठा मानत नाही. मी कुठल्याही राजकीय विचाराच्या काविळीने, सामाजिक-आर्थिक जाणिवेने बाधित नाही. मी कुठलाही विचारवंत, विचारप्रवाह प्रमाण मानत नाही. त्यामुळे माझे सरळ, प्रामाणिक व्यक्त होणे रोज कुणाला ना कुणाला त्रासदायक, जाणिवेला/संकल्पनेला धक्का देणारे आहे. तुम्हाला पटले कि मी जबरदस्त, नाही पटले कि मी एकांगी हा खेळ, हे generalization/sterotyping अव्याहत सुरु आहे.

यात गेल्या 2-3 महिन्यात मी खूप सारी लेबल लावून घेतली स्वतःला. कुणी मला अतिरेकी म्हणलं, कुणी माझ्या आईला अश्लाघ्य शिव्या दिल्या, कुणी माझे बाप किती असे विचारले, कुणी मला तुम्ही माणसाचं मटण खाता का? असेही प्रश्न विचारले आणि बरेच काही. मला सगळ्यांनी जाहीर शिव्या घातल्या, निषेध केले... अस्तिकांनी, नास्तिकांनी, डॉक्टरांनी, पत्रकारांनी, संघीनी, आंबेडकरवाद्यांनी, कम्युनिस्टांनी, भाजपायींनी आणि काँग्रेसींनीही. मी दुर्लक्ष करत राहिलो, लिहित राहिलो.

4-5 परिच्छेद असणारा लेख मी 4 ओळीत पण सांगू शकतो पण त्यात interpretation चुकीची निघू शकतात म्हणून मी सविस्तर लिहायचो. पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे लोक पूर्ण लेख, एकेक शब्द किंवा त्यामागची सुस्पष्ट दिसणारी भावना दुर्लक्षून आपल्याला हवा तसा अर्थ घेऊन, नसलेली वाक्ये माझ्या तोंडी घालून, आपाआपले कंपू tag करून गोळा करून पाहिजे तशी चिखलफेक माझ्यावर आणि विरोधी मतांच्या लोकांवर करत आणि याला कुणीही अपवाद नाही. स्पर्धा परीक्षांत comprehension का विचारले जाते ते मला त्यातून कळले.

भारतात मुद्देसूद प्रश्न विचारत, अभिनिवेश बाजूला ठेवत वादविवाद करायची बुद्ध, महावीर यांच्या काळातली परंपरा आता संपलेली आहे हे कटू सत्य आहे. त्यांच्या काळात चर्चेला बसलेले वैदिक ब्राह्मण सुद्धा बुद्धाने किंवा महाविराने त्यांचे तर्क खोडून काढले तर बुद्धाचे, महाविराचे शिष्यत्व पत्करत. याउलट येशूला क्रुसावर मारले, इस्लाम मध्येही असेच प्रकार असा मागासलेपणा होता पश्चिमेत. आज 2000 वर्षांनी पश्चिम बुद्धिवादी झालीय आणि भारत इस्लामी कट्टरतेला अंगिकारायला लागलाय. इथे गांधी मारले, दाभोळकर/पानसरे/कलबुर्गी मारले, ऑनर किलिंग झाली, गायीसाठी हत्या झाल्या, धार्मिक दंगली तर पाचवीलाच पुजल्यात देशाच्या.

अशा या सगळ्या कोलाहलात, मी खूप साधा मनुष्यप्राणी आहे काही बोलायला कारण इथे सगळेच महान, परिपूर्ण आहेत. बरं त्यात पुन्हा मी एकटा कारण मी कुठल्याच कंपूत बसत नाही. तेव्हा माझ्यासाठी एक सोपा पर्याय आहे ....तुमचं श्रेष्ठत्व मान्य करायचा. मंगेश पाडगावकरांच्या 'सलाम' कवितेसारखा, तुम्हा आस्तिक, नास्तिक, संघी, काँग्रेसी, डावे, उजवे, धार्मिक, निधर्मी, भारतीय, परदेशी सगळ्यांना माझा सलाम! आणि हो, जगात काहीही होवो, फक्त तुमचाच (हो, तुम्ही कुणीही असा) देव, देश, धर्म, पंथ, जात, सिद्धांत, विचारप्रवाह परिपूर्ण आणि विश्वाला अनुसरणीय आहे. या जगाला तुमच्या अस्मितेच्या विचारप्रवाहाशिवाय दुसरा पर्यायच नाही, तेव्हा विचार चुकूनसुद्धा बदलू नका !!

मी आधीही सांगितले होते, मला फेसबुक वर एकही मित्र किंवा like नसला तरी फरक पडत नाही. कारण माझे घर त्याच्यावर चालत नाही. ना मला काही कुठे सेलेब्रिटी/नेता बनायचं आहे फेसबुक वरचे friends/followers दाखवून, तेवढं शिक्षण आणि अभ्यास पण नाहीय माझ्याकडेे, हो ना? मी तुम्हाला कधी माझ्या पेजला like करा, माझ्याकडून कुठले product विकत घ्या किंवा मला कुठल्या लोकप्रतिनिधित्वा साठी नामांकित करा असला कुठलाही लाडिक हट्ट आजवर केला नाहीये. तेव्हा मी गेल्याने तुमच्या विश्वात काडीचा कमीपणा येणार नाही, उलट आनंदच वाढणार आहे.

तेव्हा, खुश रहा! आनंदी रहा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १८ जुलै २०१६, ००.०६ )

No comments:

Post a Comment