Thursday, December 29, 2016

जान है तो जहाँ है !


पुण्याजवळ मंचरला राहत असताना माझ्या पल्सर वरून चाललो होतो. उतार असल्याने नाही म्हणले तरी वेग वाढून गाडी 50-60 kmph च्या वेगात होती. रस्त्याच्या डाव्या कडेने एक महिला चालली होती. स्वतः रस्त्याच्या खालच्या बाजूने चालत तिच्या 2 वर्षाच्या मुलाला बोट धरून रस्त्याच्या वरून रहदारीच्या बाजूने चालली होती. मी त्यांच्या बाजूने निघून जाणार अशात माझ्या बाजूने एक ट्रक उतारावरून वेगात हॉर्न वाजवत आला. त्या आवाजाने ते लहान मूल घाबरून खाली उतरायच्या ऐवजी माझ्या गाडीच्या मार्गात धावले. एका बाजूला भरधाव ट्रक आणि दुसऱ्या बाजूला 2 वर्षाचे पळणारे बाळ यांच्या मध्ये मी अडकलो.

करकचून ब्रेक दाबला. ते बाळ अक्षरशः माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाला अलगद अडल्यामुळे त्या ट्रक खाली गेलं नाही आणि मी पण अगदी कानावरून मरण जाताना पाहिलं. हे सगळं घडलं अगदी 5-10 सेकंदात. त्या ब्रेकच्या आवाजाने त्या महिलेचं स्वतःच्या डिझायनर साडीच्या पदरामधील लक्ष मग मुलाकडे गेलं. काही क्षण मी सुन्न होतो. पण जेव्हा सावरलो तेव्हा अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली मी त्या बाईला. स्वप्नात सुद्धा मी विचार केला नव्हता कि मी कुठल्या अनोळखी बाईला अस बोलेन, पण सामाजिक संकेत, सभ्यता, कायदा इत्यादी सगळं विसरून मी ते शब्द बोललो. जर तुम्हाला दुसऱ्याच्या सोडा किंबहुना स्वतःच्या मुलाच्या जीवाची पण काळजी नसेल तर तुम्ही शिव्या खायच्याच लायकीचे असता, मग तुम्ही स्त्री असो वा पुरुष.

फुटपाथ नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं असतं. कित्येक बायका स्वतः फुटपाथच्या बाजूने चालत, मुलांना रहदारीच्या बाजूने चालवत नेताना आजही पाहतो, तसेच दुचाकीवर टाकीवर 2-3 वर्षाच्या मुलांना बसवून गाड्या दामटणारे महाभाग बाप पण. मोबाईल मध्ये तोंड खुपसून रस्ता ओलांडणारे नवयुवक-युवती आणि संस्कृती म्हणून तोंडावर पूर्ण पदर किंवा बुरखा झाकून इकडे तिकडे न पाहता वाहत्या ट्रॅफिक मध्ये सरळ आडव्या चालत येणाऱ्या बायका. लहान मुलांना गाडी चालवायला देणारे किंवा पिऊन गाडी चालवणारे. सिग्नल लाल होत असताना घाई करून वाहन जोरात हाकून काही सेकंद वाचवण्यासाठी स्वतःला आणि लोकांना जीव मारणारे लोक आणि हेल्मेटसक्ती/सीटबेल्टसक्ती मुळे फुटके हेल्मेट आणि तुटके बेल्ट अडकवणारे महाभाग. एक नाही असे असंख्य प्रकार आहेत लोकांचे जे अपघातांना कारणीभूत असतात.

जगात दर 25 सेकंदाला एक माणूस रस्त्यावर अपघातात मरतो आणि प्रमुख कारणे तीच जी वरच्या अनुच्छेदात आहेत. पण समजून घेईल कोण? स्वतःच्या 30 वर्ष वयाच्या मुलाला म्हणजे मला, कुठेही जाताना माझा बाप आजही सांगतो कि "सावकाश आणि सांभाळून सुरक्षितपणे जा". रहदारीचे आणि रस्त्यावर सुरक्षेचे नियम हे पोलिसांना रोजगार देण्यासाठी नाहीयेत, तर आमच्या सुरक्षिततेसाठी आहेत एवढी अक्कल जरी लोकांना आली तरी पुरेसं आहे.

- फेसबुक पोस्ट ( ३० मे २०१६, २१.४० )

No comments:

Post a Comment