15 जून 2001 ला 'लगान' आणि 'गदर' एकाच दिवशी रिलीज झाले होते. पाहायला गेलं तर दोन्ही काल्पनिक पिरियड फिल्म, एकात धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर प्रेमकथा तर दुसऱ्यात खेळाच्या माध्यमातून जुलमी ब्रिटिशांवर हल्लाबोल. लगान ऑस्कर गाजवेल आणि गदरचे कलेक्शन लगानपेक्षा जास्त होईल यात मला काडीमात्र संशय नव्हता. सनी, आमिर, जावेद अख्तर, रहमान यांच्या कौतुकाचे पडघम पुढचे दीड-दोन महिने सर्वत्र वाजत होते. पण हे फार काळ टिकणार नव्हतं.
10 ऑगस्ट 2001 ला 'दिल चाहता है' रिलीज झाला आणि भारतीय सिनेमाने पहिल्यांदा मध्यमवर्गीय सदरा टाकून श्रीमंतीचा कोट चढवला. तीन सुखवस्तू कुटुंबातुन येणाऱ्या मित्रांची मैत्रीची आणि त्याला समांतर प्रेमाची कथा होती ही. पण एवढ्यावरच न थांबता, पारंपरिक हिंदी सिनेमातले प्रत्येक तंत्र, निर्मितीमूल्य या सिनेमाने नव्याने हाताळल होतेे. या सिनेमाला नायक नव्हता ना खलनायक, होती ती फक्त पात्रे आणि आयुष्यातील विविध प्रसंगांकडे पाहायची, प्रतिक्रिया द्यायची त्यांची वेगवेगळी पद्धत.
आकाश, एक अत्यंत अवखळ मुलगा ज्याला कसलीही जबाबदारी, commitment माहित नाही. समीर जो सदैव गोंधळलेला आहे. सिद्धार्थ जो त्याच्या चित्रांइतकाच गूढ, अनाकलनीय आहे. शालिनी जी उपकारांच्या न दिसणाऱ्या ओझ्याखाली दबलीये. पूजा जिला बॉयफ्रेंड असताना पण आईबापांच्या आग्रहासाठी स्थळे पाहावी लागतायत आणि घटस्फोटित तारा जैस्वाल जिने दारूत आयुष्यातली दुःखे बुडवून ठेवलीयत.
वेगवान कथानक असून पण इथे प्रत्येक पात्राला तेवढाच वाव, अभिव्यक्ती मिळते. कुठलेही पात्र दुसऱ्या पात्राशी स्पर्धा करतच नाही कारण जरी सगळे एकत्र दिसत असले तरी प्रत्येकाचे भावनिक जग वेगळे आहे. यातली पात्रे व्यक्ती कमी आहेत आणि माणसाच्या भावनिक अवस्था जास्त आहेत. म्हणून एकाच वेळी एक प्रेक्षक ह्या साऱ्या पात्रांत स्वतःला पाहू शकतो. मानवी संवेदनांचा इतका सुंदर kaleidoscope खचितच कुठल्या सिनेमाने दाखवला असेल आजवर.
संपूर्ण चित्रपटभर दिसणारा निळा रंग, डायलॉगबाजी नसलेल्या अर्थपूर्ण पण छोट्या संवादांना अजून खोली देऊन जातो. काही वेळेस पात्रांचे मौन सुद्धा खूप मोठा संवाद साधून जाते. वेशभूषा, केशभूषा खूप काही बोलून जाते. "कैसी है ये रुत" आणि "वो लडकी है कहां" या दोन्ही गाण्यात सादरीकरणाचा एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीतात जादू केली या सिनेमात आणि खऱ्या अर्थाने त्यांना ब्रेक मिळाला जो 'मिशन कश्मीर' मधून मिळाला नव्हता.
'आशिक आवारा' मधला छपरी सैफअली खान यात चक्क elegant दिसून जातो. 'हिमालय पुत्र' अक्षय खन्ना या सिनेमात खराखुरा संवेदनशील पेंटर भासून जातो. 2 महिने आधी लगान मध्ये दिसलेला डोक्याला मुंडासे बांधलेला गरीब, खेडूत भुवन, आणि यातला गर्भश्रीमंत आकाश ही दोन टोकाची पात्रे तेवढ्याच ताकदीने रंगवणे फक्त आमिर खानलाच शक्य होते आणि आजही आहे. डिंपल कपाडिया चं कमबॅक तितकंच ताकदीचे होते. आणि या सगळ्यांना त्यांचे साचे मोडून, मुक्त करून रुपेरी कॅनव्हास वर त्यांचे रंग उधळणारा नव्या दमाचा, दृष्टीचा दिग्दर्शक फरहान अख्तर पडद्यामागे राहून पण सगळ्यात जास्त भिडून जातो मनाला.
काल 15 वर्ष झाली या सिनेमाला रिलीज होऊन, पण हा सिनेमा आजही तेवढाच ताजातवाना वाटतो. 'लगान' 2 वेळा आणि 'गदर' एकदाच पहिला थिएटर मध्ये, पण 'दिल चाहता है' मी आणि माझ्या मित्राने सलग 8 दिवस थिएटरमध्ये 12 ते 3 चा शो पाहिलाय. नवल नाही की 'लगान' आणि 'गदर' ला मागे टाकून या सिनेमाने त्यावर्षीचा 'बेस्ट फिल्म' चा नॅशनल अवार्ड पटकावला. करमणूक करणारे असंख्य सिनेमे येत राहतील, जात राहतील पण 'दिल चाहता है' तो मैलाचा दगड आहे जिथून हिंदी सिनेमा बग्गीतून BMW मध्ये गेला!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ११ ऑगस्ट २०१६, ०७.३६ )
No comments:
Post a Comment