Thursday, December 29, 2016

आडनाव


जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला या देशात आई-बाप एक नाव देतात. आणि ते नावसुद्धा खूप छान विचार करून देतात जेणेकरून स्वतःच्या नावाला साजेसे चांगले कार्य त्या बाळाने आयुष्यात पुढे जाऊन करावे. पण येणाऱ्या बाळाचे आडनाव मात्र दुर्दैवाने त्याचे आईबाप ठरवत नाहीत कारण त्यांचं स्वतःच आडनाव पण त्यांनी ठरवलं नाही. आडनाव आलं तुमच्या कुटुंबाच्या इतिहासातून. तुमचे आडनाव तुमच्याबद्दल काहीही सांगत नाही, तर ते सांगते तुमच्या तुम्हीही न पाहिलेल्या 10-20 पिढ्या आधीच्या पूर्वजांबद्दल ज्यांना इतिहास कधीच विसरून गेलाय.

समोरच्या माणसाला stereotype करायला आडनाव हे सगळ्यात सोपं साधन आहे. नावाने जास्तीत जास्त तुमचा धर्म कळेल, पण आडनाव तुमचा चातुर्वर्ण, तुमची जात-पोटजात, मूळ गाव, पिढीजात व्यवसाय आणि बरेच काही सांगून जाते. समोरच्या अनोळखी माणसाने स्वतःच नाव सांगताच आपल्या मूर्ख पूर्वजांनी वारसाहक्काने आपल्याला दिलेलं 'अ'ज्ञान आपल्याला त्या माणसाला त्याच्या कामावरून नाही तर नावावरून पारखायला शिकवते. मग मेंदूचं काम कमी होतं कारण लेबल आम्ही आधीच लावून टाकलेलं असतं समोरच्याला!

आमच्या मनात आम्ही प्रत्येक धर्माची-जातीची एक प्रतिमा तयार केलेली असते, आणि आम्ही नेहमी अभावितपणे प्रत्येक ओळखीच्या-अनोळखी माणसाला त्याचे आचार-विचार न पाहता त्या एका प्रतिमेत टाकून त्याचे समर्थन करायचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. 'X' वाले एकदम पाताळयंत्री-कावेबाज, 'X1' वाले एकदम चिंगूस, 'X2' वाले एकदम भांडकुदळ, 'X3' वाले अत्यंत ऐतखाऊ, 'X4' एक नंबरचे चोरटे, 'X5' एकदम गलीच्छ, 'X6' एक नंबरचे कट्टर .... अशा आमच्या लेबल खाली आम्ही माणसाना आडनावावरून विभागत जातो रसायनशास्त्रा मधल्या आवर्तसारणी सारखे. म्हणून मग X1 वाल्याने कितीही दान केलं तरी तो स्वार्थीच, X वाल्याने कितीही मोकळेपणाने प्रामाणिकपणे वागलं तरी त्याच्या हेतूंवर नेहमी शंकाच!

माणसे आमच्या अपेक्षेनुकृत त्यांच्या आडनावाला साजेशी वागली कि आम्ही खूप खुश होतो कारण आईबापांनी, समाजाने दिलेले ज्ञान किती महान होत याची खात्री पटते. आणि एखादा माणूस तसे नाही वागला कि मात्र आम्ही त्याला अवहेलना करणार. स्वतःला शूर योद्धे समजणाऱ्या एका समाजातील माझ्या मित्राने कॉलेजमध्ये स्रीवेशात लावणीवर अत्यंत सुंदर नृत्य केले होते, तेव्हा त्याच्या कुटूंबातील मुलांनी त्याला खूप सुनावले की तू काळिमा फासलास आमच्या नावाला. अलीकडे त्याच कुटुंबातील मुलांनी एक खून केला, तेव्हा मात्र कुटुंबाला कमी त्रास वाटला कारण त्यांच्या मते ते रक्तात आहे. आणि दुसऱ्या समाजातील लोकांना पण बरं वाटलं कारण त्यांच्या मनातलं त्या समाजाबद्दलची समजूत अजून बळकट झाली. किती भयानक आहे ना हे??

सामाजिक समरसतेच्या सगळ्यात आड काही येत असेल आज तर हे आडनाव! दोन माणसे कधी त्या आडनावाला गाढून एकमेकांना त्यांच्या आचार-विचारांवर तपासून उराउरी भेटतच नाहीत. अभिव्यक्तीवर शंका, हेतूंवर शंका, कृतींवर शंका, एवढंच काय प्रांजळ मनाने केलेल्या स्तुतीवर आणि दिलेल्या सल्ल्यांवर पण शंका! ओळखीच्या माणसांवर इतकी शंका तर अनोळखी माणसांचं तर सोडूनच द्या. आणि पिढ्यानपिढ्या ही आडनावाची अडचण आणि त्यासंबंधीच्या मूर्ख stereotype संकल्पना घेऊन आम्ही माणसाला माणूस म्हणून न पाहता एखाद्या समाजाचा आमच्या मनातला prototype म्हणून पाहतो. दोन जुळी भावंडे सुद्धा आचार-विचारात एकसारखी नसताना आम्ही एका काल्पनिक व्यवस्थेने आखलेल्या समाजामध्ये आचार-विचारांची एकसूत्रता पाहतो. या मूर्खपणाचा ईलाज ही काळाची गरज आहे.

-  फेसबुक पोस्ट ( १२ जून २०१६, १४.४५ )

No comments:

Post a Comment