देव किंवा ईश्वरी शक्ती मानणारे ते आस्तिक, आणि हे न मानणारे ते नास्तिक ही सर्वमान्य धारणा आहे. कुणी व्यक्ती आस्तिक आहे हे सिद्ध करणे तुलनेने सोपे असते, घरात मुर्त्या-धर्मग्रंथ ठेवले, स्तोत्र-आयती म्हणल्या, कर्मकांड केलं कि ते लागलीच सिद्ध करता येत. पण, नास्तिकता सिद्ध करणे खूप अवघड आहे कारण नास्तिकता वस्तूंत/कर्मकांडात नाही तर विचारांत असते आणि विचार मूर्त नसतात. मग हि नास्तिकता सिद्ध करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि केविलवाणा प्रकार नास्तिक करतात, तो असा की आस्तिकांच्या उलट वर्तन करून दाखवा म्हणजे झाले तुम्ही नास्तिक.
आस्तिकता आणणे सोपं आहे, कारण ती अनुकरणशील आहे आणि संस्कारात मिळते. नास्तिकता मात्र वैचारिक असते आणि ती विचारातून, चिंतनातून, ज्ञानातून यावी/आणावी लागते. संस्कारातून घेतलेली आस्तिकता आणि दुसऱ्यांचे उसने विचार घेऊन आलेली नास्तिकता या दोन्हीही दांभिक असतात कारण आयुष्यात २-४ वाईट प्रसंग आले कि असले दांभिक आस्तिक देवाला शिव्या देतात आणि दांभिक नास्तिक देवळात डोके टेकवायला लागतात. आणि जगात असल्या दांभिक आस्तिक-नास्तिकांची संख्या भयाण मोठी आहे, अगदी ९०% म्हणले तरी चूक नाही. आणि हेच ते दांभिक आस्तिक, नास्तिक असतात जे जगात कट्टरता भरून टाकतात.
एखादा नास्तिक जेव्हा कर्मकांड नाकारतो तेव्हा दांभिक अस्तिकांना त्रास होणे नवे नाही. पण, काल मी जेव्हा मला संतसाहित्य (त्यातला ईश्वरी भाग सोडून) आवडते किंवा माझ्या आईवडिलांच्या घरात वारकरी लोकांना फराळ, इतर मदत निस्वार्थी भावनेने केली जाते म्हणून लिहिले कि काही नास्तिकांना पोटशूळ उठला. मी करतोय ते कसे चूक आहे आणि त्यामुळे मी मुळात नास्तिकच कसा नाही हे दाखवायची अहमहमिका लागली त्यांच्यात. खरं सांगू, आमच्या घरी आलेला माणूस हा आम्हाला फक्त माणूस दिसतो. तो आस्तिक आहे कि नास्तिक, सफाईवाला आहे कि खासदार पाहून वेगवेगळा व्यवहार माझ्या घरात होत नाही कुणाशी. कुणी आम्हाला बदल्यात काय देतंय हे पाहून आम्ही कुणाशी नाते जोडत नाही, कारण मग तो स्वार्थातून आलेला व्यवहार असतो. त्यामुळे रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानस नाती माझ्या घरात जास्त जवळची आहेत. माझे नास्तिकत्व मला माहित आहे, ते कुणा दुसऱ्या व्यक्तीला सिद्ध करण्यासाठी कुणा आस्तिकाला मदत नाकारण्याचा खोडसाळ मूर्खपणा मी करत नाही.
कुणा आस्तिकाने greetings म्हणून माझे पाय धरले, तर मी त्याचे पाय धरेन. कुणी पाश्चिमात्य व्यक्तीने गालावर kiss केलं तर मी पण करेन आणि कुणी मुस्लिमाने मला प्रेमाने आलिंगन दिलं तर मी सुद्धा देईन. मी दिल्लीत हजरत निजमुद्दीनच्या दर्ग्यात नमाजी टोपी घालून गेलोय (हो, मी जातो धार्मिक स्थळी, देवाला काही मागायला नाही तर स्थापत्य, मूर्तिकला, इतिहास, संस्कृती आणि माणसे पाहायला). गोव्यात चर्चात कॅप काढून गेलोय आणि पंढरपुरात जेव्हा गरीब घरची लहान मुले १ रुपया मिळावा म्हणून गंध लावतात कपाळाला, तो गंध सुद्धा प्रेमाने लावून घेतलाय. मला भक्तिसंगीत आवडते, मीरेची-कबिराची-सुरदासाची भजने डोळ्यांत पाणी आणतात त्यातला भावार्थ, आर्तता ऐकून. बुल्लेशाहच्या सुफी रचना, साबरी बंधूंच्या कव्वाली मला तितक्याच प्रिय आहेत. नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळाचे अभंग मला अवीट गोड वाटतात आणि ते गाताना भीमसेनजींचे, लताबाईंचे, प्रल्हाद शिंदेंचे स्वर स्वर्गीय जाणवतात.
माझी नास्तिकता माझ्या किमान १४-१५ वर्षांच्या वैचारिक चिंतनातून, मंथनातून, अनुभवातून आलीय. कुणाची ४ पुस्तके वाचून उगीच स्वतःला cool, contemporary किंवा progressive दाखवण्याच्या उथळ अट्टाहासातून आली नाहीये. त्यामुळे कुणाचे कितीही अभंग, दोहे ऐकले आणि कितीही धार्मिक लोकांच्या संगतीत बसलो तरी मी आस्तिक होणार नाही. दैवी शक्तीला शरण जाणे किंवा मानणे हे सोडून बाकीच्या चांगल्या गोष्टी मी आनंदाने घेत राहीन त्यांच्याकडून. सत्यनारायणाचा शिरा असो वा रमजानमधले मटणाचे हलीम, मला सगळे चालते. मी beef steak पण खातो आणि pork slice पण. माझी नास्तिकता तुमच्या नास्तिक/आस्तिकते सारखी गळ्याभोवतीचा फास नाहिये, याउलट माझी नास्तिकता मला मुक्त करते सगळ्या आचार-विचारांच्या पाशातून, म्हणून ती आनंददायी आहे. ही नास्तिकता कुणाला उसनी देताच येणार नाही त्यामुळे मी कधीही कुणाला नास्तिक करायच्या भानगडीत पडत नाही आणि कुठल्या भंपक नास्तिक परिषदांना जाऊन तिथे कुणा विचारवंतांची तळी पण उचलत नाही.
तुमची आस्तिकता आणि नास्तिकता या तुमच्या अंतर्वस्त्रासारख्या खासगी बाबी असतात. जग त्यावर तुमची किंमत करत नाही तर तुमच्यातल्या माणुसकीवर जग तुम्हाला ओळखत. जगाचं रहाटगाडग या माणुसकीमुळे, त्यातून येणाऱ्या प्रेम, विश्वास यावर चालतं. त्यामुळे कुणी कितीही कट्टर आस्तिक किंवा नास्तिक होऊन जर माणुसकीला पायदळी तुडवत असेल तर जग त्या कट्टरतेची फक्त निर्भत्सना करते. म्हणून मग ISIS चे फिदायिन असोत, समस्त धार्मिक दंगलखोर असोत कि निधर्मी/नास्तिकतेच्या वेडाने ग्रासलेले हिंसाचारी माओवादी/कम्युनिस्ट, सगळेच जगाच्या लेखी नालायक आहेत. जगातून माणूसकी आणि एकूण माणूसच वजा केला तर नास्तिकांची rationality किंवा आस्तिकांची belief system ठेवायची कुणासाठी?? म्हणून हे नास्तिक/आस्तिक चा काथ्याकूट बाजूला ठेवून माणूस बघायला शिका, माणसावर प्रेम करायला शिका. आयुष्य खूप सोपं होतं त्यात !!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १६ जुलै २०१६, ०९.४६ )
No comments:
Post a Comment