Friday, December 30, 2016

आषाढी एकादशी


माझा जन्म आणि आयुष्यातला दोन तृतीयांश रहिवास पंढरपुरातला. माझी आई पराकोटीची कृष्ण/विठ्ठल भक्त आहे. तिचा संतसाहित्याचा अभ्यास प्रचंड आहे आणि ती भागवतधर्मानुसार आचरण करते. स्वातीने (माझ्या पत्नीने) कधीही पंढरपूरची आषाढी यात्रा पहिली नसल्याने यावर्षी तिला घेऊन सुट्टी टाकून पंढरपूरला आलोय. काल सकाळी आई वडील, स्वाती आणि भावाला सोबत घेऊन वाखरीला पालखीतळावर जाऊन ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखीचे दर्शन घेऊन आली. काल सायंकाळी पंढरपुरात पालख्या दाखल झाल्या. घराभोवती वेगवेगळ्या पालख्यांसोबत आलेल्या दिंड्या राहुट्या उभारून राहायला आल्यात.

काल संध्याकाळी माळशिरस तालुक्यातील दिंडीचे काही वारकरी चहापाण्याला येऊन गेले. आज संगमनेरच्या भागातील एका दिंडीचे वारकरी जे गेले १०-१२ वर्ष आमच्याकडे येतात ते भेटायला आणि फराळाला येतील. आषाढी एकादशीचा वर्षातला २-३ दिवसाचा सोहळा सोडला तर या वारकऱ्यांचा आणि आमचा कसलाही थेट संबंध येत नाही. पण आमच्यातील प्रेमाचा, सौहार्दाचा जो एक ऋणानुबंध आहे तो शब्दांच्या पलीकडील आहे. २-३ दिवस हे सगळे वारकरी आमच्या घराशेजारी तंबू टाकून राहतात. घरी चहाला येतात, फराळाला येतात. त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेला शक्य तेवढी निस्वार्थ मदत करण्यात एक वेगळा आनंद असतो. आमच्या वारकरी आज्या ज्यावेळेस गप्पा मारायला सुरु करतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातला निष्पाप भाव, प्रेम काळजाचा ठाव घेतं. त्यांच्या तोंडून ओव्या, अभंग ऐकताना खूप सुंदर वाटतात.

काल रात्री ९ च्या सुमारास घराला लागून उतरलेल्या दिंडीतून जेवायला बोलवायला दिंडीप्रमुख आले. मीसुध्दा त्यांच्या आग्रहाला शिरोधार्य मानत, माझ्याच घरासमोरच्या रस्त्यावर बसलेल्या त्या पंगतीत सामील झालो. ज्वारीची भाकरी आणि वांग्याची तिखट आमटी असं जेवण (वारकऱ्यांच्या लेखी माऊलींचा प्रसाद) होतं. आग्रहाने ते वाढत होते, मीसुद्धा हक्काने जेवून दिंडीप्रमुखांशी आणि बाकीच्या वारकऱ्यांशी गप्पा मारून आलो. आज एकादशीचा फराळ असेल माझ्या घरी आणि दिंडीत. दिंडीतले काही वारकरी आज घरी फराळाला येतील आणि मी दिंडीत जाईन फराळाला आणि रात्रीच्या कीर्तनाला सुद्धा. मला कीर्तन ऐकायला आवडतं, ओव्या-अभंग-दोहे ऐकायला आवडतात. त्यातला देवाचा अनुनय सोडला, तर जीवनाशी संबंधित ज्ञान विचार करायला प्रवृत्त करते.

मी गेली कित्येक वर्षे पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जात नाही कारण आता देव-धर्म या संकल्पनेवर विश्वास नाही. साहजिकच माझ्याकडून देवाला नमस्कार, कुठलंही धार्मिक कार्य वगैरे पण ओघाने बंद आहे. पण आषाढी वारीत जेव्हा भागवतधर्माला अनुसरून एखादा साठी ओलांडलेला वारकरी माझ्या पाय पडतो आणि 'माऊली' म्हणतो, तेव्हा मीसुद्धा त्याच आदराने त्यांच्याही पाया पडतो, गळाभेट घेतो. त्यांचं आस्तिक असणे मला खुपत नाही, माझे नास्तिक असणे त्यांना खुपत नाही. आमच्या या पाया पडण्यात त्यांच्या बाजूने भागवतधर्मातुन आलेले प्रेम, आदर असतो, माझ्या बाजूने विश्वबंधुत्वातून आलेला आदर आणि प्रेम. एवढे छान नाते असताना पाया पडायला किंवा गळाभेट घ्यायला संकोच कसला?

मी पूर्णपणे नास्तिक आहे, पण एक गोष्ट अनुभवाने सांगतो कि समस्त भारतात इतर कुठलाही धार्मिक सोहळा इतका मानवतेने, प्रेमाने, समतेने आणि आनंदाने प्रेरीत नसेल जितका हा वारकरी संप्रदाय आळंदी-देहू ते पंढरी असा चालत येऊन, ओव्या-अभंग गात, भेदभाव विसरून एक राहत गेली कित्येक शतके साजरा करतोय. इथे कर्मकांड नाहीये, इथे करोडोंच्या पूजा-देणग्या नाहीयेत, इथे सोन्याचे सिंहासन नाहीये, VIP दर्शनाच्या रांगा नाहीत, साधूंचे आखाडे नाहीयेत भांडण मानापमान दाखवून भांडायला. इथे आहे फक्त टाळ-मृदूंगाचा ध्वनि, माऊली-तुकाराम चा जयघोष, डोक्यावर तुळस, शेतकरी-कष्टकरी लोकांची अनवाणी पाऊले आणि मनात विठ्ठलाची आस.

पंढरीची वारी शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे, तो एक अमृतानुभव आहे. जमलं तर नक्की घेऊन बघा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १५ जुलै २०१६, ११.४८ )

No comments:

Post a Comment