Friday, December 30, 2016

स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक


स्वातंत्र्यदिनाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आधी कधी विचार केलाय की स्वतंत्र किंवा प्रजासत्ताक आपण खरंच झालोय का?

स्वातंत्र्य म्हणजे परकीयांची राजवट जाऊन स्वकीयांची राजवट येणे नसते. कारण राजवट कुणाचीही असो, सामान्य माणूस त्यात गुलामच असतो. स्वातंत्र्य म्हणजे या सगळ्यात शेवटच्या सामान्य माणसाचे सुद्धा पाश तोडणे जे शोषण करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेने त्याच्याभोवती टाकलेले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून गळ्यात फास अडकावणारा शेतकरी, इथले पिचले गेलेले वेठबिगार-बालमजूर, उपासमारीने मरणारे गरीब, जंगलातून हाकलले गेलेले आदिवासी, गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जनावरापेक्षा वाईट जीणे जगणाऱ्या विमुक्त जाती, वेशीबाहेरचे दलित आणि प्रत्येक घरात शोषित असणाऱ्या स्त्रीया या आमच्या देशातले बहुसंख्य लोक हे अजूनही पारतंत्र्यात असल्याचे द्योतक आहे.

लोकशाहीतील मताचा अमूल्य अधिकार वापरत, संविधानाच्या माध्यमातून 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव' यांवर आधारित एक आदर्शवत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था उभारणे, जोपासणे ज्यात या देशातल्या शेवटच्या माणसाचा आवाज ऐकला जाईल, त्याला न्याय मिळेल, हा प्रजासत्ताक होण्याचा अर्थ आहे. मूठभर लोकांच्या हातून (भले ते स्वकीय असोत) सत्तेच्या चाव्या काढून, ती सत्ता इथल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात देणे, आणि इथले राजकारणी, मंत्री, सरकारे, शासनव्यवस्था, प्रशासन हे येथील नागरिकांचे मालक न बनता त्यांचे सेवक, प्रतिनिधी म्हणून कार्य करतील त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होऊ.

स्वातंत्र्याशिवाय प्रजासत्ताक होता येत नाही. पण, प्रजासत्ताका शिवाय स्वातंत्र्याला कसलाही अर्थ नाही. एक राष्ट्र म्हणून आपल्याला आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि प्रजासत्ताक होण्यासाठी लढावे लागले. हा लढा अजून थांबलेला नाही. त्यासाठी इथल्या सरंजामी नेत्यांविरुद्ध, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध आणि धनदांडग्यांच्या बाजूने काम करणाऱ्या सरकारांविरुद्ध सुद्धा लोकशाही मार्गाने झगडावे लागेल. इथल्या अमानवी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था मोडून काढण्यासाठी संविधानाने दिलेला अभिव्यक्तीचा, न्यायाचा मूलभूत हक्क निर्भीडपणे आणि निकोपपणे वापरावा लागेल.

रवींद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातला भयमुक्त भारत अजून खूप दूर आहे. गांधींच्या स्वप्नातला बंधुभावाने भारलेला भारत अजून दूर आहे. नेहरू-आंबेडकरांच्या स्वप्नातला आधुनिक, विज्ञानवादी, प्रगत भारत अजून दुर आहे. कुठलाही एक पक्ष, एक नेता तिथे आपणास नेऊ शकत नाही. ही वाट आपल्या सर्वांना चालावी लागणार आहे एक सुजाण नागरिक, एक समतेने-बंधुत्वाने प्रेरीत समाज बनून. आपल्या प्रजासत्ताक होण्याच्या मार्गात येणाऱ्या जातीयवादी, धर्मांध, प्रतिगामी, फुटीरवादी, सरंजामी, राष्ट्रविरोधी शक्तींना कसलाही भेदभाव न पाळता आम्हाला अव्हेरावे लागेल, मोडून काढावे लागेल. स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने संपला नाहीये, प्रजासत्ताक होण्याचे स्वप्न अजून खऱ्या अर्थाने अपूर्ण आहे. चला, एक होऊया आणि या सुंदर स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपली जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून पार पाडुया!

समस्त भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद !!!

- डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १५ ऑगस्ट २०१६, ०८.३७ )

No comments:

Post a Comment