Friday, December 30, 2016

पर्युषण पर्व

भाऊ, तुझ्या पर्युषण पर्वात आम्ही मटण खात नाही... तुझ्या इच्छेला मान देऊन.

बकरी ईदला, गटारीला जरा मटण खा की आमच्या सोबत.... आमच्या इच्छेला मान देऊन!
कसं???

-  फेसबुक पोस्ट ( २९ ऑगस्ट २०१६, १७.४२ )

व्यवस्था

बायकोचे प्रेत खांद्यावर घेऊन चालणारा आदिवासी,
मृत महिलेचे कमरेचे हाड मोडून बांधली जाणारी मोट,
प्रवासात बायको मेली म्हणून 5 दिवसांच्या मुलीसोबत चालत्या बसमधून उतरवला गेलेला, भर पावसात भिजणारा बाप ....

थू या देशावर !!

थू इथल्या माणसांवर आणि व्यवस्थांवर !!!

-  फेसबुक पोस्ट ( २८ ऑगस्ट २०१६, १३.२६ )

आरोग्य व्यवस्थेची ऐशी की तैशी!!


2008 साली त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) मेणबत्ती, बॅटरीच्या उजेडात बाळंतपणे केलीयत मी आदिवासी बायकांची. बांबूला चादरीची झोळी बांधून त्यात गरोदर बाईला आणत आदिवासी लोक, अंधारात कित्येक किलोमीटर चालत. दऱ्याखोऱ्यात ना मोबाईल ला रेंज होती, ना रुग्णवाहिका. साप, विंचू चावला तरी हीच झोळी करून पेशंटला आणले जायचे. सर्पदंशाची औषधे तर कित्येकदा नसायचीच उपलब्ध, मग अपरात्री कुठली तरी गाडी शोधून पेशंट जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवा हि सर्कस करायची.

एक नर्स मुक्कामी असायची फक्त आणि मी सर्वकाळ उपलब्ध वैद्यकीय अधिकारी. साधीसुधी उपकरणे नव्हती, ना वीज, ना अत्यावश्यक औषधे. असायचे काय तर ट्रकभरून येणारी बनावट कंपन्यांची, निकृष्ट दर्जाची रक्तवाढीची औषधे, तीसुद्धा expiry date महिन्यावर असलेली. अख्ख्या गावाला वाटली तरी पुरून उरतील एवढी निकृष्ट औषधे! जे उपलब्ध असेल ते उपकरण, ते औषध अख्ख वैद्यकीय ज्ञान पणाला लावून त्यातल्या त्यात काहीतरी जुगाड करायचा. सुदैवाने कुणी पेशंट दगावू दिला नाही माझ्या नोकरीत.

अंगणवाडीची तीच अवस्था... बचत गटाच्या बायकांना एका मुलामागे इतके तोकडे अनुदान मिळायचे कि त्यात पोषक आहार आणणे पूर्णपणे अशक्य. त्यात पण भ्रष्टाचार आणि वेळेत बिले न मिळणे. मग त्या बायका भिजवलेले चणे वगैरे गोष्टी त्या बाळांना देणार. कसलं पोषण मिळणार त्याने? आणि कुपोषणाचे आकडे लपवण्यासाठी मात्र सगळे प्रयत्न खालून वरपर्यंत चालू. श्रेणी 3 आणि 4 च्या कुपोषणात कुठले बाळ दिसू नये म्हणून वजन वाढवून लिहिली जायची.

वैद्यकीय अधिकारी, स्टाफ यांची राहायची सोय असून नसल्या सारखी. 1960 साली बांधलेल्या मोडकळीस आलेल्या क्वार्टर्स मध्ये राहायचो, जिथे 2 मधल्या एका खोलीला छत नव्हते. वरून धो-धो पाऊस पडायचा आणि त्याचं पाणी माझ्या कॉटखालून वाहायचे. भिंतीला भला मोठा तडा गेलेला कि कधीही वरून टाकलेल्या भरावाच्या मातीत झोपल्या जागी गाढले जावे. नवीन PHC ची बिल्डींग बांधून झाली होती जी आधीच गळत होती म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून मी ताबा घ्यायला सरळ नकार दिला. कॉन्ट्रॅक्टर मी ताबा घ्यावा म्हणून इतरांकरवी लाच द्यायला पाहत होता, पण नाही घेतला ताबा.

गेल्या वर्षी सहज परत त्याच PHC ला चक्कर मारली. वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे गायब. एक नर्स फक्त केंद्र सुरू आहे म्हणून दाखवायला नव्या PHC बिल्डींग मध्ये उपस्थित. बाकी सर्व परिस्थिती जैसे थे !!
हे UP, बिहार चे वर्णन नाहीये.... ठाण्यापासून 90 किमी अंतरावरच्या, राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 12 किमी दूर एका PHC चं आहे. आणि अशा असंख्य PHC महाराष्ट्रात आहेत, ज्यांची प्रशासनाला किंवा सरकारला कसलीही काळजी नाही, मग सत्ता कुणाचीही असो! कुठल्या तोंडाने आपण महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतो ???

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २७ ऑगस्ट २०१६, १०.१७ )

अल्लाह के नाम पे ...


कुतुहूल म्हणून हाजी अली बद्दल विकिपीडिया वर माहिती वाचली. नेहमीसारख्या चमत्कारिक गोष्टी वाचायला मिळाल्या जसे की त्यांनी जमिनीत बोट खुपसून तेल बाहेर काढले, ते मक्केला जाताना मृत्यू पावले पण त्यांचे शव एका शवपेटीत तरंगत परत वरळीच्या खाडीत आले आणि तिथेच हा दर्गा उभारला गेला. हे सगळे झाले 15 व्या शतकात, म्हणजे हाजी अली हे आपल्या अजून एक चमत्कारी साई बाबांच्या गोत्राचे आद्यपुरुष. तसेच चमत्कार ... तसाच भक्तपरिवार!

सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजच्या नीरा नदी पलीकडे पुणे जिल्ह्यात येणारे लुमेवाडी (मुसलमान वाडी पण म्हणतात) नावाचे गाव आहे. तिथे साधारण 1990 च्या आसपास कुठून तरी (कदाचित जोधपूर हून) एक असेच बाबा आले... त्यांच नाव हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी. आणि मग त्यांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या, माझ्या आजोबांच्या शेतात कामाला येणाऱ्या अडाणी मजुरांकडून ऐकायला मिळू लागल्या. जसे की हाफ़ीसाहेबांना बसच्या कंडक्टरने तिकीट काढायला पैसे नाहीत म्हणून खाली उतरवले आणि नंतर ते अंतर्धान पावून क्षणात त्या बसच्या शेवटच्या थांब्यावर कंडक्टरच्या स्वागताला कित्येक तास आधी उभे! हाफ़ीसाहेबांना साक्षात पैगंबरांचा आशीर्वाद प्राप्त झाला इत्यादी!

1990 च्या दशकातच हाफ़ीसाहेब लुमेवाडी मध्ये अल्लाहला प्यारे झाले. आज लुमेवाडी मध्ये हाफ़ीसाहेबांचा मोठा दर्गा उभा आहे आणि लोक दुरदुरुन येतात तिथे नेहमीप्रमाणे नवस बोलायला. त्यांच्यावर गाणी रचली जातायत आणि काही व्हिडिओ youtube वर पण पाहायला मिळतील. हाजी अली आणि साईबाबा सारखा अजून एक नवसाला पावणारा बाबा हळूहळू लोकप्रिय होत जाईल. अडाणी लोक भुलत जातील आणि चाणाक्ष लोक त्यांच्या नावाने अजून नवे चमत्कार, नव्या अफवा पसरवत राहतील. एकदोन सेलेब्रिटी यायला लागले तर हाफ़ीसाहेब ची मार्केट value पण वाढेल.

काही वर्षांनी हाफ़ीसाहेबच्या दर्ग्यात पण मजारी जवळ बायकांना प्रवेश हवा म्हणून आंदोलन, कोर्टकचेऱ्या होतील. होऊ द्यात.... भक्तिभावाने नमस्कार करा, नवस बोला, जाळीला दोरे बांधा, ताईत बांधा, बकरी कापा. अजमेर शरीफ, सलीम चिश्ती सारखे हाफ़ीसाहेब ना पण वलय प्राप्त करून द्या. महाराष्ट्राने पण उत्तर भारतीय हाजी बाबांच्या तोडीचे बाबा निर्माण केले पाहिजेत, तिथे स्त्री-पुरुष समानता दाखवावी, तरच काही तोंड राहील ना आपल्याला त्यांना दाखवायला!

तर छोट्या गाव-शहराच्या बाबा-महाराज लोकांनो, तुम्हाला मोठे, नामांकित, नवसाला पावणारे बाबा व्हायचे असेल तर नक्की संपर्क साधा. तुमचे branding करून देण्यास आवडेल मला! तुमचे आशिर्वाद वगैरे नकोत, मोजून पैसे घेईन त्या कामाचे!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २६ ऑगस्ट २०१६, २०.३४ )

तरुणाई, उत्सव आणि कुटुंब


भारतीय तरुणाई इतकी दमन केलेली तरुणाई कुठल्याही विकसित देशात चुकूनसुद्धा सापडणार नाही. याला कारण एकच, दांभिक मर्यादाशील संस्कृतीच्या आड लपलेली भित्री चवचाल वृत्ती. म्हणजे सारे कंड तर शमवायचे आहेत पण चोरून किंवा त्याला सांस्कृतिक परिमाण देऊन, म्हणजे आईबापांच्या लेखी आपले अपत्य किती विनयशील, संस्कारी आहे ही इमेज सांभाळून. आणि प्रत्येक पिढी इथे तेच करते, आजचे आईबाप सुद्धा ते स्वतः त्यांच्या तरुणपणी तारुण्यसुलभ गोष्टींचा आनंद घेत होते हे पोरांपासून लपवणे आद्यकर्तव्य समजतात आणि पिढ्यानपिढ्या हीच धूळफेक चालू आहे.

अहमदाबाद मध्ये असताना NID मधल्या माझ्या एका गुजराती मैत्रिणीसोबत गरबा पाहायला (खेळायला जमत नाही) गेलो होतो, तेव्हा तिने सांगितले, "विनय, वर्षभर गुजराती मुलींना जितकी बंधने असतात ना ती या नऊ रात्रीत पोरी धुडकावून लावत जे हवं ते करतात." तिच्या बोलण्यातील सत्यता जवळून पाहायला मिळाली आणि जेव्हा वर्तमानपत्रात गुजरातेत i-pill आणि condom चा नेहमीच्या मागणीच्या कित्येक पट साठा नवरात्राच्या आधी केला जातो ते वाचले तेव्हा फार विशेष वाटले नाही. NID, CEPT मधला गरबा आणि तिथल्या मुलींच्या वेशभूषा पाहून खरंच विश्वास बसत नव्हता कि ह्या त्याच पोरी आहेत ज्या एरव्ही रस्त्यावर दिसतात? शहाळे आणि टकीला शॉट मध्ये जो फरक आहे तोच दिसत होता तिथे!

जी गत गुजराती पोरींची तीच कमीअधिक प्रमाणात भारतीय पोरापोरांची. सगळ्या आईबापांना, समाजाला जर काही व्यक्त होऊ द्यायचे नसेल तर ह्या तरुणांचे स्वातंत्र्य आणि त्यांची sexuality. थोडक्यात, ना घरात मोकळीक, ना बाहेर! वयात यायला लागलेल्या पोरापोरींना आईबाप किंवा शाळा कधी लैंगिक शिक्षण देणार नाहीत, आणि मग त्यांनी कुठे पॉर्न पाहून काही ज्ञान घ्यावे म्हटले की कायदा आणि संस्कृतीरक्षक आहेतच शासन द्यायला. म्हणून मग या सगळ्यातून काही पळवाटा काढायला कमी येतात ते सांस्कृतिक उत्सव कारण तिथे आईबाप, समाज एकंदरीत जात-धर्माची, संस्कृतीची पार्श्वभूमी पाहून कानाडोळा करतात.

नवरात्री उत्सव, गणपती उत्सव, आंबेडकर जयंती, शिवजयंती, दहीहंडी मधल्या गर्दीत, मिरवणुकीत सगळी बंधने झुगारणारी, जुगार खेळणारी आणि दारू पिऊन जल्लोष करणारी तरुणाई आणि काही मध्यमवयीन लोकसुद्धा... हे सगळेच या दमनातून पळवाट काढत तिथे पोचलेले असतात. एरव्ही कुठल्या पक्षाच्या मोर्चाला, बैठकीला चाललाय म्हणून तरुण अपत्याने घरी सांगितले तर कुठलेही आईबाप परवानगी देणार नाहीत; पण हेच त्याच पक्षाच्या नेत्याने ठेवलेल्या धार्मिक उत्सवाला चाललाय म्हणाले की आईबाप होकार देऊन मोकळे, तिथे आपले अपत्य किती सुरक्षित आहे याची कसलीही काळजी न करता!

तरुण मुला-मुलींना सर्व तारुण्यसुलभ भावना होतात... वेगाने गाडी चालवायच्या, सिगारेट शिलगवायच्या, थंड बीअर प्यायच्या, पब मध्ये नाचायच्या, पॉर्न पाहायच्या आणि कधीकधी sex करायच्या सुद्धा. जेव्हा घरात यातली कुठलीही इच्छा पूर्ण करणे सोडा, व्यक्त करणे हीसुद्धा शक्यता अस्तित्वात नसते तेव्हा या मुलांना उत्सव अपरिहार्य बनतात. आणि यात सगळ्यात जास्त धोका असतो या तरुणाईला जी वेगाच्या-दारूच्या नशेत अपघात, लैंगिक गुन्हे, लैंगिक आजार यांची बळी पडू शकते किंवा गुन्ह्यात सामील सुद्धा होऊ शकते. असे कित्येक दुर्दैवी प्रकार तरुणाईसोबत घडतात, जे उत्सव आयोजित करणारे राजकीय धेंड झाकून टाकतात आणि हतबल आईबाप "झाकली मूठ सव्वा लाखाची" म्हणून शांत बसतात. पण मुलांच्या मनावर, शरीरावर झालेले आघात खूप दूरगामी असतात.

तरुण मुलामुलींच्या अभिव्यक्तीला योग्य तितका वाव घरात, समाजात मिळाला तर ह्या उत्सवांच्या आडून येणारे दुर्दैवी प्रसंग सहज टाळता येतात. दारू, सिगारेट, सेक्स यांच्याकडे होणारे आकर्षण हे तितकेच तीव्र असते जितके त्यांच्याबद्दल गूढ बाळगले जाते. बापाने जर पहिली सिगारेट शिलगावून पोरा-पोरीला दिली, पहिला पेग बनवून दिला तर ते कशाला चोरून पितील? दारू जास्त चढल्यावर काय होतं आणि आपण किती vulnerable असतो हे घरातच कळल्यावर ते बाहेर जाऊन नक्कीच दारू किंवा ड्रग्ज मध्ये धुंद होणार नाहीत. लैंगिक शिक्षण, लैंगिक संबंधामागचे भावनिक बंध, असुरक्षित sex मधले धोके, contraception कसं करावे याची माहिती घरातूनच मिळाली तर वयात आलेली मुले-मुली लैंगिक संबंधाबाबत बरीच सजग आणि सुरक्षित राहतील.

कुणीही तरुण मुला-मुलींवर 24 तास लक्ष ठेवू शकत नाही, बंधन ठेवू शकत नाही आणि ती ठेवू पण नयेत, कारण त्याने उपाय कमी, अपाय जास्त होतात. स्वतःला व्यक्त करायचं विधायक स्वातंत्र्य, त्यासोबत येणाऱ्या जबाबदारींची माहिती आणि कुटुंबाचा विश्वास एवढं मिळालं तर आपल्याकडील तरुणाईचे बरेच प्रश्न गंभीर स्वरूपात व्यक्त न होता, योग्य वेळेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात नाहीसे होतील.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २६ ऑगस्ट २०१६, १३.०० )

25 पैशाची हंडी!!!


हे बघ गोविंदा,

हंडी फोडायला वर चढणार कोण? .... तू !

जीव धोक्यात घालणार कोण? .... तू !

कोर्टाची अवमानना करणार कोण? .... तू !


अंगावर केसेस घेणार कोण? .... तू!


पासपोर्ट, नोकरीला अडचण कुणाच्या?... तुझ्या!


उद्या लोक विसरणार कुणाला?... तुलाच!


मग गोविंदा, कशाला एवढा जीवाला त्रास करून घेतोय? ज्यांना धर्माची, संस्कृतीची, उत्सवाची काळजी आहे त्या समस्त मोहरम च्या वाघांना, ब्लू प्रिंट वाल्यांना, 'Save Gaza' वाल्यांना, निळ्या हंडी वाल्यांना, भाऊ-दादा-आप्पा-काका-तात्या-साहेब-नेते लोकांना आणि त्यांच्या काळ्या पैशावर नाचायला तयार असलेल्या बॉलिवूडच्या खान-भाई पासून सदाशिव पेठी सेलेब्रिटी पर्यंत सगळ्यांना म्हणायचं "वर्षभर सहकुटुंब तयारी करा आणि नऊ थर लावून हंडीला सलामी द्या, आम्ही तुम्हाला 50 लाख देतो!"

कसले मस्त दृश्य दिसेल ना?? आणि पैशाचे म्हणशील तर 2 कोटी मुंबई-ठाणे करांना फक्त 25 पैसे द्यावे लागतील दरडोई!!

Entertainment unlimited !!!

-  फेसबुक पोस्ट ( २५ ऑगस्ट २०१६, १७.३३ )

फडणवीस सरकार

फडणवीस सरकार इतके निर्विवाद नालायक सरकार महाराष्ट्रात प्रथमच आलेले आहे.
मागे हे अध्यादेश काढायला निघाले होते की, जर कुणी सरकारच्या विरोधात टीका केली तर तो राष्ट्रद्रोह असेल. जनमताच्या रेट्यापुढे आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे हनन होतेय म्हणून माध्यमांनी टीका केल्यावर नांगी टाकत त्यांनी तो प्रकार थांबवला.

नंतर गोहत्येची अस्तित्वात असलेली बंदी वाढवून 'गोवंश हत्या बंदी' केली. महाराष्ट्रातला चर्मोद्योग यांनी मातीत घातला, अगदी इथल्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपला सुद्धा आता बाजारात मिळेना झाल्यात. आणि जेव्हा स्वतः पंतप्रधान गोरक्षकांचे कान उपटत होते तेव्हा महाराष्ट्र सरकार अधिकृत गोरक्षक नेमत होते आणि आहे. थोडक्यात आहार आणि व्यवसाय निवडीचे मूलभूत स्वातंत्र्य यांनी पायदळी तुडवले.

आज एक पाऊल पूढे जात कुठल्याही कारणासाठी 100 पेक्षा जास्त लोक जमा होणार असतील तर आधी परवानगी घ्यावी लागेल असा कायदा बनवायला चाललेय. थोडक्यात कार्यक्रम खासगी असो, राजकीय किंवा सामाजिक.... लोकांच्या हालचालीवर सरकारचे निर्बंध आणि नजर. घटनेने लोकांना हालचालींचे मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि या मूलभूत हक्का ला फडणवीस सरकार पायदळी तुडवायला चाललेय.

प्रत्येक वेळेस नागरिकांचा घटनेने दिलेला एकेक मूलभूत हक्क काढून घ्यायला हे सरकार इतके आतुर का आहे??? आणि कारण काय तर म्हणे आंतरिक सुरक्षा??? कसली बोडक्याची आंतरिक सुरक्षा धोक्यात आलीय महाराष्ट्रात जी 100 लोक मिळवून बिघडवतील ?? एवढीच आंतरिक सुरक्षेची काळजी असेल तर आधी दाभोळकर आणि पानसरेंचे खुनी पकडून दाखवा ना!! थांबवा ना कोपर्डी, खर्डा सारखे नृशंस अत्याचार !!

फडणवीस साहेब, स्वतःच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी, त्याच्या विरोधात असलेला जनक्षोभ लपवण्यासाठी किती हक्क माराल लोकांचे?? काही काम कराल कि फक्त हे खाऊ नका, हे बोलू नका, इथे भेटू नका, तिथे जाऊ नका यातच आपली अर्धवट अक्कल लावत बसणार?? विदर्भातून निवडून येऊन, तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून थांबवण्यासाठी काही काम केलंय का 2 वर्षात? जरा विधायक कामे करा सरकार म्हणून ज्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय!!!

-  फेसबुक पोस्ट ( २४ ऑगस्ट २०१६, १६.०७ )

रेशीमबागेतल्या मिशाळू सुरवंटा ...


मला मुसलमानांची, त्यांच्या अल्पसंख्याक असण्याची भीती किंवा काळजी वाटत नाही कारण ते माझे वैरी नाहीत.
मला हिंदूंची, त्यांच्या बहुसंख्यांक असण्याची भीती किंवा काळजी वाटत नाही कारण तेही माझे वैरी नाहीत.
मला काळजी वाटते ती माझ्या देशाला लागलेल्या धर्मांध किडीची... जी वेगवेगळ्या संघटनांची नावे वापरत इथली शांतता बिघडवत असली तरी तुझ्या पायाशी एकरूप होऊन नतमस्तक होते, या देशाला हिंदुराष्ट्र बनवायचे स्वप्न पाहत.

मला काळजी वाटते तुझ्यासारख्या किडीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या धर्मांमध्ये वाढणाऱ्या इतर किडींची ज्यांना या देशात विनाकारण भय वाटतं आणि इथल्या लोकशाही व्यवस्थेपेक्षा बाहेरचे शरिया कायदे ईश्वरी वाटतात.
सुदैवाने, इथले 99% हिंदू आणि मुसलमान मानवता जपत, शांततापूर्ण सहजीवनात आनंद मानणारे आहेत आणि उरलेले 1% धर्मांध तुमच्या हिंदुराष्ट्र आणि मुस्लिमराष्ट्र या नालायकपणात अंध झालेले आहेत.

या 99% मधल्या काहींना, तुम्ही सर्व धर्मांचे कट्टरवादी थोड्या काळ फसवून सत्तेत आला तरी लोकांचे डोळे उघडायला लागलेले आहेत. ते डोळे अजून चांगले उघडत जातील येत्या काही वर्षात आणि आज दिसणारी तुम्हा समस्त कट्टरपंथीयांची संख्या हळूहळू खूप रोडावत जाणार आहे.

तेव्हा लोकांच्या बायकांना जास्त मुले जन्माला घालायला लावण्यापेक्षा स्वतःच्या संसाराचं काय जमतंय का बघ या वयात. मुलबाळ नाही झाले तरी हरकत नाही, पण एखाद्या स्त्रीच्या निस्वार्थ प्रेमाने तरी तुमच्या सडक्या मेंदूतील द्वेषाची जळमटे बऱ्यापैकी निघायला मदत होईल.

-  फेसबुक पोस्ट ( २३ ऑगस्ट २०१६, २१.५६ )

स्मारक ... बघतोय काय?


या या अंकल सॅम!
तुमच्या देशात 'Staue of Liberty' आहे होय? किती फूट उंच आहे? 305 फूट ..... बरं.

आम्ही छत्रपती शिवाजींचा पुतळा उभारतोय, 630 फूट उंच!!!
आम्ही सरदार पटेलांचा पुतळा उभारतोय, 522 फूट उंच !!
आम्ही डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारतोय, 350 फूट उंच!
(पटेलांपेक्षा आंबेडकर थोडा कमीच उंच ठेवायचा, नंतर उभारला तरी, त्याला कारणे असतात)


आता बोला... तुम्ही करणार आमची बरोबरी?? तुमच्या एका काल्पनिक Liberty बाईच्या पुतळ्यापेक्षा, आमच्याकडे खऱ्याखुऱ्या 3 महापुरुषांचे पुतळे असणार आहेत. आणि हे तर काहीच नाही. थोडी वर्ष अजून जाऊ द्या, अजून बरेच महापुरुष wait-list वर आहेत. कसं आहे ना, आमचा देश खूप महान आहे. इथे नर-नारी रत्नांची खाण आहे आणि नवनवीन रत्ने आम्ही तयार करत राहतोच.

राजकारण, समाजकारण, धर्मकारण यांनी प्रेरित होऊन आणि कधी कधी अगदी विनाकारण सुद्धा आम्ही महापुरुषांचे पुतळे उभारणे हे आमचे कर्तव्य समजतो. आणि तुमच्या 'statue of Liberty' सारखी आम्ही पण 'statue of unity' आणि 'statue of equality' वगैरे भारी नाव द्यायला शिकलोय आता. तेव्हा तुमच्या 300 वर्षे जुन्या देशाला आमचा सत्ययुगापासून अस्तित्वात असलेला देश आणि संस्कृती कधीही वरचढ आहे. समजलात का?

काय म्हणताय तुम्ही? आमच्या देशात जगातली सगळ्यात जास्त कुपोषित बालके आहेत? 50% बायका ऍनिमिया ने ग्रस्त आहेत? 70% लोक 2 डॉलर पेक्षा कमी पैसे दरदिवशी मिळवतात? कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात? खेळाडू गरिबीत आयुष्य कंठतात? माणसे डोक्यावरून मैला वाहतात? बालके मजुरी करतात? देहव्यापार, मानवतस्करी राजरोस चालते? दिवसाढवळ्या झुंडीने लोक निर्दोष लोकांच्या हत्या, त्यांना मारहाण करतात? आमचीच सशस्त्र दले आमच्याच लोकांवर गोळ्या झाडतात, बलात्कार करतात? स्कॉलरशिप मिळत नाहीत, फी भरायला पैसे नाहीत म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात? बेरोजगार युवक धार्मिक, राजकीय दंगलीत डोके गहाण ठेवून जाळपोळ करतात, खून करतात,बायकांचे बलात्कार करतात?

हे बघ अंकल सॅम, आमचा देश परत एकदा 'विश्वगुरु' बनायला लागलाय म्हणून तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागलीय. म्हणून तुम्ही फक्त वाईटावर बोट ठेवायची संधी हुडकताय आणि नसलेल्या अफवा उडवताय आमच्या देशाबद्दल. आम्ही तुमच्या सारखे भिकारी नाही की तुमचा 'statue of Liberty' सुद्धा फ्रान्सने तुम्हाला भेट करावा. आम्ही आमच्या करदात्यांच्या पैशातून पुतळे उभारतो... कळलं???

आता बघतोय काय? मुजरा कर आमच्या देशाला !!!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २३ ऑगस्ट २०१६, १६.५० )

सैराट

किती लोकांनी लक्ष दिले माहित नाही ... बॅनर वर नीट वाचा 'टुरलामेंन्ट'
ग्रामीण पार्श्वभूमीचा सिनेमा असा बनवावा लागतो !
 
 
-  फेसबुक पोस्ट ( २१ ऑगस्ट २०१६, २१.१३ )

प्रभू येशूच्या नावानं



मिरजेत शिकल्यामुळे चर्चात जायचे प्रसंग खूपदा आले. कुणी जबरदस्ती केली नाही पण उगीच कंटाळा आला की चर्चात जाऊन बसणे हा विरंगुळा. खरंच विरंगुळा होता तो, कारण जरा वेळ शांत बसावं म्हणलं त्या बाकड्यावर तर कुठून तरी एखादा स्वयंसेवक यायचा, शेजारी बसायचा आणि चौकशी करायचा. मी ख्रिस्ती नाही म्हणून सांगितलं की लगेच मग येशूच्या आयुष्याचा एक धावता आढावा सांगितला जायचा, तो आदाम, ती हव्वा, तो साप, ते सफरचंद आणि ते पाप... आणि मग त्या दिवसापर्यंत मला माहित नसलेल्या माझ्या पापासाठी देवाने आपला पुत्र बलिदान कसा केला याची कहाणी. आणि जाताना बायबल ची एक प्रत सप्रेम भेट. 2-3 वर्षात बऱ्याच नव्या आणि जुन्या कराराच्या प्रती कपाटात साठल्या होत्या. त्यांना माझा त्रास नव्हता आणि मला त्यांचा!

रविवारी कधीकधी भरल्या चर्चात जायचो. सकाळी शिक्षित, श्रीमंत लोकांसाठी इंग्लिश मध्ये फादर कथा सांगणार. दुपारची सभा अडाणी, गरीब लोकांसाठी मराठीत. कधी कधी सार्वकालीक आयुष्य मिळावे म्हणून येशूचे रक्त प्या, मांस खा म्हणून पाणी घातलेली बुचभर वाईन आणि एक बेचव कागदी चकती पण प्रतिक म्हणून खायप्यायला दिली जायची. आयुष्यात पहिल्यांदा दारू पिली ती अशी चर्चात आणि नरमांस खाल्ले ते थेट प्रभू येशूचे. प्रार्थना पण एकदम मस्त असायच्या, दरवेळी आकाशातल्या प्रेमळ बापाचा धावा केला जायचा. एके दिवशी तर फादर म्हणाले,"'आमचे चर्च आणि दुसरे चर्च यांच्या मधल्या जमिनीच्या बाबतीतल्या केस मध्ये न्यायालयाने आमच्या बाजूने न्याय दिला म्हणून हे आकाशातील प्रेमळ बापा, आम्ही तुझे आभार मानतो!" त्या दिवशी कळलं, आपल न्यायालय पण आकाशातल्या प्रेमळ बापाला वरचढ आहे.

एक ख्रिस्ती GF होती, तिच्या आई सोबत एका प्रार्थना सभेला गेलो कुतुहुल म्हणून. ते परवा किडनीच्या आजाराने वारले ना 'आराराराराराराराररारा' वाले समस्त रोग प्रार्थनेने बरे करणारे मार्टिनबाबा, अगदी तोच प्रकार. गोरगरीब, अडाणी जनता मंत्रमुग्ध होऊन प्रार्थना ऐकून संमोहित होत होती. तो धर्मप्रसारक hallelujah (हालेलुया असं वाचा अडाण्यांनो) म्हणत डोक्याला हात लावायचा कि लोक धाडकन खाली पडायचे मूर्च्छित होऊन. त्याने नेमक काय व्हायचं ते येशूला आणि बेशुद्ध पडणारे या दोघांनाच माहित.

अशाच गोरगरीब जनतेसाठी 'Impact World Tour' नावाची एक छोटेखानी परदेशी पैलवानांची, gymnast ची टोळी आली होती. आडदांड पैलवान गरम पाण्याने शेकायच्या रबरी पिशवी तोंडाने फुगवून फोडत होते, बाई gymnast नाचून दाखवत होत्या आणि जनता भान हरपून पाहत होती. त्यात शेवटी ते पैलवान, त्या बायका त्यांचं आयुष्य कसं बरबाद झाले होते, ड्रग्ज-वेश्यावृत्ती पासून ते तुरुंगवसापर्यंत कसे प्रसंग आले, आणि त्यात येशूने कसा दृष्टांत दिला आणि आयुष्य बदलले याच्या सुरस कथा इंग्लिश मध्ये सांगत होते आणि त्याचं हास्यास्पद मराठी भाषांतर तिथल्या तिथे एक मराठी फादर सांगत होता. अडाणी लोक डोळे पुसत होते, भान हरपून ऐकत होते, आणि येशूचा जयजयकार करत होते.

त्या काळात मी या गोष्टी फक्त एक अनुभव, कुतुहुल म्हणून पाहायला जायचो. पण आज जेव्हा ख्रिस्ती धर्म, बायबल मधल्या भुताखेतांच्या गोष्टी (दयासागर नावाची सिरिअल लागायची DD वर), मूळ पाप आणि त्या पापमुक्तीसाठी येशूचे बलिदान इत्यादी गोष्टी ऐकल्या की हसू येते. आणि त्यातून हे प्रार्थनासभा आणि त्यातून बरे केले जाणारे आजार, भूतबाधेवरचे उपचार, जॉयस मेयर, पॉल दिनकरन आणि सेबास्टियन मार्टिन सारखे ढोंगी प्रसारक वगैरे पाहिले की त्या गरीब लोकांची दया येते जे एका रानटी धर्माला मुक्तीचा मार्ग मानून बसलेत. या रानटी गोष्टींमध्ये आणि अवैज्ञानिक बाबींमध्ये बाकी सारे धर्म एकमेकाला पुरून उरतील.

लहानपणी कुणी सांगितलं की देवाला घाबर, तर थोडं फार घाबरायचो. पण जेव्हापासून येशूच्या नावाने, अल्लाहच्या नावाने आणि हिंदू देवतांच्या नावाने इतकी भंकस पाहिली, ऐकली आणि अनुभवलीय की आता देव आणि धर्म म्हणलं की मी फक्त हसतो आणि पुढच्या धार्मिक माणसाला प्रेमाने गळाभेट देतो, मनातून "लवकर बरा हो" म्हणून शुभेच्छा देत.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १९ ऑगस्ट २०१६, १७.२० )

खंडेराव

खंडेराव सवर्णांच्या पोरांना खूप पर्याय असतात, जसे की -

१) जातीचा माज करत दलितांवर अत्याचार करणे
२) जातीय अत्याचारांना उघड, छुपे समर्थन देणे
३) मवाळ बनत दिखाऊ 'सेवादल' वगैरे काढणे
४) समरसतेच्या नावाने 'kitty party' करणे
५) समाजवादी होऊन 'guilt conscious' शमवणे
६) भंपक पुरोगामी होऊन थोडा विरोध पण करणे
७) 'विवेक' वगैरे गोष्टी सांगत पळवाटा शोधणे
८) "मी जात मानत नाही" म्हणून जातप्रश्नच नाकारणे
९) जातींचा उल्लेख नाकारून शहामृगासारखे तोंड लपवणे
१०) भविष्याकडे बोट दाखवत वर्तमानाचे अस्तित्व नाकारणे
११) जातवास्तव मांडणाऱ्यांनाच जातीयवादी म्हणणे
१२) अज्ञानी राहून जातव्यवस्थेचे फायदे साळसूदपणे घेणे


त्यांचा प्रत्येक कृतीला इथली व्यवस्था डोक्यावर घेऊन नाचणार आहे... कुठल्या का बाजूला जाईना पोरगा, जातीतून बाहेर तरी होत नाही.

दलितांच्या पोरांना एकचं पर्याय असतो - या जातीय व्यवस्थेचं अमानुष वास्तव मान्य करून, त्यातून स्वतःचा मार्ग काढत, या व्यवस्थेला जाळण्यासाठी संघर्ष करायचा, जी व्यवस्था त्यांना जनावरापेक्षा खालचे मानते.

तू तुझ्या हस्तिदंती मनोऱ्यात सुखात पडून रहा खंडेराव, आम्ही लढायला समर्थ आहोत. तुझ्या कौतुकाने आम्हाला मूठभर मांस चढत नाही की तुझ्या तिरस्काराने आम्ही सैरभैर होत नाही.

तुझ्या हस्तिदंती मनोऱ्याला आग लागेपर्यंत सुखाने झोपून घे खंडेराव !!

-  फेसबुक पोस्ट ( १७ ऑगस्ट २०१६, ०८.१० )

स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक


स्वातंत्र्यदिनाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आधी कधी विचार केलाय की स्वतंत्र किंवा प्रजासत्ताक आपण खरंच झालोय का?

स्वातंत्र्य म्हणजे परकीयांची राजवट जाऊन स्वकीयांची राजवट येणे नसते. कारण राजवट कुणाचीही असो, सामान्य माणूस त्यात गुलामच असतो. स्वातंत्र्य म्हणजे या सगळ्यात शेवटच्या सामान्य माणसाचे सुद्धा पाश तोडणे जे शोषण करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेने त्याच्याभोवती टाकलेले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून गळ्यात फास अडकावणारा शेतकरी, इथले पिचले गेलेले वेठबिगार-बालमजूर, उपासमारीने मरणारे गरीब, जंगलातून हाकलले गेलेले आदिवासी, गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जनावरापेक्षा वाईट जीणे जगणाऱ्या विमुक्त जाती, वेशीबाहेरचे दलित आणि प्रत्येक घरात शोषित असणाऱ्या स्त्रीया या आमच्या देशातले बहुसंख्य लोक हे अजूनही पारतंत्र्यात असल्याचे द्योतक आहे.

लोकशाहीतील मताचा अमूल्य अधिकार वापरत, संविधानाच्या माध्यमातून 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव' यांवर आधारित एक आदर्शवत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था उभारणे, जोपासणे ज्यात या देशातल्या शेवटच्या माणसाचा आवाज ऐकला जाईल, त्याला न्याय मिळेल, हा प्रजासत्ताक होण्याचा अर्थ आहे. मूठभर लोकांच्या हातून (भले ते स्वकीय असोत) सत्तेच्या चाव्या काढून, ती सत्ता इथल्या प्रत्येक नागरिकाच्या हातात देणे, आणि इथले राजकारणी, मंत्री, सरकारे, शासनव्यवस्था, प्रशासन हे येथील नागरिकांचे मालक न बनता त्यांचे सेवक, प्रतिनिधी म्हणून कार्य करतील त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होऊ.

स्वातंत्र्याशिवाय प्रजासत्ताक होता येत नाही. पण, प्रजासत्ताका शिवाय स्वातंत्र्याला कसलाही अर्थ नाही. एक राष्ट्र म्हणून आपल्याला आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि प्रजासत्ताक होण्यासाठी लढावे लागले. हा लढा अजून थांबलेला नाही. त्यासाठी इथल्या सरंजामी नेत्यांविरुद्ध, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध आणि धनदांडग्यांच्या बाजूने काम करणाऱ्या सरकारांविरुद्ध सुद्धा लोकशाही मार्गाने झगडावे लागेल. इथल्या अमानवी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था मोडून काढण्यासाठी संविधानाने दिलेला अभिव्यक्तीचा, न्यायाचा मूलभूत हक्क निर्भीडपणे आणि निकोपपणे वापरावा लागेल.

रवींद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातला भयमुक्त भारत अजून खूप दूर आहे. गांधींच्या स्वप्नातला बंधुभावाने भारलेला भारत अजून दूर आहे. नेहरू-आंबेडकरांच्या स्वप्नातला आधुनिक, विज्ञानवादी, प्रगत भारत अजून दुर आहे. कुठलाही एक पक्ष, एक नेता तिथे आपणास नेऊ शकत नाही. ही वाट आपल्या सर्वांना चालावी लागणार आहे एक सुजाण नागरिक, एक समतेने-बंधुत्वाने प्रेरीत समाज बनून. आपल्या प्रजासत्ताक होण्याच्या मार्गात येणाऱ्या जातीयवादी, धर्मांध, प्रतिगामी, फुटीरवादी, सरंजामी, राष्ट्रविरोधी शक्तींना कसलाही भेदभाव न पाळता आम्हाला अव्हेरावे लागेल, मोडून काढावे लागेल. स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने संपला नाहीये, प्रजासत्ताक होण्याचे स्वप्न अजून खऱ्या अर्थाने अपूर्ण आहे. चला, एक होऊया आणि या सुंदर स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपली जबाबदारी एक सुजाण नागरिक म्हणून पार पाडुया!

समस्त भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद !!!

- डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १५ ऑगस्ट २०१६, ०८.३७ )

डॉ. बालाजी तांबे यांची पदवीच सापडेना!

माणसे खूप आदर्शवादी बोलायला लागली, प्रसिद्धीच्या आणि श्रीमंतीच्या शिड्या पटापट चढायला लागली, थोरामोठ्यांपासून ते सामान्यांपर्यंत लोक त्यांच्या पायात जाहीर लोटांगण घालायला लागले की समजून घ्या कुठेतरी पाणी मुरतंय !!

बालाजी तांबेचं 'गर्भसंस्कार' आणून बायकोला वाचायला, ऐकायला दे असं स्वातीच्या प्रेग्नन्सी मध्ये खूप जणांनी सांगितले. मला हा माणूस पहिल्या पासून भंकस वाटायचाच, त्यामुळे आपण कधीही याला 5 पैसे खर्चले नाहीत, ना कधी याची 'फॅमिली डॉक्टर' मधली भंकस वाचली.

गोरेगोमटे बाळ व्हावे म्हणून एकही बाळाचं चित्र आम्ही भिंतीवर लावले नाही. बाह्य रंगावर, ठेवणीवर सौंदर्य थोडीच असते?? सगळी बाळे सुंदर असतात, मग ते माझं असो की अजून कुणाचं असो. म्हणून कधी त्या 'cute baby' किंवा 'सुदृढ बालक' स्पर्धेत पण कधी पोराला पाठवलं नाही.

आणि राहिली गोष्ट गर्भसंस्कारांची.... आपल्याला कसलेही 'आदर्श बालक' सारखे संस्कार पोरावर करायचे नाहीयेत. जिथे बापाने स्वतः सगळे बालपणीचे धर्मसंस्कार फेकून दिले तिथे पोराला का शिकवा? पोराला नाव कबीर ठेवले, आणि कागदोपत्री धर्माला उडवून टाकले. 18 वर्षानंतर बघेल तो काय करायचं ते त्याच्या इच्छेने. आपल्या डोक्याला त्रास नाही :)

-  फेसबुक पोस्ट ( १३ ऑगस्ट २०१६, २०.३४ )

दिल चाहता है


15 जून 2001 ला 'लगान' आणि 'गदर' एकाच दिवशी रिलीज झाले होते. पाहायला गेलं तर दोन्ही काल्पनिक पिरियड फिल्म, एकात धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर प्रेमकथा तर दुसऱ्यात खेळाच्या माध्यमातून जुलमी ब्रिटिशांवर हल्लाबोल. लगान ऑस्कर गाजवेल आणि गदरचे कलेक्शन लगानपेक्षा जास्त होईल यात मला काडीमात्र संशय नव्हता. सनी, आमिर, जावेद अख्तर, रहमान यांच्या कौतुकाचे पडघम पुढचे दीड-दोन महिने सर्वत्र वाजत होते. पण हे फार काळ टिकणार नव्हतं.

10 ऑगस्ट 2001 ला 'दिल चाहता है' रिलीज झाला आणि भारतीय सिनेमाने पहिल्यांदा मध्यमवर्गीय सदरा टाकून श्रीमंतीचा कोट चढवला. तीन सुखवस्तू कुटुंबातुन येणाऱ्या मित्रांची मैत्रीची आणि त्याला समांतर प्रेमाची कथा होती ही. पण एवढ्यावरच न थांबता, पारंपरिक हिंदी सिनेमातले प्रत्येक तंत्र, निर्मितीमूल्य या सिनेमाने नव्याने हाताळल होतेे. या सिनेमाला नायक नव्हता ना खलनायक, होती ती फक्त पात्रे आणि आयुष्यातील विविध प्रसंगांकडे पाहायची, प्रतिक्रिया द्यायची त्यांची वेगवेगळी पद्धत.

आकाश, एक अत्यंत अवखळ मुलगा ज्याला कसलीही जबाबदारी, commitment माहित नाही. समीर जो सदैव गोंधळलेला आहे. सिद्धार्थ जो त्याच्या चित्रांइतकाच गूढ, अनाकलनीय आहे. शालिनी जी उपकारांच्या न दिसणाऱ्या ओझ्याखाली दबलीये. पूजा जिला बॉयफ्रेंड असताना पण आईबापांच्या आग्रहासाठी स्थळे पाहावी लागतायत आणि घटस्फोटित तारा जैस्वाल जिने दारूत आयुष्यातली दुःखे बुडवून ठेवलीयत.

वेगवान कथानक असून पण इथे प्रत्येक पात्राला तेवढाच वाव, अभिव्यक्ती मिळते. कुठलेही पात्र दुसऱ्या पात्राशी स्पर्धा करतच नाही कारण जरी सगळे एकत्र दिसत असले तरी प्रत्येकाचे भावनिक जग वेगळे आहे. यातली पात्रे व्यक्ती कमी आहेत आणि माणसाच्या भावनिक अवस्था जास्त आहेत. म्हणून एकाच वेळी एक प्रेक्षक ह्या साऱ्या पात्रांत स्वतःला पाहू शकतो. मानवी संवेदनांचा इतका सुंदर kaleidoscope खचितच कुठल्या सिनेमाने दाखवला असेल आजवर.

संपूर्ण चित्रपटभर दिसणारा निळा रंग, डायलॉगबाजी नसलेल्या अर्थपूर्ण पण छोट्या संवादांना अजून खोली देऊन जातो. काही वेळेस पात्रांचे मौन सुद्धा खूप मोठा संवाद साधून जाते. वेशभूषा, केशभूषा खूप काही बोलून जाते. "कैसी है ये रुत" आणि "वो लडकी है कहां" या दोन्ही गाण्यात सादरीकरणाचा एक वेगळा प्रकार पाहायला मिळतो. शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीतात जादू केली या सिनेमात आणि खऱ्या अर्थाने त्यांना ब्रेक मिळाला जो 'मिशन कश्मीर' मधून मिळाला नव्हता.

'आशिक आवारा' मधला छपरी सैफअली खान यात चक्क elegant दिसून जातो. 'हिमालय पुत्र' अक्षय खन्ना या सिनेमात खराखुरा संवेदनशील पेंटर भासून जातो. 2 महिने आधी लगान मध्ये दिसलेला डोक्याला मुंडासे बांधलेला गरीब, खेडूत भुवन, आणि यातला गर्भश्रीमंत आकाश ही दोन टोकाची पात्रे तेवढ्याच ताकदीने रंगवणे फक्त आमिर खानलाच शक्य होते आणि आजही आहे. डिंपल कपाडिया चं कमबॅक तितकंच ताकदीचे होते. आणि या सगळ्यांना त्यांचे साचे मोडून, मुक्त करून रुपेरी कॅनव्हास वर त्यांचे रंग उधळणारा नव्या दमाचा, दृष्टीचा दिग्दर्शक फरहान अख्तर पडद्यामागे राहून पण सगळ्यात जास्त भिडून जातो मनाला.

काल 15 वर्ष झाली या सिनेमाला रिलीज होऊन, पण हा सिनेमा आजही तेवढाच ताजातवाना वाटतो. 'लगान' 2 वेळा आणि 'गदर' एकदाच पहिला थिएटर मध्ये, पण 'दिल चाहता है' मी आणि माझ्या मित्राने सलग 8 दिवस थिएटरमध्ये 12 ते 3 चा शो पाहिलाय. नवल नाही की 'लगान' आणि 'गदर' ला मागे टाकून या सिनेमाने त्यावर्षीचा 'बेस्ट फिल्म' चा नॅशनल अवार्ड पटकावला. करमणूक करणारे असंख्य सिनेमे येत राहतील, जात राहतील पण 'दिल चाहता है' तो मैलाचा दगड आहे जिथून हिंदी सिनेमा बग्गीतून BMW मध्ये गेला!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ११ ऑगस्ट २०१६, ०७.३६ )

प्रमोशन -


पुरुष्या, तुझ्यासोबत बुद्धीबळ खेळून खूप वर्ष झाली. सत्तेच्या पटावर तू आता वजीर झालायस, आठही दिशांना बेफाम उधळतोयस ! मला माहित आहे याइतके सामर्थ्य तू कधीही अनुभवले नव्हतेस. काही क्षणांसाठी तुला एकावेळी एक घर चालणारा राजा पण कमजोर, तुझ्या पायातली बेडी वाटू लागला असेल. हो ना?

पण पुरुष्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, पटावर खेळ तोवरच चालतो जोवर राजा जिवंत आहे. आणि राजाला जिवंत ठेवण्यासाठी कुणाचाही बळी दिला जाऊ शकतो, प्रसंगी स्वतःच्या सामर्थ्यशाली वजीराचा सुद्धा !

काय म्हणालास? वजीराशिवाय राजसत्ता कशी टिकेल? प्रमोशन पुरुष्या प्रमोशन! वजीर भरात असताना सुद्धा राजा काही प्यादी आठव्या घराकडे नेत असतो. कधी कधी शत्रूचे एखादे प्यादे सुद्धा राजसत्तेला आणि वजीराला एकत्र शह देते, आणि मग वेळ येते राजसत्तेला वाचवायची. तेव्हा वजीराचा बळी दिला जातो आणि तिकडे आठव्या घरात प्यादे नेऊन त्याला नवा वजीर म्हणून पटावर आणायचं!

राजसत्ता स्वयंभू असते आणि ती कुठल्याही प्याद्याला वजीर बनवायची ताकद ठेवून असते. तेव्हा पुरुष्या, सांभाळून रहा आणि राजसत्तेला, तिच्या लाडक्या प्याद्यांना अप्रत्यक्ष आव्हान देताना सुद्धा दोनदा विचार करत जा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १० ऑगस्ट २०१६, २०.०७ )

ऑलिम्पिकची ऐशी कि तैशी !


भाऊ, आपला जन्म गेला पंढरपूरात. शालेय शिक्षणाच्या तासाला पटांगणात खडे, कागदाचे तुकडे, बोराच्या बिया (आटोळ्या म्हणतात आमच्याकडे त्याला) इत्यादी जिन्नस उचलणे आणि मैदान साफ करणे हे आमच्या शाळेचं क्रीडाविषयक धोरण. त्याच्यात कुणी पळाला नाही, खेळला नाही की लै मोठा खेळाडू व्हायची स्वप्ने कुणाला पडली नाहीत. पळण्याचा आणि आमचा संबंध फक्त शाळेतून खिडकीतून दप्तर टाकून पळून जाणे एवढाच होता. कधी काळी एकदा खोखो खेळलो मुली विरुद्ध मुले असा आणि त्यात पळणाऱ्या विद्यार्थिनीचा स्कर्ट पकडला गेला, तेव्हापासून तो खेळ पण बंद!

शाळेबाहेरचे खेळ बघावे तर आट्यापाट्या जिथे उनाड पोरांचा भरणा म्हणून आईबाप नको म्हणायचे. गोट्या थोडा काळ खेळलो पण त्यात आपले शेजारच्या खेडेगावचे भिडूलोक आमचा कचरा करत म्हणजे आम्ही फक्त हारायला. विटीदांडू बरा जमायचा, उन्हातान्हात राज्य घेणारा आणि देणारा दोघे उपाशीपोटी बोंबलत फिरायचे. त्यात पण घराच्या काचा फोडल्यावर तो खेळ बंद झाला. भोवरे वगैरे खेळ जास्त हिट नव्हते. सुरपारंबी खेळायला जाऊन हात पाय मोडून घ्यायची रिस्क आपण कधी घेतली नाही. विहिरीत पोहायला शिकलो, खूपशी मारायला (dive करायला तुमच्या भाषेत) गेलो तर खाली तळाला जाऊन कपाळमोक्ष...तिथल्या तिथे ओल्या अंगाने आधी बापाचा मार खाल्ला आणि मग जखमेत चुना भरून औषधोपचार.

आमच्या नदीला पाणी हे फक्त वारीत सोडत आणि त्यात 5 रुपये दिले की चक्कर मारून मिळायची त्यामुळे ते रोईंग, रॅफ्टिंग वगैरे धाडसी खेळ आम्ही केले नाहीत. नदीच्या घाण पाण्यात पोहायला जाण्यापेक्षा तेच पाणी शुद्ध होऊन नळाने घरी आल्यावर आम्ही त्यात तांब्या बादलीने अंघोळ करायचो. धनुष्य करायचो लिंबाचा आणि त्याला ज्वारीच्या ताटाची काडी जिला पुढे शेळीच्या लेंडीने बाभळीचा काटा जोडलेला असायचा, आणि त्या बाणाने सरडे मारायचा कार्यक्रम चालायचा. पुढे आमचे हे धाडसी खेळ पाहून आमचे कोदंड आईबापांनी जप्त केले आणि मग आम्ही स्वतः वनवासात जाऊन गजगे आणायचो आणि ते घासून एकमेकांना चटके द्यायचो आणि व्यवस्थेवर सूड उगवायचो.

ज्युनिअर कॉलेजला गेलो, ते पण science ला. त्यामुळे आम्ही खेळात वेळ वाया घालवू नये ही तो श्रींची ईच्छा!! त्यातून पण 12 वीच्या मार्कांसाठी एकदा खेळायला नेण्यात आले. शर्यत लावण्यात आली, त्यात 100 किलो वजनाच्या मित्राला साथ द्यायला हळूहळू पळालो. गोळाफेक करताना त्या कंसकृती रेषेकडे गोळा न टाकता मास्तरांच्या पायावर नेम गेला चुकून. तेवढ्यानेच दिग्मूढ होऊन मास्तरांनी तुला बाकीचे मार्क देऊन टाकतो, घरी गेलास तरी चालेल असे सांगून रवानगी केली. पुढे मेडिकल कॉलेजला गेल्यावर मुलींच्या अंडरआर्म क्रिकेट सामन्यात पंच ही भरीव कामगिरी केली आणि खेळाला रामराम केला.

तर भाऊ हा आहे आपला क्रीडाविषयक इतिहास. असल्या फाटक्या माणसाने काय म्हणून ऑलिम्पिक साठी नाचावे? Yonex चं बॅडमिंटन racket आणि shuttle जिथे आपल्याला परवडली नाहीत, तिथे कशाला ते सायना, सानिया, राफा आणि जोको करून नाचावे? हॉकीची स्टिक ही मारामारी करायला असते हा ठाम ग्रह होता कित्येक वर्षे! Volleyball ला फुटबॉल म्हणून खेळायचो, कारण स्वस्तात मिळायचा. आणि क्रिकेट tennis ball वर कारण ते लेदर बॉल (आम्ही त्याला दगडी बॉल म्हणत असू) ना खिशाला परवडायचे, ना दुखापतीला. असल्या लोकांनी कुठे ते बिंद्रा सारखी 10-15 लाखाची बंदूक पाळावी? इथे वारीत 10 रुपये देऊन छऱ्याच्या बंदुकीने फुगे फोडायला नेम लागेना लवकर!

आपल्याला ते 3-4 लाख रुपयांचे धनुष्य झेपत नाहीत. 10-15 लाखांच्या बंदुका पण आणि लाखो रूपयांची टेनिस, बॅडमिंटन ची रॅकेट. ऑलिम्पिक चा खेळ आपन खेळलो ते व्हिडीओ गेम मध्ये... 1997 च्या आसपास, घरबसल्या. बाकी 10 मीटर मध्ये मेडल जिंकलं म्हणून 200 कोटींचे हॉटेल भेट मिळायला आपल्या घरात बिंद्रा सारखी श्रीमंती उतू चालली नाही, कि ना आपला बाबा कलमाडी आणि आई अंबानी आहे की काही कामधंदा नसला तरी उगीच त्या ऑलिम्पिक पथकात झेंडा वगैरे घेऊन पुढे पाठवेल. आणि एवढे सगळे करून मिळवायचे काय तर सोन्याचे, चांदीचे पदक?? पुण्यातल्या एखाद्या गुंठामंत्र्याला झटकला तरी त्याच्या अंगावर सगळ्या ऑलिम्पिक पेक्षा जास्त सोने निघेल कधीपण !!

तेव्हा भाऊ, तू आणि तुझ ऑलिम्पिक ... गेले उडत!!
 
डॉ. विनय काटे

(नम्र सूचना - फक्त विनोद म्हणून घ्या )

-  फेसबुक पोस्ट ( ०८ ऑगस्ट २०१६, २०.१२ )

शुद्ध रक्ताचा हिंदू !!


साधारण 25 वर्षांपूर्वी, बाबरी मशीद दंगलींच्या काळात एका महाराष्ट्रीय हिंदुत्ववादी पक्षाने मेळावा घेतला होता, ज्याच्या वर्तमानातल्या जाहिराती साधारण असे बोलत होत्या ... "ज्यांचे रक्त शुद्ध आहे अशा हिंदूंनी विराट संख्येने उपस्थित रहावे!"

पंढरपूर कॉलेजला तेव्हा प्रा.पानवळ नावाचे स्पष्टवक्ते, इतिहासाचे विद्वान प्राचार्य होते. त्यांनी त्या जाहिरातीवर मार्मिक टिपण्णी केली होती ती साधारण अशी...

"या देशात ग्रीक आले, रोमन आले, शक आले, हुन आले, अरब आले, तुर्क आले, तुघलक आले, खिलजी आले, मुघल आले, अफगाण आले, पठाण आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले .... आपआपली तलफ भागवून गेले आणि तरीसुद्धा आम्ही शुद्ध रक्ताचे !!!"

-  फेसबुक पोस्ट ( ०८ ऑगस्ट २०१६, १७.०६ )

सना शेख - सिंदूर

सना शेख नावाच्या अभिनेत्रीने सिंदूर लावला म्हणून मुस्लिम धर्मीय नाराज ....
लय भारी!

सना खान नावाची मॉडेल जेव्हा चड्डी धुवून "ये तो बडा टोइंग है" म्हणत चेहऱ्यावर कामुक भाव देत होत्या, निगार खान टॉपलेस मॉडेलिंग करत होत्या आणि 'चढती जवानी remix' गाण्यामध्ये उत्तान दृश्ये देत होत्या तेव्हा ते इस्लामी होते का?

कंदील बलोच ला जीव मारले कारण तिने तुमच्या पुरुषी वर्चस्वाला आव्हान दिले. पूनम पांडे किंवा सनी लिओन ला तुम्ही मारू शकत नाहीये, पण तीच अभद्र भाषा वापरता जी पाकिस्तानी कट्टरपंथी वापरतात.

सिंदूर लावला कि मुस्लिम बाई नाजायज झाली? हिंदू विवाहित बाईने सिंदूर नाही लावलं, मंगळसूत्र नाही घातले कि ती हिंदूंच्या लेखी नालायक झाली. बुरखा किंवा गोशा घातला, पदर घेतला आणि दुसऱ्या पुरुषाला नख सुद्धा दिसू दिलं नाही की मग बाई पाक, पवित्र.... हो ना??

स्त्रीला स्वातंत्र्य दिले की ती मुक्त होईल, मग पुरुषी वर्चस्व राहणार नाही. कदाचित ती लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवेल किंवा लग्नानंतर तिला दुसरं कोण आवडलं तर?? मग करा बायकोचे फोन check, बघा तिचे Whatsapp, फेसबुक वरचे मेसेज. आणि ही नीच वृत्ती समस्त धर्मात आणि अगदी परदेशी राहून आलेल्या किंवा राहणाऱ्या उच्चशिक्षित भारतीयांत सुद्धा आहे.

Love in the Time of Cholera या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे -
"पण जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषासोबत झोपायचे ठरवते, अशी कुठली भिंत नाही जी ती ओलांडणार नाही, कुठला बालेकिल्ला नाही जो ती उध्वस्त करणार नाही, कुठलेही नितीमूल्य नाही ज्याला ती मुळापासून दुर्लक्षून टाकणार नाही: असा कुठलाही देव नाही ज्याची भीती बाळगावी."

तेव्हा, बस करा आता ते virginity चे स्तोम, कुलीनतेच्या भंपक कल्पना, त्या लक्ष्मणरेषा, शरीयती कायदे, मनुस्मृतीचे श्लोक, जातपंचायती, खानदानी पणाच्या व्याख्या.... जे सारे फक्त स्त्रीची अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, लैंगिकता यांना दडपून तिला पुरुषांसाठी भोगवस्तू म्हणून ठेवणे एवढा एकमेव नीच उद्देश ठेवून अस्तित्वात आहेत. स्त्रिया या सर्व व्यवस्था सुद्धा लवकरच मोडून काढतील.

-  फेसबुक पोस्ट ( ०७ ऑगस्ट २०१६, २३.५३ )

हिंदू देवांना नैवेद्य दाखवलेले भोजन खाणार नाही

अरे वेड्यांनो, तुम्ही इस्लामी कि नाही? हो, मग तुमच्या इतकं कुणाला चांगलं माहित कि अल्लाह सोडून दुसरा ईश्वरच अस्तित्वात नाही? खरंय ना! कि ईस्लाम वरचा विश्वास इतका डळमळीत आहे की हे अन्न खाल्ल्याने अल्लाह कोपावा, कयामतच्या दिवशी तुम्हाला वांग्या सारखं तेलात तळाव त्याने ??

आणि हो, हे हिंदू देव वगैरे अस्तित्वात नसतात रे अजिबात, अगदी तुमच्या अल्लाह सारखेच! आणि ते काहीही खात नाहीत कितीही दाखवलं तरी, दगड आहेत हो ते! कल्पना करू हे देव अस्तित्वात आहेत, तरी हे देव लै कमजोर आणि दरिद्री आहेत. 100 कोटी हिंदूंच्या साठी 33 कोटी देव आहेत, थोडक्यात 3 हिंदूंसाठी 1 देव, तरीही या देवांना इथली गरिबी, अस्वच्छता, उपासमार, रोगराई, दुष्काळ आवरेना. कशाला असल्या देवांना घाबरता तुम्ही?

बरं त्यातून तुमचे आणि हिंदूंचे सगळेच देव खरे आहेत असे थोडावेळ मानुयात .... मग तुम्ही आणि हिंदू का भांडताय? होऊन जाऊ द्या कि एक जंगी मुकाबला वर स्वर्गात आज, अल्लाह विरुद्ध 33 कोटीचा. आपण खाली उभा राहून बघू पॉपकॉर्न खात बघूया आकाशातले दैवी युद्ध !! जो धर्म जिंकेल त्याला मी पण स्विकारतो नंतर. काय म्हणता ???

ऍनाकोंडा

* सिद्धू आजारी - कर tweet
* सोनिया आजारी - कर tweet
* क्रिकेट मॅच - कर tweet
* परदेश दौरा - कर tweet
* ओबामा बर्थडे - कर tweet
* उद्धव बर्थडे - कर tweet
* मंकी बात - कर tweet
.
.
.
* पटेल आरक्षण हिंसाचार -
* जाट आरक्षण हिंसाचार -
* 2 वर्षे 200 रु किलो डाळ -
* पेट्रोलची अप्रत्यश्य भाववाढ -
* दलितांवरचे अत्याचार -
* गौराक्षसांचा कहर -
* पठाणकोट हल्ला -
* चीनची घुसखोरी -
* काश्मीरमध्ये गोळीबार -


परदेशात भाषण ठोकताना आणि event च्या वेळी ऍनाकोंडा एवढे तोंड उघडायचे .... कामाची वेळ किंवा कठीण प्रसंग आला की पैशासारखे (एक पावसाळी किडा) वेटोळे मारून तोंड लपवायचे !!

 -  फेसबुक पोस्ट ( ०५ ऑगस्ट २०१६, १७.३० )

ओसामा बिन लादेन

ओसामा बिन लादेन, तुझ्यासारखा गाढव मनुष्य मी पाहिला नाही !

ते धमकीचे व्हिडिओ पाठवण्यापेक्षा आमच्या गोळवलकर गुरुजींसारखा "Bunch of thoughts" सारखा ग्रंथ लिहायचा होतास ना!

म्हणजे 'अल कायदा' ला अधिकृतरित्या ते पुस्तक नाकारून "आम्ही मुस्लिम एकता आणि हितासाठी काम करणारी शांतिप्रिय अराजकीय संघटना आहे" म्हणत, एखादा "जी हुजूर" म्हणणारा गाढव अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष पदी बसवायची सोय झाली असती कि नाही??

- चाणक्य चा 'खापर'फोडया वंशज

-  फेसबुक पोस्ट ( ०५ ऑगस्ट २०१६, १२.५९ )

जातीयवादी किरण बेदी

जातीयतेचा कळस आहे हा ... आणि तो पण राज्यपाल असणाऱ्या पूर्वाश्रमीच्या पोलीस अधिकारी महिलेकडून!
1871 पासून 1952 पर्यंत आम्ही या जमातींना उघडउघड गुन्हेगारीचे लेबल लावून ठेवलं. 1952 ते 2008 पर्यंत denotified tribes (DNT) म्हणून तीच वागणूक दिली. UN ने 2007 साली 1952 चा DNT कायदा बदलायला सांगितलं तेव्हा 2008 पासून आम्ही त्यांच DNT चं लेबल काढून टाकल.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आजही इथला बहुतांश पारधी समाज कुठलीही जमीन, जगण्याचे साधन नसताना जीवन कंठतोय. त्यांच्याकडे ना रहिवासी दाखले आहेत, ना रेशन कार्ड, ना जात प्रमाणपत्र ज्याद्वारे शिक्षण/नोकरीत संधी मिळावी. गावाच्या बाहेर पालं टाकून राहणारे गरीब पारधी हे पोलिसांच्या कार्यक्षमतेचा कणा आहेत. खरा गुन्हेगार सापडत नाहीये ना, मग आण 2-4 पारधी धरून, लावा पाहिजे ते IPC आणि ठेवा कुजत तुरुंगात. खायला अन्न नाही तो कुठून आणणार कायदेशीर मदत?

3-4 वर्षांच्या पारधी मुलांवर सुद्धा दरोडे, खून असल्या केसेस दाखल केल्यात पोलिसांनी. अकलूज शेजारी एक पारधी वस्ती आहे, त्यांना राहण्यासाठी ती जागा मिळवून देण्यासाठी माझ्या आजोबांनी 35-40 वर्षांपूर्वी प्रशासनाशी खूप पाठपुरावा केला. त्यांची वस्ती उभारल्यावर ती वस्ती सुद्धा गावगुंडांनी पेटवून दिली पारध्यांनी चोरी केला म्हणून खोटा आळ घेत.

2005-06 च्या सुमारास सांगलीजवळ कुठेतरी असाच दरोडा पडला. लगेच तिथल्या गावकऱ्यांनी, पोलिसांनी पारधी समाजावर खापर फोडत त्यांची वस्ती उठवली. शेकडो पारधी अंगावरच्या कपड्यानिशी सांगली ते मिरज चालत, मिरज मेडिकल च्या हॉस्पिटलच्या आवारात येऊन राहिले. 1-2 दिवसांत त्यांना तिथून पण बाहेर काढण्यात आले. त्यांची लहान लेकरे, तुटपुंजा संसार पाहून पोटात गोळा आला होता त्यावेळी.

जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो. इथला समाज, इथल्या अमानवी व्यवस्था चांगल्या माणसाला सुद्धा गुन्हेगार बनवायची ताकत राखून आहेत. आणि या व्यवस्थेचे धुरीण जेव्हा अशी नीच वक्तव्ये करतात आणि त्यावर सर्वपक्षीय मूग गिळून बसतात तेव्हा कळते की या देशात आदिवासींना, दलितांना, विमुक्त जातींना कुठलाही राजकीय पक्ष मतांच्या समीकरणा पलीकडे पाहतच नाही.

इथल्या नीच सामाजिक, राजकीय व्यवस्थेचा धिक्कार !!!

-  फेसबुक पोस्ट ( ०४ ऑगस्ट २०१६, १०.१५ )

अस्पृश्य जोशी - शुक्लाच्या गोष्टीची दुसरी बाजू


(माझे गुरु आणि मोठे भाऊ जोशी सरांनी सांगितलेली UP मधली एक आठवण)

भर उन्हाळ्याचे दिवस होते. सर, आई आणि बाबा हे तिघे मथुरेत पर्यटनासाठी गेले होते. भर ऊन्हात चालून चालून सर्वांना तहान लागली होती. आजूबाजूला फक्त घरे होती, पाण्याची इतर कुठलीही सोय दिसेना. तेव्हा एका घरात जाऊन सरांनी पाणी मागितले.

घरातल्या रहिवाशांनी पाहिल्या प्रथम जात विचारली, कारण अस्पृश्यांना पाणी द्यायचे नव्हते त्यांना. यांनी सांगितले की ब्राम्हण आहोत. त्यावर लगेच त्या घरमालकाने सांगितले की ब्राम्हण असाल तर जानवे दाखवा. सर आणि बाबा दोघेही रूढींना फाटा देणारे त्यामुळे दोघांच्याही अंगावर जानवे नव्हते.

आता आली पंचाईत? पण तरीही त्या घरमालकाने यांचा वेष, बोली पाहून थोडे औदार्य दाखवले. आणि संडास/बाथरूम मध्ये वापरल्या गेलेल्या एका घाणेरड्या मग मध्ये पाणी आणून वरून ओंजळीत ओतले. दुसरा कुठलाही पर्याय आजूबाजूला दिसत नसल्याने त्या तिघांनी अपरिहार्यता म्हणून ते पाणी पिले.

हा किस्सा सांगताना सुद्धा सर पोटतिडकीच्या संतापाने सांगत होते. आणि आधीच रूढी परंपराना फाटा देणारे सर यानंतर आणखीनच त्यांच्या विरोधात गेले.

सर मला एक गोष्ट नेहमी सांगतात "कुणाच्या घरात जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नसते. म्हणून जन्माला आधार मानून कुणालाही विनाकारण जवळ करू नये किंवा तिरस्कार करू नये." यापेक्षा सोपी व्याख्या काय असू शकते मानवतेची!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ०३ ऑगस्ट २०१६, २०.११ )

खंडेराव थोडी सवय लावून घे आता


खंडेराव, मला माहितेय तुझ्या बालपणापासून आजवर तुला जे काही संस्कार दिले गेले ते तुला सहज टाकता येणार नाहीत. वर्ण आणि पुरुषी वर्चस्वाचा पगडा एवढा सहजासहजी उतरणार नाही.

पण, खंडेराव जग प्रचंड वेगाने बदलतंय. गावच्या पडक्या लायब्ररी मधून २-४ ऐतिहासिक पुस्तके वाचून ज्ञानी असल्याच्या थाटात फिरायचे दिवस आता संपतयात, कारण त्या पुस्तकांनाच मोडीत काढणारा खरा इतिहास हळूहळू बाहेर येतोय. ज्यांच्यावर भाषणे ठोकीत शाळा गाजवल्यास, ज्यांच्या बद्दल जाज्वल्य अभिमान बाळगत तारुण्यात तुझे रक्त पेटून उठले, ते महापुरुष आज त्यांच्याच शब्दांच्या आणि लपवलेल्या कृतीच्या उघड होण्याने अतिसामान्य आणि कालबाह्य सिद्ध होत आहेत. किती वेळ त्यांचा बचाव करू शकशील तू तरी?

माहिती तंत्रज्ञानाने आज हे सगळे ज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा घरबसल्या मिळतंय. कसं थांबवणार याला तू खंडेराव? ज्यांना शिक्षण नाकारून तू स्वतःच श्रेष्ठत्व ठेवले होतेस, त्यांना शिक्षण मिळाल्यावर पण तू त्यांच्या पाठयपुस्तकात स्वतःची महती गायलीस, पण आता ते ती महती गायला नकार देत आहेत. कारण, त्यांचे डोळे उघडतायत आणि मेंदू सुद्धा. किती पुस्तकांवर आणि किती माध्यमांवर बंदी आणशील तू तरी?
पैसा आज एका सेकंदात एका हातातून दुसऱ्या हातात वाहतोय. गावातला व्यवसाय/शेती जगाच्या बाजारपेठेत विक्रय करतोय आता, आणि तुझ्या मध्यस्थीची गरज आता जवळपास संपणार आहे. धर्माच हाडूक दाखवून तू ४ पिसाळलेल्या कुत्र्यांना भुंकायला, चावायला लावशीलही, पण हळूहळू ती कुत्री सुद्धा तुझ्यावरच उलटतील जेव्हा त्यांना तुझी मखलाशी कळेल. याचा अनुभव तुला आधी पण आलाय, पण तू काही शिकत नाहीस गड्या.

खंडेराव, माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात, उद्योगात तुला first mover advantage मिळाला कारण व्यवस्था तुझ्या बाजूला झुकली होती तेव्हा. सोशल मीडिया वर आधी वर्चस्व गाजवत, लोकांना भुलवून तू सरकारं सुद्धा निवडून आणलीस. पण, आता ती सरकारे नतद्रष्ट सिद्ध होतायत. भुकेली, आत्मसन्मान दुखावलेली लोक फार काळ शांत राहत नाहीत. तेव्हा, आता तरी शहाणा हो आणि जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणायला शिक. तुझा first mover advantage संपलाय आता खंडेराव. लोक सरकारला "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" असे म्हणतात आजकाल.

खंडेराव, मला माहित आहे तू खूप त्रासात आहेस. तुझं आभाळ फाटायला लागलंय. त्याला ठिगळ लावून, रोज किल्ला लढवत बसून काय होणार आहे? तुझ्या कधीकळीच्या पवित्र पुस्तकांच्या पानावर लोक आता भेळ खातात आणि सक्ती केली तरी तुझी विद्वान भाषा शिकायला ते तयार नाहीत. म्हणून सांगतोय खंडेराव, लवकर शहाणा हो. काळाची पावले ओळखून घे, आणि बदलाची सवय लावून घे. तू धोरणी आहेस हे मला माहित आहे म्हणूनच तुझ्या विषयीच्या प्रेमाने सांगतोय. बाकी तुझी ईच्छा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ०३ ऑगस्ट २०१६, ०७.१२ )

हिंसा, दहशतवाद आणि दांभिक समर्थक/निषेधकर्ते:


१. हिंसा ही गुणात्मक असते, संख्यात्मक नाही.
एका निष्पाप माणसाचा खून असो की शंभर निष्पापांचा, त्याने क्रौर्य कमी होत नाही.

२. हिंसा ही शस्त्रांपेक्षाही मानसिक विकृती जास्त असते.
शस्त्र कुठले वापरायचे हे औकातीचा आणि त्यावेळच्या उपलब्धतेचा भाग असतो. हिंसा अगदी शब्दांनी सुद्धा होत असते.

३. संघटित हिंसा हा दहशतवाद असतो.
संघटन २-४ लोकांचे असो किंवा २-४ हजार लोकांचे, त्यामागे एक विकृत विचार असतो. संघटनेतील संख्याबळ हे काळाच्या ओघात आणि समाजाच्या डोळेझाक/उदोउदो करण्याने कैक पटीत वाढत जाते.

४. हिंसा सर्व कारणांसाठी निषेधास पात्र आहे.
धर्मासाठी असो, राजकीय पक्षासाठी असो की देशाच्या साम्राज्यवादी विस्तारासाठी.

कुणी आपल्या जीवावर उठले तर तेवढ्यापुरते फक्त आत्मसंरक्षणासाठी केलेला बचाव हिंसा होत नाही. पण त्याचे मानक न्यायालय ठरवते.

बाकी सर्वच हिंसाना आपले-तुपले बघून सोयीस्कर मौन बाळगणारे किंवा कडक शब्दांत निषेध आळीपाळीने करणारे लोक दांभिक, खोटारडे आणि मुळात हिंसेचे समर्थक असतात.

हे तेच लोक असतात ज्यांना 1984 अतिरेकी हिंसा वाटते आणि 2002 प्रतिक्षिप्त क्रिया किंवा vice versa.
हे तेच लोक असतात जे ISIS चा निषेध करतात आणि बजरंग दलाचे छुपे समर्थन किंवा vice versa.
हे तेच लोक असतात जे एका राजकीय संघटनेने केलेल्या "एका विशिष्ट जातीच्या बायकांचे बलात्कार करा" या आवाहनाचा निषेध करतात आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृतीचे छुपे समर्थन किंवा vice versa.

अशा समस्त दांभिकाना एकच सल्ला, काळ परिवर्तनीय असतो. आज तुमच्या धर्माकडे, पक्षाकडे, संघटनेकडे झुकते पारडे आहे म्हणून जर तुम्ही सोयीस्कर मौन पाळत असाल किंवा छुपे समर्थन करत असाल तर उद्या हे पारडे दुसऱ्या बाजूला झुकणार आहे हे ध्यानात राहू द्या. आणि तुमच्यासारखे दांभिक त्या बाजूला पण असतील जे त्यावेळेस दुसऱ्या बाजूने केलेल्या हिंसेचे तेव्हा असंच मूक समर्थन करतील. तेव्हा आजच शहाणे व्हा आणि ही मुकसमर्थनाची विकृत परंपरा मोडून काढा. तुमच्यात आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होताना गप्प राहणाऱ्या भीष्म-द्रोणात काहीही गुणात्मक फरक नाहीये. त्यांचा शेवट काय झाला तुम्हाला चांगला माहित आहे.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( ०२ ऑगस्ट २०१६, १७.१४ )

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प हा मनुष्य धर्मातिरेकी गाढव आहे याबद्दल मला कसलाही संदेह नाही. पण, त्याच्या उमेदवारीला विरोध करताना त्याच्या पत्नीची, मेलनिया ची मॉडेलिंगच्या काळातली नग्न छायाचित्रे अमेरिकन मीडियाने छापून "अशी फर्स्ट लेडी तुम्हाला चालेल का?" असले मथळे लिहिले.

डोनाल्ड ट्रम्प ची बायको हि पॉर्नस्टार जरी असती तरी त्याचा ट्रम्पच्या उमेदवारीशी काय संबंध? कुणीही नेता व्हायचे असेल तर त्याची बायको सतीसावित्री, त्याचे सर्वकाळ ऐकणारी का पाहिजे? बाईला दाबून ठेवता आले म्हणजेच पुरुष नेतृत्वगुणांनी युक्त होतो का?

"कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे.... आधी घरच्या बायका सांभाळा म्हणावं" ही फालतू पुरुषी मानसिकता अमेरिकेत सुद्धा यावी याचं विशेष वाटले.

मला नरेंद्र मोदी आवडत नाहीत, पण म्हणून मी त्यांच्या पत्नीवर, आईवर किंवा सार्वजनिक जीवनात नसलेल्या इतर कुठल्याही कुटुंबियांच्या वैयक्तिक गोष्टींवर एक शब्दाने खालच्या दर्जाची टीका करणार नाही. आणि मोदींनी सुद्धा "50 करोड कि गर्लफ्रेंड" किंवा उजव्या नेत्यांनी नेहमी केलेले सोनिया गांधींचे शाब्दिक चारित्र्यहनन मला मान्य नाही. दिग्गी राजाचे "100% टंच माल" असो की स्मृती इराणींवर डाव्यांनी केलेली अश्लाघ्य टीका ... सगळेच अमान्य !!!

स्त्रीला तिचे स्वतंत्र आयुष्य, ईच्छा, निर्णयक्षमता, निवडी आणि तिच्यासोबतच्या पुरुषांशी न जोडले गेलेले स्वतंत्र अस्तित्व आहे. मग ती स्त्री तुमची किंवा कुणाचीही आई असो, बायको असो, मुलगी असो, GF असो, लिव्ह इन पार्टनर असो की सख्खी बहीण असो !

-  फेसबुक पोस्ट ( ०१ ऑगस्ट २०१६, १६.१४ )

जातीव्यवस्था

ज्या दिवशी धेड/महार/मांग समाज मेलेली गुरे ओढायचे, ढोर समाज कातडी कमवायचे, चांभार समाज जोडे शिवायचे आणि जमादार/भंगी समाज गटारी साफ करायचे समाजदत्त काम नाकारेल त्यादिवशी या देशातल्या जातीव्यवस्थेला पायापासून सुरुंग लागायला सुरुवात होईल.

-  फेसबुक पोस्ट ( ०१ ऑगस्ट २०१६, ०८.३५ )

अस्पृश्यता - शुक्लाची गोष्ट


सन 2009, स्थळ - बांदा (UP)

मी WHO चा अधिकारी म्हणून बांदा जिल्ह्याचा लसीकरण कार्यक्रम आणि प्लस-पोलिओ मोहीम सांभाळत होतो. दर महिन्यात 1 दिवस बूथ आणि 6 दिवस घरोघर जाऊन 5 वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओची लस पाजणे ही मोहीम. अधिकारी म्हणून सबंध जिल्ह्यात फिरून घरोघर जाऊन सर्वेक्षण करणे, मुलांना खरंच लस दिलीय का याची खात्री करणे ही जबाबदारी होती. आणि जर लस न देता खोटी नोंद केली तर संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार कलेक्टर कडे रोजच्या मीटिंग मध्ये करणे हे ओघाने आलेच. 

अशाच एका मीटिंग मध्ये माझा सहकारी प्रदीप शुक्ला याने एक तक्रार कलेक्टर पुढे मांडली. एका गावात दोन अंगणवाडी सेविकानी जमादार (सफाई कामगार) समाजाच्या घरातील मुलांना लस देताना विटाळ होईल म्हणून लस न देता, लस दिलीय अशी खोटी नोंद त्या घरावर आणि कागदोपत्री केली होती. कलेक्टरनी तात्काळ खात्री केली आणि शुक्ला ने केलेली तक्रार प्राथमिकत: खरी निघाली. तात्काळ निलंबनाचे आदेश दिले गेले त्या दोन महिला कर्मचाऱ्यांच्या आणि नंतर सेवामुक्तीचे.

ही अशी भीषण अस्पृश्यता फक्त उत्तर प्रदेशातच नाही, तर महाराष्ट्रात सुद्धा आहे. अंगणवाडीत, शाळेत दलित/मुस्लिम मुलांना वेगळी पंगत, बचत गटात अन्न शिजवायला दलित महिला, विधवा/परित्यक्ता नको, देवळात अस्पृश्यांना प्रवेश नाकारणे हे सगळे प्रकार इथेही होतात. गोष्ट एवढीच आहे की ना दलित याला विरोध करतात, ना सवर्ण याला बदलायची जबाबदारी घेतात.

स्वतः ब्राम्हण असूनही २ सवर्ण स्रियांनी अस्पृश्यता पाळली म्हणून निर्भीडपणे तक्रार करून त्यांची नोकरी घालावणारा, उत्तर प्रदेश सारख्या जातीभेदाने बरबटलेल्या राज्यात ७००० रुपयांची कंत्राटी नोकरी धोक्यात घालून, सत्याचा आणि मानवतेचा आवाज बुलंद करणारा शुक्ला मला खूप भावून गेला. इथेही असे अनेक शुक्ला आहेत ज्यांना अंतरीची प्रामाणिकता वागण्यातून, विरोधातून प्रकट करावी लागेल जर या राज्याला खरंच एक प्रगतशील राज्य बनवायचं असेल तर. नाहीतर आमची गत उत्तर प्रदेश सारखी व्हायला उशीर लागणार नाही.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २८ जुलै २०१६, १२.१४ )

बीफ

प्रसन्न जोशी नी परदेशात बीफ खाल्लं म्हणून त्याचा उद्धार करताय ना....
मग ही पहा माझी प्लेट ... यात बैल पण आहे आणि डुक्कर पण ... आणि स्थळ 'द ललित - बेंगळुरू' यावर्षी जानेवारीत.
तसं 2 वर्षांपूर्वी विठ्ठल कामतांच्या 'द ऑर्किड (सांताक्रूज विमानतळ, मुंबई) ' मध्ये पण हेच तथाकथित दोन पूज्य/निषिद्ध जीव खाल्लेत.
गेल्यावर्षी अमेरिकेत Chipotle मध्ये दोन वेळा आणि हैदराबाद मध्ये 'केरला beef fry' तर कित्येकदा खाल्लेय. तामिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक मध्ये सगळ्या धर्माचे/जातीचे लोक हि दोन्ही जनावरे आवडीने खातात.
मला अल्लाहची भीती नाही की अजून 33 कोटी देवांची !!
मी असा आहे... पटलं तर राहा नाहीतर सोडून द्या !!


-  फेसबुक पोस्ट ( २८ जुलै २०१६, ००.०२ )

राजाबाबूंना -


* व्यंगचित्रकार व्हायचंय
* नगररचनाकार व्हायचंय
* विकासपुरुष व्हायचंय
* हिंदुहृदयसम्राट व्हायचंय
* मराठीहृदयसम्राट व्हायचंय
* पोरांना बॉम्बे स्कॉटिश ला पाठवायचंय
* मराठाहृदयसम्राट व्हायचंय
* दलित कैवारी व्हायचंय
* विधिज्ञ व्हायचंय
* इतिहासतज्ञ व्हायचंय
* बिल्डर व्हायचंय
* उद्योगसेनेचा सेनापती व्हायचंय
* मराठी चित्रपतसेनेचा सेनापती व्हायचंय
* माईकल जॅक्सनला नाचवायचंय
* वक्ता व्हायचंय
* मिमिक्री आर्टिस्ट व्हायचंय
* पोस्टर रंगवायचंय
* पोस्टर फाडायचंय
* थेटरात सिनेमा लावायचाय
* मल्टिप्लेक्स बंद करायचंय
* रस्ते बांधायचेत
* रास्ता रोको करायचेत
* टोल बंद करायचंय
* इलेक्शन लढवायचंय
* पक्ष वाढवायचाय


"कोण बोलतोय रे ते एकच आमदार, एकच आमदार??"

"तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका राजाबाबू ... नवा फोटू काढायचाय ना आपल्याला? मग इकडे तोंड करा..."

इ...स्माईल :)


by-
डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २७ जुलै २०१६, १२.३२ )

मुक्त

6 वर्षांपूर्वी रेल्वेत प्रवास करताना एक पंचाहत्तरीतला म्हातारा भेटला होता.

गप्पांच्या ओघात बोलला,"आयुष्यात मुक्त होऊन सुखाने जगायचे असेल तर ४ लोकांच्या चौकटीत अडकू नकोस ... आई, बाप, शिक्षक, धर्मोपदेशक (mother, father, teacher and preacher)"

मी अजून दोन गोष्टी जोडेन त्यात ... देश आणि राजकारण

मोकळा श्वास घेऊन, खुल्या मनाने विचार करून बघा यांच्या पलीकडे जाऊन... आयुष्य खूप सुंदर आहे!

-  फेसबुक पोस्ट ( २७ जुलै २०१६, १०.१७ )

काडीमोड

चावडीत बसून तात्या वाघ गरजले,"25 वर्ष ह्या कमळीच्या नादाने वाया घालवली आयुष्यातली! डोक्याचा भुगा केलाय बाईने!"

शेजारी बसलेला कारकून बोलला,"तुमचं चुकलंच सरपंच! मागे ६ महिने रुसून गेलत्या कमळाबाई तवाच काडीमोड घ्यायचा व्हता"

तात्या वाघ अजून जोरात गरजले,"लै शाना झालास का? घरात खायला आन नसल्यावर गावाने दिलेल्या मानाला काय चाटू का? सांगतोय मोठा काडीमोड द्यायला!"

डॉ.विनय काटे

 -  फेसबुक पोस्ट ( २६ जुलै २०१६, २०.३४ )

सुरक्षा

नीताबाईंना 'Y' दर्जाची सुरक्षा,
मुकेशभाईंना 'Z' दर्जाची सुरक्षा,
सामान्यांना 'YZ' दर्जाची सुरक्षा !

-  फेसबुक पोस्ट ( २६ जुलै २०१६, १९.०९ )
 

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती खूप महान आहे वगैरे गैरसमज असणाऱ्या लोकांसाठी काही ज्ञान -

१. आमच्याकडे स्वतःच्या मुली, आई-बहिणी यांच्याशी शरीरसंबंध ठेवणे हे समाजमान्य (आणि भूषणावह ) होते

२. मित्राला, घरी आलेल्या पाहुण्याला आपली पत्नी भोगण्यास देणे हा पाहुणचार होता

३. आम्ही उघडयावर संभोग करायचो

४. बाप आपल्या मुलीला पैशासाठी संभोगकामी भाड्याने देऊ शकायचे 


५. आम्ही पशूंशी (हरिणी वगैरे) संभोग करायचो


हे मी सांगत नाहीये तर इतिहासाचार्य राजवाडे सांगतायत .... आणि ते सुद्धा वैदिक धर्मातील वेदांचा, महाभारत आदी ग्रंथांचा हवाला देत.

लिंक देतोय ... पुस्तक डाऊनलोड करा आणि वाचा

'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' - लेखक इतिहासाचार्य वि.का. राजवाडे

-  फेसबुक पोस्ट ( २६ जुलै २०१६, ११.१५ )

खानचाचांचे न्यायमूर्तीस पत्र -


प्रिय न्यायमूर्ती,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा तुमच्या संगतीत लवकरच,
मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक सज्जनागणिक
असतात १० मवाली, गुंडही
स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य भ्रष्टाचार करणारे नेतेही.
असतात सत्याचे मूर्ख कैवारी, तसेच जपणारे मित्रही,

मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेल्या छदामापेक्षा,
आयत मिळालेल घबाड मौल्यवान आहे.
हारायचं कसं नाही ते त्याला शिकवा
आणि शिकवा पैशाचा उन्माद करायला,
तुमच्यातली मस्ती दाखवत .........

त्याला सत्य, माणुसकी पासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला मदोन्मत्त व्हायला
पोलिसांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
अंडरवर्ल्ड चं अदभूत वैभव.

मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सौंदर्यवतींचे देहसौंदर्य अनुभवायला ,
पाहू दे त्याला , SUV ची वेगवान सवारी ............
संधीसाठी हपापलेल्या मदनिका ..........
आणि पैशासाठी हपापलेले नट-नट्या आणि दिग्दर्शक ......

न्यायालयात त्याला हा धडा मिळू दे ,
कष्टाने मिळालेल्या यशापेक्षा ,
बापकमाईने आलेल ऐश्वर्य श्रेयस्कर आहे .
आपल्या दर्पोक्ती, आपले अविचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,

त्याला सांगा ................
भल्याशी टगेगिरीन वागावं,
आणि टग्यांच्या पुढ्यात लोटांगण घालावं .
माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीच,
नेतृत्व करण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,

पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच ...........
पण गाळून घ्यावं ते पैशाच्या, प्रसिद्धीच्या चाळणीतून ,
आणि फालतू आदर्श टाकून निव्वळ सवंग तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं लोकांना चिरडून मारून ,

आणि म्हणावं त्याला
कुप्रसिद्धीची लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
सामान्यजणांना तुच्छ मानायला ,
अन राजनेत्यांची चाटूगिरी करायला .

त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
प्रसंगी विक्रय करून, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.

आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे प्रसिद्धी आणि पैशाकडे नेते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
शिक्षा वगैरे देऊ नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,

त्याच्या अंगी बाणवा बेशरम व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर माजवायच असेल क्रौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला ..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच वाटेल शूद्रता मानवजातीबद्दल,

माफ करा न्यायमूर्ती,
मी फार बोललो आहे _
खूप काही मागतो आहे.........

पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा, भलताच गोड छोकरा आहे हो तो.

- सलीम
 
by  डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( २५ जुलै २०१६, १६.०३ )

Munnabhai MBBS

Few observations while watching Munnabhai MBBS again..

1. Founder of production house 'Sahara One' is in jail now
2. Sanjay Dutt went to jail afterwards and completed his sentence more like in a filmy jail
3. Pickpocket Nawazuddin Siddiqui is a leading actor after years of struggle
4. Simple and sober looking student Priya Bapat is now a hot actress in Marathi
5. Gracy Singh turned out to be a 'two film wonder' after Lagaan and this movie
6. Boman Irani, whose name appears later in credits is a leading comedian/actor

The world has changed so much except one thing...
the way MCI (mis)handles medical education  

-  फेसबुक पोस्ट ( १४ जुलै २०१६, १८.५४ )

लिखाण बंद !


मी कुठलाही देव, देश, धर्म मानवतेपेक्षा मोठा मानत नाही. मी कुठल्याही राजकीय विचाराच्या काविळीने, सामाजिक-आर्थिक जाणिवेने बाधित नाही. मी कुठलाही विचारवंत, विचारप्रवाह प्रमाण मानत नाही. त्यामुळे माझे सरळ, प्रामाणिक व्यक्त होणे रोज कुणाला ना कुणाला त्रासदायक, जाणिवेला/संकल्पनेला धक्का देणारे आहे. तुम्हाला पटले कि मी जबरदस्त, नाही पटले कि मी एकांगी हा खेळ, हे generalization/sterotyping अव्याहत सुरु आहे.

यात गेल्या 2-3 महिन्यात मी खूप सारी लेबल लावून घेतली स्वतःला. कुणी मला अतिरेकी म्हणलं, कुणी माझ्या आईला अश्लाघ्य शिव्या दिल्या, कुणी माझे बाप किती असे विचारले, कुणी मला तुम्ही माणसाचं मटण खाता का? असेही प्रश्न विचारले आणि बरेच काही. मला सगळ्यांनी जाहीर शिव्या घातल्या, निषेध केले... अस्तिकांनी, नास्तिकांनी, डॉक्टरांनी, पत्रकारांनी, संघीनी, आंबेडकरवाद्यांनी, कम्युनिस्टांनी, भाजपायींनी आणि काँग्रेसींनीही. मी दुर्लक्ष करत राहिलो, लिहित राहिलो.

4-5 परिच्छेद असणारा लेख मी 4 ओळीत पण सांगू शकतो पण त्यात interpretation चुकीची निघू शकतात म्हणून मी सविस्तर लिहायचो. पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे लोक पूर्ण लेख, एकेक शब्द किंवा त्यामागची सुस्पष्ट दिसणारी भावना दुर्लक्षून आपल्याला हवा तसा अर्थ घेऊन, नसलेली वाक्ये माझ्या तोंडी घालून, आपाआपले कंपू tag करून गोळा करून पाहिजे तशी चिखलफेक माझ्यावर आणि विरोधी मतांच्या लोकांवर करत आणि याला कुणीही अपवाद नाही. स्पर्धा परीक्षांत comprehension का विचारले जाते ते मला त्यातून कळले.

भारतात मुद्देसूद प्रश्न विचारत, अभिनिवेश बाजूला ठेवत वादविवाद करायची बुद्ध, महावीर यांच्या काळातली परंपरा आता संपलेली आहे हे कटू सत्य आहे. त्यांच्या काळात चर्चेला बसलेले वैदिक ब्राह्मण सुद्धा बुद्धाने किंवा महाविराने त्यांचे तर्क खोडून काढले तर बुद्धाचे, महाविराचे शिष्यत्व पत्करत. याउलट येशूला क्रुसावर मारले, इस्लाम मध्येही असेच प्रकार असा मागासलेपणा होता पश्चिमेत. आज 2000 वर्षांनी पश्चिम बुद्धिवादी झालीय आणि भारत इस्लामी कट्टरतेला अंगिकारायला लागलाय. इथे गांधी मारले, दाभोळकर/पानसरे/कलबुर्गी मारले, ऑनर किलिंग झाली, गायीसाठी हत्या झाल्या, धार्मिक दंगली तर पाचवीलाच पुजल्यात देशाच्या.

अशा या सगळ्या कोलाहलात, मी खूप साधा मनुष्यप्राणी आहे काही बोलायला कारण इथे सगळेच महान, परिपूर्ण आहेत. बरं त्यात पुन्हा मी एकटा कारण मी कुठल्याच कंपूत बसत नाही. तेव्हा माझ्यासाठी एक सोपा पर्याय आहे ....तुमचं श्रेष्ठत्व मान्य करायचा. मंगेश पाडगावकरांच्या 'सलाम' कवितेसारखा, तुम्हा आस्तिक, नास्तिक, संघी, काँग्रेसी, डावे, उजवे, धार्मिक, निधर्मी, भारतीय, परदेशी सगळ्यांना माझा सलाम! आणि हो, जगात काहीही होवो, फक्त तुमचाच (हो, तुम्ही कुणीही असा) देव, देश, धर्म, पंथ, जात, सिद्धांत, विचारप्रवाह परिपूर्ण आणि विश्वाला अनुसरणीय आहे. या जगाला तुमच्या अस्मितेच्या विचारप्रवाहाशिवाय दुसरा पर्यायच नाही, तेव्हा विचार चुकूनसुद्धा बदलू नका !!

मी आधीही सांगितले होते, मला फेसबुक वर एकही मित्र किंवा like नसला तरी फरक पडत नाही. कारण माझे घर त्याच्यावर चालत नाही. ना मला काही कुठे सेलेब्रिटी/नेता बनायचं आहे फेसबुक वरचे friends/followers दाखवून, तेवढं शिक्षण आणि अभ्यास पण नाहीय माझ्याकडेे, हो ना? मी तुम्हाला कधी माझ्या पेजला like करा, माझ्याकडून कुठले product विकत घ्या किंवा मला कुठल्या लोकप्रतिनिधित्वा साठी नामांकित करा असला कुठलाही लाडिक हट्ट आजवर केला नाहीये. तेव्हा मी गेल्याने तुमच्या विश्वात काडीचा कमीपणा येणार नाही, उलट आनंदच वाढणार आहे.

तेव्हा, खुश रहा! आनंदी रहा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १८ जुलै २०१६, ००.०६ )

काश्मीर

मी कश्मीर, ईशान्य भारतातील AFSPA चा दुरूपयोग करुन सैन्याने निष्पाप लोकांवरचे केलेले अत्याचार किंवा छत्तीसगड मधील आदिवासींचे हत्याकांड, बलात्कार यावर लिहिल आणि नेहमीचे खालील काही प्रातिनिधिक आक्षेप आले, आणि त्याच्यावर माझे उत्तर -

1. AC त बसून बोलायला काय जातय? तिथे जावून बोला.

- का बाबा? तुमच्या घरातले AC काढून, सोफे फेकून देवून कुठल्या काटेरी आसनावर आपला पार्श्वभाग ठेवून तुम्ही हे कमेंट लिहिता? तुमची आई का बाप कश्मीरी की तुम्ही एवढे अधिकारवाणीने माझा बोलायचा हक्क नाकरता?
तुम्ही ISIS विरुद्ध, France मधल्या हल्ल्यांवर लिहिता तेव्हा तुमचा आजा का पणजा ईराक मध्ये जन्मला होता की फ्रेंच राज्यक्रांति मधे लढला होता ?
चंद्रावर खड्डे आहेत हे काय चंद्रावर जावून येवून सांगताय का?

2. कश्मीर मध्ये पुर आला तेव्हा हे तितर खात होते.

- हो, खाल्ले तितर, गाय, डुक्कर आणि बोकड. स्वत:च्या पैशाने खाल्ले.
भारतात रोज कुठे न कुठे नैसर्गिक आपत्ति, अपघात होतात... तेव्हा तुम्ही काय 365 दिवस सूतक पाळून असता का? का वर्षभर उपाशीच असता ? रात्री बायकोसोबत झोपता की सीमेवरच्या सैनिकांना सोबत म्हणून जागे असता?
आणि काही काम धंदा वगैरे करता की वर्ष भर आपत्तिनिवारण करत भारतभर फिरता? दिसत तर नाही तुम्ही कुठे ते काम करताना!

3. निष्पाप नागरिक .. गुड़ जोक.

- कुठल्या गाढवाने तुम्हाला सांगितलं कि सगळे काश्मिरी अपराधी आहेत? लहान लहान बाळांवर चालवलेले छर्रे, त्यांचे गेलेले डोळे तुम्हाला दिसत नाहीत का?

4. छत्तीसगड मधले अत्याचार - सोनी सोरी, हिडमे इत्यादी

- यावर एकाही राष्ट्रप्रेमीची लिहायची हिम्मत झालीच नाही. सोनी सोरी च्या गुप्तांगात खडे भरले, तिचे तोंड ऍसिडने जाळले. हिडमेच्या गुप्तांगात सुरी खुपसून तिचे पोट फाडले. आणि अशा शेकडो आदिवासी स्त्रिया आहेत ज्यांची हि फरफट राष्ट्रवादी आंधळ्याना दिसणारच नाही.
तुमच्या पार्श्वभागात दम असेल तर करून दाखवा निषेध सोनी सोरी आणि हिडमेवर अत्याचार करणाऱ्या सशस्त्र बलांचा. ती तरी काश्मिरी नाहीये ना?

5. काश्मीर शांत असले तर सैन्य असेलच कशाला तिथे? त्यांनी शांत व्हावं आम्ही सैन्य माघारी बोलावू.

- राजा हरीसिंग ने काश्मीर तुम्हाला दिलंय, काश्मिरी जनतेला अजून एकाही माणसाने विचारलं नाहीये. 1948 पासून काश्मिरात सार्वमत घ्यावे याला भारत आणि पाकिस्तान टाळतायत. आणि जर ते लोक तुमचे नाहीयेत तर कुणी सांगितलंय तुम्हाला तिथे जाऊन चौकीदारी करायला आणि बर्फात मरायला. करा त्यांना मोकळे आणि ठरवू द्या त्यांना कि त्यांच्यात भांडून मरायचंय, कि पाकीस्तानात जायचंय, कि भारतात जायचंय कि स्वतंत्र देश म्हणून रहायचंय!

थोडक्यात सांगतो... काश्मीरी जनतेचे एका बाजूला भारतीय कट्टर राष्ट्रवादी लोकांनी आणि त्यांच्या कट्टर राष्ट्रवादी सरकारने आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानमधले तिकडचे कट्टर धार्मिक नेते आणि पाकिस्तान सरकार यांनी लचके तोडलेत. या सगळ्या प्रकारात जो भारताकडे झुकेल तो पाकिस्तानच्या दृष्टीने फुटीरवादी, जो पाककडे झुकेल तो भारताच्या दृष्टीने फुटीरतावादी आणि जो स्वतंत्र काश्मीर मागेल तो दोन्हीच्या दृष्टीने अतिरेकी. हा नीचपणा 68 वर्ष चालू आहे. यात काश्मिरी मुस्लिम आणि पंडित दोन्ही भरडले गेले, विस्थापित झाले आणि मेले.

काश्मीर ही एक देवदासी झालीय जिला अख्ख्या गावाने भोगावे आणि तिच्या पोरांना वाऱ्यावर सोडावे. आदिवासी ह्या जणू काही अनौरस औलादी आहेत ह्या देशाच्या ज्यांना कुठले हक्कच नाहीत.
माझ्या घरात ४ पिढ्या सैन्यात वाढल्यात आणि मेल्यात, अगदी दुसऱ्या महायुद्धापासून. आणि तरीसुद्धा सैन्य किंवा सशस्त्र दलाच्या कुठल्याही अत्याचारच मी समर्थन करणार नाही. AFSPA एवढाच आवडतो तर घ्या लावून महाराष्ट्रात आणि दर १५ नागरिकांमागे license to kill असणारा एक सशस्त्र जवान ठेवून 68 वर्ष जगून दाखवा! हिंमत असेल तर करून दाखवा!

-  फेसबुक पोस्ट ( १७ जुलै २०१६, १३.३५ )

AFSPA

कश्मीर किंवा ईशान्य भारतात AFSPA वापरून तेथील निष्पाप भारतीय नागरिकांचे खून, बलात्कार करणारे सेनेतील जवान ...

छत्तीसगढ़ मध्ये गरीब निष्पाप आदिवासींचे शिरकाण करणारे, बलात्कार (सोनी सोरी, हिडमे बद्दल वाचा) करणारे सशस्त्र दल...

हा 'राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद' आहे !!

आम्हाला सामरिकदृष्टया काश्मीर (फक्त जमीन, माणसे नाही) महत्वाचा आहे म्हणून गेले 68 वर्ष लष्कराच्या जोरावर आम्ही कश्मीरला आमच अविभाज्य अंग म्हणताना तेथील समस्त नागरिकांचे (पंडितांसकट) चीत्कार, वेदना यांच्याकडे दुर्लक्ष करतोय.

आम्हाला आदिवासी राहत असलेली जंगले हवियेत, आदिवासी नकोयत म्हणून तिथेही तोच प्रकार चालू आहे.
भुभागावरची सत्ता आणि खोटा विकास यासाठी आम्ही गेली कित्येक दशके मानवता पायदळी तुडवतोय आणि त्याला राष्ट्रवादाच गोंडस नाव देतोय.

बंदुकीच्या जोरावर कुठलाही भूभाग सर्वकाळ अंमलाखाली ठेवता येत नाही हा इतिहास आहे !

-  फेसबुक पोस्ट ( १७ जुलै २०१६, ०५.५५ )

कंदील बलोच

पाकिस्तानमध्ये पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या अजून एका स्त्रीचा सख्ख्या भावाकडून खून...कारण त्याला लाज वाटायची तिच्या मॉडेलिंगची, खुल्या वागणुकीची !!

कंदील बलोच पेज-3 मॉडेल होती, मोकळे-ढाकळे फोटो, विडिओ टाकायची किंवा भारतात जसे पूनम पांडेने सेन्सेशन माजवले तसे तिने पाकिस्तानात केले म्हणून तिच्या खुनाने अस्वस्थ व्हायच नाही असे नसते.

कंदील बलोच ही इस्लामी धार्मिक कट्टरतेची बळी आहे, तीच कट्टरता जिने मलाला वर खुनी हल्ला केला होता.
RIP Qandeel Baloch !

-  फेसबुक पोस्ट ( १६ जुलै २०१६, २१.०९ )

आस्तिक-नास्तिक


देव किंवा ईश्वरी शक्ती मानणारे ते आस्तिक, आणि हे न मानणारे ते नास्तिक ही सर्वमान्य धारणा आहे. कुणी व्यक्ती आस्तिक आहे हे सिद्ध करणे तुलनेने सोपे असते, घरात मुर्त्या-धर्मग्रंथ ठेवले, स्तोत्र-आयती म्हणल्या, कर्मकांड केलं कि ते लागलीच सिद्ध करता येत. पण, नास्तिकता सिद्ध करणे खूप अवघड आहे कारण नास्तिकता वस्तूंत/कर्मकांडात नाही तर विचारांत असते आणि विचार मूर्त नसतात. मग हि नास्तिकता सिद्ध करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि केविलवाणा प्रकार नास्तिक करतात, तो असा की आस्तिकांच्या उलट वर्तन करून दाखवा म्हणजे झाले तुम्ही नास्तिक.

आस्तिकता आणणे सोपं आहे, कारण ती अनुकरणशील आहे आणि संस्कारात मिळते. नास्तिकता मात्र वैचारिक असते आणि ती विचारातून, चिंतनातून, ज्ञानातून यावी/आणावी लागते. संस्कारातून घेतलेली आस्तिकता आणि दुसऱ्यांचे उसने विचार घेऊन आलेली नास्तिकता या दोन्हीही दांभिक असतात कारण आयुष्यात २-४ वाईट प्रसंग आले कि असले दांभिक आस्तिक देवाला शिव्या देतात आणि दांभिक नास्तिक देवळात डोके टेकवायला लागतात. आणि जगात असल्या दांभिक आस्तिक-नास्तिकांची संख्या भयाण मोठी आहे, अगदी ९०% म्हणले तरी चूक नाही. आणि हेच ते दांभिक आस्तिक, नास्तिक असतात जे जगात कट्टरता भरून टाकतात.

एखादा नास्तिक जेव्हा कर्मकांड नाकारतो तेव्हा दांभिक अस्तिकांना त्रास होणे नवे नाही. पण, काल मी जेव्हा मला संतसाहित्य (त्यातला ईश्वरी भाग सोडून) आवडते किंवा माझ्या आईवडिलांच्या घरात वारकरी लोकांना फराळ, इतर मदत निस्वार्थी भावनेने केली जाते म्हणून लिहिले कि काही नास्तिकांना पोटशूळ उठला. मी करतोय ते कसे चूक आहे आणि त्यामुळे मी मुळात नास्तिकच कसा नाही हे दाखवायची अहमहमिका लागली त्यांच्यात. खरं सांगू, आमच्या घरी आलेला माणूस हा आम्हाला फक्त माणूस दिसतो. तो आस्तिक आहे कि नास्तिक, सफाईवाला आहे कि खासदार पाहून वेगवेगळा व्यवहार माझ्या घरात होत नाही कुणाशी. कुणी आम्हाला बदल्यात काय देतंय हे पाहून आम्ही कुणाशी नाते जोडत नाही, कारण मग तो स्वार्थातून आलेला व्यवहार असतो. त्यामुळे रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानस नाती माझ्या घरात जास्त जवळची आहेत. माझे नास्तिकत्व मला माहित आहे, ते कुणा दुसऱ्या व्यक्तीला सिद्ध करण्यासाठी कुणा आस्तिकाला मदत नाकारण्याचा खोडसाळ मूर्खपणा मी करत नाही.

कुणा आस्तिकाने greetings म्हणून माझे पाय धरले, तर मी त्याचे पाय धरेन. कुणी पाश्चिमात्य व्यक्तीने गालावर kiss केलं तर मी पण करेन आणि कुणी मुस्लिमाने मला प्रेमाने आलिंगन दिलं तर मी सुद्धा देईन. मी दिल्लीत हजरत निजमुद्दीनच्या दर्ग्यात नमाजी टोपी घालून गेलोय (हो, मी जातो धार्मिक स्थळी, देवाला काही मागायला नाही तर स्थापत्य, मूर्तिकला, इतिहास, संस्कृती आणि माणसे पाहायला). गोव्यात चर्चात कॅप काढून गेलोय आणि पंढरपुरात जेव्हा गरीब घरची लहान मुले १ रुपया मिळावा म्हणून गंध लावतात कपाळाला, तो गंध सुद्धा प्रेमाने लावून घेतलाय. मला भक्तिसंगीत आवडते, मीरेची-कबिराची-सुरदासाची भजने डोळ्यांत पाणी आणतात त्यातला भावार्थ, आर्तता ऐकून. बुल्लेशाहच्या सुफी रचना, साबरी बंधूंच्या कव्वाली मला तितक्याच प्रिय आहेत. नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळाचे अभंग मला अवीट गोड वाटतात आणि ते गाताना भीमसेनजींचे, लताबाईंचे, प्रल्हाद शिंदेंचे स्वर स्वर्गीय जाणवतात.

माझी नास्तिकता माझ्या किमान १४-१५ वर्षांच्या वैचारिक चिंतनातून, मंथनातून, अनुभवातून आलीय. कुणाची ४ पुस्तके वाचून उगीच स्वतःला cool, contemporary किंवा progressive दाखवण्याच्या उथळ अट्टाहासातून आली नाहीये. त्यामुळे कुणाचे कितीही अभंग, दोहे ऐकले आणि कितीही धार्मिक लोकांच्या संगतीत बसलो तरी मी आस्तिक होणार नाही. दैवी शक्तीला शरण जाणे किंवा मानणे हे सोडून बाकीच्या चांगल्या गोष्टी मी आनंदाने घेत राहीन त्यांच्याकडून. सत्यनारायणाचा शिरा असो वा रमजानमधले मटणाचे हलीम, मला सगळे चालते. मी beef steak पण खातो आणि pork slice पण. माझी नास्तिकता तुमच्या नास्तिक/आस्तिकते सारखी गळ्याभोवतीचा फास नाहिये, याउलट माझी नास्तिकता मला मुक्त करते सगळ्या आचार-विचारांच्या पाशातून, म्हणून ती आनंददायी आहे. ही नास्तिकता कुणाला उसनी देताच येणार नाही त्यामुळे मी कधीही कुणाला नास्तिक करायच्या भानगडीत पडत नाही आणि कुठल्या भंपक नास्तिक परिषदांना जाऊन तिथे कुणा विचारवंतांची तळी पण उचलत नाही.

तुमची आस्तिकता आणि नास्तिकता या तुमच्या अंतर्वस्त्रासारख्या खासगी बाबी असतात. जग त्यावर तुमची किंमत करत नाही तर तुमच्यातल्या माणुसकीवर जग तुम्हाला ओळखत. जगाचं रहाटगाडग या माणुसकीमुळे, त्यातून येणाऱ्या प्रेम, विश्वास यावर चालतं. त्यामुळे कुणी कितीही कट्टर आस्तिक किंवा नास्तिक होऊन जर माणुसकीला पायदळी तुडवत असेल तर जग त्या कट्टरतेची फक्त निर्भत्सना करते. म्हणून मग ISIS चे फिदायिन असोत, समस्त धार्मिक दंगलखोर असोत कि निधर्मी/नास्तिकतेच्या वेडाने ग्रासलेले हिंसाचारी माओवादी/कम्युनिस्ट, सगळेच जगाच्या लेखी नालायक आहेत. जगातून माणूसकी आणि एकूण माणूसच वजा केला तर नास्तिकांची rationality किंवा आस्तिकांची belief system ठेवायची कुणासाठी?? म्हणून हे नास्तिक/आस्तिक चा काथ्याकूट बाजूला ठेवून माणूस बघायला शिका, माणसावर प्रेम करायला शिका. आयुष्य खूप सोपं होतं त्यात !!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १६ जुलै २०१६, ०९.४६ )

आषाढी एकादशी


माझा जन्म आणि आयुष्यातला दोन तृतीयांश रहिवास पंढरपुरातला. माझी आई पराकोटीची कृष्ण/विठ्ठल भक्त आहे. तिचा संतसाहित्याचा अभ्यास प्रचंड आहे आणि ती भागवतधर्मानुसार आचरण करते. स्वातीने (माझ्या पत्नीने) कधीही पंढरपूरची आषाढी यात्रा पहिली नसल्याने यावर्षी तिला घेऊन सुट्टी टाकून पंढरपूरला आलोय. काल सकाळी आई वडील, स्वाती आणि भावाला सोबत घेऊन वाखरीला पालखीतळावर जाऊन ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालखीचे दर्शन घेऊन आली. काल सायंकाळी पंढरपुरात पालख्या दाखल झाल्या. घराभोवती वेगवेगळ्या पालख्यांसोबत आलेल्या दिंड्या राहुट्या उभारून राहायला आल्यात.

काल संध्याकाळी माळशिरस तालुक्यातील दिंडीचे काही वारकरी चहापाण्याला येऊन गेले. आज संगमनेरच्या भागातील एका दिंडीचे वारकरी जे गेले १०-१२ वर्ष आमच्याकडे येतात ते भेटायला आणि फराळाला येतील. आषाढी एकादशीचा वर्षातला २-३ दिवसाचा सोहळा सोडला तर या वारकऱ्यांचा आणि आमचा कसलाही थेट संबंध येत नाही. पण आमच्यातील प्रेमाचा, सौहार्दाचा जो एक ऋणानुबंध आहे तो शब्दांच्या पलीकडील आहे. २-३ दिवस हे सगळे वारकरी आमच्या घराशेजारी तंबू टाकून राहतात. घरी चहाला येतात, फराळाला येतात. त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेला शक्य तेवढी निस्वार्थ मदत करण्यात एक वेगळा आनंद असतो. आमच्या वारकरी आज्या ज्यावेळेस गप्पा मारायला सुरु करतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातला निष्पाप भाव, प्रेम काळजाचा ठाव घेतं. त्यांच्या तोंडून ओव्या, अभंग ऐकताना खूप सुंदर वाटतात.

काल रात्री ९ च्या सुमारास घराला लागून उतरलेल्या दिंडीतून जेवायला बोलवायला दिंडीप्रमुख आले. मीसुध्दा त्यांच्या आग्रहाला शिरोधार्य मानत, माझ्याच घरासमोरच्या रस्त्यावर बसलेल्या त्या पंगतीत सामील झालो. ज्वारीची भाकरी आणि वांग्याची तिखट आमटी असं जेवण (वारकऱ्यांच्या लेखी माऊलींचा प्रसाद) होतं. आग्रहाने ते वाढत होते, मीसुद्धा हक्काने जेवून दिंडीप्रमुखांशी आणि बाकीच्या वारकऱ्यांशी गप्पा मारून आलो. आज एकादशीचा फराळ असेल माझ्या घरी आणि दिंडीत. दिंडीतले काही वारकरी आज घरी फराळाला येतील आणि मी दिंडीत जाईन फराळाला आणि रात्रीच्या कीर्तनाला सुद्धा. मला कीर्तन ऐकायला आवडतं, ओव्या-अभंग-दोहे ऐकायला आवडतात. त्यातला देवाचा अनुनय सोडला, तर जीवनाशी संबंधित ज्ञान विचार करायला प्रवृत्त करते.

मी गेली कित्येक वर्षे पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जात नाही कारण आता देव-धर्म या संकल्पनेवर विश्वास नाही. साहजिकच माझ्याकडून देवाला नमस्कार, कुठलंही धार्मिक कार्य वगैरे पण ओघाने बंद आहे. पण आषाढी वारीत जेव्हा भागवतधर्माला अनुसरून एखादा साठी ओलांडलेला वारकरी माझ्या पाय पडतो आणि 'माऊली' म्हणतो, तेव्हा मीसुद्धा त्याच आदराने त्यांच्याही पाया पडतो, गळाभेट घेतो. त्यांचं आस्तिक असणे मला खुपत नाही, माझे नास्तिक असणे त्यांना खुपत नाही. आमच्या या पाया पडण्यात त्यांच्या बाजूने भागवतधर्मातुन आलेले प्रेम, आदर असतो, माझ्या बाजूने विश्वबंधुत्वातून आलेला आदर आणि प्रेम. एवढे छान नाते असताना पाया पडायला किंवा गळाभेट घ्यायला संकोच कसला?

मी पूर्णपणे नास्तिक आहे, पण एक गोष्ट अनुभवाने सांगतो कि समस्त भारतात इतर कुठलाही धार्मिक सोहळा इतका मानवतेने, प्रेमाने, समतेने आणि आनंदाने प्रेरीत नसेल जितका हा वारकरी संप्रदाय आळंदी-देहू ते पंढरी असा चालत येऊन, ओव्या-अभंग गात, भेदभाव विसरून एक राहत गेली कित्येक शतके साजरा करतोय. इथे कर्मकांड नाहीये, इथे करोडोंच्या पूजा-देणग्या नाहीयेत, इथे सोन्याचे सिंहासन नाहीये, VIP दर्शनाच्या रांगा नाहीत, साधूंचे आखाडे नाहीयेत भांडण मानापमान दाखवून भांडायला. इथे आहे फक्त टाळ-मृदूंगाचा ध्वनि, माऊली-तुकाराम चा जयघोष, डोक्यावर तुळस, शेतकरी-कष्टकरी लोकांची अनवाणी पाऊले आणि मनात विठ्ठलाची आस.

पंढरीची वारी शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे, तो एक अमृतानुभव आहे. जमलं तर नक्की घेऊन बघा!

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १५ जुलै २०१६, ११.४८ )

महाशंख

एक साधू हिमालयात 12 वर्षे खडतर तप करत होता. त्याची घनघोर तपश्चर्या पाहून त्याच्यावर देव प्रसन्न झाला. देवाने त्या साधूला एक शंख दिला आणि बोलला, "भक्ता, या शंखाला जे काही मागशील ती इच्छा हा शंख पूर्ण करील." एवढे बोलून देव अंतर्धान पावला. साधू प्रचंड खुश झाला आणि लागलीच आपल्या गावाकडे परतून एखादा आश्रम टाकून सुखात राहावे या विचाराने उतरणीच्या वाटेने चालू लागला. दुपारच्या वेळेस त्याला भूक लागली, तेव्हा आजूबाजूला काही खाण्यायोग्य फळ/वनस्पती दिसेना. एका झाडाच्या सावलीत थांबून साधूने पोतडीतून शंख काढला आणि शंखाला बोलला,"हे शंखा, छानसं जेवण दे." क्षणात पंचपक्वान्नाच ताट साधूच्या समोर हजर झाले. पोटभर जेवण करून तृप्त होऊन साधू त्या झाडाखाली झोपी गेला
.
थोड्यावेळाने उठून साधू परत मार्गस्थ झाला. सायंकाळ होता होता तो एका आश्रमजवळ पोचला. रात्री इथेच मुक्काम करून उद्या गावाला रवाना व्हावे या विचाराने साधू आश्रमात शिरला. आश्रमात त्याच्यासारखेच अनेक वाटसरू साधूही मुक्कामी थांबले होते. रात्रीची जेवणं झाली आणि नंतर एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या. साधूला आपली तपश्चर्या आणि त्या शंखाबद्दल किती सांगू आणि नको अस झालं होतं पण तो ते मनात दाबून ठेवत होता. बाकीचे सगळे झोपल्यावर साधू आणि अजून एक वृद्ध साधू हे दोघेच जागे होते. साधूने वृद्ध साधूला न राहवून त्याच्या तपश्चर्येबाबत आणि शंखाबाबत सांगितले. वृद्ध साधू अगदी निर्विकार चेहऱ्याने ऐकत होता, कसलंही आश्चर्य न दाखवता.

साधुची गोष्ट ऐकून झाल्यावर वृद्ध साधूने त्याच्या पोतडीतून एक महाशंख बाहेर काढला आणि तो साधूला बोलला,"हे बघ, मी 24 वर्षे तपस्या केली आणि हा महाशंख मिळवला. जे मागशील त्याच्या दुप्पट देतो हा". वृद्ध साधू महाशंखाला बोलला,"हे शंखा, एक सहस्त्र सुवर्णमुद्रा दे". महाशंखातून आवाज आला,"एक सहस्त्र काय, दोन सहस्त्र देतो". साधू स्तिमित होऊन ते पाहत वृद्ध साधूला हात जोडता झाला. पण त्याच वेळेला आपला शंख महाशंखा सारखा दुप्पट पण देत नाही आणि बोलत पण नाही याच साधूला वाईट वाटलं. साधूच्या चेहऱ्यावरची नाराजी ओळखत वृद्ध साधू म्हणाला,"हा महाशंख तुला घे, आणि तुझा शंख मला दे. मला म्हाताऱ्याला आता कसलीही मोठी इच्छा नाहीये". ते ऐकून साधूला अवर्णनीय आनंद झाला, त्याने पटकन वृद्ध साधूला आपला शंख दिला व त्याच्याकडून महाशंख घेतला. आज साधूला स्वतःच्या भाग्यावर विश्वास बसत नव्हता. रात्रभर महाशंख मिळाल्याच्या आनंदात तो जागत राहिला आणि उषेच्या पहिल्या किरणासोबत त्याने आश्रम सोडला त्याच्या गावाची वाट धरत.

पहाटेपासून साधू चालत होता महाशंख मिळाल्याच्या आनंदात. दुपारची वेळ झाली, तेव्हा त्याला तहानभूक जाणवू लागली. एका डेरेदार झाडाच्या सावलीत बसून साधूने महाशंख पोतडीतून बाहेर काढला आणि बोलला,"महाशंखा, एक पंचपक्वान्नाच ताट दे." महाशंखातून आवाज आला,"एक काय, दोन ताटं देतो." काही सेकंद गेले पण ताट काही आलं नाही. तेव्हा साधू म्हणाला,"महाशंखा, बरं दोन ताटं दे." महाशंखातून परत आवाज आला,"दोन काय, चार ताटं देतो". परत काहीच झालं नाही. परत साधूने चार ताटं मागितली, महशंखाने दुप्पट करून आठ ताटं द्यायचं आश्वासन दिलं आणि हे तोवर चाललं जोवर साधूला हे कळून चुकलं कि महाशंख फक्त दुप्पट द्यायचं आश्वासन देतो, प्रत्यक्षात काहीच देत नाही. लगबगीने साधू माघारी फिरला, आश्रमाजवळ पोचला जिथे मुक्काम केला होता. त्याने खूप शोध घेतला पण वृद्ध साधू तिथून देवाने दिलेला शंख देऊन कधीच पसार झाला होता !

महाशंख-शंख आणि आजी-माजी पंतप्रधान यांत तुम्हाला साधर्म्य दिसले तर त्यात माझ्यापेक्षा स्वतःला दोष द्यावा :)

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १४ जुलै २०१६, १४.२८ )

संसर्ग

एकदा एका गावात संसर्गजन्य रोगाची साथ आली. सारे गाव त्या आजाराने बाधित झाले होते आणि दररोज काहीजण मृत्यमुखी पडत होते. वास्तविक पाहता त्या आजाराचा ईलाज खूप सोपा आणि साथ पटकन आटोक्यात आणणारा होता. त्यामुळे वैद्यकीय पुस्तके सुद्धा त्या आजाराची कालबाह्य साथीच्या आजारात वर्गवारी करत. पण तरी पण हा रोग एवढा बळावलाच कसा म्हणून जागतिक स्तरावरील वैद्यकीय तज्ज्ञांना आश्चर्य वाटले.

जगभरातील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांचे, संशोधकांचे एक पथक लागलीच गावात रवाना झाले सोबत औषधांचा साठा घेऊन. गावात शिरताच जिकडे पाहावे तिकडे आजारी रुग्ण दिसायला लागले. वैद्यकीय पथकाने गावच्या पंचायतीच्या कार्यालयात छोटेखानी दवाखाना उभारला आणि गावात ध्वनिक्षेपकावरून घोषणा केली कि सर्वांनी पंचायतीतल्या दवाखान्यात येऊन औषध घेऊन जावे, जे औषध रोग 1-2 दिवसात समूळ बरा करेल आणि कुणीही दगावणार नाही. पूर्ण दिवस निघून गेला तरी एकही गावकरी रोगी दवाखाण्याकडे फिरकला नाही.

शेवटी वैद्यकीय पथकानेच घरोघर जाऊन रुग्णांवर उपचार करावे असे त्या रात्री तज्ज्ञांनी ठरवले. दुसरा दिवस उजाडताच वैद्यकीय पथक पंचायतीला लागून असणाऱ्या घरात गेले. आत जाऊन पाहतात तो सगळेच रोगाने बाधित. त्या घरातील एका रुग्णावर उपचार करणार तेवढ्यात तो रोगी कडाडला,"तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" त्या रोग्याचे शेजारच्या घराबद्दलचे प्रेम पाहून तज्ज्ञ सुद्धा अवाक झाले. त्याच्या इच्छेचा मान ठेवीत, ते शेजारच्या घरात शिरले, तर तिथेही सगळे रोगी. त्या शेजारच्या कुटुंबातील गृहप्रमुख पण खेकसला, "तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" नाईलाजाने त्याही घरातून तज्ज्ञ बाहेर पडले आणि पुढच्या घरात गेले. तिथेही तोच अनुभव!

एरव्ही आजारावर औषधोपचार घेण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी रुग्णांची झुंबड उडते असा तज्ज्ञांचा अनुभव होता. पण हे गाव त्याला अपवाद ठरत होते. इथे ज्याला भेटावं तो शेजारच्या घरी पाठवत होता. अक्खा दिवस फिरून तज्ञांचे पथक एकाही माणसावर उपाय करू शकले नाहीत. फिरून पथक पंचायतीत आले. पथकाने ठरवले कि आता बळजबरीने उपचार करायचे लोकांवर, याला पर्याय नाही. पथक परत पहिल्या घरात शिरले आणि तिथल्या गृहप्रमुखाला पकडून औषधोपचार करणार तेवढयात त्या घरातील बाकीच्या सदस्यांनी त्या तज्ञाला धरून चोप द्यायला सुरुवात केली.

इतका वेळ तळमळत पडलेला आजारी कुटुंबप्रमुख बेंबीच्या देठापासून बोंबलत शेजारच्या घरातील लोकांना बोलावू लागला कि "हे बघा हे काय चाललंय! मी यांना आधी बाकीच्या आजारी लोकांना बघा म्हणून सांगतोय तर हे माझ्यावरच जबरदस्ती करतायेत!! पकडा आणि बदडा यांना!!" पाहता पाहता सारे गाव गोळा झाले आणि वैद्यकीय पथकाच्या विरोधात उभे ठाकले. त्यातून एक म्होरक्या पण समोर आला आणि बोलला,"जगात बाकीच्या देशात, गावात हे आजार असताना तुम्ही आमच्याच गावात का तडफडताय? आमचे आम्ही बघून घेऊ! तुमचा हक्कच काय आमच्यावर औषधोपचार करायचा? खबरदार जर इथे दिसाल तर!! नरडीचा घोट घेऊ आम्ही सगळे मिळून तुमच्या!!"

म्होरक्याच्या त्या गर्जनेने सगळे गाव चेतले, एक झाले आणि या वैद्यकीय पथकावर चाल करायच्या पवित्र्यात उभे राहिले. तज्ज्ञांच्या पथकापुढे दोनच पर्याय होते आता, स्वतःचा जीव वाचवा किंवा त्या गावाचा. तज्ज्ञांनी पहिला पर्याय निवडला आणि ते त्या गावातून निघून गेले, गावाला मरण्यासाठी सोडून.

या गावाचा आणि या देशाचा, या घरांचा आणि इथल्या धर्मांचा, या रोग्यांचा आणि इथल्या लोकांचा काही संबंध तुम्हाला लागल्यास त्याला अजिबात योगायोग समजू नका.

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १३ जुलै २०१६, २१.४३ )

चिमणी

घरात एके दिवशी एक चिमणी येते... एक छानसा कोपरा निवडते आणि एकेक काडी आणत तिच घरट बनवायला लागते. कापूस, पिसे आणून ते घरट उबदार बनवते. त्यात तिची पिल्ले जन्मतात. तो चिवचिवाट, ते चोचीत चोच घालून पिल्लाना भरवण.... आपण सगळ पाहत असतो. तिच्या जागी कधी स्वतःला तर कधी आपल्या आईला पाहून भावनिक पण होतो.

लखलखित घर ठेवणारे आपण, त्या घरट्यातुन पडलेला कचरा पण कौतुकाने न्याहाळतो. त्या चिवचिवाटाने कधी झोपमोड होत नाही आपली. उत्क्रांतिच्या साखळीमध्ये कुठलाही संबंध नसताना ती चिमणी आपली "चिऊताई" होते. तिच्या नावाने घरातील बाळाला घास भरवला जातो. तिच्या गोष्टी सांगीतल्या जातात.

आणि एक दिवस उजाडतो... चिमणीची पिल्ले भुरकन उडून जातात... आणि चिमणी पण. ते रिकामे घरटे अचानक मृतवत वाटायला लागत... एक अडगळ. तरीही आपण काही दिवस ते तसच ठेवतो... कारण आपला जीव त्यात अडकलेला असतो जरी चिमणीने स्वतःचा जीव त्यातून काढला तरी. तेव्हा कमाल वाटते त्याच चिमणीची.... किती वास्तववादी असतो एवढासा जीव!

मग एके दिवशी मनाचा निग्रह करून आपण झाड़ू हातात घेतो. हात धजावत नाही काही दिवस त्यावर झाड़ू मारायला.... पण एकदाचा आपण झाडू मारतो त्या रिकाम्या घरटयावर आणि आपल्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भावनांवर आणि आठवणींवर.

आपण परत तो कोपरा स्वच्छ करतो.... या आशेवर की कोण जाणे अजून एखादी चिमणी तिथे परत घरटे बांधेल ...

डॉ. विनय काटे

-  फेसबुक पोस्ट ( १३ जुलै २०१६, ०८.४१ )