Wednesday, December 28, 2016

महापुरुष, अनुयायी, संघटना आणि विवेकी माणूस


मानवजातीच्या सुरुवातीपासून प्रत्येक नवा विचार किंवा आचार आधी दुर्लक्षिला जातो, मग विनाचर्चा नाकारला जातो आणि तरीपण त्यात काही तथ्य असेल तर मग चर्चिला जातो आणि त्यातून पण तरुन निघाला तर स्वीकारला जातो. आणि प्रत्येक नव्या स्वीकारल्या गेलेल्या क्रांतिकारी विचारासोबत एक माणूस नवा महापुरुष म्हणून पुनर्जन्म घेतो. मग तो सिद्धार्थचा बुद्ध होतो किंवा नरेंद्रचा विवेकानंद होतो आणि तद्वत समाजकारण आणि राजकारणात पण क्रांतिसूर्य, महात्मा, लोकमान्य अशा काही उपाधीस पात्र होतो. मग महामानवाचे काही अनुयायी किंवा भक्त होतात, आणि व्हायलाच हवे. मग अशा असंख्य अनुयायांना बांधून ठेवण्यासाठी काही संघटना निर्माण होतात, त्या कधी धर्म-पंथ असतील तर कधी राजकीय पक्ष तर कधी अजून कसल्या स्वरुपात. मग या सर्व प्रकारच्या संघटना काही संमेलने, सण-उत्सव किंवा चर्चासत्रे करून आपल्या महापुरुषाचा विचार किंवा आचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आणि इथून पुढे गोष्टी वेगळ्या वाटेने जायला लागतात.

एखादा उभा दंडगोल जसा वरून पाहणाऱ्याना वर्तुळ आणि बाजूने पाहणाऱ्याना आयत दिसतो, तसाच प्रत्येक महापुरुष (जो मुळात एक माणूस असतो) प्रत्येक गोष्टीला त्याच्या तात्कालिक संदर्भमधून, त्याच्या दृष्टीकोनातून पाहतो आणि त्यावर त्याचे विचार व्यक्त करतो. आणि जेव्हा हे महापुरुष ऐतिहासिक असतात तेव्हा तर संघटना आणि अनुयायांची फार गोची होते. Mobile वरून दिलेला तलाक मान्य करायचा कि नाही? चरखा चालवून कंपनी सरकारला नामोहरम करणाऱ्या गांधीवाद्यांनी FDI वर काय भूमिका घ्यायची? Bible मध्ये पृथ्वी सपाट आहे म्हणताना चर्चने पृथ्वीचे गोल असणे स्वीकारायचे का नाही? हे आणि इतर असेच बरेच प्रश्न मग अनुयायांना भेडसावू लागतात कारण आजच्या परिस्थितीवर भाष्य द्यायला त्यांचा महापुरुष उपलब्ध नसतो. मग ते येनकेन प्रकारे आपल्या महापुरुषाला योग्य ठरवायचा प्रयत्न चालूच ठेवतात आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती यात काही बदल नाही झाला असेही सांगत बसतात. त्यातून पण भरीस भर म्हणून मग झुंडी करून व्यवस्थेवर दबाव आणतात कि हे बदल स्वीकारू नका.

आपण ज्याला मानतो तो महापुरुषच कसा एकमेव सत्य, महान आणि सर्वजणांना सार्वकालिक अनुकरणीय आहे याची अहमहमिका लागते अनुयायामध्ये आणि संघटनांमध्ये. आता बरेच वेळा यातले दोन किंवा अनेक महापुरुष समकालीन असतात आणि त्यांचे एका विषयावरचे मत हे परस्पर विरोधी असते. मग अनुयायी भिडतात एकमेकांशी, आमच्या महापुरुषाचे मत हेच कसे योग्य आहे हे पटवून द्यायला. मग ते दुसऱ्या महापुरुषाची निंदा नालस्ती सुरु करतात, त्याच्या नावे अफवा पसरवतात, त्याची वाक्ये संदर्भ सोडून बाजूला काढून तो महापुरुष किती खालच्या दर्जाचा आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मग या टीकेला तोड म्हणून दुसऱ्या महापुरुषाचे अनुयायी पण तोडीस तोड तंत्रे वापरून इकडच्या महापुरुषाला खाली दाखवण्यात धन्यता मानतात. प्रत्येक अनुयायी आणि संघटना, आमचा इतिहास हाच कसा खरा इतिहास आणि आमचे आचार-विचार हेच कसे योग्य या एकाच गोष्टीसाठी रणकंदन करतात. कधी हे रणकंदन वैचारिक असते, आणि कधी कधी हे आणखी तीव्र होवून हिंसक रूप घेऊन घरांची जाळपोळ, निर्दोष माणसांची कत्तल पण घडवून आणते. यातून खरे बघायला गेले तर त्या महापुरुषांचा खूप मोठा पराभव होत असतो पण बहुधा ते या जगात नसतात अनुयायांना थांबवायला.

हि सगळी वैचारिक-शारीरिक हिंसा अगदीच टाळण्याजोगी नाहीये. थोडासा विवेक जर आपण सर्वांनी ठेवला तर नक्कीच हे सगळा टाळता येत आणि खर सांगू विवेक हि खूप सोपी गोष्ट आहे धारण करायला. वाईटात वाईट गुन्हेगार माणूस पण आत एक सुंदर मन घेवून जन्माला आलेला असतो आणि तो सुद्धा विवेक जागृत झाला कि बदलू शकतो, मग आपण का नाही तो धारण करू शकत? आणि विवेक म्हणजे नक्की काय? 'नीर-क्षीर विवेक' असाही ज्याला म्हणलं जाते तो विवेक म्हणजे 'जे माझे ते चांगले' यापेक्षा 'जे चांगले ते माझे' हे म्हणायची आणि आचरणात आणायची वृत्ती. हि वृत्ती मनात असली कि आयुष्य खूप सुंदर होवून जाते आणि आपण आपोआप अनुयायी आणि संघटनाच्या कचाट्यातून मुक्त होतो. विवेकी माणूस इतिहासाच्या खोट्या दुराभिमानासाठी वर्तमान विसरत नाही, तो बदल विचारपूर्वक स्वीकारतो आणि संघटनांच्या गलबल्यात वाहवत जात नाही. "फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके" या वृत्तीने विवेकी माणूस जिथून जे चांगल मिळेल ते स्वीकारतो आणि स्वतःला वृद्धिंगत करत प्रवाही ठेवतो.

तेव्हा जे जे चांगलं दिसेल ते स्वीकारत चला आणि वाईटाला वगळत चला. चार्वाकाकडून व्यवहारिकता घ्या, मीरेकडून भक्ती घ्या, बुद्धाकडून शांती घ्या, महाविराकडून अहिंसा घ्या, येशुकडून प्रेम घ्या, पैगंबराकडून जकात घ्या, शिवाजींकडून शौर्य घ्या, अकबराकडून सर्वधर्मसमभाव घ्या, आंबेडकरांकडून विद्वत्ता घ्या, सावरकरांकडून विज्ञानवाद घ्या, गांधींकडून प्रवाहीवृत्ती घ्या …. आणि हो फक्त महापुरुषच नाही तर आजूबाजूला असणाऱ्या वरवर सामान्य दिसणाऱ्या लोकांमधले असामान्य गुण घ्या. सगळ्यांच चांगल दिसेल ते घ्या, आत्मसात करा. कुणीही महापुरुष सर्वबाबतीत सत्य किंवा कालसुसंगत असू शकत नाही हे समजून त्यांना काळाच्या, परिस्थितीच्या आणि विचारांच्या कसोटीवर पारखून त्यांचे योग्य तितकेच आचार-विचार आयुष्यात घ्या. आणि जे कालसुसंगत किंवा तर्कसुसंगत नाहीये ते शांततेने सोडून द्या, त्यासाठी तो महापुरुष वाईट असे मत बनवायची गरज नाही कारण कदाचित त्यांचा तो विचार तात्कालिक परिस्थितीत त्यांच्या दृष्टीकोनातून योग्य पण असू शकेल.
चला वर्तमानात विवेकाला अनुसरून जगूया आणि एक छान आयुष्य घडवूया !

- फेसबुक पोस्ट (२० एप्रिल २०१६, १२.३८) 

No comments:

Post a Comment