Friday, January 6, 2017

अडाणीपणाचा चलनखेळ -

500, 1000 च्या नोटा बंद करण्याचे मी स्वागतच केले, अपेक्षा होती की त्याने देशांतर्गत काळा पैसा एकतर चलनात येईल किंवा बाद होईल. पण लगोलग 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणण्याची घोषणा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. कारण त्यामुळे आताचा 500, 1000 च्या चलनात साठवलेला काळा पैसा 2000 च्या चलनात बदलला जाईल. सरकारचा हा चलनखेळ किती पोरकट आहे हे खालील उदाहरणांवरून दिसून येईल -

१) करचुकव्या सोन्याचे शुद्धीकरण -
कर चुकवून आणले गेलेले कित्येक टन सोने या देशातल्या सराफांकडे पडून होते ज्याला अचानक या चलनबदलाने 'अच्छे दिन' आले. 30 हजारांवर असणारे सोने रात्रीत 34 हजारांवर गेले आणि काळ्या बाजारात तर अगदी 45-50 हजारांच्या दरात गेले. जे सराफ काही महिने आधी 1% कर कमी करावा म्हणून बंद करत होते, मोदींना शिव्या देत होते ते एका रात्रीत त्यांचे फॅन होऊन गेले. आता तुम्ही म्हणाल सराफांना ग्राहकांची नोंद ठेवावी लागतेय, पण जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर करचुकवे सोने ठेवले जाऊ शकते, तिथे नकली ग्राहक दाखवणे आणि बाजारभावाच्या दराने विक्री दाखवून काळ्या बाजाराच्या दराने पैसे फिरवणे काय अवघड आहे??
थोडक्यात एका हाताचा काळा पैसा दुसऱ्या हातात गेला, त्यात तो पैसा पण पवित्र झाला आणि ते करचुकवे सोने पण!

२) चलनाचा तुटवडा -
अचानक केलेल्या घोषणेने बाजारात चलनाचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला. ज्यांच्याकडे Card Payment ची सोय नाही अशा छोट्या व्यावसायिक लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. ग्राहक येईना झाले. लोक प्रवासात अडकले, लग्नसराईत अडचणी झाल्या. एवढंच काय तर अगदी दवाखान्यापासून ते स्मशानापर्यंत कामे ठप्प पडली. पेट्रोल पंप वाल्यांनी आपली चांदी करून घेतली. बँकांसमोर सामान्य लोकांच्या त्रासलेल्या रांगा लागल्या ... कुणाला किराणा आणायला पैसे नाहीत, कुणाला औषधाला, तर कुणाला मुलांच्या शिक्षणाच्या फीला. हातावर पोट असणाऱ्या सामान्य माणसाचे हाल हे त्यांनाच माहित. लोकांचा रोजगार बुडाला, गेल्या 3 दिवसात देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याची जी वाताहत झालीय ती अभूतपूर्व आहे.

३) बँकामधून चलनबदली -
ही म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती आहे. देशाच्या 84% नोटा या 500, 1000 च्या पटीत होत्या. म्हणजे फक्त 16% नोटा या 100 किंवा खालील किंमतीच्या होत्या. त्यामुळे 500, 1000 च्या नोटा बदलायला गेलेल्या प्रत्येकाला बँक 2000 च्या 2 नोटा देऊन घरी पाठवतेय. आता समजा एखाद्या माणसाला 120 किंवा अगदी 1120 रुपयांची खरेदी करायची आहे, तर त्याला उरलेली शिल्लक द्यायला दुकानदाराने इतक्या 100 च्या नोटा आणायच्या कुठून? मुळात 100 च्या नोटाच जर बाजारात इतक्या कमी असतील तर त्या किमान महिनाभर तरी 500, 1000 च्या नोटांचा तुटवडा भरून काढू शकत नाहीत. थोडक्यात 2000 च्या नोटा असूनही आपण येणारे काही दिवस त्यांना न्याहाळत बसण्या पलीकडे काहीही करू शकत नाही, किंवा 200 रुपयांच्या ऐवजी 2000 ची खरेदी करून यावी लागेल जो एक मूर्खपणा आहे.

४) काळा पैसा -
2000 च्या नोटा आणून काळा पैसा साठवायला अजून कमी जागा लागेल याची भविष्यात व्यवस्था करून झालीय. तुम्ही म्हणाल कि काळा पैसा राहीलच कसा?
तर, काळा पैसा पांढरा करायला विशेष काही करावे लागणार नाहीये. आजही आपल्या देशात शेतीवर tax नाहीये, करोडो शेतकऱ्यांकडे PAN कार्ड नाहीतच. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या नावे तुम्ही त्याचे आधार, वाहन परवाना वापरून पैसे जमा करून काळ्याचे पांढरे करून घेऊ शकता, त्याच्याकडून post dated cheque घेऊन. ज्याचा IT return नाही, आणि जरी कुणी नाव नोंदवून घेतले तरी त्याला कृषीचे उत्पन्न हे सांगायला कारण आहे अशा करोडो शेतकऱ्यांची देशात कमी नाही. राजकारणी या शेतकऱ्यांना हाताशी धरून, किंवा अगदी अंधारात ठेवूनसुद्धा त्यांच्या नावाने हा पैसा पांढरा करू शकतात आणि income tax वाले यावर काहीही करू शकत नाहीत.

५) Identity theft-
एखाद्या माणसाची ओळख चोरून त्याच्या नावे पैसा बदलून आणला जाऊ शकतो, तोही असंख्य वेळेला, असंख्य ठिकाणी आणि तेही त्या माणसाला माहित न होता. हे सहज शक्य आहे कारण आपणा सर्वांची PAN कार्ड, आधार, वाहन परवाना कागदपत्रे यांच्या फोटोकॉपी मार्केट मध्ये सहज उपलब्ध आहेत. तुम्ही नवीन sim card घ्या, तत्काल reservation करा किंवा अजून काही सेवा घ्या, ही सगळी कागदपत्रे आपण बिनबोभाट विश्वासाने फोटोकॉपी करून सह्या करून ओळखीचा पुरावा म्हणून जमा करतो किंवा details नोंदवतो. हीच कागदपत्रे, ह्याच नोंदी तुम्हाला माहित न होता कित्येक ठिकाणी वापरली जातील आणि तुमच्या नावाने असंख्य ठिकाणी काळा पैसा पांढरा करून घेतलाही जाईल.

थोडक्यात, 500 किंवा 1000 च्या नोटा बदलून आपण काळा पैसा संपवून खूप मोठी आर्थिक क्रांती करतोय हा सरकारचा दावा म्हणजे मूर्खपणा आहे. काळा पैसा पांढरा करायला यातून असंख्य पळवाटा आहेत आणि फक्त पैसाच नाही तर अगदी चोरटे सोनेसुद्धा यात शुचिर्भूत होणार आहे. असंख्य लोकांच्या नावाने चोरटी transactions होणार आहेत. खासगी, सहकारी पतसंस्था मधून zero balance असणाऱ्या जनधन योजनेत उघडलेल्या कार्यरत नसणाऱ्या अकाउंटचा गैरवापर होणार आहे ज्याची कसलीही माहिती त्या अकाउंट धारकाला सुद्धा नसणार आहे. आणि अशा अकाउंटना कुणी शोधणारही नाहीये कारण ही नेटबँकिंग च्या पलीकडे असलेली अकाउंट आहेत.

500, 1000 च्या नोटा बदलून 2000 च्या नोटा आणण्याचा हा चलनखेळ हे एखाद्या तुघलकी फर्मानापेक्षा काहीही वेगळे नाहीये. यात कसलीही दूरदृष्टी नाहीये. याने टीचभर फायदा न होता, सर्वसामान्य लोकांना अफाट उपद्रव देण्याची क्षमता मात्र यात नक्कीच आहे!

- डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ११ नोव्हेंबर २०१६, १९.०९ )

(ता.क  - पाकिस्तान दरवर्षी 500 कोटींचे नकली चलन भारतात पाठवते असेही एक कारण दिले गेलेय. पण गेल्या 3 दिवसात झालेले अर्थव्यवस्थेचे नुकसान हे पाकिस्तानने आजवर केलेल्या एकूण नुकसानापेक्षाही जास्त आहे. आणि 2000 च्या नव्या नोटांच्या नकली नोटही ते नंतर बाजारात आणतीलच यात संशय नाही. रोगपेक्षाही इलाज भयंकर झालाय हेच खरे!)

No comments:

Post a Comment