Wednesday, January 25, 2017

वाचन कौशल्य

Reading Comprehension अर्थात लिहिलेलं वाचणे, त्यावर विचार करणे आणि त्याचा योग्य अर्थ समजून घेणे हे आत्मसात करायला खूप अवघड कौशल्य आहे. म्हणून UPSC असो, CAT असो की अजून कुठलीही स्पर्धा परीक्षा, त्यात उमेदवारांची ही क्षमता तपासण्यासाठी काही प्रश्न नक्की असतात.

कुठलेही वाक्य हे नीट न वाचता, नीट विचार न करता आणि नीट अर्थ समजून न घेतल्याने अनर्थ होतात. हे अनर्थ वैयक्तिक आयुष्यापासून ते सार्वजनिक आयुष्यापर्यंत घातक असतात. काही लोकांकडे हे कौशल्य अजिबात नसते त्यामुळे ते नजरचुकीने, अनावधानाने अर्थाचा अनर्थ करतात. 

काही धूर्त आणि स्वार्थी लोक जाणूनबुजून हे कौशल्य चुकीच्या पद्धतीने वापरत अर्थाचा अनर्थ करतात. जगातल्या साऱ्या दंगली-युद्धे, धार्मिक-जातीय तेढ, विद्वेषाचे वातावरण ही या धूर्त आणि पराकोटीच्या स्वार्थी लोकांची देण आहे. असे लोक इतिहाससंशोधन, कला-साहित्य, राजकारण, माध्यमे अशा विविध सामाजिक क्षेत्रांत आघाडीवर असतात ती याच कौशल्याने. कुणी काहीही बोलू द्या, त्या वाक्याचा अनर्थ करत प्रसंगी लोकांच्या चितेवर सुद्धा या लोकांना आपली पोळी भाजायची कला अवगत असते.

अज्ञानी लोकांना समजावता येते. धूर्त व स्वार्थी लोकांना कधीच समजावता येत नाही कारण त्यांचे पोट अनर्थ होण्याने भरत असते.

- डॉ. विनय काटे

No comments:

Post a Comment