Saturday, January 21, 2017

इतिहास आणि वर्तमान -

१) तैमूर, गझनी, अकबर, औरंगजेब, टिपू, अब्दाली, निजाम इ. यांना शिव्या देत बसणारे किंवा यांचा जयजयकार करणारे लोक

२) प्रताप, शिवाजी, बाजीराव, शिंदे, होळकर, झाशी राणी, जयसिंग, यादव इ. यांचा जयजयकार करणारे किंवा यांना शिव्या देत बसणारे लोक ....

हे सांगीव, भाट लोकांनी लिहिलेला इतिहास खरा समजून, सध्याच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही असणाऱ्या भारत देशात राहून धार्मिक, कौटुंबिक आधारावर उभारल्या गेलेल्या संस्थानांची मूर्ख दिवास्वप्ने पाहत असतात फक्त.
काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा -

१) यातला कुठलाही राजा भारतासाठी किंवा भारताविरुद्ध लढलाच नाही. कारण आज जो भारत दिसतो तो 1857 नंतर ब्रिटिशांनी केलेल्या साम्राज्यवादी एकीकरणाचा परिणाम आहे. ब्रिटिश नसते तर आपण आजही अफगाण लोकांसारखे टोळ्यांत भांडत राहिलो असतो. ब्रिटिशांनी तुमचा पैसा नेला, पण तुम्हाला एक देश आणि राजकीय व्यवस्था दिली.

२) वरीलपैकी कुठलाही भारतात जन्मलेला राजा सेक्युलर नव्हता किंवा कट्टर धार्मिक. बहुतांशी सगळ्यांच्या पदरी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही धर्माचे सैन्य, सरदार होते. तेव्हा कुणी फक्त राजाचे नाव पाहून तो आमच्या धर्माचा किंवा दुसऱ्या धर्माचा वगैरे गप्पा करू नयेत.

३) यापैकी एकाही राजाचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नव्हता. कुणीही लोकांना विचारून राज्य केले नाही. आणि कुणीही लोकांच्या भल्यासाठी राज्य केले नाही. आजचे राजनेते जशा लोकसेवेच्या गप्पा करत स्वतःची घरे भरून घेतात तेच याही समस्त राजांनी केले होते. त्यांच्या पदरी भाट लोक ठेवलेले असत (आजच्या पत्रकारांसारखे) जे राजाच्या मोठ्या मनाच्या खोट्या गोष्टी जनतेत पसरवत असत, लोक खुश राहावेत म्हणून.

४) यापैकी कुठलाही राजा हा कनवाळू किंवा मायाळू नव्हता, आणि तो कनवाळू नसणे हे राजेशाही टिकवायला गरजेचे होते.

५) यातल्या कुठल्याही राजाचे सैन्य हे शांततेसाठी लढत नव्हते, किंवा दुसऱ्या राज्यातल्या प्रजेशी प्रेमाने वागत नव्हते. मुळात त्यांच्या सैन्याला कसलीही नीतिमूल्ये नव्हती. शत्रू राज्यात घुसून संपत्ती आणि स्त्रियांची अब्रू लुटणे हा दंडक होता, आणि त्यामुळेच हिंस्त्र स्वभावाचे लोक सैन्यात भरती होत. आजचे सैन्य पण याला अपवाद नाही. जशी वर्णने यवनांनी केलेल्या अत्याचाराची आहेत, अगदी तशीच वर्णने मराठा सैन्याने बंगालमध्ये केलेल्या अत्याचाराची आहेत.

थोडक्यात सांगतो - तुम्ही एका लोकशाही धर्मनिरपेक्ष देशात जन्मलाय याचा आनंद माना, ज्या देशाचा पाया नेहरू, आंबेडकर यांच्यासारख्या विद्वान व मानवतावादी लोकांनी घातला आहे. उगीच भूतकाळातील कुठल्या तरी स्वतःच्या धर्माच्या राजाबद्दल भावनिक होत, त्याचे राज्य यावे वगैरे स्वप्ने बघत आयुष्य, वेळ आणि भावना खर्ची घालू नका.

राजेशाही काय असते ते शुभशकून म्हणून तोफेखाली डोके चिरडल्या गेलेल्या, बुरूजात जिवंत पुरल्या गेलेल्या धेडाला आणि अब्रूची सामूहिक लक्तरे केलेल्या गेलेल्या अजाण मुलींपासून ते वयस्क स्त्रियांना विचारा!!
तुमचा इतिहास बऱ्यापैकी कपोलकल्पित आणि एकांगी आहे. आणि त्या कपोलकल्पित इतिहासाचा अनाठायी गर्व किंवा लाज हे दोन्ही मूर्खपणाचे आहे. माझ्यासाठी भारत 15 ऑगस्ट 1947 ला सुरु होतो !!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २३ डिसेंबर २०१६, ०७.११ )

No comments:

Post a Comment