Saturday, January 21, 2017

पवार साहेब - माझ्या नजरेतून

1988 साली वयाच्या पाचव्या वर्षी "आवाज" च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर शरद पवार यांचे भूखंडाचे श्रीखंड (तत्कालीन तथाकथित भूखंड घोटाळा) खातानाचे कार्टून पाहिले होते. ही साहेबांची माझ्या आयुष्यातली माझ्या स्मरणातली पहिली एंट्री. माझे आजोबा कट्टर काँग्रेसविरोधी होते त्यामुळे शरद पवार हे खूप वाईट आहेत असा बालसुलभ समज होता. कारणेही तशीच होती.

1992-93 च्या काळात बाबरी पतन आणि मुंबई दंगली व स्फोटांनंतर पवारांवर बेछूट आरोप करायची अहमहमिका लागली होती मीडिया, राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्यात. गो.रा.खैरनार यांनी मुंबईत अतिक्रमणे पाडण्याचा धडाका लावला, ज्यात पप्पू कलानी यांच्या 'सीमा' हॉटेलचा एक मजलाही होता. त्यांनी सगळ्या अतिक्रमणाच्या मागे पवार आहेत असा सूर आळवला होता. "नवा काळ" चे खाडिलकर तेव्हा अग्रलेखा मागून अग्रलेख छापून पवारांना त्राही करून सोडत होते. आणि विधानसभेत तेव्हाचे तरुण विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी पवारांना अगदी दाऊदच्या गँगमध्ये सामील करून टाकले होते. अनिल गोटे नामक उत्तर महाराष्ट्रातल्या भाजप आमदाराने (जे तेलगीच्या सोबत 4 वर्षे जेल मध्ये गेले नंतर) तर अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या घरांच्या भिंतीसुद्धा रंगवल्या होत्या "तख्त बदल दो, ताज बदल दो, दाऊद के गुंडो का राज बदल दो " अशा घोषणांनी.

गेल्या 3-4 वर्षाच्या काळात मोदींनी मनमोहन सिंगांच्या विरुद्ध केलेली आगपाखड सुद्धा यापुढे काहीही वाटणार नाही इतका पराकोटीचा विरोध आणि बेताल आरोप तत्कालीन सेना, भाजप आणि मीडियाने पवारांवर केले होते. गंमतीचा भाग हा की इतकी सगळी बदनामी चालू असताना शरद पवार हे शांततेत आपले काम करत होते कुणावरही कसलीही वैयक्तिक टीका न करता. त्या वयात मला त्यांची शांतता ही ह्या आरोपांना मुकसंमती असल्यासारखी वाटायची, जशी 3 वर्ष आधी मनमोहन सिंगांची शांतता भासायची. त्यामुळे पवारांचा अजून राग यायचा तेव्हा. या शांततेची परिणती 1995 ला युतीचे शासन येण्यात झाली. पवारांनी 5 वर्ष विरोधी पक्षात काढायचा जनादेशही नेहमीप्रमाणे स्वीकारला.

युती सरकारच्या काळात व्हायला लागलेले एकेक विखारी जातीयवादी प्रकार उदाहरणार्थ मुलांना जातीनुसार वेगवेगळे युनिफॉर्म, रमाबाई आंबेडकर नगरचे हत्याकांड जेव्हा कळू लागले, तेव्हा मात्र समजले की शरद पवारांचा कालखंड तुलनेने बरा होता. काँग्रेस मधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्याची पवारांची चूक ऐतिहासिक होती, कारण तसे केले नसते तर कदाचित मनमोहन सिंगांच्या जागी त्यांचा नंबर लागला असता. पण पवारांनी जो निर्णय घेतला त्यावर ठाम राहून अगदी 2-3 महिन्याच्या कालावधीत स्वतःचा नवा पक्ष काँग्रेसच्या तोडीला ठेवत, युती सरकारला पुढच्याच निवडणुकीत पराभूत केले. त्यानंतर 2004 च्या मनमोहन सिंग सरकार मध्ये विविध पक्षांची मोट बांधून ठेवण्याचे कार्यही त्यांनी जवळपास 10 वर्षे केले.

एका सामान्य घरात जन्मलेला हा माणूस किती कुशाग्र राजकारणी आहे याची भाराभर उदाहरणे सांगता येतील. सहकारी पतसंस्था असो, दूध संघ असोत, सूतगिरणी असो, बाजार समित्या असोत, साखर कारखाने असोत की अगदी ICC चे अध्यक्षपद असो... पवारांनी जिथे हात घातला तिथे यश मिळवले. अलबत त्यांच्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या वावरात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप झाले, पण नेहमीसारखे एकही आरोप सिद्ध करता आला नाही कुणाला. "राजकीय आखड्यातला तेल लावलेला पैलवान" हे पवारांना का म्हणले जाते हे वेगळे सांगायचे गरज नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी बारामतीत जाऊन गर्जले होते की "NCP म्हणजे National Corrupt Party", पण सत्तेत आल्यावर तेच मोदी म्हणाले की ते पवारांचा हात धरून राजकारण करायला शिकलेत. हे दिसते तितके सोपे किंवा सहज साध्य नाही.

2007 साली पवारांच्या हस्ते सांगलीत पं.भीमसेन जोशींना एक पुरस्कार दिला गेला होता तेव्हा त्यांच्या भाषणातून कळाले की हा माणूस कलेचा किती दर्दी आहे. त्याच वर्षी नारायण सुर्वेंशी खासगीत बोलता बोलता पवारांचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले,"शरद पवार, विलासराव आणि सुशीलकुमार हे तिघेही खूप चांगले वाचक आहेत आणि साहित्यिकांना हवी ती मदत या सुसंस्कृत नेत्यांनी केलीय." बालपणापासून पवारांबद्दल मनात असलेली अढी निवळायला लागली होती.

पुढे 2008-09 साली WHO साठी काम करताना मी 8-9 महिने UP, बिहार, MP मधली असंख्य गावे पाहिली जिथे वीज,रस्ते,पाणी नव्हते, पक्की घरे नव्हती, बँका/गिरण्या दवाखाने नव्हते, रोजगार नव्हते, शेतीला पाणी नव्हते आणि लोकांचे दारिद्र्य सांगण्या पलीकडे वाईट होते. तेव्हा मी महाराष्ट्रातील खेडी आठवायचो आणि त्यांची तुलना तिथल्या खेड्यांशी करायचो. तेव्हा कळायला लागलं की महाराष्ट्र या राज्यांच्या तुलनेत कितीतरी अग्रेसर आहे. अगदी महाराष्ट्रातल्या आदिवासी भागांत सुद्धा मूलभूत सेवा मिळतात ज्या या राज्यांत तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मिळत नाहीत. तेव्हा कळाले की यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार या लोकांनी खरंच महाराष्ट्राला किती सर्वांगीण प्रगत करून ठेवलंय. शरद पवारांच्या कार्याची खरी ओळख तेव्हा होऊ लागली होती.

महाराष्ट्राचे राजकारण असो की देशाचे राजकारण, पवार साहेबांनी सर्व पक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध जपले आहेत, कुणाचाही वैयक्तिक द्वेष न करता. ज्या सहजतेने ते कॉर्पोरेट जगाशी बोलतात त्याच सहजतेने ते शेतकऱ्यांशीही संवाद साधतात. पवारांकडून शेकडो चुका झाल्याही असतील, कारण हा माणूस हजारो कामांचा आवाका ठेवून कार्यरत असतो. आणि जो काम करतो त्याचाच कडून चुकाही होतात. कुणी कितीही वैयक्तिक आरोप करा, दूषणे द्या, प्रसंगी त्यांच्यावर हात उगारा (जो प्रकार अण्णाच्या भक्ताने केलाही होता आणि अण्णांची "एकही मारा" ही प्रतिक्रिया अण्णांच्या गांधीवादाचे पितळ उघडे करून गेली), हा माणूस शब्दाने उलट उत्तर देत नाही. कुशाग्र स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता, अफाट जनसंग्रह आणि कँसरसारख्या आजारावर मात करून दाखवायची जीजीविषा असणारा हा नेता आहे. शरद पवार नसलेल्या मुद्द्याचे राजकारण करू शकतात आणि कळीचे मुद्दे सुद्धा मुळातून बाद करू शकतात.

तथाकथित आरोपांच्या वावड्या ऐकून कुणी कितीही पवारांचा कितीही तिरस्कार करू देत, पण एक चलाख राजकारणी म्हणून, एक संयमी नेता म्हणून, एक सुसंस्कृत-व्यासंगी व्यक्ती म्हणून, सामान्यांचे प्रश्न जाणणारी आणि जमिनीवरील राजकारणाची समज असणारी सद्यकालीन राजकीय परिघात जी मोजकी लोकं आहेत त्यातही शरद पवार अद्वितीय आहेत.

पवार साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १२ डिसेंबर २०१६, १८.५० )

No comments:

Post a Comment