Saturday, January 21, 2017

सैन्य, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद-

सरकारच्या कुठल्याही मूर्खपणाच्या निर्णयाविरुद्ध काहीही बोललं की "आपले सैन्य देशासाठी मरतेय आणि तुम्हाला एवढा त्रास घ्यायला नको!" हे आजकाल खूपदा ऐकायला मिळते. भारतात सैन्याचे अवाजवी उदात्तीकरण व्हायला खूप कारणे आहेत.

भारताने 1947/48, 1962, 1965, 1971 आणि 1999 अशी पाच युद्धे पाकिस्तान, चीन या शेजारी देशांसोबत केली. आणि या देशांसोबतच्या सीमांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. सीमेलगतची काही राज्ये अशांत आहेत म्हणून आपल्या देशाला काही सैन्य या सीमांवर ठेवावे लागते. पण तसे सैन्य आपले शेजारीही ठेवतात. पाकिस्तान आणि चीनचे सैन्य त्यांच्या सीमेवर रक्षण न करता काय Disneyland मध्ये मौजमजा करत असते? आणि आपल्याच देशाचे तरी सगळे सैन्य काय सदासर्वकाळ सीमेवरच असते का? सीमेवरची परिस्थिती पाहून, गरजेनुसार थोडेसेच सैन्य सीमेवर असते, बहुतांश सैन्य देशाच्या आतील भागात छावण्यांमध्ये असते.

सैन्याबद्दलही लोकांना खूप सारे गैरसमज आहेत, जसे की सैन्य म्हणजे तळहातावर जीव घेऊन देशासाठी मरायला आणि मारायला तयार असणारेच सगळे तिथे जातात, किंवा सैन्यात प्रचंड एकोपा असतो वगैरे. प्रत्यक्षात असे काहीही नाही. सैन्यात बहुतांश लोक हे सैनिक या गैर-अधिकारी प्रवर्गात मोडतात आणि त्यांतले बहुतांश हे फक्त घरात, गावात रोजगार नाहीये म्हणून सैन्यात जातात. माझ्या स्वतःच्या मूळ गावात (तासगाव तालुका, सांगली) 20-30 वर्षांपूर्वी गावात कुठलेही पोर शिकेना झाले, काम करेना झाले की त्याला सैन्यभरती साठी तयार केले जायचे. प्रत्येक घरात एक तरी सैनिक असायचा, आणि सगळे पोट भरायला सैन्यात जायचे, ज्यात माझे कित्येक काका येतात. आज परिस्थिती वेगळी आहे. लोकांना द्राक्ष शेतीत चांगले उत्पन्न आहे, रोजगार आहेत तर सैन्यात जायचे गावातले प्रमाण आज नगण्य झालेय. सैन्यात गुजराती लोक कमी आहेत आणि उत्तर भारतीय जास्त आहेत यामागे सुद्धा हेच कारण आहे.

सैन्यातील अधिकारी वर्ग हा संख्येने कमी आणि पूर्णतः वेगळा असतो, सरंजामी असतो. लष्करी छावण्यांमध्ये अधिकाऱ्यांना मोठी घरे राहायला मिळतात, स्वस्त राशन मिळते, प्रवासी भत्ते मिळतात आणि सुट्ट्याही. बाकी घरची दैनंदिन कामे करायला उदाहरणार्थ स्वयंपाक, भांडी, कुत्र्याला फिरवून आणणे, कपड्यांना इस्त्री करणे, शू पॉलिश करणे, बाथरूम स्वच्छ करणे आदी साठी orderly (म्हणजेच अधिकारी नसलेला सामान्य सैनिक) असतो. ऑफिसर लोकांच्या मेस वेगळ्या असतात, त्यांच्या रंगारंग पार्टी वेगळ्या असतात ज्यात कुठल्याही साध्या सैनिकाला प्रवेशही नसतो. प्रचंड सरंजामी असणारी ही व्यवस्था आहे आणि यात सामान्य सैनिक फक्त पोट भरायसाठी काम करत राहतो.

ऐन युद्धाच्या ठिकाणी हा अधिकारी आणि सामान्य सैनिक हा भेदभाव थोडा कमी होतो, कारण शत्रूच्या गोळ्या भेदभाव करत नाहीत. पण त्यातसुद्धा सामान्य सैनिकांना दिली जाणारी स्वसंरक्षणाची साधने उदाहरणार्थ बुलेटप्रूफ जॅकेट, थंडीसाठीचे स्वेटर्स, हेल्मेट, शूज हे अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या त्याच वस्तूंपेक्षा तुलनेने कमी दर्जाचे असतात. आणि हे व्हायला सुद्धा नेहणीप्रमाणे कारण आहे भ्रष्टाचार! सैन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो हे सर्वज्ञात आहे. सैन्याच्या खरेदीत आधी अनधिकृत दलाल असायचे ज्यांच्यासोबत राजकारणी, उच्चपदस्थ अधिकारी कमिशन खायचे आणि निकृष्ट सामान द्यायचे. आताच्या सरकारने तर दलाली अधिकृतच करून टाकलीय. आणि सैन्याच्या खरेदीतील हे भ्रष्टाचार कधीही बाहेर येतच नाहीत कारण सैन्याला तुम्ही RTI मध्ये काहीच विचारू शकत नाही. सैन्याच्या बऱ्याच चुकीच्या कृतींना प्रेस-मीडिया मध्ये येऊ दिलेच जात नाही कारण त्यात राजकारणी लोकांचा, दलालांचा फायदा असतो.

एखाद्या देशाच्या उन्नतीसाठी जसे एखादा शेतकरी राबतो, सफाई कामगार गटारी साफ करतो, मजूर राबतो, शिक्षक शिकवतो, इंजिनिअर काही निर्माण करतो, व्यापारी माल विकतो, डॉक्टर रोगमुक्ती देतो किंवा एखादा CA आर्थिक नियमितता ठेवतो, तसेच सैन्य सुद्धा त्यांचे काम करते. कुठल्याही कारणाने सैन्य मोठे, विशेष आणि जगावेगळे होत नाही. युद्धकाळात जसे सैन्याचे महत्व वाढते, तसे रोगांच्या साथीच्या काळात डॉक्टरचेही वाढतेच की. आणि मरणाचेच घ्याल तर कर्जाच्या त्रासाने शेतकरी फास लावून मारतात, खाणीत मजूर मरतातच, गटारीत गुदमरून सफाई कामगार मरतात, बँकेत रात्रंदिवस काम करून कर्मचारी मरतात. थोडक्यात जीवाचा धोका इथे साऱ्या कामांमध्ये आहे. फक्त एवढेच की कुणी शेतकरी फास लावून मेला किंवा कुणी सफाई कामगार गटारीत गुदमरून मेला तर त्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत नाहीत जसे जवानांचे होतात. आणि हे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शेतकरी, सफाई कामगार यांच्या वाट्याला येणार पण नाहीत कारण त्याला कारणीभूत इथली राजकीय व्यवस्था असते, मग कशाला कुठला राजकारणी तिथे पुष्पचक्र घेऊन जाईल??

प्रामाणिकपणे आपले काम करून आजीविका कमावणारा शेतकरी असो, सफाई कामगार असो, सैनिक असो, शिक्षक असो, व्यापारी असो, डॉक्टर असो, इंजिनिअर असो की अजून कुठलाही व्यवसायिक, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी असो.... सगळेच देशासाठी राबत असतात, देशभक्त असतात. राष्ट्रवादाचा फुसका बार मोठा भासवून देण्यासाठी फक्त तुम्हाला सैनिक मरायची वाट पाहावी लागते. बाकी कितीही प्रामाणिक देशवासी मेले, कुपोषणाने बालके मेली तरी त्याला कुणीही राष्ट्रवादी ढुंकूनही पाहणार नाही.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १५ नोव्हेंबर २०१६, ०८.०५ )

No comments:

Post a Comment