Thursday, January 5, 2017

जन्मदिनाच्या निमित्ताने -


मी जन्माला आलो त्याच्या आधी कृष्णजन्मासारखी कुठली आकाशवाणी झाली नाही. मी जन्मल्यावर पण माझ्याबद्दल कुणी बुद्धजन्मासारखी भविष्यवाणी केली नाही. ना येशूच्या जन्मच्या कथेतल्या सारखा आकाशातला कुठला तारा पाहून कुणी माझ्या घराचा माग काढत आले. मला बालपणी मारायला कुठले राक्षस, राजाचे सैन्य वगैरे पण आले नाहीत की ज्यांना मारून मी लहानपणीच माझ्या महानतेचा प्रत्यय द्यावा. माझा जन्म, बालपण आणि आजवरचे आयुष्य अगदीच सामान्य गेलेले आहे. थोडक्यात माझा जन्म म्हणजे या विशाल पृथ्वीच्या 4.5 बिलियन वर्षाच्या इतिहासातली एक निःसंशय अदखलपात्र गोष्ट आहे. त्यामुळे मी कित्येक वर्षांपासून वाढदिवस साजरा करतच नव्हतो.

बरं दुसऱ्यांनी माझा मोठा वाढदिवस करायला, किंवा ते फ्लेक्सचे बोर्ड उभारायला ना आपल्या मागे भाऊ, तात्या, अण्णा, अप्पा, भाई वगैरे कार्यकर्त्यांची फौज; ना आपल्याकडून कुणाला टक्केवारी घेऊन कुठले शासकीय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळाले ज्यासाठी कुणी 'कार्यसम्राट', 'मनासारखा राजा, राजासारखं मन' वगैरे लिहावे. बाकी मारहाणीत पण प्राविण्य नाही, त्यामुळे 'एकच फाईट, वातावरण टाईट' वगैरे विरश्रीचे वाक्यही कुणी लावणार नाही माझ्या फोटो सोबत. मी कुठल्या राजकीय पक्षात, संघटनेत, समाजातही मोडत नाही, त्यामुळे 'युवकांचे आशास्थान' वगैरे पण पदव्या गेल्या. गेलाबाजार United Nations मध्ये वगैरे पण पैसे देऊन कधी बोललो नाही, उलट त्यांनी दिलेली नोकरी सोडून आलेलो.... त्यामुळे 'आशास्थान', 'दिगंत कीर्ती' वगैरे पण नाही. आता माझ्यासारख्या असल्या फुटकळ माणसाने मुळात जन्मच कशाला घ्यावा??

तरीही अलीकडे मित्र-मैत्रिणी किंवा स्वाती यापैकी कुणीतरी घरी केक आणते, आपण तो कापायचा आणि नंतर एक छोटंसं जेवण एवढा साधा सोपा प्रकार. आज सहज विचार केला की पुण्यातल्या पुण्यात जितके खुप जवळचे कुटुंबीय-मित्र आहेत त्यांना सगळ्यांना जेवायला नेऊया आणि त्यासाठी छोटीशी यादी काढली तरी त्यात 45-50 लोक झाले, साऱ्यांना एकत्र बोलवायला गेलो तर एखादे हॉटेल बुक करावे लागेल, मोठे नियोजन लागेल आणि न झेपेल इतका खर्च पण. त्यामुळे हा विचार परत फक्त डोक्यातच ठेवून दिला. थोडक्यात मी एक अतिसामान्य माणूस आहे, ज्याच्या जन्मदिवसाला विशेष काही महत्व नाहीये.

आज पहिल्यांदा मित्राच्या सांगण्यावरून FB वॉल लोकांना लिहायला open ठेवली आणि लोकांचे प्रेम आणि शुभेच्छा पाहून भारावून गेलोय. समाजात मोठेपणाने मिरवला जाणारा पैसा, प्रसिद्धी, बाहुबल किंवा पूर्वजांची थोरवी वगैरे एकही गुण नसताना जगभरातील मित्र-मैत्रिणींकडून शुभेच्छांचा आणि वर्षाव होतोय. Phone, FB, Whatsapp च्या notifications नी कामसुद्धा करता येईना झालं. जात-धर्म, व्यवसायिक संबंध, राजकीय विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक 'सामान्य माणूस' म्हणून माझे जगणे लोकांना इतके असामान्य किंवा आवडते वाटावे हा माझ्यासाठी खरंच एकदम नवीन अनुभव आहे. स्वतःला एक चिमटा काढून तपासावे वाटले की हे खरंच आहे का!

आज तसा माझ्या आईचाही वाढदिवस आहे. मी तिच्या 21 व्या वाढदिवसाला तिला मिळालेलं गिफ्ट आहे. मी समाजासाठी गिफ्ट ठरायला अजून खूप मोठा पल्ला मला पार करावा लागेल. संत कबीर म्हणतात -

"कबिरा जब हम पैदा हुये, जग हंसे हम रोये,
ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोये।"

अगदी तसं, एक असं अर्थपूर्ण आयुष्य मला जगायचंय कि मरताना सुद्धा माझ्या चेहऱ्यावर आनंद असावा, कृतकृत्यता असावी; आणि माघारी काही लोकांना तरी माझ्या जाण्याचे वाईट वाटावे. तेवढे अर्थपूर्ण आयुष्य आणि आनंददायी मृत्यू मिळवण्यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा नक्की द्या.

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छाना वैयक्तिक उत्तर द्यायचा प्रयत्न करतोयच. चुकून कुणाला उत्तर देणे राहून गेले असेल तर ही पोस्ट हेच आभारप्रदर्शन मानावे. आणि ब्रॉडबँड नसल्यामुळे जवळपास 600 लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट अजून accept करायच्या राहिल्यात, त्याही लवकरच करेन. त्यांना ताटकळत ठेवल्याबद्दल क्षमस्व.
असेच प्रेम पाठीशी राहू द्या. सर्वांना मनापासून धन्यवाद!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २४ ऑक्टोबर २०१६, १३.५३ )

No comments:

Post a Comment