Saturday, January 21, 2017

द्विपक्षीय भ्रष्टाचार प्रणाली -

सन 2001-02 च्या आसपास AT&T च्या निवडक शहरांतल्या सेल्युलर सेवेनंतर भारतात BSNL ची मोबाईल सर्विस संबंध भारतात सुरु होणार होती. त्यावेळेस भारतभर BSNL चे टॉवर्स उभारूनही सर्विस सुरु व्हायला खूप वेळ घेतला गेला. आणि अगदी त्याच दरम्यान Reliance ने स्वतःची CDMA सेवा सुरू केली होती. 22000 ते 27000 असल्या दरांत लोकांना LG आणि Samsung चे फोन विकले गेले (ज्यांची किंमत 4-5 वर्षांनी 1700 रुपये च्या आसपास आली होती) व नंतर अगदी लाख रुपयांपर्यंतची बिले लोकांना पाठवली गेली. हा सगळा Reliance गोंधळ वर्षभर चालला आणि नंतर जेव्हा BSNL बाजारात उतरले तेव्हा मोबाईल सेवांच्या किमती झपाट्याने कमी झाल्या.

ज्या लोकांनी Reliance चे फोन घेतले होते त्यांनी खूप मोठी रक्कम एकगठ्ठा पाण्यात घातली होती. Economics च्या भाषेत Reliance ने Consumer Surplus पूर्णपणे खाऊन टाकला होता, किंबहुना त्यापेक्षाही जास्त पैसा खाल्ला होता. आणि Reliance ला मार्केटिंग च्या भाषेतला First Mover Advantage द्यायला तत्कालीन दूरसंचार मंत्री जबाबदार होते. सरकारी धोरणांमधून केला जाणारा भ्रष्टाचार हा नवीन पायंडा NDA ने तेव्हा पाडला होता, काँग्रेसच्या लायसन्स राजला WTO नंतरचे समांतर असे हे मॉडेल होते. शुचितेच्या आणि चारित्र्याच्या गप्पा मारणारी भाजप आणि तिचे मंत्री अचानक श्रीमंत कसे झाले याचं कारण या नव्या मॉडेल मध्ये दडलं होतं. पुढं या फुकटच्या पैशाने काही भाजप नेत्यांची मुले राजकारणात यायला नालायक ठरत, Big Boss मध्ये जायच्या लायकीची कशी ठरली हेही आपण पाहिलेच.

आज 15 वर्षांनी परत एकदा तोच प्रकार घडत आहे. BSNL चे 65000 टॉवर्स Reliance ला द्यायची तयारी सरकारी पातळीवर चालू आहे. पुन्हा NDA सत्तेत आहे आणि अंबानींचा व त्यांचा घरोबा फार जुना आहे. यात BSNL ला कसा फायदा मिळाला वगैरे आकडेही लोकांच्या तोंडावर फेकले जातील. पण BSNL सारखी मोठी सरकारी दूरसंचार कंपनी डबघाईला आणण्याच पातक हे काँग्रेस आणि NDA हे दोघांनी मिळून केलेलं आहे. काँग्रेसने तिला वाढू दिले नाही आणि भाजप तिच्या अस्तित्वाच्याच विरोधात. यात नुकसान काँग्रेस किंवा भाजपचं नाहीये, तर आहे सर्वसामान्य लोकांचं. आपण दिलेल्या करांमधून इतकी मोठी दूरसंचार व्यवस्था उभारली जाते, तिला जाणीवपूर्वक डबघाईला आणले जाते आणि नंतर ती विकली जाते, तीसुद्धा फक्त राजकीय हस्तक्षेपांमुळे.
भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे सत्तेत असतात, ते पैसे खातात आणि विरोधात बसलेले शंख करतात. सत्ता पालटली की उलट खेळ परत चालू.

कमळ असो की हात, जनतेच्या विश्वासाशी घात अखंडपणे सुरु आहे.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १७ डिसेंबर २०१६, ०८.५६ )

No comments:

Post a Comment