खेडेगावांमध्ये भल्या सकाळी कधी कधी एक पोलीस दाराचे कवाड वाजवतो. हातात एक डायरी, खिशाला २-३ पेन आणि काखेत दाबून धरलेली पितळी टोकांची लाकडी छडी! झोपडीवजा घरातली लहान मुले वगैरे एकदम चकित होतात. पोलीस एकदम लकबीमध्ये बोलायला सुरुवात करतो -
"खंडूजी पिसाळच घर हेच का? त्यांच्याविरुद्ध चोरी केल्याची फिर्याद दाखल झालीय. त्यांना बेड्या ठोकून अटक करून पोलीस चौकीला न्यायच आहे. चला बाहेर या आणि गाडीत बसा!"
घरातली लहान मुले घाबरून जातात. एखादं थोडं कळतं मूल रडू लागतं. थोडंसं मोठं मूल थोडा धीर करून बोलतं , "आमच्या बापानं काय नाय चोरलं?".
त्यावर पोलीस तात्काळ बोलतो," असं कसं? लय मोठी चोरी केलीय त्याने! 420 ची केस लागणार त्याच्यावर! तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल मला आता."
मोठं मुल: आसं काय चोरलंय? बाप तर इथंच व्हता रातभर. कुठं गेला पण न्हाय रातीला.
पोलीस: मला शहाणपण शिकवतो का? तुझ्या बापानं काल रात्री सांगलीच्या राजाचा हत्ती चोरून आणलाय आणि लपवून ठेवलाय घरात!
मोठं मुल: हत्ती? आन घरात?? आन त्यो कसा लपवला???
पोलीस: सैपाकघरातल्या फळीवर सगळ्यात बारक्या डब्यात तुझ्या बापानं हत्ती लपवून ठेवलाय!
पोरगं तडक स्वयंपाकघरात पळत जातं. चुलीसमोर बसलेल्या आईला सांगत कि बाहेर कुणी पोलीस असलं काहीसं खुळ्यावाणी बडबडतोय. चुलीच्या धुरात डोळे दुखत असतानाही ती आई खळखळून हसते आणि पोराला म्हणते," चिपट भरून गहू देऊन टाक त्या रायरंदाला!" आणि आई हसत कामाला लागते.
खेडेगावांमध्ये रायरंद (बहुरूपी) हे लोकांचे, विशेषत: मुलांचे व बायकांचे खूप मनोरंजन करतात. बोलण्यात फार पटाईत आणि हजरजबाबी असतात. वेगवेगळी सोंग घेऊन येतात, वाटेल ते मोठे मोठे थापा ठोकतात; पण काहीच करत नाहीत, कुणाला त्रास देत नाहीत, कसलीही हानी करत नाहीत. फक्त खळखळून हसवून जातात.
सध्या आपल्या देशात असाच एक रायरंद दिल्लीत राहतो. दर काही दिवसांनी एक सोंग आणतो. कधी स्वच्छ भारत, कधी Digital India, कधी Skill India, कधी Make in India, कधी Start up India, कधी योगा दिन, कधी Smart City, कधी Bullet Train तर कधी महापुरुषांचे पुतळे. दिल्लीतला रायरंद सुदधा मस्त अभिनय करतो.. जपानमध्ये हसून तर भारतात रडून दाखवतो. मनोरंजनात कौटुंबिक टच असावा म्हणून कधी आईला वगैरे पण बळजबरी सामील करतो. दिल्लीचा रायरंद कपडे सुद्धा दिवसातून 5 वेळा बदलतो. आणि बोलायचं म्हणाल तर अख्ख्या भारतात या रायरंदाला कुणीही बोलण्यात हरवू शकत नाही.
दुर्दैवाने खेड्यातील आणि दिल्लीच्या रायरंदात फक्त एकच फरक आहे तो हा की दिल्लीतला रायरंद फक्त स्वतःच्या विखारी आनंदासाठी लोकांच्या पैशावर, चरितार्थावर, आयुष्यावर बेमुर्वतपणे नांगर फिरवतो. खेड्याच्या रायरंदाला मुलं हसली की आनंद मिळतो आणि दिल्लीच्या रायरंदाला हजारो माणसे मेली की कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आल्यावर व्हावे तेवढे दुःख होते.
- डॉ. विनय काटे
No comments:
Post a Comment