वास्तविक पाहता जगामध्ये एखाद्या मुद्द्यावर परस्परविरोधी मताच्या विचारधारा आणि त्यांना बाळगणारे लोक हे नेहमी असतात, आणि ते असायलाच हवेत. कारण प्रत्येक गोष्ट किंवा घटना ही प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवाच्या, संवेदनांच्या, संस्कारांच्या आणि एकंदर आयुष्यातील घटनांच्या संदर्भाने पाहते आणि त्यानुसार त्यावर प्रतिक्रिया देते. त्यामुळे एकाच गोष्टीबाबत प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन, मत आणि प्रतिक्रिया खूप वेगवेगळे असतात आणि त्यात गैर काहीही नाहीये.
प्राचीन काळापासून भारतात वैचारिक वादविवादाची एक मोठी परंपरा राहिली आहे. चार्वाकांनी देव नाकारले, बुद्ध-महावीरांनी वैदिक धर्म नाकारला पण त्यांना कुणीही धर्ममार्तंड जीव मारायच्या भानगडीत पडले नाही. धर्ममार्तंड पश्चिमेतही होते, पण ते हिंसक होते, त्यांनी येशूला सुळावर चढवले, गॅलिलिओला त्रास केला. ईस्लामच्या इतिहासात पण रक्तपात होताच. भारत हा त्यामानाने त्याकाळी एक वैचारिक देश होता, जिथे बौद्धिक वादाची परंपरा होती. अगदी 10 वर्ष आधीपर्यंत भारतात ही स्थिती टिकून होती.
या बौद्धिक वादविवादाच्या परंपरेला सुरुंग लागला तो सोशल मीडियाच्या आगमनाने. सोशल मीडिया हे तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर माध्यम आहे. सर्वांना एकसमान अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या सोशल मीडियाने दिले. दोन व्यक्तींमधल्या, विचारधारांमधल्या वादविवादाला याने मोठा श्रोता वर्गही मिळवून दिला. पण, या मोठ्या श्रोता वर्गाला अजून एक ताकत सोशल मीडियाने दिली ती म्हणजे स्वतःचे सांख्यिक उपद्रवमूल्य दाखवायची, ट्रोल करायची. कुठल्याही वैचारिक मुद्द्यावर काहीही अभ्यासपूर्ण मत नसताना फालतू शब्दांच्या पिंका टाकायला, हशे उडवायला, झुंडीने एखाद्यावर तुटून पडायला आणि मुळ मुद्दा भरकटवून वैचारिक वादविवादाला मूठमाती देण्याचे काम या ट्रोल लोकांनी केले.
ट्रोल लोकांची ताकत आजकाल सर्वच नेत्यांना, विचारधारांना इतकी हवीहवीशी वाटण्याचे कारण म्हणजे स्वतःच्या विरोधातला प्रत्येक आवाज, विचार तिथे संख्येने दाबता येतो, क्षीण करता येतो. पंडित शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर हुसेन जर जुगलबंदी करत असतील, छानसे श्रवणीय संगीत ऐकायला मिळत असेल आणि त्यात जर कुणी मधेच येऊन ताल सोडून ढोल बडवायला सुरुवात केली तर जो बेरंग होईल, अगदी तोच बेरंग हे ट्रोल सोशल मीडिया मध्ये करतात. मूळ मुद्दा सोडून अचकट विचकट कॉमेन्ट, वैयक्तिक दूषणे, शिव्या, लेबले, नवनवीन हिणकस संबोधने इत्यादी उपद्रव ट्रोल लोक मनापासून करत असतात, त्यांच्या विचारधारेच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला.
ट्रोल च्या संस्कृतीसंवर्धनात आज भारतात कुणीही कमी नाहीये, मग ते समस्त पक्ष असोत, समस्त राजकीय संघटना असोत, धार्मिक लोक असोत, निधर्मी असोत, नास्तिक असोत, जातीचे समूह असोत आणि अगदीच खोलात गेले तर अगदी व्यावसायिक गट सुद्धा असोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा इतका उपद्रवपूर्वक वापर आणि वैचारिक वादविवादाची इतकी मोठी गळचेपी क्वचितच आपल्या देशाने कधी पाहिली होती. मुद्द्यात किंवा विचारात किती खोली आहे हे पाहण्यापेक्षा त्याला like किती आहेत, retweet किती आहेत आणि trending किती आहे, हे पाहण्यातच आपली पिढी वाया जात आहे.
नवीन विचार दाबण्यासाठी, विरोधी विचार क्षीण करण्यातच आपण धन्यता मानू लागलो आहोत. लोकांना आपण रेडिमेड लेबले चिकटवून, हिणकस संबोधने वापरून, stereotype करून त्यांच्या बोलण्याला कसा अर्थ नाही हे सांगायचे, हा एक अत्यंत चुकीचा पायंडा सोशल मीडियामुळे आलेला आहे. उथळ, उठवळ लिहून सुद्धा इथे सेलिब्रिटी होता येत, फक्त मित्रयादीत 5-10 हजार मित्र गोळा करायचे, ज्यात 1000 भर ट्रोल मिळतातच. आपण लिहिलेल्या कुठल्याही वाक्याला ही ट्रोल आर्मी like करते, आणि आपल्या विरोधाला कुणी लिहिलं की त्याच्यावर तुटून पडते. सोशल मीडिया हा त्याच्या अंगभूत रचनेमुळे आणि त्यात असणाऱ्या प्रत्येक Tom, Dick & Harry ला असणाऱ्या अमर्याद अभिव्यक्तीच्या उपद्रवमूल्यामुळे एक समृद्ध अडगळ बनत चालला आहे.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ५ नोव्हेंबर २०१६, २३.११ )
No comments:
Post a Comment