Saturday, January 21, 2017

अजि 'सोनियाचा' दिनू -

सोनिया गांधींबद्दल जितका पराकोटीचा द्वेष भारतातल्या राजनेत्यांनी, पत्रकारांनी केला असेल तेवढा क्वचितच कुणाच्या वाटेला आला असेल. पं. नेहरूंच्या नातवाने, आई इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना एखाद्या परदेशी आणि तेही कुठल्याही राजघराण्यात न जन्मलेल्या मुलीशी लग्न करणे हे बहुतांश लोकांना खटकणारे होते, कारण या लग्नात कुठलेच राजकीय समीकरण नव्हते उलट भविष्यकालीन धोका होता. पण इंदिरा गांधींनी असले काहीही विरोध मनावर न घेता त्यांना सून म्हणून स्विकारले. सोनिया आणि राजीव यांच्या लग्नाआधी काही महिने सोनिया पं. हरिवंशराय बच्चन यांच्या कुटुंबासोबत राहिल्या भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था समजून घ्यायला. एखाद्या परदेशी मुलीने सासरच्या घराबद्दल एवढी जाण बाळगणे निश्चितच विचार करण्याजोगे आहे.

राजीव गांधींवर जेव्हा बोफोर्सचे किटाळ लावले गेले (किटाळच ते, काहीही सिद्ध झाले नाही त्यात) तेव्हा सोनियांच्या इटालियन असण्याचा आणि बोफोर्सच्या तोफा इटालियन असण्याचा बादरायण संबंध जोडत सोनियांनाही राजकीय परिघात बदनाम केले गेले. या आरोपांत नंतर काही तथ्य आढळले नाही, पण जेव्हा कारगीलचे युद्ध झाले तेव्हा याच बोफोर्स तोफांनी बाजी पालटली आणि आधीचे आरोपकर्ते या तोफांचे गुणगान गाऊ लागले.

जन्माने परदेशी असूनही सोनियांनी भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था यांना पूर्णपणे स्विकारत नेहमी एक आदर्श स्नुषा, पत्नी आणि माता म्हणून वर्तन ठेवले. म्हणूनच इंदिराजींनी सुद्धा सतत त्यांना आपल्या जवळ ठेवले. इंदिरा गांधींचा जेव्हा खून झाला तेव्हा सर्वात आधी धावत जाऊन त्यांना मदत करणारी सून सोनिया होती. राजीव गांधींच्या हत्येनंतर तर बऱ्याच लोकांनी कयास केले की सोनिया गांधी आता इटलीला निघून जातील, पण त्या भारताला कधीच आपलं घर मानून राहिलेल्या होत्या.

जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर राहिलेल्या, स्वतःची सासू आणि नवरा यांचे सांडलेले रक्त डोळ्यांनी पाहूनही जेव्हा काँग्रेसची अवस्था विदारक होती, तेव्हा त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेही पक्ष विरोधी बाकांवर बसला असताना. हिंदी बोलायला यायचं नाही, तरीही त्या बोलायचा प्रयत्न करायच्या. त्यांच्या भाषणावर हिणकस टिकासुद्धा करण्यात आली. एक शिवराळ नेते म्हणाले होते "ही बाई स्वतःचे आडनाव घेताना सुद्धा शिवी दिल्यासारखा उच्चार करते". तोगडिया सारख्या कट्टरवादी लोकांनी तर "इटालियन बीच" म्हणण्यापर्यंत मजल मारली. पवारांनी त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा काढत काँग्रेस सोडली आणि त्यांना टीकेचे लक्ष्य केले. पण सोनियांनी हे सगळं कानामागे टाकलं आणि दरदिवशी त्या स्वतःला एक चांगल्या राजकारणी बनवत गेल्या.

2004 साली जेव्हा काँग्रेस अगदी अनपेक्षितपणे लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा स्वतःला पंतप्रधान व्हायची संधी त्यांनी नाकारली आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या शालीन व विद्वान माणसाला ते पद दिले. याबद्दलही लोकांचे आक्षेप होतेच की त्यांनी रबरस्टॅम्प पंतप्रधान नेमलाय वगैरे, पण 2004 ते 2014 या काळात भारताचा GDP ज्या वेगाने वाढला ते डॉ.सिंग हे किती मोकळेपणाने आपले काम करत होते याचे द्योतक आहे. एकदा RTI च्या कायद्यात मनमोहन सिंग यांनी एक बदल करायचा ठरवले, तेव्हा सोनिया गांधींनी स्वतः त्या बदलाला लोकविरोधी ठरवून उघड विरोध केला. विरोधी पक्ष असोत की अगदी स्वतःची सरकारे, सोनियांनी राजकीय विरोध करताना भाषेतील शालीनता जपली. आकांडतांडव न करताही सौम्य, सभ्य भाषेत स्वतःचे मुद्दे मांडता येतात हे त्यांनी नेहमीच दाखवून दिलंय.

इंदिरा गांधींबद्दल खूप पुस्तके लिहिली गेली, पण सोनियांबद्दल अभावानेच लिहिले जाते, कारण त्यांना स्वतःचे महिमामंडन कधी आवडले नाही हे त्यांच्या वागण्यातून दिसतेच. मीडिया पासून एक अंतर त्यांनी नेहमी राखून ठेवलंय. साहजिकच त्यांनी कुणाचे अपशब्द मनावर घेतली नाहीत की कुणाची स्तुती. गेली 2-3 वर्षे त्या प्रकृतीच्या कारणाने राजकारणात जास्त सक्रिय भासत नाहीत आणि त्याचे परिणाम काँग्रेसच्या अजून एका मोठया पडझडीत स्पष्ट दिसतायत. आज त्यांच्या वाढदिवशी अपेक्षा करू की त्या परत एकदा ह्या देशातील विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करतील. आज देशाला खरंच एका चांगल्या विरोधी पक्षाची आणि सोनियांसारख्या करारी व धोरणी नेतृत्वाची गरज आहे!

- डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( ०९ डिसेंबर २०१६, १७.४६ )

No comments:

Post a Comment