Thursday, January 5, 2017

माझी नास्तिकता

सकाळी आस्तिक लोकांना सरळ मूर्ख म्हणालो पण बिचारे जास्त कावले नाहीत माझ्यावर. कदाचित हे ऐकून घ्यायची सवय झाली असावी त्यांना. नास्तिकांना पण त्यांच्या सोबत जोडल्याने त्यांचा पोटशूळ मात्र जाम उठला. "कोण कुठला विनय काटे चक्क डॉकिन्स आणि सत्यनारायणाचं पुस्तक एका ओळीत आणून मांडून ठेवतो? काय हा प्रमाद!!" पासून ते काही महान लोकांच्या शब्दांत "ह्यांना आम्ही वरचढ आहोत हे पटत नाही. हे आस्तिक लोक याची ## चाटतात म्हणून हा त्यांच्यापासून वेगळा होऊ शकत नाही!" अशी स्तुतीसुमने माझ्यावर उधळली गेली.

आस्तिक किंवा नास्तिक असणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी स्वतः आयुष्याची पहिली 14 वर्षे संस्कारांमुळे आस्तिक होतो, नंतरची 7 वर्षे विचारमंथनात होतो आणि त्यानंतर गेली 12 वर्षे नास्तिक झालोय. मला कुणी आस्तिक आहे म्हणून त्याच्याबद्दल मनात तेढ नाही, किंवा नास्तिक आहे म्हणून प्रेम नाही. आस्तिकता/नास्तिकता हि अंतर्वस्त्रासारखी असते आणि असावी. "मी आत चड्डी घातलीय" असे कोणी डांगोरा पिटून सांगत नाही आणि "मी आत चड्डी घातली नाही" म्हणूनही कुणी दवंडी देत नाही, कारण ही गोष्ट खाजगी असते.

रस्त्यावर, सभागृहात आणि सार्वजनिक ठिकाणी आपले देव/धर्म आणून त्यांचे उत्सव करणारे आस्तिक आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या समविचारी विचारवंतांचा उदो करणारे नास्तिक हे एकाच पठडीतले असतात. दोन्ही प्रकारचे लोक एकतर भित्रे असतात, एकटे असतात किंवा त्यांचा स्वतःच्या विचारांवर विश्वास नसतो म्हणून मग थोडीशी गर्दी झाली की त्यांचा अहं गोंजारला जातो. क्वचित वेळेला दुसऱ्या प्रकारचे लोक कसे मूर्ख आहेत हे दाखवणे हा सुद्धा कार्यक्रम असतो. या सगळ्या आस्तिक उत्सवांच्या आणि नास्तिक मेळाव्यांच्या मुळाशी एक गर्दीचे मानसशास्त्र असते. आणि गर्दी कुणाचीही असो, तिला अक्कल नसते. नास्तिक होणे असे काय अवघड आहे की त्यासाठी गर्दीची गरज भासावी? एकटेपणाची, समाजापासून दूर जातोय याची भीती का यावी नास्तिकाला? मी कुठल्याही मित्राच्या घरी कुठल्याही घरगुती उत्सवात जाऊन पोटभर जेवून-खाऊन येतो, मला त्यांचे देव भीती घालत नाहीत की मी त्यांच्या देवांना भीक घालत नाही.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर आपण दिलसे जगणारा माणूस आहे. छोटासा असलो तरी स्वत:चे विचार करून जगतो, मग भले ते जगाला पटो अथवा न पटो. मला कसल्याही गर्दीची गरज नाही आणि भीतीसुद्धा नाही. मला कसल्याही लेबलची आणि कुणाच्या शाबासकीची गरज नाही की कुठल्याही जमावाने स्वीकारण्याची इच्छा नाही. माझ्या नास्तिक होण्याला बुद्ध, मार्क्स, आंबेडकर, सावरकर, कुरुंदकर, डॉकिन्स, दलवाई किंवा दाभोळकर यांचा कसलाही हातभार नाहीये. जितके विज्ञान शिकत गेलो, प्रश्न विचारत गेलो, स्वतःची आणि लोकांची गृहीतके/संस्कार सतत तपासत गेलो तितका विचारांनी नास्तिक झालो. आणि हे सर्व करायला कुणाच्या विशेष मार्गदर्शनाची, पाठबळाची गरज नाहीये. त्यामुळे मी कुठल्याही विद्वानाची तळी उचलायला जात नाही आणि कुणा विचारवंताच्या विरोधात कुणी काही लिहिलं तरी मला कसलाही त्रास होत नाही.

माझी नास्तिकता माझ्या विचारांतून उगम पावते आणि माझ्यापाशीच थांबते. कुठल्याही संप्रदायात, विचारप्रवाहात मला वाहून जायचेच नाहीये, कारण जर तेच करायचे असते तर मग आधी आयुष्याची पहिली 14 वर्षे काय वेगळी होती? माझ्या नास्तिक असण्याची ना मला लाज आहे, ना माज आहे. एका फुटकळ गोष्टीबद्दल माझ्या नसणाऱ्या विश्वासाने जगात काय घंटा फरक पडणार आहे? त्यामुळे मला कुणालाही काहीही शहाणपण शिकवायचे नाहीये. खा, प्या, आनंदात रहा, आपले काम करा. तुमच्या देव/धर्म मानण्या किंवा न मानण्याने मानवतेवर कसलाही उपकार होत नाहीये. तेव्हा चालू द्या तुमचं!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ९ ऑक्टोबर २०१६, १७.४२ )

No comments:

Post a Comment